सहजस्थिती

सहजावस्था ही सिद्ध महापुरुषाची सर्वोच्च अवस्था होय. या अवस्थेमध्ये जीवाचा कर्म करणे किंवा न करणे यामागे कोणताही स्वार्थ नसतो. तसेच कर्म फळाविषयी सुख हवे, दुःख नको या भावना त्याच्या अंतकरणात उमटत नाहीत. त्यामुळे अनुकूल व प्रतिकूल घटनांमध्ये त्याची चित्तवृत्ती स्थिर असते. यालाच वेदांतात ‘सहजस्थिती’ म्हणतात. या अवस्थेचे वर्णन करतांना आपल्या ‘आगमसार’ या ग्रंथात प.पू. हंसराजस्वामी म्हणतात,

“जैसे प्रारब्धे देह व्यापारे । तैसे वर्तेना का बा रे ।

होय नव्हे करणे सरे । हे सहजस्थिती ।।”

दासबोधातील नवव्या दशकातही सहजस्थितीचे लक्षण स्पष्ट केलेले आहे. अनेक जन्मांच्या पूर्वसंस्कारामुळे जीवाला दृश्य जग खरे वाटते. ते डोळ्यांनी दिसते, अनुभवता येते. त्या संबंधाने त्याचे दैनंदिन व्यवहार होत असतात. त्यामुळे भ्रमाने जीव त्यात रममाण होतो. प्रारब्धानुसार देहाला, मनाला त्रिविध ताप भोगावे लागतात. यातून सुटण्यासाठी जीव अनेक आधार शोधतो. परंतु कुणीही यातून कायमचे सुटण्याचा मार्ग दाखवू शकत नाही. कुठलीच गोष्ट मनुष्याला शाश्वत, अखंड समाधान देऊ शकत नाही. समाधान हे ‘साधूजनाचेनी योगे’च प्राप्त होत असल्यामुळे आधी संतांची संगत धरली पाहिजे.

“सुन्यत्वातीत शुद्धज्ञान । तेणें जालें समाधान ।

ऐक्यरूपें अभिन्न । सहजस्थिती ।। ६-१०-३९ ।।”

आत्मज्ञानी संतच आपल्याला ‘मीपणा’ तून बाहेर येण्याची कला शिकवतात. त्यासाठी आधी वृत्ती सर्व मायिक पसाऱ्यातून निवृत्त करावी लागते. मग वासनांचा समूळ नाश होतो. ‘राम कर्ता’ म्हणून कर्म केले की, कर्तृत्व; भोक्तृत्व; भ्रांतीतून सुटका होते. ‘खरा मी कोण’ याचे एकदा निश्चयरूप ज्ञान झाले की जीव देहाद्वारे होणाऱ्या सर्व व्यवहाराकडे अलिप्तपणे बघू लागतो. याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

“माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेलें ।

तया पाणिया ऐसें केलें । होआवें गा ।। १२- १२० ।।”

पाण्याचा गुणधर्म सरळ वहाणे हा आहे. परंतु माळी जसे वळण देईल तसे ते निमूटपणे वहाते. त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म करताना भगवंताची इच्छा समजून वागले तर मनात कुठलेच संकल्प-विकल्प निर्माण होत नाहीत. अशी सहजस्थिती प्राप्त झालेला साधक प्रारब्ध असेपर्यंत अखंड आनंदात जीवन व्यतीत करतो. त्याची देहाबद्दलची आसक्ती, जगाबद्दलची ओढ आणि कर्तृत्वाची/कर्तेपणाची भावना पूर्णपणे नाहीशी झालेली असते. स्वतःच्या देह व अंतःकरणाचे व्यवहार बाधित झालेले असतात. बाधित होणे म्हणजे दृश्य जग हे परिवर्तनशील असून येथील एकही गोष्ट टिकाऊ नाही व जे दिसते तो केवळ भास आहे, असा बुद्धीचा पक्का निश्चय होणे.

“बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण ।

ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ।। ज्ञाने. ५-८७  ।।”

असा निश्चय मनात दृढ झाला की, देह, मन व बुद्धीचे सर्व व्यवहार त्रयस्थपणे होतात. जीव सुखदुःखात अडकत नाही. अशी सहजस्थिती लाभलेले ज्वलंत उदाहरण म्हणजे राजा जनक. त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग असा –

एकदा जनकाच्या नगरीला आग लागली आणि त्यांच्या पायाला चटका बसला. तेव्हा ते म्हणाले, “माझा पाय जळतो आहे, परंतु माझ्या आत्म्याला काहीही झालेले नाही. म्हणजे राजा जनकाने ज्ञानाची अंतिम अवस्था प्राप्त केली होती. जे विषय ‘असार’ आहेत म्हणजे मृगजळाप्रमाणे ‘मिथ्या’ आहेत हे कळल्यानंतर त्या विषयांबद्दल कुठल्याच प्रकारची आसक्ती शिल्लक रहात नाही. ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणे ब्रह्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट संपते. सहजस्थिती ही अंतःकरणाची अवस्था आहे. हिचा संबंध अंतरंगाशी आहे. सर्वसामान्य मनुष्याचा व ज्ञानी पुरुषाचा देह वरकरणी जरी सारखा दिसत असला तरी, मुख्यत्वे त्यांच्या मनोभूमिकेत फरक असतो.

“देह भावितां देहचि दिसे । परी अंतर अनारिसें असे ।

तयास शोधितां नसे । जन्ममरण ।। ९-३-२४ ।।”

त्यांच्या ठिकाणी अविद्येचा मागमूसही नसतो. देहधारी असल्यामुळे त्यांच्याही वाट्याला नाना प्रकारच्या यातना, दुःखे व संकटे येतात हे उघडपणे दिसते. परंतु ‘मी ब्रह्म आहे’ या निश्चयापासून ज्ञानी पुरुष कधीही ढळत नसल्यामुळे ते जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकत नाहीत. संत तुकाराम महाराजांनी जातीयतेचे चटके, आर्थिक दिवाळखोरी, आप्तांचे मृत्यू इत्यादी प्रकारचे आत्यंतिक दुःख सहन केले. तरी भोगून-अभोक्ता अशीच त्यांच्या अंतःकरणाची स्थिती होती. परमात्म्याच्या स्वरूपासंबंधीची किंवा भगवत्प्राप्तीची अनावर ओढ हळूहळू त्यांना ऐहिक जगाच्या आसक्तीपासून दूर घेऊन गेली. त्यामुळे संसार करीत असूनही ते त्यापासून अलिप्तच राहिले. सहजस्थिती व अलिप्तपण ही नित्यमुक्ताची लक्षणे त्यांच्या अंगी पुरेपूर भरलेली होती. अशाप्रकारे जीवन मुक्त हा भजनात तल्लीन झालेला असो की भोगात रमलेला दिसो, तो अंतर्बाह्य मोकळाच असतो. याविषयी एकनाथ महाराज म्हणतात,

“अथवा तो इंद्रियसंगती । दैवे अनेक विषयप्राप्ती ।

भोगीताही अहोराती । ब्रह्मस्थिती भंगेना ।। ए.भा. २८-३२९ ।।”

अशा पुरुषाला विषयांचे ध्यान नसते. त्यामुळे त्याला त्यांचा संग नसतो. संग नसल्याने काहीतरी मिळावे अशी इच्छा नसते. तरी प्रारब्धामुळे त्याला भोग भोगावेच लागतात. परंतु आत्मज्ञानी पुरुष नित्यतृप्त व सुखरूप असल्याने त्याला भोगातून सुख मिळण्याची अपेक्षा नसते. प्रतिकूल भोगातून दुःख वाट्याला येईल अशी भीतीही नसते. भोग कमी किंवा जास्त मिळाले तरी त्याबद्दल खंत नसते.

स्वामी विवेकानंदांना परदेशात कधी उपाशी पोटी रहावे लागले तर कधी राजे, महाराजांकडे स्वादिष्ट रुचकर पक्वान्नेही खायला मिळाली, कधी पायपीट करावी लागली तर कधी बोटीचा प्रवासही झाला. परंतु याही परिस्थितीत त्यांची मन:शांती भंग पावली नाही. सहज स्थिती ही अशी अवस्था आहे, की त्यात नाशिवंत पदार्थांचे वृत्तीने जरी ज्ञान होत असले तरी पदार्थ व वृत्ती बाधित होऊन वस्तूतंत्र आत्मा अनुभव रूपाने रहातो. अंतकरणासह दृश्य जग भ्रामक, नश्वर आहे या दृढ, स्थिर व प्रत्यक्ष निश्चयामुळे कुठलेही कार्य करीत असताना किंवा कुठल्याही कार्यामुळे सहज स्थिती बदलत नाही. या स्थितीत राहून संतांनी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता, 

“ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ।।”

या भूमिकेतून जगदुद्धाराचे महान कार्य केले. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

बुद्धी दे रघुनायका

समर्थांच्या करुणाष्टकातील या करुणाष्टकात “बुद्धी दे रघुनायका” हा चरण २० वेळा आला आहे व यावरून बुद्धी शब्दाच्या अंतरंगात शिरण्याचा मी प्रयत्न केला. समर्थ घर सोडून टाकळीला लहान वयात आले. त्या काळात लग्न, संसार, व्यवसाय ही चाकोरी सोडून जनप्रवाहाच्या विरुद्ध दिशेला त्यांचा प्रवास होता. लोक निंदा करत, हसत त्यांच्या संसार व्यथा सांगत, त्यांचे दारिद्र्य पाहून समर्थांना वाईट वाटत असे. स्वत: वैयक्तिकदृष्ट्या समर्थांना युक्ती, बुद्धी, विद्या नाही, नेटके लिहिता, वाचता येत नाही, उदास वाटते. मन व चित्त एकाग्र होत नाही याबद्दल दु:ख होत होते. स्वतःची व्यथा एका रामाशिवाय कोणाला सांगावी ? त्यामुळे, “मी काया, वाचा व मनाने तुझा झालो आहे. तू अनेक देवांना आपत्तीतून सोडवलेस, मला ही सोडवशील; तू दयाळू; कीर्तिमान आहेस; मी तूझाच आहे या बद्दल संशय वाटत आहे का ?” असा समर्थांनी आत्मारामाशी संबंध साधला व ‘बुद्धी दे’ असा प्रेमळ आग्रह केला.

