हनुमंता रामदूता – भाग १

श्री समर्थांच्या कार्यातील केंद्रबिंदू म्हणजे चाफळ. महाराष्ट्राची अयोध्या म्हटले जाते ते चाफळ. इथे वीर मारुती आणि दास मारुती दोन्ही आहेत. श्री समर्थांनी दास मारुतीचे वर्णन प्रस्तुत स्तोत्रात केले आहे 

हनुमंता रामदूता। वायुपुत्रा महाबला।

ब्रह्मचारी कपीनाथा। विश्वंभरा जगत्पते ॥ १ ॥

इंद्राच्या वज्राने हनुवटी भंगली व त्यानंतर त्याच्याच वराने वज्रदेही झालेले मारुतीराय हे राम रायाचे परम भक्त होते, जन्मत: कटीला सुवर्ण कासोटी लेउन जन्मलेले प्रखर ब्रह्मचारी वानरकुलाला ललामभूत होते जगाचे नियामक, संरक्षक होते असा गौरव समर्थांनी केला आहे  

कामांतका दानवारी। शोकहारी दयानिधे ।

महारुद्रा मुख्यप्राणा। मूळमूर्ति पुरातना ॥ २ ॥

वज्रदेही सौख्यकारी। भीमरूपा प्रभंजना।

पंचभूतां मूळमाया। तूंचि कर्ता सकळही ॥ ३॥

मारुती रायांची उपासना ही, निरास करायला कठीण अशा वासनांचा निरास करायला, सद्भक्तांना मदत करते. सर्व प्रकारचे दु:ख व वियोगाच्या सुद्धा दु:खातून बाहेर पडायला हनुमंत उपासना मदत करते. ते अशी कृपा भक्तांवर करतात.वासना निर्मूळ करून ते हे साध्य करतात. शंकराचा रुद्रावतार आहे त्यातील अकराव्या रुद्राचा अंश म्हणून मारुती रायांचा अवतार झाला असून ते श्री रामांचा बहिस्थ प्राण आहेत. मारुतीराय चिरंजीव आहेत आदिपुरुष स्वरूपच आहेत.भक्ती कशी करावी याचे मूर्तीमंत उदाहरण त्यांनी घालून दिले असून उपासकांना सर्वतोपरी सहाय्य करून उपासना फलद्रूप होण्यासाठी मारुतीरायांची मोठी मदत होत असते. वायुरूप असून मनाच्या गती पेक्षाही वेगात कार्य करतात.मारुती राय हे अंतरात्म्याचे स्वरूप असल्याने समर्थ त्याना मूळ पुरुष, आदिमाया असेही संबोधतात.

स्थितिरूपें तूंचि विष्णु। संहारक पशुपती।

परात्पर स्वयंज्योती। नामरूपा गुणातिता ॥ ४॥

सांगता वर्णितां ये ना। वेदशास्त्रां पडे ठका।

शेष तो सीणला भारी। नेति नेति पराश्रुती ॥ ५ ॥

उत्पत्ती स्थिती  व लय म्हणजे सृष्टी उभारणी व संहारिणी या दोन्ही मारुतीरायांच्या लीला आहेत. परावाणी स्फुरण रूप असते. तिच्याही पलीकडे असलेले स्वयंप्रकाशित असे जे परमात्म तत्व आहे ते गुण व नामाच्या अतीत आहे म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूपच आहे. त्याचे वर्णन करता येत नाही, ते अनुर्वाच्य आहे.हजार फणी असलेला शेष पण तोही वर्णन करताना थकतो व मौन होतो व वेद इथे पांगुळे होतात असे हे वर्णनातीत  आनंद स्वरूप आहे.  

धन्य अवतार कैसा हा। भक्तालागिं परोपरी।

रामकार्य उतावेळा । भक्तरक्षक सारथी ॥ ६ ॥

वारितो दुर्घटं मोठीं। संकटीं धांवतो त्वरें।

दयाळा हा पूर्णदाता। नाम घेतांचि पावतो ॥ ७॥

भक्तांवर उपकार करणे म्हणजे त्याना भक्ती प्रवण करणे व त्यांचा निश्चय दृढ व्हावा म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे हा मारुती रायांच्या अवताराचा हेतू आहे आणि त्या कार्यासाठी राम रायांनी निजधामास जाताना मारुती रायांना चिरंजीव केले. मारुती राय संकट मोचक आहेत. मोठ मोठी संकटे ते लीलया दूर करतात. रावणाच्या बरोबर संघर्ष झाला त्यात कितीतरी अवघड प्रसंग आले पण ते निवारण्यात मारुती रायांचे योगदान मोठे आहे. तसेच जो कोणी पवित्र अंत:करणाने भक्ती करतो त्याच्याही सहाय्या साठी तत्पर असतात. नामसाधनेने मनोरथे पूर्ण करतो. पूर्ण दाता म्हणजे त्यांची कृपा झाली की काहीही मागायची इच्छा उरत नाही. वासनेचे मूळ किंवा बीज जाळून जाते मग त्यातून पुढे काहीही उगवून येत नाही.  

धीर वीर कपि मोठा। मागें न होय सर्वथा।

उड्डाण अद्भूत ज्याचें। लंघिलें समुद्राजळें ॥ ८॥

देउनी लिखिता हातीं। नमस्कारी सीतावरा।

वाचितो सौमित्र अंगें। रामसुखें सुखावला ॥ ९॥

गर्जतो स्वानंदमेळीं। ब्रह्मानंदे  सकळही।

अपार महिमा मोठा। ब्रह्मादिकांसी ना कळे ॥ १०॥

कोणतेही आव्हान असो-सीतामाईचा शोध असो की पाच जलधी ओलांडून औषधी संजीवनी असो, मारुतीराय कधीही मागे हटले नाहीत. आवेशे लोटून त्यांनी ते कार्य सिद्ध केले. कार्य स्वीकारले आणि त्यात झोकून दिले की अंतरीची शक्ती कशी सहाय्यक होते याचे हनुमंत उत्तम उदाहरण होते.स्वयं प्रकाशी म्हणजे स्व-प्रज्ञेने मार्ग शोधणारे होते. समुद्र ओलांडून जाण्यासाठी उड्डाण हे विलक्षण होते. सीता माईचा शोध घेउन लंका दहन केल्यावर मारुती रायांनी रामराया कडे यायला प्रस्थान केले तेव्हा त्यांच्या हाती ब्रह्माने एक पत्र दिले. त्यात मारुती रायांच्या कार्याचे वर्णन गौरव होता. स्वत: हनुमान ते सांगणार नाहीत म्हणून ब्रह्मदेवाने हे दिलेले पत्र रामारायांना दिले व नमस्कार करून मारुतीराय हात जोडून पुढील आज्ञा घेण्यासाठी उभे राहिले. ते पत्र वाचून राम राया व लक्ष्मण दोघाना आनंद झाला. आधीचा मोठा काळ राम राय मोठ्या  चिंतेत होते. पण त्यांची मुद्रा ते पत्र पाहून सुखावली हे पाहून त्यांचा भाउ सुखावला. मारुती राय आणि लक्ष्मण दोघेही रामाशी अतिशय एकरूप झाले होते. 

मारुती रायांनी सीतामाईचे स्थान शोधून काढले आणि रावणाला धडा शिकवून मारुती राय परतले, देवाना आणि सीतेला दिलासा देउन ते आले ह्या बातमीने सारे वानरकूळ किती आनंदले असेल व त्यांनी केवढा जल्लोष केला त्याचे वर्णन समर्थ करीत आहेत.मारुती अवताराचा हा महिमा ब्रह्मादिकांना देखील अनाकलनीय असा आहे असे समर्थ म्हणतात. ज्या शत्रू विरुद्ध दंड मारुती रायांनी थोपटले तो सामान्य नव्हता. देवाना आपल्या इशा-यावर फिरवणारा, बंदी बनवणारा होता. त्याला असा धडा कोणी शिकवू शकेल,असे काही घडू शकते हेच मुळी देवांनाही अनपेक्षित व अतर्क्य होते. 

याच पार्श्व भूमीवर आपण समर्थ काल बघितला तर तीनशे वर्षांच्या अंधारात शिव समर्थ असा तेजाचा किरण दिसू शकेल असे कोणाला स्वप्नात तरी वाटले असेल का? पण असा सूर्य उगवला आणि श्री समर्थ आणि शिवाजी राजे दोघेही शिवांश होते व राम रायांसारखे योजना करून कार्य सिद्ध करणारे होते हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता. जे काही अद्भुत अतर्क्य असे काम मारुतीराय करून आले होते त्यामागे त्यांच्या अद्भुत शेपटी चे योगदान खूप मोठे होते. ते मंडलाकार फिरवले की नभात पोकळी उत्पन्न होते. दास मारुतीचे वर्णन करून झाल्यावर समर्थ आता ‘समर्थ मारुतीचे ‘ वर्णन करीत आहेत…

अद्भुत पुच्छ तें कैसें। भोवंडी नभपोकळी।

फांकडें तेज तें भारी। झांकिलें सूर्यमंडळ ॥ ११ ॥

हनुमानाचे दर्शन हे तेजाचे प्रगटन आहे. सूर्य मंडल झाकून टाकण्या इतके म्हणजे ते फिके वाटावे असे अति विशाल व महातेजस्वी आहे. 

देखतां रूप पैं ज्याचें। उड्डाण अद्भूत शोभलें।

ध्वजांग ऊर्ध्व तो बाहो। वाम हस्त कटावरी ॥ १२ ॥

कसिली हेमकासोटी। घंटा किंकिणि भोंवत्या।

मेखळे जडिलीं मुक्ते। दिव्य रत्नें परोपरी ॥ १३॥

मारुतीचे रूप त्याचे उड्डाण विलक्षण असे आहे. उजव्या हातात श्री रामांची ध्वजा असून डावा हात कटी वर म्हणजे कमरेवर आहे. सुवर्णाची कासोटी, किणकिण करणा-या घंटा मंजुळ नाद करीत आहेत. नाना रत्ने मोती जडवले आहेत. 

(क्रमश: भाग दुसरा….) 

संदर्भ :- सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे)    

समर्थ रामदासांच्या करुणाष्टकांची वैशिष्ट्ये

परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी केलेला धावा म्हणजे करुणाष्टके. ‘धावा’ या शब्दावरून गजेंद्राचा, द्रौपदीचा, संकटमुक्त करण्यासाठी केलेला धावा आठवतो. आद्य शंकराचार्यांची अष्टके आठ श्लोकांचीच आहेत, पण समर्थांची काही अष्टके आठ श्लोकांची आहेत, तर काही नाहीत. समर्थांची करुणाष्टके म्हणजे भगवंताची करुणा भाकण्याकरिता रचलेली आर्त गीते आहेत. समर्थांच्या काही करुणाष्टकांत चौथ्या चरणाची पुनरावृत्ती आहे. ही चरणे मनावर आघात करतात व तो विचार मनावर कायमचा कोरला जातो. ‘बुद्धी दे रघुनायका’ हा चरण एक नाद, लय, निर्माण करतो. समर्थांच्या करुणाष्टकातील भाव, भावना, निराशा, अगतिकता व्यक्तीनिष्ठ नाहीत तर त्या व्यापक समाजमनाच्या आहेत. ‘प्रपंचसंगे आयुष्य गेले’, ‘सदृढ जाली देहेबुधि देहीं’ हा समर्थांचा वैयक्तिक प्रश्न नाही, तर तो जनमानसाचा प्रश्न आहे. तो त्यावेळी होता व आजही आपण तो अनुभवतो आहे.

समर्थांच्या करुणाष्टकांची निर्मिती दु:खातून झाली. जन्म हाच दु:खमूळ. मीपणाच्या जाणिवेचे दु:ख, त्रिविध तापांचे दु:ख, देहाच्या व्याधींचे दु:ख, साधकावस्थेतील दु:ख, अज्ञानाचे दु:ख, विरहाचे दु:ख, समर्थांनी पाहिले होते.  भिक्षेसाठी गेले असताना घराघरांतील दु:ख, व्यक्तींचे दु:ख, समाजातील भयग्रस्त परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती. 

दु:खाचे मूळ कारण अज्ञान. ज्ञान नाही म्हणून भरकटलेले लोक समर्थांनी पाहिले. अंध:श्रद्धा, साधनेचे अघोरी प्रकार, गैरसमजुती यामुळे लोक गांजलेले होते. ‘सुख सुख म्हणता हे दु:ख ठाकोनी आले’ अशी त्यांची स्थिती समर्थांनी पाहिली होती. दु:खावर उपाय योजण्याची क्षमता नाही. दु:खाचे मूळ कारण ईश्वराचा वियोग व अज्ञान हे होय. “तुझिया वियोगे जीवित्व आले” असे समर्थ याचसाठी म्हणतात. समर्थांच्या काळात योग्य मार्ग दाखवणारा अध्यात्मिक नेता नव्हता, पारतंत्र्यामुळे लोक भयग्रस्त होते. सगुण निर्गुण श्रीरामाची उपासना कशी करावी ? याचे ज्ञान लोकांना नव्हते. समर्थांना, केवळ श्रीराम कृपा; हे दु:ख कमी करेल हा विश्वास होता. त्याच्या जवळ कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. त्याच्याशी दास, सखा, मित्र, स्वामी असे नाते जोडावे. काया, वाचा, मनाने त्याचे व्हावे असे त्यांना वाटे व तशी प्रार्थना ते करुणाष्टकांतून करतात. 

अनन्यता – समर्थांना ‘एका रामाशिवाय माझे कोणी नाही’ अशी अनन्य भक्ती करणे आवडत असे. तोच तारणारा, तोच माझे सर्वस्व, म्हणून “तुजवीण रघुनाथा वोखटे सर्व काही”, “तुजवीण रामा मज कंठवेना” असं ते म्हणतात. सामान्य जन मात्र प्रपंचात इतके गुंततात की त्यांना ईश्वराची आठवण येत नाही, त्यांचा परमार्थ सवडीचा असतो.

संवाद – समर्थ सर्वस्वी श्रीरामाचे झाले म्हणून ते त्याच्याशी संवाद साधत. अशी एकाग्रता, तळमळ सामान्य माणसांमध्ये नसते. या संवादात “दुष्ट संव्हारिलें मागें । ऐसें उदंड ऐकतों । परंतु रोकडें कांहीं । मूळ सामर्थ्य दाखवी ।” हा हट्ट आहे. काया वाचा मनाने तुझा झालो म्हणून ‘हे लाज तुजला माझी’ यात सख्यत्व आहे. संवादात एका रामाशिवाय ही कृपा कोणीही करू शकत नाही ही प्रांजळ कबुली आहे, माझ्या साधनेत काही कमतरता आहे का ? हा प्रश्नही ते विचारतात. ‘नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों’ अशी व्यथा ते मांडतात. हा संवाद आतील मनाचा होता, ते हितगुज होते, देवा-भक्ताचा एकांतात घडलेला तो संवाद होता. एका असामान्य, निष्ठावान, श्रद्धाळू, अनन्य भक्ताचे ते हितगुज होते.

भाषा – ईश्वराशी संवाद साधायला समर्थांसारखे संत योग्य शब्द योजना करतात. प्रभूचे अंत:करण वितळावे, करुण रसातून, प्रेमातून त्याचे लक्ष आपण वेधावे, आर्तता प्रगट व्हावी म्हणून शब्दाचे सामर्थ्य समर्थ प्रगट करतात. ‘तुजवीण करुणा हे कोण जाणेल माझी ? तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता’ यातील शब्द योजना पाहिली की, त्यातील सामर्थ्य जाणवते. त्यातील एकही शब्द इकडचा तिकडे करता येत नाही. कारण त्यांची मांडणी नेमकी, नेटकी व प्रत्ययाची आहे.

भावावस्था – ‘श्रीराम आहेच’ या मनाच्या अवस्थेला भाव म्हणतात. समर्थांमध्ये तो परिपूर्ण होता. पश्चात्ताप, कमतरतेची प्रांजळ कबुली, लोकांचे दु:ख कमी होण्याची तळमळ असलेला, हे लोक तुझेच, म्हणून स्मरण करुन देणारी तळमळ त्यात आहे.

अद्वैताची अवस्था – करुणाष्टकांत श्रीराम समर्थ यांची एकरूपता दिसते. ‘जेथे शब्दच निमाला, तेथे रामदास रामचि झाला’ अशी अवस्था शब्दांतून प्रगट होते. 