अंत:करण पंचकात अंत:करण जेव्हा संकल्प विकल्प करते त्याला मन म्हणतात. संकल्प पक्का झाला की निश्चय होतो ती बुद्धी, निश्चयाचे चिंतनात रूपांतर होते ते चित्त, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ‘मी करेन’ हा अहंकार ठरवतो. दासबोध किंवा आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास सुरू करण्याअगोदर अनेक विकल्प येतात. त्यात मैत्रिणी, नातेवाईक भर टाकतात. इतक्या वर्षानी लिहिणे जमेल का ? सातत्य राहील का ? एक नाही अनेक विकल्प येतात. ‘बरा निश्चयो शाश्वताचा करावा’ असा निश्चय असेल तर ‘ऐकावे जनाचे’ या न्यायाने आपण स्वत:च निश्चय करतो. विकल्प जातात मन संकल्प करते, बुद्धी निश्चय करते, चित्त चिंतन करते व आपला अहंकार ‘मी करेन’ असा आतून निर्णय देतो. बुद्धीने निश्चय नाही केला तर मन बुद्धीला कुठेही फरफटत नेते व आयुष्य वाया जाते पदरी काहीच पडत नाही. 

भगवत्गीतेत ‘सांख्य बुद्धी’ चा विचार आहे. सांख्य म्हणजे ‘ब्रह्म’. ते जाणणारी बुद्धी म्हणजे ‘सांख्य बुद्धी’ सत् म्हणजेही ब्रह्म, ते जाणणारी बुद्धी म्हणजे सद्बुद्धी. ती दुर्लभ असते. व्यवसायात्मिका बुद्धी ‘ईश्वर निष्ठच’ असते. तिला ईश्वरावाचून दुसरे आधिष्ठानच नसते. सत्वगुणी बुद्धीने आत्म्याचे शुद्ध स्वरूप जाणता येते. ज्ञानेश्वरी २-२७३ मध्ये ज्ञानदेव मन व बुद्धीच्या ऐक्याचा विचार मांडतात. या ऐक्याने निष्काम कर्म होते. त्यातील अहंकार ‘मी केले’ न म्हणता ‘राम कर्ता’ या भावनेत कर्म करतो. निश्चयात्मक बुद्धी, मी म्हणजे देह; देहसुख हे खरे सुख; मी कर्ता; मी भोक्ता; जग सत्य आहे; हे भ्रम नष्ट करते आणि साधकाला मी म्हणजे आत्मा, आत्मसुख हे खरे सुख, राम कर्ता, राम भोक्ता, जग नष्ट होणारे व अनित्य आहे अशा निश्चयाचा विचार करायला शिकवते. बुद्धीचे भ्रम नाहीसे करून अहंकाराचा लय करण्याची कला आत्मसात करण्याच्या प्रयत्नांनाच साधना म्हणतात. शुद्ध मन व शुद्ध बुद्धी अंगी बाणली की सोsहं साधना सोपी होते आणि जागेपणीच मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचा लय होतो.

दासबोधात द.१ स. १ मध्ये १५ बुद्धी निश्चय करते. निश्चय म्हणजे ‘संशयरहित ज्ञान’. १५ विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धी कार्यरत रहाते. त्यासाठी आपण ‘बरा निश्चयो शाश्वतचा करावा’ हे समर्थ वचन लक्षात ठेवावे लागते. १५ विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी मायोद्भव उपासना, पंचभूतांचे लक्षण अशी ६ लक्षणे मदत करतात. आत्मानात्म विचाराने बुद्धी स्थिर, निश्चळ व शांतपणे विचार करते. समर्थ १५-१०-२९ मध्ये म्हणतात, 

“विचारे निश्चळ झाली बुद्धी । बुद्धीपाशी कार्यसिद्धी ।

पाहातां वडिलांची बुद्धी । निश्चली गेली ।।”

अशी निश्चयात्मक ‘बुद्धी हे देणे भगवंताचे’ असेही समर्थ म्हणतात. 

बुद्धी जेव्हा अहंकाराचा लय करून कर्म करण्याचा निश्चय करते तेव्हा फलाशारहित निष्काम कर्म होते. निष्काम कर्मामुळे कर्माचे कष्ट वाटत नाहीत व चांगलेच कर्म होते. सर्वांच्या हृदयात अंतरात्मा आहे या भावनेत कर्म केले तर ते समत्वबुद्धीने होते व अशा समत्व बुद्धियोगाने सर्वत्र ईश्वरी सत्ता अनुभवता येते. भगवत्गीतेच्या दुसर्‍या अध्यायात हा विचार सविस्तरपणे मांडला आहे. आसक्ती, काम, क्रोध, मत्सर, अविवेक, स्मरणनाश व अखेर बुद्धी नाश असे अध:पतन एका आसक्तीमुळे होते. म्हणून साधकाने या बाबत फार सावध असावे. 

समर्थ रामदासांनी लोक संघटन व लोकसंग्रह केला. अज्ञानी लोकांच्या श्रद्धांना त्यांनी कधीच धक्का लावला नाही. स्थानिक देवतांनाही योग्य स्थान उपासनेत दिले. त्यांची खंडोबाची सवाई व आरती प्रसिद्धच आहे. त्यांनी बुद्धीचे वैभव संपादन केले पण नि:स्पृह वृत्तीने अनुभवाचे ब्रह्मज्ञान सामान्यांना दिले. आत्मज्ञान, पाठांतर, देहातील तत्वांचे विवरण याची तर्कसंगत मांडणी करून लोकांच्या मनातील वैचारिक गोंधळ नष्ट केला. त्यासाठी ‘बुद्धी दे रघुनायका’ असे मागणे मागितले. 

दृढ होता अनुसंधान । मन झाले उन्मन ।

पाहो जाता माया नासे । द्वैत गेले अनायासे ।

होता बोधाचा प्रबोध । झाला शब्दाचा नि:शब्द ।

ज्ञान विज्ञान झाले । वृत्ती निवृत्ती पाहिले ।

ध्यान धारणेची बुद्धी । झाली सहज समाधी ।

रामी रामदास वाच्य । पुढे झाले अनिर्वाच्य ।। उन्मत पंचक  ४ ।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

चिंतामणी

चिंतामणीची विशेषता ही की, तो ज्याच्या जवळ असेल तो चिंतामणीच्या सहाय्याने इच्छिलेली प्रत्येक गोष्ट प्राप्त  करू शकतो. श्रीसमर्थांच्या दासबोधातील पाचवा दशक हा मुमुक्षुसाठी जणू चिंतामणीच आहे. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा. पाचव्या दशकाची रचना मुमुक्षुला परिपूर्णता यावी या उद्दे‌शानेच केली आहे. पहिल्या दोन समासात गुरू व सद्‌गुरू यातील फरक सांगितला आहे. जीवनातील विविध शास्त्रांचे, तंत्रांचे, यंत्रांचे ज्ञान देणारे ते गुरु ! मात्र जे भगवंताचे ज्ञान करून देतात ते सद्‌गुरू. सद्गुरूंवाचून परमार्थ साधन नाही. 

सद्‌गुरू वाचून सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ।।

सद्‌गुरूंना शरण जाणे, हाच मुमुक्षुसाठी तरणोपाय आहे. सद्‌गुरू समजण्यासाठी त्यांची लक्षणे सांगतात, 

“मुख्य सद्‌गुरूचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान ।

निश्चयाचें समाधान । स्वरूपस्थिती ।। ५-२-४५ ।।

याहिवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ ।

विशेष आचारें निर्मळ । स्वधर्मविषई ।। ५-२-४६ ।।”

हे गुणविशेष ज्याच्यात आहेत तेच सद्गुरू असे मुमुक्षुने लक्षात घ्यावे व उत्तम शिष्य बनून सद्‌गुरूंच्या आदेशाप्रमाणे आचरण करावे. परमार्थ मार्गात सद्‌गुरू व सत्शिष्य या खरंतर  परस्परावलंबी जोड्या आहेत. जसे जमीन सुपीक असेल आणि पेरलेले बी देखील उत्तम असेल तरच उत्तम पीक येते. तसे गुरू मुखातून अध्यात्म शास्त्रातील विविध संकल्पना नीट समजाउन घेणारा मुमुक्षुच त्यांच्या उपदेशाप्रमाणे उत्तम साधना करील. त्यासाठी मुमुक्षुने नित्य सावध असलेच पाहिजे. त्याने आळसाला जराही थारा देता कामा नये. 

अनंत जन्मांचे सुकृत पाठीशी असेल तर सद्‌गुरू-सत्शिष्याची जोडी जमण्याचा सुयोग जुळून  येतो. सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने सत्शिष्य आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. एकदा का आत्मानुभुती व त्याने मिळणाऱ्या आत्मसुखाची गोडी त्याला लागली की, त्या अवीट सुखापासून दूर होण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवणार नाही. सदगुरूंनी सत्शिष्याला समजाविले आहे,

“ऐक शिष्या येथीचे वर्म । स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म ।। ५-६-४५ ।।

पाहावें आपणासि आपण । या नाव ज्ञान ।। ५-६-१ ।।”

आपल्या मधील जो ‘खरा मी’ आहे ते आपले खरे स्वस्वरूप. तो खरा मी आत्मरूपच आहे, ब्रह्मरूपच आहे. ते स्वरूप कायम टिकणारे आहे. श्रीसमर्थ समजावितात, 

“आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुल्लभ ।

जें आदिअंतीं स्वयंभ । स्वरूपचि स्वयें ।। ५-६-१५ ।।

जेथून हें सर्व ही प्रगटे । आणी सकळ ही जेथें आटे ।

तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ।। ५-६-१६ ।।”

खरा ‘मी’ आत्मस्वरूप आहे. म्हणून स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या चार देहाहून मी वेगळा आहे, हे एकदा कळले की सारा देहाभिमान गळून जातो. हे मनात बिंबविण्यासाठी मुमुक्षुने एकांतात बसावे. श्रवण, मनन व चिंतनाच्या अभ्यासातून हा परम अर्थ दृढ होतो. मग ज्ञानाचा प्रकाश अंतर्यामी फांकतो व अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो. हे आत्मबुद्धीचे ज्ञान मायेच्या पलीकडील असल्याने ते निश्चित व संशयरहित असते. त्याने संपूर्ण समाधान मिळते. एकदा हे समाधान लाभले की, काही भोगायची इच्छा बाकी रहात नाही आणि काही मागायचेही मनात येत नाही. अर्थात आत्मज्ञान झाल्यावर ही साधना चालूच रहायला हवी. अखंड आत्मानुसंधानाचा अभ्यास चालूच राहिला पाहिजे. ज्ञानप्राप्तीचे टप्पे श्रीसमर्थांनी फार छान समजाविले आहेत. मी खरा म्हणजे देहबुद्धी बळकट. देव खरा म्हणजे आत्मबुद्धीचा विचार. असा हा प्रवास असतो. हा प्रवास यशस्वी व्हायचा असेल तर तो शिष्य मुमुक्षु तसाच योग्य पहिजे.

“शिष्य पाहिजे साक्षपी विशेष । शिष्य पाहिजे परम दक्ष । ५-३-२२ ।।”

तो अति धीर, अति तत्पर असलाच पाहिजे. श्रीसमर्थांनी बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध हे चार टप्पे सांगितले आहेत. आपण येथे बद्धाचा विचार करत नाही  आहोत. पण या बद्धाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग येतात की, त्याची प्रपंचाची झिंग एकदम नाहीशी होते. संसाराचा हव्यास त्याला नकोसा वाटू लागतो. अन मग त्या मनस्थितीला बद्धाचा मुमुक्षु बनतो. मुमुक्षुत्व येणे म्हणजे  बद्धाच्या जीवनात आलेला टर्निंग पॉइंटच असतो. आतापर्यंत केलेल्या सर्व गोष्टींचा त्याला पश्चाताप वाटू लागतो. अनुताप वाटू लागतो. उपरती निर्माण होते. जी वाल्या कोळ्याला झाली होती. आता काही पुण्य पदरी घ्यावे, सत्संग करावा, संतांना शरण जावे, असे त्याला मनापासून वाटू लागते. मोक्षाची इच्छा मनात बळावते. हीच मुमुक्षु अवस्था. परमार्थात टाकलेले पाऊल पुढेच पडते. भगवंताच्या  दिशेने तुम्ही एक पाऊल टाका, तो दहा पावलं तुमच्यासाठी पुढे चालत येईल असे संतसज्जन सांगतात. एकदा मुमुक्षत्व प्राप्त झाले की, हळूहळू त्याचा प्रवास साधकत्वा कडे होऊ लागतो. या दशकात हा पुढचा प्रवासही श्रीसमर्थ वर्णन करतात, 

“अवगुणाचा करूनि त्याग । जेणें धरिला संतसंग ।

तयासी बोलिजे मग । साधक ऐसा ।। ५-९-२ ।।”

या साधकावस्थेतील साधनेने, हाच साधक पुढे  सिद्ध बनतो. परमार्थ मार्गातील हा अखेरचा टप्पा आहे.

“साधु वस्तु होऊन ठेला । संशय ब्रह्मांडाबाहेरि गेला ।

निश्चये चळेना ऐसा जाला । या नाव सिद्ध ।। ५-१०-१० ।।”

अत्यंत संशयरहित असे निश्चयात्मक आत्मज्ञान होणे, वासना संपूर्णपणे नाहीशा होणे व अत्यंत निर्भय होऊन स्वानंदात जगणे ही सिद्धाची लक्षणे त्याच्यात प्रकर्षाने दिसतात. ह्या दशकात  बद्ध ते सिद्ध हा अध्यात्म प्रवास फार सुलभतेने उलगडत जातो. त्या प्रवासाचे प्रत्ययकारी वर्णन करणारा हा दशक “चिंतामणी” म्हणून वाखाणला जातो. “मुक्तीचे सोहळे” हे प्राप्तव्य प्राप्त करून देणारा म्हणून तो  “चिंतामणी” आहे.

।। जय जय रघवीर समर्थ ।।

ज्ञानाचा दीपोत्सव

दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव. दिव्यांची ज्योत शुभ, कल्याण करणारी, धनसंपदा व आरोग्य देणारी, शत्रुबुद्धीचा नाश करणारी असते. दीपज्योत परब्रह्म स्वरूप असते. म्हणून पापाचा नाश करते. दिवा अज्ञानाचा अंध:कार नष्ट करतो. तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्याची ज्योत मंद प्रकाश देते म्हणून डोळ्यांना सुखकारक असते. एका दिव्याच्या ज्योतीने अनेक दिवे लावता येतात तसेच एक ज्ञानाचा दिवा अनेकांच्या अंत:करणात ज्ञानाचा दिवा प्रज्वलीत करू शकतो. समर्थ म्हणतात,

 

“तैसें ज्ञानें तृप्त व्हावें । तेंचि ज्ञान जनास सांगावें ।

तरतेन बुडों नेदावें । बुडतयासी ।। १२-१०-२ ।।”

 

दीपोत्सव आनंद, उल्हास, प्रकाश व प्रसन्नता देणारा उत्सव असून दिवाळीत धनलक्ष्मी, विष्णुपत्नी महालक्ष्मी, विद्येची देवता सरस्वती यांची पूजा आपण करतो. नरकासुरा सारख्या क्रूर दैत्याचा संहार श्रीकृष्णाने केला. म्हणून नरकचतुर्दशीला श्रीकृष्णाचे स्मरण करतो. लक्ष्मीपूजनाला व्यापारी लक्ष्मीचे पूजन करतात. हिशोबाच्या वह्यांचे पूजन करतात. लक्ष्मी चुकीच्या मार्गाने मिळवली तर दूराचाराकडे खेचते व कष्ट करून मिळवली तर हातून सदाचार होतो. बलिप्रतिपदेला आपण बळीराजाचे आत्मनिवेदन आठवतो. भाऊबीजेला स्त्रीकडे माता किंवा बहिणीच्या नात्याने पाहायला आपली संस्कृती शिकवते. दीपावली शुभ संकल्प करण्याचा दिवस आहे.

 

ज्ञानाचा दिवा साधकाच्या स्थूल देहाची शुद्धी करतो. समर्थांसारखे संत “सहज बोलणें हित उपदेश । करूनि सायास शिकविती” असे असतात.  संत चरित्र श्रवणाने व नाम साधनेने देह शुद्ध होतो. संत तुकाराम म्हणतात “पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ” वाणी वर्तनाशी जोडलेली असावी म्हणजे सत्कर्म होते. ज्ञानाचा दिवा विकार, मोह, अहंता व अज्ञान नष्ट करतो. ज्ञानदेवांनी २१व्या वर्षी समाधी घेतली पण त्यांचे ज्ञान इतके व्यापक झाले की आज अनेक वर्ष त्यांच्या वाङ्मयरूपी ज्ञानाचा दिवा भक्तांना पांडुरंगाच्या चरणावर स्वशक्तीने नेतो.

 

“काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ।” या संत तुकारामांच्या  वचनाप्रमाणे ज्ञानाचा दिवा म्हणजेच नित्य आत्मस्वरुपाचा दिवा भक्तांच्या अंत:करणात आत्मज्ञान प्रज्वलीत करतो. हा दिवा अनित्य, अशाश्वत गोष्टी, काम; क्रोध; लोभ; मोहादी; षड्रिपू नष्ट करतो. अंत:करणात नित्यानित्य विवेक, सारासार विचार जागा होतो. समर्थ या विवेक वैराग्याला स्थिर स्वरूप देतात, अशा स्थिर विचारालाच धारणा म्हणतात. “देव माझा मी देवाचा” ही तुकोबांची धारणा होती. “शोभे सिंहासनी राम माझा” ही समर्थांची धारणा होती. दासबोधासारखा ग्रंथ अज्ञान नष्ट करतो ही निरंतर जागृती आहे.

 

ज्ञानाचा दिवा अंतरंग जागृतीही करतो. शांती, सख्य, वात्सल्य, दास्यत्व, माधुर्य या निष्ठा निर्माण करतो; संशय नष्ट करतो व भगवत प्रेमाचा दीप अंत:करणात सतत तेवत ठेवतो. संतांचे ज्ञान भक्ताला निरंतर सांभाळते. ते आत्मधनाचे दान लक्ष्मीपूजनाला भक्ताला देतात. आपणही आपला वेळ त्यांच्या चरणी अर्पण करावा आणि पुढील वर्षभर “रिकामा जाऊ नेदि एक क्षण” हे समर्थ वचन आठवावे. 

 

या वर्षी कोजागिरीच्या आधीपासूनच आपण ज्ञानाची दिवाळी साजरी केली. आपल्या संसाररूपी भवसागरात समर्थांचा ज्ञान दीपस्तंभ सतत सदाचाराचा मार्ग दाखवतो. हा अंतरीचा ज्ञानदीप भक्तीची प्रेरणा देतो, मिथ्याचा नाश करून सत्याची प्राप्ती करून देतो, अंध:काराचा नाश करून स्वयंप्रकाश देतो, मृत्यू पासून सोडवून आत्मस्वरुपात विलीन होण्याची शक्ति देतो. आनंद हे आपले खरे स्वरूप आहे. आत्मज्ञानाने कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहाणे ही कला आत्मसात करता येते आणि श्रीगुरु सेवा मनोभावाने, निरलसपणे करता येते.

 

शिवशक्ती

वडाचं बीज लहान असता फोडून पाहिलं तर त्यात वृक्ष काही दिसत नाही. पण झाडाचं खोड, फांद्या, पाने, फळे असा प्रचंड विस्तार या बीजातून होतो. “फळ फोडितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे । १७-२-१४ ।।” ८-३-२० आणि २३ या दोन्ही ओव्यांमध्ये किंवा अनेक ठिकाणी मूळ माया तोचि मूळ पुरुष असे श्रीसमर्थ सांगतात. मूळ माया बीजासारखी आहे आणि तिच्यात संपूर्ण विश्वविस्तार आहे. श्रीसमर्थ इथे अद्वैतच सांगतात. आकाशात चंचल वायू निर्माण झाला त्यात शुद्ध जाणीव वास करते. तो जगत्ज्योतिचा मूळ झरा ! अर्थात वायू ही प्रकृती, जगतज्योति पुरुष होय. 

“निर्गुणीं गुणविकारु । तोचि शड्गुणैश्वरु ।

अर्धनारीनटेश्वरु । तयास म्हणिजे ।।१७-२-८ ।।”

प्रकृती पुरुष हे मूळमायेचे नाव. तीच शिवशक्ती, अर्धनारीनटेश्वर, षड् गुणेश्वर. ही नावे मायेचे स्वरूप अधिक स्पष्ट करतात. इथेच द्वैताला सुरुवात होते. तिथेपर्यंत जायचे आहे व नंतर अद्वैत व्हायचे आहे. शिवशक्तीचे एकत्रित रूप म्हणजे शिवलिंग म्हणजेच शंकराची पिंड होय. मुळात भगवान शिव हे चिन्हरहित आहेत, अलिंग आहेत. वायूपासून त्रिगुण झाले, तमोगुणापासून झाली पंचभूते. मूळमायेत असणारी शक्ती अनंत, अपार आहे. त्यातच त्रिगुण साम्यवस्थेत आहेत. हे साम्य डळमळीत झाले की त्रिगुण प्रकटतात. हे त्रिगुण, जाणीव, पंचभूते, मायेच्या अनंत शक्ती होत्या कुठे ? तर सारे काही मूळमायेतच सामावलेले आहे.