मागणे – ‘रघूनायका मागणे हेची आता’. कोमळ वाचा, विमळ करणी, प्रसंग ओळखी, धूर्तकळा, हितकारक ते, विद्यावैभव, शब्दमनोहर, अर्थारोहण, अलाप गोडी अशा शब्दात समर्थ रामाकडे मागणे मागतात. त्यात वैयक्तिक स्वार्थ नाही. ‘मजविण तू मज दे रे राम’ यात अद्वैताची परमोच्च अवस्था आहे.

आपण सज्जनगडावर जातो तेव्हा मनातले ताण तणाव, प्रापंचिक दु:ख विसरतो. ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ या विचारात उठतो, समर्थ समाधी व श्रीरामाचा अभिषेक पहातो, सायंकाळी करुणाष्टके म्हणतो तेव्हा आपली व्यथा, दु:ख श्रीरामासमोर मांडले म्हणून मन हलकं व शांत होते. उत्साह वाढतो, एकाकीपणा, नाहीसा होतो, रात्री दासबोध वाचन, शेजारती होते. मनाला विश्रांती व समाधान मिळते; प्रसन्न वाटते. 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

चिरंजीव हनुमंत

आपल्या भारतीय संस्कृतीत सप्त चिरंजीव मानले गेले आहेत. 

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।

कृप: परशुरामश्चैव सप्तैते चिरंजीविनः।।

अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत. प्रत्येकामध्ये एकेका गुणाचा प्रकर्ष असल्याने त्यांना चिरंजीवित्व प्राप्त झालेले आहे. अश्वत्थाम्याला मात्र हे चिरंजीवित्व शापरुपात मिळालेले आहे.

हनुमंत हा प्रभू श्रीरामचंद्रांचा श्रेष्ठ भक्त आहे. अनेकानेक गुणांचा समुच्चय त्याच्यात आहे. श्रीरामप्रभू त्याच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. म्ह‌णूनच आपल्या अवतार कार्य समाप्तीचे वेळी त्याला, “मृत्युलोकातच अखंड वास्तव्य करून सर्व रामभक्तांचे रक्षण करावे”, असा आदेश दिला. हनुमंतानेही तो आदेश शिरोधार्य मानला. त्यामुळे जेथे जेथे रामकथा चालू असते तेथे तेथे हनुमंत सूक्ष्म रुपाने उपस्थित असतात. या श्रद्धा विश्वासाने त्यांचे आसन व्यासपीठाजवळ ठेवलेले असते.

श्रीरामांचा अवतार त्रेतायुगातला. पुढे द्वापार युगातही अर्जुनाचे सारथ्य भगवान श्रीकृष्णांनी केले तेव्हा रथावर मारुतीराय आरूढ झाले होतेच. त्यानंतरही त्यांच्या अस्तित्वाची प्रचीति रामभक्तांना आलेली आहे. गोंदवलेकर महाराज तर सांगत, “तुम्हाला रामाला जे मागायचे आहे ते हनुमंताजवळ सांगा, ते रामापर्यंत नक्की पोहोचेल.” श्रीसमर्थांच्या संपूर्ण जीवनात हनुमंताने त्यांच्यावर छत्र-छाया धरली होती. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा ते तेथे धावून आले आहेत. श्रीसमर्थ चरित्रात असे खूप दाखले आहेत. मारुतीरायांना अर्थात हनुमंताला या सर्वश्रेष्ठ दास्यभक्तीमुळे चिरंजीवित्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या दास्यभक्तीचे तेरा पैलू आपण पाहू‌यात.

१) सेवेची आत्यंतिक गरज असताना सेवाकार्य – सीतेचा शोध लावण्यासाठी सुग्रीवाने आपल्या वानरसेनेचे चार गट करून चार दिशांना त्यांना पाठवले. दक्षिण दिशेला निघालेल्या वानरसेनेला जटायूचा बंधू संपाती यांच्याकडून, सीतामाई सागराच्या पलीकडे असलेल्या रावणाच्या लंकेत अशोकवनात रावणाच्या सैंनिकांच्या पहाऱ्यात असल्याची माहिती कळली. पण मधला समुद्र ओलांडायचा कसा ? मोठाच प्रश्न होता. अशावेळी शांत बसलेल्या हनुमंतास जांबुवंताने त्याच्यापाशी असलेल्या प्रचंड सामर्थ्याची व योगज्ञानाची आठवण करून दिली आणि हनुमंत रामकार्य सिद्ध झाला आणि त्याने ते उत्तम प्रकारे पार पाडलेही. 

२) मोहापासून अलिप्तता – रामकार्य करताना मध्ये काही मोहाची स्थाने येतीलही, त्यावर मात करता आली पाहिजे. हनु‌मंताने उंच झेप घेतली व तो गगनमार्गे निघाला. वाटेत सोन्याचा मैनाक पर्वत आडवा आला. चकाकणारं सोनं, पण हनुमंतांना सोन्याचा मोह झाला नाही. त्याने मैनाकाला आपल्या पावलांचा जोर देऊन समुद्राच्या आत ढकलले व तो पुढे निघाला.

३) अनेक संकटावर मात करण्याची निर्भयता – पुढे राहू-केतूंची माता सिहिंका ही हनुमंतांना मार्गात येऊन उताणी पडली. तिने बारा योजने मुख पसरले. हनुमंत तिच्या पोटात शिरला व तिचे पोट फाडून बाहेर आला. भक्ताने देखील वाटेत असे काही भयप्रद अडथळे आले तरी निर्भयपणे त्यातून बाहेर पड‌ले पाहिजे.

४) दुष्टांना नामोहरम करण्याची क्षमता – हनुमंत लंकेच्या प्रवेश द्वारापाशी आला तेथे लंकिनी ही राक्षसी त्याला मारायला टपूनच बसली होती. हनुमंताने उग्ररुप धारण करून तिला मारले. भक्तिमार्गात भक्ताला त्रास देणारे दुष्टप्रवृत्तीचे लोक असतातच. पण त्यांना नामोहरम केले पाहिजे.

५) सेवा कार्यात बुद्धिमत्ता हवी – हनुमंत लंकेत शिरला. सीतामाईचा शोध घेऊ लागला. अखेरीस अशोकवनात एक वृक्षाखाली बसलेली सीता त्यांना दिसली. तिचे मुख म्लान दिसत असले तरी पण अविरत रामाचे स्मरण चालू होते. हनुमंताने मोठ्या चातुर्याने तिला रामकथा ऐकवली. नंतर तिला प्रभू रामचंद्रांची मुद्रिका दाखवून, तिला आपण रामदूत असल्याची खात्री पटवून दिली. नंतर तिने रामासाठी दिलेला निरोप व तिची खूण म्हणून दिलेला चूडामणी त्याने घेतला. तसेच प्रभु लवकरच येतील व आपली सुटका करतील असे सांगून सीमामाईला त्यांनी आश्वस्त केले.

६) नम्रता शालिनता – सीतेला भेटून हनुमंत परत‌ला, पण स्वत:च्या तोंडाने आपली कामगिरी यशस्वी झाली हे त्याने सांगितले नाही. त्याने ब्रह्मदेवांना ते सारे वर्णन लिहिण्याची विनंती केली. भक्ताने असेच आपल्या आराध्यापुढे नम्र व शालीन असावे.

७) तत्परता – मेघनाथाने टाकलेले ‘शक्ती’ नावाचे अस्त्र लक्ष्मणाच्या मर्म स्थानावर बस‌ले व तो खाली पडला. पहात‌ा पहाता त्याचे शरीर काळे निळे दिसू लागले. राम अत्यंत दु:खित झाले. सुषेणवैद्याने हिमालयातील संजीवनी औषधीबद्दल सांगताच मारुतीराय त्वरेने उत्तरेकडे झेपावला. तो मनोवेगाने गेला व संजीवनी औषधी घेऊन मनोवेगानेच परतला. त्वरित केलेल्या संजिवनी उपचारांनी लक्ष्मणाचे प्राण वाचले. भक्त आपला आराध्याच्या सेवेला तत्पर हवा. 