गणितात एक संकल्पना आहे venn diagram. त्यात असलेले संच म्हणजे subsets आहेत. तसे परब्रह्म हा super set आणि त्रिगुण, मायेच्या साऱ्या शक्ती त्यातच कर्दम रूपाने असतात त्याला subset म्हणू या. अणूऊर्जेचे उदाहरण घ्या. जेव्हा अणूकेंद्र डळमळीत केले जाते तेव्हा अणू ऊर्जा मिळते आणि तिचे प्रचंड परिणाम पहावयास मिळतात. गुणसाम्य डळमळीत झाले की साऱ्या शक्ती व्यक्त होतात. आपण पाहतो ते सारे शक्तीचे परिणाम 

“आदिशक्ति शिवशक्ति । मुळीं आहे सर्वशक्ति ।

तेथून पुढें नाना वेक्ती । निर्माण जाल्या ।। १७-२-९ ।।”

आपण विजेचे परिणाम पहातो, प्रत्यक्ष वीज ऊर्जा पहात नाही. गुरुत्वाकर्षणाचे परिणाम पाहतो, पण गुरुत्वाकर्षण दिसत नाही. झाडावरील फळ खालीच पडते, कितीही उंच उडी मारली तरी आपण खालीच येतो. निर्माण झाल्यापासून ग्रहगोल विशिष्ट कक्षांमधून फिरतात, एकमेकावर आदळत नाहीत. हा गुरुत्वाकर्षण आणि inter planetary forces चा परिणाम. Inter molecular forces वस्तूला आकार देतात. या साऱ्या शक्ती, जगातील चैतन्य म्हणजेच प्रकृती-पुरुष. मग हे २ आहेत का? भेद निर्माण करतात का ? गुणमाया ते मुळमाया भेदच दाखवले जातात. शिवशक्तीमुळे संसारात स्त्रीपुरूष असा भेद दिसतो. जीवशास्त्रीय दृष्ट्या अवयवात, संप्रेरकात भेद आहे, ते रहाणारच. 

“नाना पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव ।

येकचि परी देहस्वभाव । वेगळाले ।। १७-२-२० ।।”

नवरीला नवरा हवा असतो असा भेद तर दिसतोच. पिंडात दिसणाऱ्या या भेदावरून ब्रह्मांडाच्या बीजाची कल्पना करता येते. पण भगवंताने गाय, माता निर्माण केली त्यावेळी वात्सल्य त्यांच्या ठिकाणी अधिक दिले. “माता वाटून कृपाळू जाला” असे श्रीसमर्थ म्हणतातच. मग वात्सल्य, ममता फक्त स्त्रियातच असते का ? धैर्य, कणखरपणा, धाडस, निश्चयी वृत्ती फक्त पुरुषातच आहे का ? (पुरुषाचे गुण, स्त्रीगुण या साऱ्या मानवी कल्पना) तर तसं नाही. अनेक प्रेमळ, काळजी घेणारेही पुरुष आहेत. घरोघरी स्त्रियांनी स्वयंपाक केला तरी जागतिक कीर्तीचा शेफ म्हणून आज पुरुषाचे नाव पुढे येते. जिजामातेने ममतेने, वात्सल्याने शिवबाला वाढवले. पण राजकारण, न्यायनिवाडा करण्याचे कसबही शिकवले ना ! राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांचे उदाहरण घ्या. अगदी अलीकडची उदाहरणे घ्यायची तर मॅडम कामा, डिटेक्टिव रजनी पंडित, किरण बेदी आणि मीरा बोरवणकर इ. पहा.

आज शास्त्रज्ञ, विमानचालक, लोकोपायलट, कंडक्टर, पोस्टमन कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत. उद्योग व्यवसायात उच्च शिखर गाठणाऱ्याही आहेतच. उदा. इंद्रा नूयी. आज राजकारणातही स्त्रिया मागे नाहीत. उदा. इंदिरा गांधी, सुषमा स्वराज. कुप्रसिद्ध डाकू फुलनदेवी होऊन गेली. कीर्तन, प्रवचन करणाऱ्या, मठपती महिला तर श्रीसमर्थांच्या काळापासून आहेतच. म्हणजेच भेद शरीरात असला तरी गुणात नाही. ईश्वराने सारी माणसे परस्परात गुंतून रहातील असे लोभाचे गुंडाळे केले आहेत. “वासना मुळींची अभेद । देहसमंधें जाला भेद । १७-२-२३ ।।” 

या भेदात श्रीसमर्थांचे सांगणे असे की, 

“पुरुषास स्त्रीचा विश्वास । स्त्रीस पुरुषाचा संतोष ।

परस्परें वासनेस । बांधोन टाकिलें ।। १७-२-२९ ।।”

असे आकर्षण असले तरी सूक्ष्म विवेकाने पहावे असा सावध इशाराच श्रीसमर्थ आपल्याला देत आहेत. पुराणात एक कथा आहे. आदियोगी, आदिगुरु भगवान शिव काही ज्ञान देत होते. सभोवताली ऋषी बसले होते. त्यातील भृगू (काही ठिकाणी भृंगी असे आहे) ऋषींना शिवाला प्रदक्षिणा घालाव्या असे वाटले. परवानगी मागितली. ती शिवशंकरांनी दिली. पार्वती माता भगवान शिवांच्या डाव्या बाजूला बसली होती. भृगुंना तिला प्रदक्षिणा नव्हती घालायची. त्यांनी सूक्ष्म होऊन दोघांच्या मधून मार्ग काढला. शंकरांच्या ते लक्षात आले, त्यांनी पार्वतीमातेला डाव्या मांडीवर घेतले. आता भृगुंनी शिवाच्या खाली असलेल्या पावलाला प्रदक्षिणा केली. तेव्हा भगवान शिवांनी पार्वतीमातेला पूर्ण आपल्यात सामावून अर्धनारीनटेश्वराचे दर्शन भृगुंना घडवले. शिवशक्तीचे अभेदत्वच दाखवले.

भगवंताच्या अवतारातही बघा, श्रीरामांबरोबर सीतामाई, श्रीकृष्ण रखुमाई सोबतच आहेत. शंकरांचा ११वा रुद्र ब्रह्मचारी मारुती, पण त्याच्या शेपटीत शक्ती (पार्वती) शिरली. तिने काय केले ते आपण सुंदरकांडात वाचले आहे. निसर्गातील पूर्ण फुलात स्त्रीकेसर, पुकेसर असतात. मग self कधी एका फुलात दोन्ही नसतात तेव्हा cross pollination ने प्रजा वाढते. सर्वच प्राणी, पक्षी, यातही नर मादी असतातच आणि तेच लैंगिक प्रजा वाढवतात. ब्रह्म निर्गुण, निराकार, निश्चल असले तरी प्रकृतीपुरुष तीच शिवशक्ती, सर्वत्र आहेच. तिच्यामुळे जगरहाटी चालू आहे. संसार/प्रपंचात स्त्री – पुरुष, पति-पत्नी परस्परपूरक गुणाचे; कार्याचे असायला हवेत. तरच संसार नेटका होईल.

जीव ब्रह्म यात अनेक पडदे (जन्म) आहेत. पण सामान्यांना आपल्यातील जीव कळत नाही, विश्वातील शिव कळत नाही. सूक्ष्माचा विचारही आकलन होत नाही. नुसते यंत्र निर्माण करून चालत नाही, त्याला चालवायला शक्तीही हवीच ना ! म्हणूनच भारताचे चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण भागात जिथे उतरले तो पॉईंट, शिवशक्ती म्हणूनच सर्वांनी मान्य केलाच ना !

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

समर्थांचे सामर्थ्य

अत्यंत बालवयामध्ये केवळ प्रभूरामचंद्राच्या दर्शनाची आस हृदयाशी बाळगत एक मुलगा घरदार, संपत्ती, आईवडील, भावंडे यांचा त्याग करतो काय आणि पुढे त्याच्या हातून अतुलनीय कार्य घडते काय!!  आसेतूहिमालय पसरलेल्या शतखंडित भारतवर्षाच्या एकत्रीकरणामध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या श्रीरामाचे दास, हनुमंतस्वरूप श्रीसमर्थ रामदासांचे कार्य सर्वांना ठाऊक आहे. “आधी केले मग सांगितले” अशा पद्धतीने धर्माचरण कसे करावे, हे श्रीसमर्थांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले. 

 

श्रीसमर्थ रामदास हे एक आध्यात्मिक योद्धा असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसते. भारत भ्रमण करताना त्यांची गुरु गोविंदसिंग यांच्याशी भेट झाली व त्यांचे विचार पालटले व त्यांनी धर्मकार्याचा उपयोग प्रतिकाराच्या मार्गाने धर्मरक्षणासाठी करण्याचे सुरु केले. अतिशय गांजलेला समाज स्वतःच्या धर्माचे आचरण करताना घाबरून दीन झाला होता. तेव्हा, समाजाचे संघटन करून त्यांच्यामध्ये स्वत्त्व जागृत करणे गरजेचे होते. गावोगावी हनुमंत मंदिरे स्थापन करून सर्व तरुण वर्गाला व्यायाम, सूर्यनमस्कार यासाठी एकत्र करून त्यांच्यामध्ये शक्तीची उपासना जागवली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या राज्यक्रांतीला समाजक्रांतीची जोड देवून धर्मक्रांती घडविली व त्यासाठी मावळ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम श्रीसमर्थांनी केले. स्त्रियांचे शील रक्षण करण्यासाठी सक्षम फौज बनविली. गावोगाव फिरून हनुमान मंदिरे व मठ स्थापन केले. योग्य नेतृत्वगुण असलेले महंत स्थापन करून लोकजागृतीचे बीज रोवले. 

 

समाज धर्मवेडा होता तेव्हा, रामनवमीचा उत्सव सुरु केला. शस्त्रधारी श्रीरामांप्रमाणे प्रत्येकाने शस्त्र बाळगून प्रतिकार करावा, श्रीरामांचे सर्वगुण अंगीकारावे असे पटवून दिले. अध्यात्मिक मार्गातून लोकसंघटन केले. ‘जय जय रघुवीर समर्थ’ अशी गर्जना करणाऱ्या रामदासांनी घरोघर जावून मनाच्या श्लोकांद्वारे जीवन कसे जगावे याचा बोध केला व सर्वसामान्यांत स्वाभिमान जागवला. विवेक व प्रयत्न हे दोन अनमोल गुण अंगिकारले की मनुष्य प्रगती करतो हे सर्वांना पटवून दिले. श्रीसमर्थांनी मठातील महंतासाठी एक आचारसंहिता तयार केली. जी “दासबोध” ग्रंथात आहे. 

 

जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दासबोधात आहे. त्यातील वीस दशक दोनशे समास पाहिल्यास प्रत्येक मनुष्याने संसार करता करता परमार्थ कसा करावा हे त्यांनी दाखवून दिले. समाजाविषयी अपार तळमळीतून श्रीसमर्थानी विपुल वाङ्मय निर्मिती केली. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्रे, अनेक आरत्या लिहिल्या. गणपतीची सुखकर्ता दुखहर्ता आरती आणि अशा अनेक आरत्यांमधून समाजात धैर्य, आत्मविश्वास वाढविला. श्रीसमर्थांची शिकवण म्हणजे कर्म, उपासना, ज्ञान, विवेक, भक्ती, प्रयत्न व सावधानता यांच्याद्वारे सर्वसामान्य मनुष्याने प्रयत्नपूर्वक व विवेकाने आचरण केल्यास त्याचे योग्य व्यक्तीमत्व तयार होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी श्रीसमर्थांनी खूप प्रयत्न केले. मुसलमानी राजवट व बाबा, फकीर, संन्यासी यांच्यामध्ये जखडलेल्या मनुष्याच्या अंधश्रद्धेचे रूपांतर श्रद्धेत केले. सर्वसामान्य मनुष्य वासना, पैसा, स्त्रीसुख यातच सुख मानत असतो. मनुष्याने संसार करता करता परमार्थ कसा साधावा हे श्रीसमर्थ सांगतात. संसारातील प्रत्येक कर्म हे वासना न ठेवता भगवंतास अर्पण केल्यास परमेश्वर प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त होईल, हे त्यांनी पटवून दिले. 

 

आसक्तीच्या आहारी गेलेल्या मनुष्याला श्रीसमर्थानी मनाच्या श्लोकांमधून मार्गदर्शन केले. “देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी” या ओळीतून समर्थांनी कसे जगावे हे सांगितले. अतिशय दुर्लभ नरदेह प्राप्त करून आपल्या भक्तीने जीवनाचे सार्थक करावे असे श्रीसमर्थ सांगतात. कोदंडधारी रामाप्रमाणे सज्जनाने शब्दरूपी शस्त्र आणि अस्त्राचा वापर विवेकाने करावा. आजच्या काळात जगभर शस्त्रांच्या जोरावर दहशतवाद वाढतो आहे. प्रत्येकाने शस्त्रसज्ज असावे. रामदासांनी शक्तीचा बोध  देऊन स्वाभिमान टिकवण्यासाठी शस्त्र धारण करणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले. मूर्ख माणूस देह म्हणजेच मी असे मानतो. या शरीराचा परमार्थासाठी साधन म्हणून उपयोग केला तर जीवनाचे सार्थक होते, याचे समर्थन केले.

 

श्रीसमर्थानी मन, मेंदू आणि मनगट यांचे जीवनातील महत्त्व ओळखून समाजाला क्रियाशीलतेचा जागृत मंत्र दिला. ते प्रयत्नांना परमेश्वर मानणारे प्रयत्नवादी संत होते. श्रीसमर्थानी चारशे वर्षापूर्वी मृतप्राय समाजाला आपल्या ओजस्वी वाणीतून जागृत केले. जीवनविषयक मूल्ये, परिस्थितीचे आकलन, वर्तन, आत्म-परीक्षण असे असंख्य पैलू श्रीसमर्थ वाङ्मयात दिसतात. सामान्य मनुष्य श्रद्धेच्या, भक्तीच्या द्वारे ईश्वर; आत्मा; आत्माराम सर्व जाणून घेऊ शकतो. माणसाच्या आयुष्यात सद्गुरु महत्त्वाचे असतात. “यत्न तो देव जाणावा” हे ब्रीदवाक्य श्रीसमर्थांनी स्व-आचरणातून समाजास दाखविले. अशा श्रीसमर्थ रामदास स्वामींना माझा दंडवत. 

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

उन्मनी

उन्मनी ही मनाची परिपक्व अवस्था होय.  उन्मनी = उद + मनस. उद म्हणजे उर्ध्वगती, पूर्णत्व, मुक्त होणे, विकास होणे व मनस म्हणजे मन. परमार्थ मार्गामध्ये मन जेव्हा दृश्य जगताचा संग सोडून वृत्तीरहित बनते, तेव्हा त्या अवस्थेला ‘उन्मनी’ म्हणतात. मनाचा उर्ध्वगतीने उन्मनीपर्यंत विकास करणे हेच साधकाचे अंतिम ध्येय असते. या अवस्थेमध्ये मनात कुठलेच संकल्प-विकल्प निर्माण होत नाहीत. ही निर्विकल्प अवस्था आहे. तेथे मन मनपणाने शिल्लक उरत नाही, म्हणून ही अवस्था शब्दाने सांगता येत नाही, त्याची कल्पनाही करता येत नाही आणि कुठल्याच इंद्रियांद्वारे ती जाणलीही जात नाही. मात्र संतांनी अनुभव घेऊन साधकांसाठी त्याचे वर्णन करून ठेवले आहे. या अवस्थेचे वर्णन करताना प.पू. हंसराज स्वामी आपल्या ‘आगमसार’ ग्रंथात म्हणतात, 

“मन सांडून एकीकडे । आपण ओतप्रोत चहूकडे ।

वृत्तीसहित मन बुडे । हेचि उन्मनी ।।”

दासबोधातील ‘जगतज्योती’ या दहाव्या दशकातही उन्मनीचे लक्षण स्पष्ट केले आहे. सामान्यपणे मनुष्य दिवसाच्या २४ तासांमध्ये जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्था अनुभवतो. कसे ते पाहू.

१) जागृती – जागृतावस्थेत जीव आपल्या इंद्रियांच्या द्वारे व्यावहारिक जगाचा अनुभव घेतो. या अवस्थेत मन व इंद्रिये कार्यरत असतात. मनाची स्पष्ट जाणीव असते. इंद्रियाद्वारे विषयांपासून कितीही सुख मिळाले तरी मनाची तृप्ती होत नाही. ते सतत सुखाच्या ओढीने धडपडते. 

“अंतःकरण-इंद्रिये । घेणे पडे जो जो विषय ।

तयासी नांव होय । जागृती ऐसी ।।”

२) स्वप्न – जागृती अवस्थेतील विषय भोग मनाने त्या त्या वेळी भोगून झालेले असतात. परंतु त्याचा सुप्त संस्कार अंतकरणात दडलेला असतो. जसे, कापुराच्या डबीतला कापूर संपला तरी त्या डबीला कापुराचा सुगंध येतो. त्याप्रमाणे स्वप्नात त्या सुप्त संस्कारामुळे प्रत्यक्ष विषय समोर नसले तरी ते खरे वाटतात व त्याच्या सुखदुःखाची जाणीव होते. उदा. स्वप्नात काही भीतीदायक पाहिले की अंगाला घाम फुटतो. परंतू जाग आल्यावर तो भ्रम होता हे कळते.

“इंद्रिय-विषयेंविण । संस्कारे कल्पी मन ।

घडे सुखदुःख भोगेंविण । ते स्वप्नावस्था ।।”

स्वप्नामध्ये सर्व इंद्रिये शांत झालेली असतात. परंतु मन कार्यरत असते.

३) सुषुप्ती – सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. 

“मन जेथे लया जाय । परी सुखाचा प्रत्यय होय ।

अज्ञान नाश न होय । ते सुषुप्ती ।।”

गाढ झोपेत इंद्रिये, मन व बुद्धीसह सर्व वृत्ती अज्ञानात विलीन होतात. त्यामुळे गाढ झोपलेल्या माणसाला बाहेर काय चालले आहे ते कळत नाही. झोपेतून उठल्यावर तात्पुरता सुखाचा अनुभव येतो. पण अज्ञान पूर्णपणे नाहीसे झालेले नसते. उन्मनी आणि सुषुप्ती या दोन्ही अवस्था बाहेरून सारख्याच वाटतात. परंतु उन्मनी अवस्थेमध्ये अंत:करणात शुद्ध जाणीव जागी असते तर सुषुप्तीमध्ये जाणीव अज्ञानात लय पावते. वृत्ती शांत होतात.

जागृती,स्वप्न व सुषुप्ती या तीनही सहजसाध्य अवस्था आहेत. 

४) तुर्या – ही प्रयत्नसाध्य अवस्था आहे. ही साधना करून मिळवावी लागते.

“जाणे ब्रह्म जाणे माया । ते येक जाणावी तुर्या ।

सर्व जाणे म्हणोनिया । सर्वसाक्षिणी ।। ७-५-५ ।।”

या अवस्थेमध्ये साधकाला एकीकडे देहाचे भान असते तर दुसरीकडे ‘मी आत्मा आहे’ हेही ज्ञान असते. म्हणून या अवस्थेला ‘सर्वसाक्षिणी’ म्हणतात. ही अवस्था शुद्ध ज्ञानरूप आणि सच्चिदानंदरूप आहे. या अवस्थेलाच महाकारण देह असेही म्हणतात.