८) चातुर्य व युक्तीचा वापर – अहिरावण व महिरावणांनी राम व लक्ष्मणांना पाताळात नेले. तेव्हा हनुमंत योगबळाने तेथे पोहोचले. देवी मंदिरात तो देवीच्या मूर्तीमागे लपून बसला. अहिरावण महिरावण राम-लक्ष्मणांना बळी देण्यासाठी देवी मंदिरात आले तेव्हा मारुतीराय प्रकट झाले व त्याने त्या दोघांचा समाचार घेत त्यांना मारले व राम-लक्ष्मणांची सुटका केली. 

९) सेवाकार्यात लौकिक गोष्टींना फाटा – हनुमंत द्रोणागिरी पर्वत घेऊन येत होता तेव्हा कालनेमी नावाच्या राक्षसाने त्याचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा खूप प्रयत्न केला. पण हनुमंत त्याला फसला नाही व मध्ये थांबला नाही. भक्ताने असेच लौकिकाला न भुलता निष्ठेने भक्ती करायला हवी. 

१०) आरामाची सवय नको – द्रोणागिरी घेऊन येताना वाटेत अयोध्या लागली. भरताने आपली ओळख देत थोडी विश्रांती घेण्याचा आग्रह केला, पण ‘आराम हराम आहे’ हे मनाशी पक्के असल्याने हनुमंताने नम्रपणे नकार दिला व तो पुढे निघाला. 

११ ते १३) भक्त निस्वार्थ असावा, निर्मत्सरी असावा, नम्र असावा, निर्लोभी असावा, निरपेक्ष असावा – अयोध्येला परतल्यावर बक्षिसादाखल दिलेला मोत्याचा हार हनुमंताने गळ्यात मिरवला नाही. तर प्रत्येक मोती फोडून तो तेथे आपल्या आराध्याचा शोध घेत राहिला. परंतु एकाही मोत्यामध्ये श्रीरामांचे दर्शन न घडल्यामुळे, अंतिमतः आपल्या छातीला छेद देऊन, त्याने तेथे विराजलेल्या श्रीराम-सीतेचं दर्शन घडवले ! असा होता सर्वश्रेष्ठ भक्त हनुमान ! याच भक्तीमुळे त्याला चिरंजीवित्व प्राप्त झाले होते. 

 

जय हनुमान ! जय चिरंजीव हनुमान !

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

गुणवंत हनुमंत

श्रीप्रभूराम व मारुतीराय अर्थात् हनुमंत यांच्यात एक फार सुंदर संवाद आहे. प्रभूश्रीरामांनाना आपला परीचय देताना हनुमंत म्हणतात, 

देहबुद्ध्या तु दासोऽस्मि जीवबुद्ध्या त्वदंशकः।

आत्मबुद्ध्या त्वमेवाहं इति मे निश्चिता मतिः।।”

देहबुद्धीने विचार केला तर मी आपला दासानुदास आहे. जीव (मी) या दृष्टीने विचार केला तर, आपण परमात्मा असल्याने मी आपला (एक) अंश आहे. (ममै वांशो जीवलोके जीवभूतः सनातन:।) आणि आत्मदृष्ट्या विचार केला तर (आपल्याशी सायुज्य प्राप्त झाले असल्याने) प्रभु, तुम्ही व मी एकच आहोत, अशी माझी दृढ धारणा आहे. हनुमंताच्या या स्व ओळखीतून त्याच्या बुद्धीमत्तेची चुणूक दिसतेच पण, त्याचा भक्तीयोगातला अधिकार देखील अधोरेखित होतो !

वाल्मिकी रामायणातून हनुमंताचे व्याक्तिचित्रण अति उत्तम झालेले आहे. अनेक गुणांचा समुच्चय त्याच्यात आहे. तो ‘बुध्दीमतां वरिष्ठ’ तर आहेच पण ‘ज्ञानीनां अग्रगण्य’ ही आहे. भक्ती, शक्ती, सेवा, नम्रता, वाक्पटुता, चापल्य, दूतकौशल्य, ब्रह्मचर्य, दास्य, रणपटुत्व अशा अनेकानेक गुणांचा समुच्चय त्याच्यात असल्याने प्रभूरामचंद्रांची व त्याची जेव्हा भेट होते, तेव्हा प्रभूरामचंद्रांच्या ते गुण लक्षात येतात व ते मुक्त कंठाने लक्ष्मणाजवळ त्याची प्रशंसा करतात. हा ‘दूत’ म्हणून उत्तम कामगिरी करू शकतो हे त्यांनी प्रथम भेटीतच हेरले.

दूत हनुमान : प्रभूरामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, “लक्ष्मणा ! बघ तरी, हा किती समर्पक बोलतो आहे. याच्या बोलण्यात चुकीचा शब्दप्रयोग अजिबात नाही. याचे बोलणे फार पाल्हाळाचे नाही, फार त्रोटकही नाही. फार घाईघाईचे नाही, फार संथही नाही. हा तोंडातल्या तोंडात पुटपुटत नाही व मोठ्या कर्कश आवाजात देखील हा बोलत नाही. अकारण अंगविक्षेप करीत, वेडे वाकडे हावभाव करीत हा बोलत नाही. याचा भाषीक डौल सुंदर व मोहक आहे. हा सुग्रीवाचा दूत म्हणून आला आहे. ज्याचे कार्य साधणारे ‘दूत’ अशा उत्तम गुणांनी युक्त असतील, त्या राजाचे सर्व मनोरथ दूताच्या संभाषण चतुराईने सिद्धीस जाऊ शकतात.” 

म्हणूनच सीता माईचा शोध घेण्याचे व दूत म्हणून शत्रूराज्यात (लंकेत) पाठविण्याची वेळ आली तेव्हा प्रभूरामचंद्रांनी हनुमंताकडेच ती जबाबदारी सोप‌विली. दक्षिण दिशेकडे निघालेल्या वानरचमूंपैकी त्यांनी हनुमंताला जवळ बोलावून त्याच्या जवळ सीतामाईला दाखविण्यासाठी आपल्या हातातील मुद्रिका (अंगठी) काढून दिली व तिच्यासाठी निरोप पाठविला. 


अंतर्मुख विवेकी हनुमंत: सागर उल्लंघून जाताना, वाटेतील अडथळे पार करीत हनुमंताने लंकेत प्रवेश केला. सीतामाईंना शोधत शोधत तो रावणाच्या राजवाड्यात गेला. रावणाच्या अन्त:पुरातील सुंदर स्त्रिया त्याने पाहिल्या. क्षणभर तो बिचकला पण त्याने विचार केला, मी ब्रह्मचारी ! आजपर्यंत मी कोणत्याही स्त्रीकडे पाहिले नाही. आज अचानक अनेक सुंदर स्त्रिया पाहिल्या, हे दूषण मला लागेलच. पण, प्रभूंचे कार्य करीत असताना हे अनवधानाने घडले.’ या विचाराने विवेकारूढ होत त्याने स्वत:ला सावरले, स्थिर केले साऱ्या स्त्रियांमध्ये मातृ‌भाव ठेवीत तो शांत होत पुढे निघाला.

निर्भय हनुमान : हनुमंताने आपले सर्वस्व, आपले कर्तृत्व, भोक्तृत्व  प्रभूरामचंद्रांच्या चरणी अर्पण केले होते. रावणापुढे आल्यावर तो स्पष्टपणे रावणाला सांगतो, सीताहरणाचे पाप व अधर्माची कृती तू केली आहेस. हे सर्वथा अयोग्य आहे. वाली वध, सुग्रीव व प्रभूरामचंद्राची भेट, राक्षस संहार या झालेल्या घटना लक्षात घे. अजूनही पुनर्विचार कर. सीतामाईंची मुक्तता कर. उदार मनाचे श्रीराम तुला क्षमा करतील. तेव्हा तू तुझे कल्याण करुन घे. शत्रूराज्यात प्रवेश करून, त्यांच्या प्रमुखाला असं निर्भयपणे सांगणे हे प्रचंड धाडसाचंच काम ! तसेच धोक्याचेही !!  पण हनुमंत ते निर्भयतेने उत्तम प्रकारे  पार पाडतो.