भक्ती मार्गामध्ये ईश्वराशी एकरूप झाल्यावर भक्ताच्या अनुभवास येणारी तुर्यावस्थाच होय. या अवस्थेमध्ये देहासहित सर्व दृश्य विश्वाला साधक वेगळेपणाने पाहू शकतो. तुर्येमध्ये साक्षीत्त्वाची सूक्ष्म वृत्ती शिल्लक असते. ही वृत्ती सुद्धा नाहीशी झाली की उन्मनी अवस्था प्राप्त होते. श्रीसमर्थ या अवस्थेचे वर्णन करताना म्हणतात,

“म्हणोनि सर्वसाक्षी मन । तेंचि जालिया उन्मन ।

मग तुर्यारूप ज्ञान । तें मावळोन गेलें ।। ७-५-११ ।।”

५)उन्मनी – उन्मनीत मनातील विषय, विकार समूळ नाश पावतात. मन पूर्णपणे शांत आणि विचार मुक्त होते. परब्रह्माशी एकरूप होऊन जाते. ही अवस्था साधायची कशी ? यासाठी समर्थांच्या चरित्रातील एक गोष्ट आपण पाहू – 

 

श्रीसमर्थ गडावर असताना एकदा धोंडीबा नावाचा शिष्य त्यांची कीर्ती ऐकून दर्शनासाठी आला व त्याने ‘मला राम दर्शन होईल असे करा’ असे स्वामींना सांगितले. यावर ‘मनाचे काहीही ऐकू नकोस’ असे सोपे, सुलभ साधन स्वामींनी त्यास सांगितले. त्याप्रमाणे वागायचे ठरवून तो निघाला. असे करता करता त्याच्या सर्व वृत्तींची निवृत्ती झाली व त्याला उन्मनी साधली. संत एकनाथ महाराज उन्मनी अवस्थेबद्दल सांगतांना म्हणतात, “मी-तूपणाची झाली बोळवण । हरपले मन झाले उन्मन ।।”  मी-माझे या आसक्तीतून सुटल्यावर मन संगरहित होते. अशा मनाला ध्यानकाळी अनुभवाला येणारी अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था होय. म्हणून संगत्याग व उन्मनी एकच होत. ही अवस्था प्राप्त झाल्यावर सगळीकडे ‘भरला घनदाट हरी दिसे’ अशी अवस्था होते. अशी अवस्था श्रीसमर्थांसह सर्व संतांना प्राप्त झाली होती.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

आल्हाददायक आषाढ

विषय वाचल्यावर काय लिहावे ? असे विचारमंथन चालू होते. हिंदू पंचांगानुसार चौथा महिना पहिले सगळे उत्सव हे शुक्ल पक्षातील आणि दिव्याची आवस म्हणजे दीप पूजन ही कृष्ण पक्षातील आहे. आषाढातील पहिला दिवस कालिदास जयंती. नंतर कांदे नवमी – ४ महिने कांदा लसूण वर्ज्य. नंतर येते देवशयनी एकादशी. अवघ्या महाराष्ट्राची पाऊले पंढरीकडे लावणारी. महाराष्ट्राच्या या पंढरी क्षेत्रात सर्वजण धर्म, जात, पंथ, संप्रदाय हे सारं विसरून एकत्र येतात. येथे खरी एकात्मता व समानता अनुभवाला येते. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ ! या पंढरीच्या राउळात सर्व संत मांदियाळीची भेट होते. काही दिवसांपूर्वी गोव्यात शंखनाद ऐकला होता ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले ते भाग्यवान ! ‘सुखी संसाराची सोडूनिया वाट‘ ! ही वाट संसार सुखाच्या त्यागाने मळलेली आहे. समर्थ रामदासांनीही पंढरीची वाट धरली होती, म्हणून तर समर्थ म्हणाले, 

“आम्ही देखिली पंढरी । सच्चिदानंद पैलतीरी ।।”

असा हा पंढरीत सर्व संतांचा मेळावा भरतो.समर्थांनी संतांचे अचूक वर्णन केले आहे. ते अत्यंत लक्षणीय व बोधप्रद आहे.

“संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ ।

नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ।। १-५-१६ ।।”

समर्थ संतांचे वर्णन असे करतात की, संत आनंदाचे स्थान आहे. संत हे अनेक प्रकारच्या संतोषाचे मूळ आहे. संत केवळ सुखरुप आहेत. संतांचे सान्निध्य हेच विश्रांती स्थान आहे. संतांमुळे निजरूपाचे ज्ञान होते. संत केवळ धर्माचे धर्मक्षेत्र आहेत. असे हे सर्व संत पंढरीत येतात, त्यामुळे पंढरी क्षेत्र ही पुण्यभूमी झाली आहे. हे क्षेत्र समाधानाचे मंदिर बनले आहे. संत संगतीत विवेकाचा खजिना प्राप्त होतो. तेच साधकाला आत्मस्वरूपाचे दान करु शकतात. संत संगतीतच साधकाच्या अंत:करणात परमात्मा प्रकट होतो. समर्थ रामदासांनी एक स्फुट अभंग पण विठ्ठलावर रचला आहे.

“आम्ही देखिला विठोबा । आनंदे विटेवरी उभा ।। १ ।।

तेथे दृश्यांची जे दाटी । तेचि रुक्मिणी गोमटी ।। २ ।।

रामी रामदास म्हणे । जो ओळखे तो चि धन्य ।। ३ ।।”

प्रत्येक देवतेच्या आरत्या समर्थ रामदासांनी रचिल्या आहेत. विठ्ठलावर तीन आरत्या रचलेल्या आहेत. समर्थ रामदासांना विठ्ठल व प्रभूरामचंद्र यांच्यात भेद वाटत नाही. समर्थ म्हणतात,  

“धन्य धन्य पांडुरंग । अखंड कथेचा होतो धिंग ।

तानमानें रागरंग । नाना प्रकारीं ।। १८-१-१३ ।।”

तसेच ‘येथे का रे उभा श्रीरामा’ हा अभंग सर्वश्रुत आहे. पंढरपूरला विठ्ठलाच्या प्रथम दर्शनाचे वेळी रामदासांनी रचलेला हा अभंग.

“येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ।।

चाप बाण काय केलें । कर कटावरी ठेविले ।।

कां बा धरिला अबोला । दिसे वेष पालटला ।।

काय जाली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ।।

शरयूगंगा काय केली । कैची भीमा मेळविली ।।

किल्किलाट वानरांचे । थवे न दिसती तयांचे ।।

दिसे हनुमंत येकला । हा कां सैन्यातून फुटला ।।

काय जाली सीतासति । येथे बहुत जन दिसती ।।

रामदासीं सद्भाव जाणा । राम जाला पंढरीराणा ।।”

समर्थ रचीत हा अभंग म्हणजे आपल्या आराध्य देव किंवा देवतेचा किती ध्यास लागायला हवा याचे उत्तम उदाहरण आहे. पंढरपुरात पांडुरंगाची मूर्ती पाहुन त्यात देखील समर्थांनी राम पाहिला आणि रामाचे बदललेले हे रूप पाहून समर्थ पांडुरंगरुपी श्रीरामाला अनेक प्रश्न विचारतात. आणि अखेरीस शेवटच्या दोन ओळीत समर्थ सांगतात खरा रामदासी तोच ज्याच्या अंतरी सद़्भाव आहे. तेव्हा खरा दास तोच जो बाहेर रुप कोणतेही असले तरी त्या रुपात समर्थांना पहातो आणि त्या रुपाच्या चरणी नम्र होतो, नतमस्तक होतो, त्या नवीन रुपाचा देखील आदर करतो. हनुमंताला प्रत्येक ठिकाणी राम दिसत असे. तोच ध्यास, तोच भाव समर्थांमध्ये होता. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की, एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला ना की; ती गोष्ट जेव्हा मिळते; होते तेव्हा ती सर्वोत्तम असते. जगात ज्या ज्या लोकांनी काही भव्य दिव्य करुन दाखवले त्यांना त्या गोष्टींचा ध्यास लागला होता म्हणूनच ते या गोष्टी करु शकले. आता आपण आत्मपरिक्षण करायला हवे ना ? की, आपल्याला असा समर्थांचा ध्यास लागला आहे का ? की नुसते आपण तसे दाखवतो. उत्तर जे काही असेल ते इतरांना सांगायची गरज नाही. फ़क्त जर काही सुधारणा गरजेची असेल तर ती मात्र अवश्य करायलाच हवी. समर्थांना नेमके हेच तर हवे आहे. तसेच समर्थ संप्रदायात दर बुधवारी विठ्ठलपर सवाई म्हटली जाते.

“नाम विठ्ठल सुंदर । ब्रह्मा विष्णु आणि हर ।

गुणातीत निर्विकार । शुकादिकी गायला ।।

चंद्रभागा रम्यतीर । तेथे उभा कटिकर ।

दिंड्या पताका अपार । यात्रा घोष जाहला ।।

तेथे येतां रामदास । दृढ श्रीरामीं विश्वास ।

रुप पालटोनी त्यास । रामरूपीं भेटला ।।

पुन्हा विठ्ठलस्वरूप । रामविठ्ठल एकरुप ।

पूर्वपुण्य हे अमूप । लक्ष पायीं ठेविला ।।”

असा एकात्मतेचा भाव समर्थांचे मनात होता. तुकोबांनीही झेंडा असा उभा केला की,

“विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।

वाळवंटी चंद्रभागेच्या तीरी डाव मांडला॥”

आणखी एके ठिकाणी तुकोबा म्हणतात, “खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ।।” पंढरीचे वर्णन करताना जनाबाई म्हणतात, “संतभार पंढरीत । कीर्तनाचा गजर होत ।।” तुकाराम महाराज हे विठ्ठल भक्त असूनही त्यांना श्रीरामही तितकेच प्रिय होते. समर्थ रामभक्त असून विठ्ठलही त्यांना तितकेच प्रिय होते. संताना जात, धर्म, सांप्रदायिक भेद नसतो हे यातून स्पष्ट होते. एका अभंगात त्यांनी देहावर पंढरीचे रुपक केले आहे. देह हीच पंढरी आणि आत्मा हा पंढरीनाथ आहे. आमच्या येथे यात्रा आणि महोत्सव नेहमीच घडत असतात. यात भक्ती ही वीट आहे आणि या विटेवर आत्मरुपी विठ्ठल उभा आहे. वैराग्य ही भीमा नदी आणि आत्मज्ञान हा पुंडलिक आहे. 

नंतर पौर्णिमा- व्यासपौर्णिमा-गुरुपौर्णिमा. खरचंच आल्हाददायक. कारण गुरु हे शिष्याला योग्य वेळ आली की शोधत येतात. अनुग्रह हा द्यायचा किंवा घ्यायचा नसतो तर तो व्हायचा असतो. अनुग्रह होणे म्हणजे वासना कमी होणे, विकार कमी होणे, भगवंताचे प्रेम वाढीला लागणे. 