स्वामीनिष्ठ व प्रसंगावधानी हनुमंत : सेतूबंधनाचे वेळी वानर मोठमोठ्या शिळांवर रामनाम लिहित व त्या शिळा समुद्रात टाकीत. त्या तरंगत होत्या. ते पाहून रामानेही एक शिला रामनाम लिहून समुद्रात टाकली, तर ती न तरंगता खाली बुडाली. हनुमंत पटकन म्हणाला, प्रभो ! ज्यांनी आपला व आपल्या नामाचा आधार घेतला त्या शिला तरल्या. पण जिला साक्षात प्रभूंनीच टाकून दिले ती तरेल कशी ? ” हनुमंताच्या या उत्तरातून त्यांची स्वामीनिष्ठा तर दिसतेच पण त्यांचे प्रसंगावधान पण नजरेत भरते.

संघटन कौशल्यधारी हनुमान : हनुमंत हा ‘वानरयूथपती’ आहे. वानरांचा अग्रणी आहे. लंकेत असताना बिभीषणाच्या घराची पहाणी करून, तो धार्मिक, सत्यप्रिय, संस्कारशील आहे हे त्याने ओळखले होते. व जेव्हा बिभीषण प्रभूरामचंद्रांना शरण आला तेव्हा त्याच्या साधू वृत्तीची ग्वाही देत त्याला आपला पक्षात घेण्याबद्दल हनुमंताने आपली अनुकुलता दर्शवली. यामधून त्याच्या बुद्धीची सूक्ष्मता, सत्यासत्याचा विवेक, राजनीती व व्यवहारचातुर्याचे दर्शन होते. प्रभूंनीही ते ओळखून बिभीषणाला जवळ केले.

गुणपारखी हनुमंत : प्रभूरामचंद्रांची व भरताची चित्रकूटावर भेट झाली तेव्हा भरताने श्रीरामांना अयोध्येला येण्याविषयी खूप आग्रह करूनही त्यांनी त्याची समजून काढली. शेवटी भरत प्रभूरामचंद्रांच्या पादुका मस्तकी धारण करून अयोध्येला परतला. मध्ये चौदा वर्षे गेली तेवढ्यात भरताचे मन पालटले असेल का ? याची शहानिशा करण्याच्या नाजूक कामगिरीसाठी त्यांनी हनुमंतालाच पाठविले. हनुमंताने भरताचे तपस्वी जीवन पाहिले, तो प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची अंतःकरणपूर्वक वाट पहातो आहे, हे हेरून त्याने प्रभूंना त्याच्या प्रेमाची नि:संदिग्ध ग्वाही दिली! असा तो गुणपारखी आहे.

भक्त श्रेष्ठ हनुमंत : हनुमंत रामरायांचे भक्तश्रेष्ठ आहेत प्रभूरामचंद्र त्यांच्यावर अतिशय प्रसन्न होते. हनुमंता, तुझ्याखेरीज रावण वधाचे कार्य मी करूच शकलो नसतो असे ते हनुमंताला प्रेमभराने म्हणतात, त्याला बहिश्चर प्राण म्हणून गौरवतात. म्हणून आपल्या अवतार कार्याच्या समाप्ती प्रसंगी त्यांनी आपल्या या भक्तश्रेष्ठाला चिरंजीवपद देत त्याच्यावर सर्व रामभक्तांचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली. आणि ते, ही जबाबदारी उत्तम निभावीत आहेत. जेथे जेथे राम कथा असते तेथे तेथे ते सूक्ष्मरुपाने उपस्थित असतात. श्रीसमर्थांनी हे आग्रहाने सांगितले आहे की, 

पावावया रघुनाथ।जया मनी वाटे आर्त।

तेणे ध्यावा हनुमंत।घडवील रामभेट।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

मारुती उपासना नेमस्त

आपला संप्रदाय, स्वरूप संप्रदाय; आपले दैवत श्रीरघुनाथ आणि आपली उपासना मारूतीची, हे श्रीसमर्थांनी सुस्पष्टपणे सांगितले आहे. कोदंडधारी रामरायांचा आद‌र्श श्रीसमर्थांनी सर्व समाजापुढे ठेवला. श्रीरामरायांच्या चरणी, ज्यांनी आपल्या कृतीने भक्तीमार्गातील दास्य भक्तीचा मापदंड सर्वांसमोर प्रस्थापित केला, त्या श्रीमारुतीरायांची उपासना श्रीसमर्थांनी नेमस्तपणे केली. श्रीसमर्थ आणि मारुतीराय या दोघांची युगायुगांची परंपरा भविष्योत्तर पुराणात सांगितली आहे. 

कृते तु मारुताख्याश्च त्रेतायां पवनात्मजः।

द्वापरे भीमसंज्ञश्च रामदासः कलौयुगे।।

कृतयुगात जो मारूती या नावाने, त्रेतायुगात जो पवनात्मज नावाने, द्वापारयुगात ज्याला भीम असे संबोधले गेले, तेच कलीयुगात रामदास झाले. श्रीसमर्थ व मारूतीराय यांच्यात असे अद्वैत होते. अंतरीचे तत्त्व उभयतात एकच होते.

श्रीसमर्थांच्या जीवनकाळात त्यांनी मारूतीरायाची निस्सीम भक्ती केली व मारूतीरायांनीही त्यांना उदंड साथ दिली, मार्गदर्शन केलं. श्रीसमर्थ, अर्थात तेव्हाचा छोटा नारायण जेव्हा तीन दिवस; तीन रात्री उपाशीपोटी; तहानभूक विसरून रामरायांचा दर्शनासाठी अविचल बसलेला पाहून, मारूती मंदिरातील मारूतीरायांनीच मग प्रभूश्रीरामचंद्रांना दर्शन देण्याची विनंती केली. त्यानंतर प्रभूश्रीरामचंद्र प्रकट झाले. बाल नारायणास अनुग्रह देऊन, त्याला रामदासहे नाव देऊन, प्रभूंनी त्याला रामनामी शाल पांघरली. कानांत मंत्र सांगितला व त्याला मारूतीरायांकडे सोपवले. त्याला सांभाळा असा आदेश देत ते अंतर्धान पावले. तेव्हापासून मारूतीराय नारायणाच्या पाठीशी सदैव सज्ज होते. पुढे नारायणाला समाजात सन्मान मिळू लागला. श्रीसमर्थ अशी बिरुदावली प्राप्त झाली. शेवटपर्यंत त्या दोघांमधील अनुबंध अत्यंत मधुर राहिले. माझा सखा सहोदरही त्यांची उत्कट भावना होती, ते सतत मारुतीरायांना आळवीत राहिले.

तुजविण मज पाहें पाहतां कोण आहे।

म्हणउनि मन माझें रे तुझी वाट पाहे।।

मज तुज निरवीलें पाहिजे आठवीलें।

सकळिक निजदासांलागिं सांभाळवीलें।।

(कफनाशक हनुमान स्तोत्र)

बलभीमाच्या, मारुतीरायांच्या ठायी शक्ती; बुद्धी; युक्ती यांचा एकत्र संगम आहे. ते बुद्धिमतां वरिष्ठम्आहे तसेच ज्ञानीनां अग्रगण्यआहेत. कडकडीत ब्रह्मचर्य पाळणारे आहे. अशा मारूतीरायांचा आदर्श श्रीसमर्थांनी मनी मान‌सी जपला, समाजापुढे ठेवला व मारूती उपासना नेमस्त करण्याचा आग्रह धरला. ही उपासना त्रिविध प्रकारांनी सांगितलेली आहे.

आधिदैविक उपासना : त्रेतायुगात रावणाने पृथ्वीवर उत्पात माजविला होता. नवग्रहांना पालथे घालून त्यावर त्याने स्वत:चा मंचक ठेवला होता. देवांना पराभूत करून त्यांना बंदी बनविले होते. तेव्हा भयभीत पृथ्वीला अभय देत भगवान नारायणांनी एक योजना ठरविली. त्यासाठी महादेवांना मदतीचे आवाहन करीत म्हटले, “,देवाधिदेवा महा‌देवा ! मी अयोध्येचा राजपुत्र म्हणून राजा दशरथांच्या पोटी जन्म घेतो. आपण आपल्या अकराव्या अंशापासून अंजनी व केसरी यांचा पुत्र म्हणून वानर जमातीत अवतार घ्यावा.” अयोध्येला रामचंद्रांचा व अंजनीपुत्र हनुमंताचा वानर जमातीत जन्म झाला. हा रूद्रावतार, अधिदैवत मारुतीराय शंकरांचा अकरावा अंश; म्हणून श्रीसमर्थ संप्रदायात अकरा या संख्येला महत्व आहे.

आध्यात्मिक उपासना : श्रीराम हा भगवान विष्णूंचा अवतार तर मारूतीराय शिवशंकरांचा अवतार. श्रीरामांना जर आत्मा म्हटले तर मारूतीराय हा त्यांचा बहिश्चर प्राण ! येथे ज्ञानदेवांनी केलेला उल्लेख महत्वाचा आहे. त्यांनी देहातील कुंडलिनी शक्तीला मारूती म्हटले आहे. योगाच्या सहाय्याने मूलाधार चक्रापाशी असलेली कुंडलीनी शक्ती जागृत करून तिला उर्ध्वमुखी केले की, तिचा उलट दिशेकडे प्रवास सुरु होतो, तो सहस्त्रधार चक्रापर्यंत ! चैतन्याला आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलीनी केवळ प्राणवायूरूप होते. देह वायुरूप होतो, देह इतका हलका होतो की, आकाशातही संचार करू शकतो. मारुतीरायाचे हे आध्यात्मिकरूप आहे. याच रुपात त्याची उपासना करतात.

आधिभौतिक उपासना : यामध्ये मारुतीरायाची १) दास मारूती २) वीर मारूती ही दोन रूपे येतात. पैकी दासमारुती श्रीरामांसमोर दास होऊन हात जोडून उभा असतो. नवविधा भक्तीतील दास्य भक्तीचा तो आदर्श आहे. वीर मारूती म्हणजे दुष्ट विचार व दुष्ट शक्ती यांना चिरडून टाकणारा. वीर, पराक्रमी, साहसी, निर्भय असे हे मारूतीरायाचे रूप आहे. श्रीसमर्थांनी तत्कालीन समाजाची हरवलेली वा लोप पावलेली अस्मिता पुन्हा जागृत करण्यासाठी मारूतीरायाच्या ह्या रूपाची खूप भलावण केली आहे. धर्म संस्थापना करणे हेच श्रीसमर्थांचे मुख्य उद्दीष्ट होते. त्यासाठी रुद्रावतारी मारूतीरायाची उपासना त्यांनी नेमस्तपणे केली व समाजालाही सांगितली.


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

अंजनीसूत हनुमान – बाललीला व वैज्ञानिक अर्थ

हनुमंताची जन्मकथा फार अद्भूत आहे. इंद्राच्या दरबारात पुंजिकास्थला नावाची सुंदर अप्सरा होती.  होती गुणी पण मनाने मात्र चंचल! एकदा दरबारात एका मुनींकडे पाहून ती अकारणच हसली. आता तपस्वी मुनीच ते! त्यांना तिचा थिल्लरपणा काही आवडला नाही. त्यांनी तिला रागाने शाप दिला. चंचळ स्वभावाची आहेस, तर आता वानरीच होशील. शाप ऐकल्यावर पुंजिकास्थला नरमली. तिने मुनींकडे क्षमेची याचना केली. तेव्हा मुनी म्हणा‌ले, “माझ्या शापानुसार तुला वानरी तर व्हावेच लागेल, पण तू क्षमा मागते आहेस म्हणून, तुला सांगतो की, तू चिरंजीव पुत्राची माता होशील व त्याची माता म्ह‌णूनच जग तुला ओळखेल.” 

पुंजिकास्थला वानरी बनली, त्या वानरीचे नाव अंजनी. तिचा विवाह केसरी नावाच्या वानराशी झाला. केसरी हा सुमेरू पर्वताचा राजा होता. अतिशय पराक्रमी. दोघांच्या विवाहानंतर बराच काळ झाला तरी त्या दंपतीला संतान प्राप्ती झाली नाही. मग अंजनीने मतंग ऋषींच्या मार्गदर्शनाप्रमाणे वायूदेवता व भगवान शंकरांची आराधना सुरु केली. तिच्या तपस्येचा प्रसाद म्हणून “रूद्राच्या अकराव्या अंशापासून वायूची गती प्राप्त असलेला तेजस्वी पुत्र तुला मिळेल”, असा शिवशंकरांचा वर तिला मिळाला. योग असा विलक्षण आला की, त्याच वेळी राजा दशरथाने केलेला पुत्रकामेष्टी यज्ञात प्रत्यक्ष प्रकट झालेल्या अग्नीने राजाला पायसाचे दान केले. ते तीन राण्यांना वाटून द्यायचा होते. तसे पायसाचे दान कौसल्याराणी व सुमित्राराणी ह्यांना मिळालेही. कैकयीराणी तिचा वाटा घेणार तेवढ्यात सुर्कला नावाची शापीत अप्सरा घारीच्या रूपात घिरट्या घालीत होती, तिने पायसावर झडप घातली व त्या पायसाचा काही भाग घेऊन ती उडाली आणि अंजनीच्या ओंजळीत तिने तो भाग टाकला व ती शापमुक्त झाली!

इकडे वायुदेवतेने सांगितल्यावर अंजनीने तो पायसाचा भाग भक्षण केला. चैत्र महिन्याच्या पोर्णिमेला अगदी सूर्योदयालाच्या वेळी तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. हा महादेवाचा (रूद्राचा) अकरावा अंश मारूती. ह्या बाळाला जन्मजात कटीला सुवर्ण कासोटी होती. मस्तकावर मुकूट होता व हातात सुरेख काकणे होती. बाळाला भूक लागली होती. तेवढ्यात बाळाला उगवणारा सूर्य दिसला. त्याला ते लालचुटूक फळ वाटले. मग काय ? बाळाने उंच उड्डाणच केले व तो सूर्याच्या दिशेने झेपावला. त्याच वेळी ग्रहणकाळ असल्याने सूर्याला ग्रासायला राहूही आला होता. राहू व जन्मलेल्या बाळाचे भांडण जुंपले. राहूचे बाळापुढे काही चालेना. त्याने इंद्रदेवाची प्रार्थना केली. इंद्राने आपले वज्र मारूतीवर फेकले, ते मारुतीच्या हनुवटीवर आदळले व हनुवटी भंग पावली व मारूतीला नाव मिळाले हनुमंत !(हनुवटी भंग पावलेला)

बाल मारूतीच्या लीला अपूर्वच ! तो ह्या पर्वतावरून त्या पर्वतावर सहज उड्या मारी. इतरांनी शोधावा म्हणून झाडांच्या डेरेदार फांद्यामध्ये लपून बसे. सर्वजण शोधून दमत. मग हा एकदम मोठ्याने हसत “मी इथे आहे” म्हणत बाहेर येई. त्याला कुणी धरायला जाई, तर हा परत आकाशात झेप घेई. एका ठिकाणी स्थिर बसेल तर शपथ ! सारखी धावाधाव, पळापळ चाले. मोठमोठी झाडे तो सहज उपटून् टाकी. त्यांच्या मोडण्याचा कडाड आवाज येई. मग हा मोठ्याने हसे. त्याच्या गतीला तर सीमाच नव्हती. वाऱ्याच्या वेगाने  धावत सुटे. कुठे कुठे विवरात लपून बसे. असा हा हूड, धावणारा, पळणारा, लपणारा, सर्वांना दमवणारा खोडकर बाल मारुती!

मारूतीच्या बाललीलेत, नुकत्याच जन्म घेतलेल्या मारूतीला सूर्यबिंब जणू फळच आहे असे वाटून ते खावेसे वाटते. तो लालचुटूक सूर्यबिंबाच्या दिशेने झेपावला असे वर्णन आहे. हे वर्णन मानवी बुद्धीला न पटणारे आणि शारीरिक क्षमतेला न झेपणारे असेच आहे. पण वैज्ञानिक सत्याचा आधार घेऊन या कथेचा उलगडा करता येईल. कसा ? तो पाहूया. मारूती म्हणजे मरूत, म्हणजेच वारा. क्षणात कुठेही आणि कसेही उडणे हे केवळ वाऱ्यालाच शक्य आहे. वाऱ्याचीही अफाट शक्ती मारूतीच्या रूपात आपल्यापुढे आली. सुर्याच्या जवळ जाताजाता तो बेशुध्द पडतो ? वातावरणाच्या बाहेरील निर्वात पोकळीत वारा पोहचू शकत नाही; परिणामी बेशुद्धी येते. हा त्या कथेमागचा वैज्ञानिक अर्थ आहे! 