सद्गुरूंची परमकृपा होणे म्हणजे ‘अनुग्रह’. अनेक जन्मांच्या पुण्यसंचयामुळे आत्मज्ञानी सद्गुरूंकडून कडकडीत वैराग्यशील मुमुक्षु साधकास अनुग्रह प्राप्त होतो. जीवाचे शिवरूपात होणारे रूपांतर म्हणजे अनुग्रह. संत एकनाथ महाराज म्हणतात, सद्गुरु ओंकार स्वरूप असतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, “सद्गुरुवाचोनि सापडेना सोय । धरावे तें पाय आधी आधी ।। ‘ज्ञानदेव म्हणतात, “ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो । आता उध्दरिलो गुरुकृपे ।।” समर्थ रामदास स्वामी सद्गुरुंबद्दल म्हणतात की, मी सद्गुरुंचे वर्णन करु शकत नाही. वास्तविक समर्थ सद्गुरु स्तवनात म्हणतात,  

“आतां सद्गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शों सकेना ।

तें स्वरूप हे अज्ञाना । काये कळे ।।  १-४-१ ।।”

आता सद्गुरू वर्णवेना म्हणजे ज्याचे वर्णन होऊ शकत नाही, हेच गुरुंचे वर्णन. ज्या गुरूरुपाला माया स्पर्श करु शकत नाही, परंतु मायेशिवाय वर्णन होणे शक्य नाही म्हणून गुरुकृपेची खूण म्हणजे काय तर, जेथे माया नाही ते सद्गुरुंचे रूप होय. अज्ञान्याला ज्ञान झाल्यावर ज्ञानानेच सद्गुरुंचा अनुभव होईल, पण अज्ञानातून सद्गगुरूरुप कोणासही जाणता येणार नाही. संत-सद्गुरु हे भगवंताचे चालते-बोलते रुप आहेत. त्यांना वंदन करून इथेच थांबते.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

भीमरूपी स्तोत्र ३ – कोपला रुद्र जे काळी

“कोपला रुद्र जे काळीं । ते काळीं पाहवेचि ना ।

बोलणे चालणे कैचें । ब्रह्मकल्पांत मांडिला ।। १ ।।”

शिव कोपला की कल्पांत होतो. दक्ष राजाच्या यज्ञाच्या प्रसंगी पतीचा अपमान/उपमर्द सहन न झाल्याने देवी सतीने अग्नी प्रवेश केला तेव्हा अत्यंत क्रोधीत होऊन शिवाने तांडव केले. जणू कल्पांत आला अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली. शंकर ही देवता तिच्या विनाशकारी शक्तीसाठी प्रसिद्ध आहे. कोपला रुद्र म्हणजे या शिवाच्या अकराव्या रुद्राचा अंश अवतार मारुती जेव्हा कोपला तेव्हा काय परिस्थिती उत्पन्न झाले त्याचे वर्णन समर्थ या मारुती स्तोत्रात करीत आहेत. देवतांचे सौम्य रूप आपल्याला भावते, आवडते आणि सहन होते. रौद्र रूप मनात धडकी भरवते. भगवंताचे विराट विश्व रूप पहाताना अर्जुनाची अवस्था कशी झाली होती ? पहावेचिना अशीच होती म्हणून तर भगवंता, आपल्या सौम्य रूपात आपण यावे अशी विनंती अर्जुनाला करावी लागली आणि देवानेही ती मान्य केली.

मारुतीराय का बरे एवढे कोपले ? रागावले ? तर रावणाने उच्छाद मांडला होता. वैदिक धर्म संकटात होता. उपास्य देव सारे रावणाच्या कैदेत हाल अपेष्टा भोगत कनिष्ठ कार्य करीत होते. देवतांची ही अवस्था, तर सामान्य माणसांचे काय सांगावे ? देशोदेशीच्या रूपवान स्त्रिया त्याने आपल्या अंत:पुरात आणून बंदी केल्या होत्या. रावण विद्वान होता, शिव भक्त होता पण अन्य असुरांसारखाच त्याला अनावर मोह होता आणि शक्तीचा अहंकार होता. प्रत्यक्ष जगदंबेला/सीतामाईला हरण करून बंदी बनवण्याचा घोर अपराध रावणाने केला होता. देवता या पूजनीय असतात हे विसरून त्यांची विटंबना केली होती. हे सारे मारुतीरायांनी लंकेत फिरून पाहिल्रे आणि त्यांच्या तळ पायाची आग मस्तकी गेली. 

समर्थांनी देखील १२ वर्षे देश फिरून पाहिला आणि देवा-धर्माची दुरवस्था, समाजाची दैन्य अवस्था पाहिली होती. मारुतीची लंकेत जी मनाची अवस्था होती तीच समर्थांची भारत फिरताना झालेली होती. या भाव अवस्थेत हे स्तोत्र  समर्थ रामदास स्वामीना स्फुरले हे ध्यानात घेतले की, समर्थांच्या शब्दांना एवढी धार का आहे, त्यातून स्फुल्लिंगे का बाहेर पडत आहेत हे ध्यानात येते. रावणाचे वन उध्वस्त करणारे मारुतीराय आणि त्यांच्या शेपटीला चिंध्या बांधून पेटवून दिल्यानंतरचे मारुती राय आणि प्रत्यक्ष रणांगणातील मारुतीराय हे अत्यंत क्रोधायमान अवस्थेत होते. हा सात्विक संताप होता. अन्यायाचा बदला घ्यायची त्यांची भूमिका होती. तेच स्फुल्लिंग तोच सात्त्विक संताप देशातील तरुण मनात फुलावा असाही हेतू समर्थांचा हे स्तोत्र लिहिताना असावा. समर्थ म्हणतात की, मारुतीचे हे रूप पहाणे अतिशय भय उत्पन्न करणारे होते. कोणाच्या मनात ? तर ज्यांनी अन्याय केला किंवा अन्यायाची पाठराखण केली त्यांच्यासाठी ल. सीतामाई, बिभीषण यांना मारुतीरायांच्या क्रोधाचा त्रास झाला नाही; कारण ते राम भक्त होते आणि त्यांना राम नामाची कवच कुंडले होती. मारुतीरायांने लंकेत जे आरंभले तो सर्वनाश होता, जणू ब्रह्माचा कल्पांत ओढवला होता व सारी लंका त्या विनाशाच्या कराल काळ मुखात जात होती. 

“ब्रह्मांडाहूनि जो मोठा । स्थूळ उंच भयानकु ।

पुच्छ तें मुरडिले माथां । पाऊल शून्य मंडळा ।। २ ।।”

मारुतीचे हे विश्वाला व्यापून उरणारे उग्र रूप कसे होते ? ते अतिशय भव्य, उंच आणि उग्र होते. त्याने आपली शेपटी मस्तकाजवळ आणली होती तर पाऊल सूर्य बिंबापाशी होते, एवढे ते विशाल होते. जसे भगवान श्रीकृष्णाचे विराट दर्शन हे कृष्ण अवतारापेक्षा किती तरी विशाल होते तसेच हे मारुतीचे व्यापक रूप समर्थ वर्णन करतात. ते मारुती अवतारापेक्षा खूप मोठे जाणवते. ते केवळ देहाचे विस्तारणे नाही तर ते परब्रह्म स्वरूपाचे, त्याच्या सर्व शक्ती सामर्थ्यानिशी व्यक्त होणे असते. 

“त्याहून उंच वज्रांचा । सव्य बाहो उभारिला ।

त्यापुढें दुसरा कैंचा । अद्भूत तुळणा नसे ।। ३ ।।”

हनुमानाचा वज्रासमान हात सूर्य बिंबापेक्षा उंच होता असे समर्थ म्हणतात तेव्हा ते विशाल रूप विश्वाच्या मर्यादा ओलांडून कितीतरी मोठे आहे असे समर्थ सांगत आहेत. त्या हाताचा आघात विलक्षण संहार करणारा होता. हनुमानाच्या पुच्छाने लंकेचा विध्वंस केला. त्याचा हात व त्यातही गदाधारी हात हा त्याच्या विलक्षण सामर्थ्याचे प्रतीक मानावे लागेल. हे अद्भुत रूप अतुलनीय असेच आहे. 

“मार्तंडमंडळा ऐसे । दोन्ही पिंगाक्ष ताविले ।

कर्करा घर्डिल्या दाढा । उभे रोमांच ऊठिले ।। ४ ।।”

मारुतीरायांच्या नेत्रात क्रोध म्हणजे जणू अंगार पेटला होता व त्याची तुलना सूर्य बिंबाच्या दाहकतेशीच करता येणे शक्य आहे. तसेच करकरा वाजणारे दात हे क्रोधाच्या तीव्रतेचा अंदाज देतात. ते ऐकून अंगावर काटा येत होता असे समर्थ सांगत आहेत. हे सारे दुष्टांच्या हृदयात धडकी भरवते तर सज्जन आणि जे दुर्जनांच्या त्रासाने गांजलेले आहेत त्यांना आशेचा किरण दाखवणारे ठरते.

“अद्भूत गर्जना केली । मेघचि वोळिले भुमीं ।

तूटले गिरीचे गाभे । फुटले सिंधू आटले ।। ५ ।।”

हनुमानाची गर्जना मोठी विलक्षण आणि भयानक होती. जणू गर्जना करून प्रचंड मेघ भूमीकडे वोळले म्हणजे वळाले. मेघांची दिशा बदलू शकेल इतकी ती गर्जना प्रभावी होती. आपली दैवते ही पंचभूतांना वळवू शकतात इतकी प्रभावी असताना आपण मात्र हात-पाय गाळून अन्याय सहन करणे योग्य नाही, असा संदेश समर्थ या स्तोत्रातून देत आहेत. त्या गर्जनेच्या स्पंदनांमुळे पर्वतांचे कडे तुटत होते तर सागराचे जल आटत होते. आपण काही वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशात झालेले भूस्खलन आणि प्रचंड जल वर्षाव यांचा विनाशकारी अनुभव घेतला आहे, आणि म्हणून या वर्णनाचा अर्थ आपल्याला लागू शकतो. 

“अद्भूत वेश आवेशें । कोपला रणकर्कशू ।

धर्म संस्थापनेसाठीं । दास तो ऊठिला बळें ।। ६ ।।”

हनुमानाचा हा रण आवेश कुठल्याही वैयक्तिक कारणासाठी नाही. तो पुन्हा धर्म नीती यांची स्थापना करण्यासाठी आहे. श्रीराम आणि हनुमान यांच्या कार्याचा हा हेतू समर्थ या श्लोकात सांगत आहेत. हनुमान रणभूमीवर चालताना ती हादरत होती. हे धक्के रावणाच्या अन्यायी राजवटीला होते. नीती-धर्म यांना सोडून वागण्याला होते. अहंकार, कामी वृत्तीला आव्हान होते. म्हणून हा कोप, हा क्रोध वंदनीय आहे. सज्जन लोकांचे रक्षण आणि दुर्जन-आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचे निर्दालन हे श्रीराम आणि श्रीहनुमान यांच्या अवताराचे कारणच होते. 