आपल्या पूर्वजांना निसर्गाची अफाट ताकद म्हणजे एक चमत्कार वाटला असावा. म्हणूनच निसर्गातील अग्नि, वारा, पर्जन्य आदि शक्तींना देवता स्वरूप देऊन त्यांच्या पराक्रमाच्या कथा गुंफल्या गेल्या असाव्यात. आजच्या विचारवंतांच्या मते आपल्या प्राचिन परंपरा, आप‌ली दैवत यामागे निश्चित असा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे, कार्यकारण भाव आहे. मात्र पूर्वजांनी त्याकाळच्या जनमानसाला झेपेल अशा भाषेत तो सांगितला आहे.

एक खरं की, या देवतांच्या सामर्थ्याचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी, प्रबोधनासाठी मोठ्या चातुर्याने करणारे श्रीसमर्थांसार‌खे आपले पूर्वज तेवढेच कल्पक व प्रगतीशील म्हणायला हवेत. श्रीसमर्थांचा तेरा मारुती स्तोत्रातून याचीच प्रचिती आपल्यासा सतत येत रहाते.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

भगवती सीता

भारतीय जीवनाचा अंतीम आदर्श म्हणजे सीता ! महात्मा गांधीना प्रार्थनेनंतर एकीने प्रश्न विचारला की, “आम्ही स्त्रियांनी आमच्या जीवनात कोणाचा आदर्श ठेवावा ?” गांधीजी म्हणाले, “तुम्हीच काय पण जगातील कोणत्याही स्त्रीने सती सीतेचा आदर्श ठेवावा.” लगेच तिने विचारले की, “पुरुषाने रामाचा आदर्श ठेवावा का ?” गांधीजी “नाही” म्हणाले. पुढे ते म्हणतात, “माझा असा विश्वास आहे की सीतेच्या जीवनातून राम जन्माला येतो. रामाच्या जन्मासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.” 

जनकराजांना एकदा भूमी नांगरताना एक लाकडाची पेटी मिळाली. त्यात अत्यंत सुंदर, तेजस्वी मुलगी होती. नांगराच्या फाळाच्या टोकाला सीत म्हणतात. भूमीत सीत अडकून पेटी मिळाली म्हणून नाव पडले सीता. जनकाची मानसकन्या म्हणून जानकी, मिथिलेची राजकन्या म्हणून मैथिली आणि विदेहराजाची लाडकी कन्या म्हणून वैदेही! 

रामायणात सीतेचा उल्लेख प्रथम सीता स्वयंवराच्यावेळी आला. राम लक्ष्मण मिथिलेत विश्वामित्रांबरोबर आले असताना, दोघे भाऊ गुरुदेवांना पूजेसाठी फुले आणायला म्हणून बागेत गेले होते. तिथे राम-सीता प्रथम भेटले. पाहता क्षणीच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. स्वयंवरासाठी जनक राजाने एक कठीण पण लावला होता. शिवधनुष्याला जो भंग करेल त्याला सीता द्यावयाची. शिवधनुष्याला उचलणे महा सामर्थ्यवान मनुष्याला देखील शक्य नव्हते. परंतु रामाने त्याचा भंग केला. सुवर्णासारख्या तेजस्वी व्यक्तीला जनकाने सीतेसारखे लावण्यरत्न अर्पण केले. 

दांपत्य जीवनाचे सर्व गुण राम-सीतेजवळ होते. राम-सीता सामान्य व्यक्ती नव्हत्या. रामापुढे सीतेला जगातल्या सर्व गोष्टी, स्वर्ग आणि मोक्ष सुद्धा तुच्छ होत्या. रामाची सुद्धा सीतेविषयी तीच भावना होती. सासरी जाताना सीतेची आई, सुनयनाने केलेला उपदेश खूप छान आहे.

१. घरातील सर्व मोठ्या लोकांची सेवा कर.

२. ‘सम्राज्ञी श्वशुरे भव’ – तू घराची सम्राज्ञी व्हावेस.

३. रामाने दुसरे लग्न केले तरी तू सवती बरोबर बहिणीसारखी वाग.

४. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असे समजू नकोस.

५. एखाद्या गोष्टीला जर तुझ्या पतीने नकार दिला तर एकदम चिडू नकोस. तू शांत रहा.

६. हात उदार ठेव.

७. अन्नदान उत्तम दान समज.


एक मुलगा चांगला निघाला तर कुळाचा उद्धार होतो पण एक मुलगी चांगली निघाली तर ती दोन्ही कुळांचा उद्धार करते. अयोध्येत आल्यावर राम सीतेने बारा वर्ष तेजस्वी संसार केला. जगात सौंदर्य आणि गुण एकत्र आलेले क्वचितच पहायला मिळतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सीता ! सीता तिन्ही सासवांची लाडकी सून होती. सर्वांनाच ती आदर्श स्त्री वाटायची. 

सीतेच्या महालात, राम ‘वनात जायला निघालो’ हे सांगायला आणि तिचा निरोप घ्यायला जातो. अगं सीते, मला आता अयोध्येचे नाही; वनाचे राज्य मिळालं आहे; हे सांगताना कधीचे आवरून धरलेले अश्रू रामाच्या डोळ्यात आले. ते बघून सीता रामाला म्हणते, “अहो, रडता कशाला ? जेथे राघव तेथे सीता ! तुम्ही बरोबर असल्यावर अयोध्या काय किंवा वन काय ? दोन्हीही सारखेच. नाथ ज्या दिवशी दैवाने तुमच्याशी माझी गाठ घालून दिली ती सुखदुःखात साथ देण्यासाठीच. जंगलातल्या वाघ सिंहाची भीती मला दाखवू नका. बाहुबलाने, एका स्त्रीचे रक्षण करायला असमर्थ असल्यामुळे राम सीतेला वनात बरोबर घेऊन गेला नाही; अशी बेअब्रू होऊ नये म्हणून मला यायलाच हवे.” राम म्हणतो, “माझ्या बरोबर यायचे असेल तर सर्व संपत्ती त्यागावी लागेल.” भारतातील पतिव्रता दुबळी नाही. सीतेने सर्व संपत्तीचे दान दिले परंतु, राजस्नुषा असल्यामुळे वसिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे सीता सौभाग्य अलंकार घालून बाहेर पडली.

गंगापार केल्यावर केवटाला द्यायला हातातील अंगठी काढून सीतेने रामाला दिली. वाटेत ते अत्रि-अनुसूयेच्या आश्रमात येतात. अनसूया सीतेला विचारते, “काय देऊ ?” सीता म्हणते, “मला काही नको. ज्याला काही कमी असते ती मागते. पतीच्या सहवासात माझ्या जीवनात कोणतीच उणीव नाही. मी क्षत्रिय आहे, दान घेण्यासाठी माझा हात खाली येणार नाही. दान देण्यासाठी हात वर राहील” असे बाणेदार उत्तर सीता देते. 

सीतेच्या बुद्धीप्रगल्भामुळे रामाला अनेक वेळा तिच्याबरोबर शास्त्रार्थांची, सिद्धांताची चर्चा करावी लागत असे. रावण सीतेला घेऊन जातो त्यावेळी रावण सीतेला म्हणतो, “राम क्षुद्र आहे, मी किती मोठा आहे. लंकेत सर्व देव माझी शुश्रुषा करीत आहेत.” सीता म्हणते, “तू कोल्हा आहेस पण मी सिंहीण आहे. देव तुला मारू शकत नसले तरी सुद्धा माझा राम तुला मारील.” केवढी निर्भयता ! रामाच्या सामर्थ्यावर केवढा विश्वास !! 