“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत ।

अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम ।

परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम ।

धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।”

या भगवंताच्या आश्वासनांची आठवण हे स्तोत्र वाचताना/अभ्यासताना होते. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

संदर्भ :- सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे)    

 

कल्याण करी रामराया

“कल्याण करी रामराया” ही प्रार्थना श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेली एक आगळी-वेगळी आर्त ‘आळवणी’ आहे. ही सर्वसाधारण प्रार्थनेप्रमाणे किंवा आरतीप्रमाणे इष्टदेवतेच्या सगुण स्वरूपाचे रूपसौंदर्य वर्णन करणारी; अथवा त्या त्या देवतेचे गुण वर्णन करणारी नाही. या प्रार्थनेला पसायदान म्हणावे, तर इतर  पसायदानाप्रमाणे केवळ मांगल्याचे, सुख-शांतीचे मागणे यात नाही. या प्रार्थनेत तत्कालीन समाजाचे, धर्मस्थितीचे आणि परकीय राज्यसत्तेचे जळजळीत दर्शन व्यक्त होते.

आक्रमक, निष्ठुर, निर्दयी अशा यावनी सत्तेपुढे हतबल झालेली प्रजा, धार्मिक स्थळांचा विध्वंस, स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे आणि आपलीच माणसे यवनांची चाकरी करून स्वतःचे स्वत्व विसरून, स्वधर्माला विसरून शिरजोर झालेल्यांचे वर्णन यात सूचकपणे व्यक्त झाले आहे. यामुळे श्रीसमर्थांना एकच आशेचा किरण दिसतो आहे, तो म्हणजे रामराया ! कोदंडदारी, महाप्रतापी, प्रभूरामचंद्रच यातून वाचवू शकतील; अशा आर्त भावनेने ते म्हणतात, “कल्याण करी रामराया ! हे रामराया, तूच आता यातून आम्हाला वाचव. तूच आमचा तारणहार, कर्ता आहेस.” या घडीला केवळ लौकिक भक्तिमार्ग समाजाला तारू शकणार नाही. या दृढ मनोधारणेने, जनजागृतीसाठी; समाजामध्ये कर्तव्याचा; बलाचा आणि स्वाभिमानाचा स्फुल्लिंग फुलवण्यासाठी श्रीसमर्थांनी आपल्या स्वतंत्र विचारसरणीच्या रामदासी पंथाची उभारणी केली. भक्ती मार्गातूनच आपल्या ईप्सित ध्येयाचा प्रसार आणि प्रचार त्यांनी केला. त्या ध्येयाला अनुसरून ही प्रार्थना त्यांनी लिहिलेली असावी. त्यांनी आपल्या भारत-भ्रमणामध्ये जी विदारक स्थिती पाहिली; ती त्यांनी नोंदवून ठेवली आहे. ते म्हणतात,

“पदार्थमात्र तितुका गेला । नुसता देशचि उरला ।

येणेकरिता बहुतांला ।  संकट जालें ।।”

त्यांनी धार्मिक स्थळांचा विध्वंस, स्त्रियांवरील अत्याचार आणि सामान्य प्रजेची दैना पाहून अखेरीस भगवंताला कळकळीची आळवणी केली. ते म्हणतात,

“दास म्हणे रे भगवंता । किती पाहसी सत्त्व ।

काय वांचुनि वांचुनि । नुपरते जीवित्व ।।”

आता जगून वाचून तरी काय करावे ? अशी अवस्था प्राप्त झाली आहे. हे भगवंता, तू तरी किती सत्त्व पाहणार आहेस ? अशी आर्त हाक ते मारतात. अशावेळी दुष्टांचा संहार करून प्रजेचे कल्याण करणारा निष्काम, महाप्रतापी योद्धा, शक्तिशाली रामराया त्यांना उपासनेसाठी आदर्श वाटला आणि त्यादृष्टीने त्यांनी जे कार्य केले ते पाहता, श्रीसमर्थ हे राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक आहेत असे म्हणणे सार्थ ठरेल. त्यांचे कार्य आणि तळमळ पाहून आपण नतमस्तकच होतो.

याच भावनेतून श्रीसमर्थानी लिहिलेली ही प्रार्थना, इतर प्रार्थना किंवा सर्वसाधारण आरत्यांप्रमाणे भगवंतावर स्तुती-सुमने उधळणारी किंवा त्याच्या सगुण स्वरूपाचे गुणवर्णन करणारी नसणे हे ओघाने आलेच. तत्कालीन समाजाचे दारुण चित्र सुचकरीत्या व्यक्त करताना, त्यांचे शब्द-सामर्थ्य आणि आंतरिक तळमळ अतिशय प्रभावीपणे, प्रत्ययकारी स्वरूपामध्ये व्यक्त होते. या प्रार्थनेतून त्यांना स्वतःला किंवा आपल्या पंथासाठी काहीच मागावयाचे नाही. ते समाजाचे, धर्माचे म्हणजे पर्यायाने राष्ट्राचे कल्याण; श्रीरामांकडे मागतात. यातही त्यांची धगधगीत वैराग्य दृष्टीच व्यक्त होते. ते प्रार्थना करतात, “जनहित विवरी कल्याण करी रामराया” ही प्रजा, समाज, धर्म, सारे संकटात सापडले आहेत. दुष्टांचे निर्दालन करून भक्तांना तारणार्‍या हे रामराया, आमच्या संकटाचे तूच निवारण कर. तुझ्या धनुष्याचा टणत्कार ऐकून प्रत्यक्ष काळ देखील थरारून जातो, अशी तुझी कीर्ती आहे. समाजाची स्थिती पाहून माझ्या जीवाची तळमळ होत आहे. आता या दुःखी जनास तूच हाती घेऊन आधार दे, असे ते म्हणतात. त्याला तुझ्या करुणेच्या पंखाखाली घे, असे आर्जवाने म्हणतात. यातून श्रीसमर्थांची श्रद्धा आणि दृढ विश्वास व्यक्त होतो. ते पुढे म्हणतात, अपराध, अन्याय करणारे; अपराध करतच आहेत. अन्याय, जुलूम, अत्याचार करून जनतेला हवालदिल करत आहेत. रयत गांजून गेली आहे. हे रामराया, आता तूच त्यांना सावर ! त्यांना आधार दे ! त्यांना प्रेरणा देऊन उभे राहण्याची शक्ती दे ! या संकटामध्ये वाईटात अधिकच वाईट घडावे, अशी कठीण परिस्थिती होत चालली आहे. त्यामुळे रयतेपुढे निराशेचा अंधार पसरला आहे. आशेचा किरणही कुठे दिसत नाही. परचक्र निरूपणात ते म्हणतात, 

“ऐसें जालें वर्तमान । पुढेचि अवघ्या अनमान ।

सदा दुश्चित अवघें जन ।उद्वेगरुपी ।।”

म्हणून ते पुढे म्हणतात “कोठे जावे, काय करावे ?” जनसामान्यांना आगीतून निघावे तर फुफाट्यात पडावे, अशा अवस्थेला तोंड द्यावे लागत आहे. आता कुठे जायचे ? आणि कसे वाचायचे ? ह्या केविलवाण्या अवस्थेला तोंड द्यावे लागत आहे. स्त्रिया-मुलींना जगणे अशक्य झाले आहे. अशा भयानक स्थितीत आत्महत्येशिवाय मार्ग उरलेला नाही. 

ते म्हणतात. “आरंभिली बोहरी” याला संदर्भ राजपुतान्यातील सैनिकांनी केसरीया धारण केल्यानंतर स्त्रियांनी जौहार करून अग्नी-प्रवेश केला होता त्याचा आहे. परचक्र निरूपणात ते म्हणतात, 

“कितेक अनाचारी पडिली । कितेक यातिभ्रष्ट जालीं ।

कितेक विषे घेतली । कितेक जळी बुडाली ।

जाळिली ना पुरिली । किती येक ।।

येक म्हणती कोठें जावें । येक म्हणती काये करावें ।।”

अशा भयावह अवस्थेमध्ये श्रीसमर्थांना रामराया हाच आधार, तारणहार वाटतो. म्हणून ते म्हणतात, “कल्याण करी रामराया !” आणि शेवटच्या चरणात ते आशादायी सकारात्मक विधान करतात. आपल्या प्रयत्नांना, तपश्चर्येला फळ लाभल्याचे समाधान; आनंद ते व्यक्त करतात. याचा संदर्भ छत्रपती शिवरायांच्या प्रतापाचा आणि धर्मरक्षणाच्या यशस्वी कार्याशी आहे, असे अनुमान काढता येते. आनंदभुवनी या स्फुट काव्यात ते म्हणतात, 

“स्वप्नी जे देखिलें रात्री । तें तें तैसेचि होतसे ।।”

आपल्या तपश्चर्येचे फळ, भगवंतच शिवरायांच्या रुपाने अवतरला आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, 

“मनासी प्रचिती आली । शब्दीं विश्वास वाटला ।

कामना पुरती सर्वे । आनंदवनभूवनी ।।

बंड पाषाण्ड उडाले । शुद्ध अध्यात्म वाढले ।

रामकर्ता रामभोक्ता । आनंदवनभूवनी ।।”

आपल्या स्वप्नांना आणि ध्यासाला रामरायाचा आशीर्वाद शिवरायांच्या रूपाने लाभला आहे. आपण जे जे प्रयत्न केले, त्याचे फळ आपण अनुभवतो आहोत अशी समाधानाची भावना ते व्यक्त करतात. “आम्ही केले, पावलो” अशी भावना ते शेवटच्या चरणात आनंदाने शब्दांकित करतात. शिवरायांचे राजकारणाच्या क्षितिजावरती यशस्वी पदार्पण हा ईश्वरी संकेतच श्रीसमर्थांना वाटतो. 

“कल्पांत मांडिला मोठा | म्लेंच्छ दैत्य बुडावया |

कैपक्ष घेतला देवी | आनंदवनभभूवनी ।।”

म्हणून ते अभिमानाने सांगतात, “आम्हाला मिळालेल्या या कृपाशीर्वादाला कशाचीही सर येणार नाही, असा तो अलौकिक आहे. अशी ही छोटेखानी प्रार्थना तत्कालीन समाजाच्या भीषण स्थितीचे आणि श्रीसमर्थांच्या ध्येय स्वप्नांचे चित्र उभी करणारी आहे, तितकीच स्फूर्तीदायी; प्रेरणादायी देखील आहे!  

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language