आत्यंतिक धर्मनिष्ठ आणि उत्कट कर्तव्यनिष्ठ असल्यामुळेच सीता रघुकुळाची अब्रु वाचविण्यासाठी रावणाला दान द्यायला जाते व त्याच्या तावडीत सापडते. तिच्याकडे मूर्खपणा, वेडेपणा, भोळेपणा नसून ती विचारी होती. ती कोठे आहे, हे रामाला कळावे म्हणून, ती आपले नुपूर, दागिने वगैरे रस्त्याने टाकत जाते. रावणाला कधी सीता घाबरली नाही. त्याच्याशी बोलताना सीता हातात समोर काडी धरायची, याचा अर्थ तू मला कस्पटा समान आहेस ! ती त्याच्या डोळ्याला डोळा लावून बोलायची नाही. रावणाला एकदा ती म्हणाली, “तू काजवा आहेस. सूर्यासमान असणाऱ्या माझ्या पतीशी काय तुलना करतोस ?” एकदा म्हणाली, “मी राजहंस आहे, आणि तू डोमकावळा आहेस.” अशोकवनात तिच्या अवतीभवती दुष्ट, अक्राळ विक्राळ राक्षसिणी असूनही ती त्यांच्याशी हिंमतीने वागे. रावण वधानंतर हनुमान सीतेला म्हणतो, “आई, मी सर्व राक्षसिणींना मारून टाकतो.” तर ती म्हणते, “त्यांची काय चूक ? त्या सगळ्या हुकमाच्या ताबेदार आहेत.”

सीता सौजन्यमूर्ती होती, तितकीच ती हृदयाची उदारही होती. रावण वधानंतर रामाने तिच्याविषयी अविश्वास प्रगट केला. खरंतर सीता शुद्ध, पवित्र आहे हे रामला माहित होते; पण सोन्याची परीक्षा रामाला दाखवायची होती. सीता रामाला म्हणते, “तुम्हाला माझा जर त्याग करायचा होता, तर तसा निरोप हनुमानाबरोबर पाठवायचा होता; म्हणजे मी माझ्या जीवनाचा त्याग केला असता. म्हणजे तुमच्यावर इतका त्रास, इतके दुःख सहन करण्याची पाळी आली नसती. लंकेला यावेच लागले नसते.” सौजन्यमूर्ती सीतेला पाहून मस्तक विनम्र होते व रामापेक्षाही सीतेचे चरित्र दिव्य आहे असे वाटते. 

लोकापवाद टाळण्यासाठी राम सीतेचा त्याग करतो. सीता म्हणते, “ज्या कर्तव्यनिष्ठेमुळे रामाने माझा त्याग केला त्या पौरजनांशी तुम्ही प्रेमाने वागा. त्यांच्यावर रागावू नका. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. “वाणीमध्ये काय तेज आहे सीतेच्या !! 

लव कुशांसाठी सीता परत अयोध्येत येते व भयंकर मोठी प्रतिज्ञा करते. 

मनसा कर्मणा वाचा यदी राम समर्चये ।

तदा मे माधवी देवी विवरं दातु मर्हति ।।”

कर्माने, मनाने आणि वाणीने मी दुसऱ्यावर प्रेम केले नाही. हे सीतेचे जाज्वल्य चारित्र्य सांगते. इतक्यात सिंहासन घेऊन भूमीतून वसुंधरा बाहेर येते. सीता भूमी प्रवेश करते. अश्यातऱ्हेने सीतेचा अंतही अलौकिक आहे. तिचे बलिदान हा अमर व दिव्य करुण प्रसंग आहे. जोपर्यंत सत्य आहे तोपर्यंत रामायण आहे. जोपर्यंत रामायण आहे तोपर्यंत सीता आहे. त्या कोमल पुष्पाचा सुगंध पूर्वीपासून दरवळतो आहे. पुढेही असाच दरवळणार ! त्या भगवती सीतेला माझा नमस्कार !


।। जानकीजीवन स्मरण जयजय राम ।।

भरत

रामायणामध्ये रामानंतर मुख्य चरित्र भरताचे आहे. याचे कारण लक्ष्मण ही रामाची सावली आहे. लक्ष्मणला स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व नव्हते, त्याने आपले असामान्य व्यक्तिमत्व रामात विलीन केले होते. राम लहान भावासाठी राज्य सोडून वनात गेला, परंतु रामापेक्षाही भरताचा त्याग मोठा आहे. राज्य गादी प्राप्त होऊनही रामासाठी भरताने त्याग केला. जणूकाही दोन भावांमध्ये त्याग-निर्लोभता यांची शर्यतच लागली आहे. अश्यातऱ्हेची शर्यत फक्त रामायणतच बघायला मिळते. जगात राज्याकरता भांडणे, खून, मारामाऱ्या पहायला मिळतात. परंतु इथे एक म्हणतो, “तू घे” आणि दुसरा म्हणतो, “छे, तू घे” भांडणातही केवढी दिव्यता!!

चारित्र्यनिष्ठा, कुलाभिमान आणि कर्तव्यनिष्ठा हे तीन गुण भरताच्या जीवनात आहेत. भरत आजोळहून परत आल्यावर बाबा गेल्याची वार्ता त्याने ऐकली. कैकेयीला जाऊन त्याने विचारले, “आई, बाबा जायच्या वेळी कोण कोण जवळ होते ?” ती उत्तर देते की ‘राम राम’ म्हणत ते गेले. ह्या उत्तरावरून भरत ओळखतो की त्यावेळी राम, लक्ष्मण आणि सीतावहिनी जवळ नव्हते. पुढे कैकेयी त्याला सांगते की, राम; लक्ष्मण आणि सीता यांना वनवासात पाठविण्यात आले आहे. भरत अत्यंत बुद्धिमान, विवेकी आणि भाऊक आहे. तरीही बाबा गेल्याचे अश्रू पुसून विचारतो की, रामाकडून एखाद्या ब्राह्मणाचा वध झाला का ? गोहत्या झाली का ? त्याने परस्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितले का? कैकेयी रागाने ओरडून म्हणते, “अरे, कोणाबद्दल तू विचारतो आहेस? राम अश्या प्रकारचे अपराध कधीतरी करेल का? परस्त्रीकडे वक्र दृष्टीने बघेल का? हेच रामाचे वैशिष्ठ्य आहे.” पूजकाने स्तुती करावी ह्यात विशेष काय? पण जिने रामाला चौदा वर्षे वनवासात पाठविले तिचे हे उद्गार आहेत. 

भरताचं व लक्ष्मणाचं रामावर खूप प्रेम आहे. लक्ष्मणाचं प्रेम व्यक्तिनिष्ठ आहे. राम कसंही वागो तो माझा आहे हा लक्ष्मणाचा भाव. भरताचं प्रेम व्यक्तिनिष्ठ नाही. रामामध्ये सर्व प्रकारचे सद्गुण आहेत. राम धीरोदात्त आहे. तो परिपूर्ण आहे. या त्याच्या गुणांमुळे भरत रामाचा पूजक, सेवक आहे. भरताला आपल्या वंशाचा खूप अभिमान आहे. वरील पैकी एखादा अपराध जर रामाच्या हातून घडला असला तर लक्ष्मण रामाला सोडून गेला नसता. भरत मात्र रामापासून दूर गेला असता. खरं म्हणजे भरताला कोणी ओळखलंच नाही. दशरथ, कैकेयी, भरद्वाजमुनी, कौसल्या, गुह आणि लक्ष्मणापैंकी कोणीही नाही. फक्त राम आणि वसिष्ठांनी त्याला ओळखलं होतं. भरताने कैकेयीला विचारलं, आई, तुला वाटलंच कसं मी रामाला डावलून राज्याभिषेक करून घेईन. कौसल्येलाही भरत म्हणतो, “आई, मला राजा बनायचं नाही. मी रामाला आणायला चाललो आहे.” दुसऱ्या दिवशी भरताच्या महालाबाहेर सनई चौघडे वाजायला लागतात. भरत ते सर्व बंद करतो. दुसऱ्या दिवशी राज्यसभेत गेल्यावर भरत म्हणतो, हे सिंहासन दादाचं आहे. त्यावर  बसण्याचा अधिकार मला नाही. मी उद्या दादाला आणायला निघणार व त्याला परत आणून सिंहासनावर बसवणार. लोकांनी आनंदाने टाळ्या वाजवून जयजयकार केला.

निषादराज गुहाने भरताशी लढायची तयारी केली कारण भरत सैन्य घेऊन निघाला होता. उलट, जिथे रामाने चिक लावून जटा केल्या तसेच भरतानेही केले. पुढे भरद्वाजांनी त्यांच्या आश्रमात सर्वांसाठी जेवणाची, रहाण्याची उत्तम व्यवस्था केली होती. पण भरत मात्र जिथे राम झोपले होते त्या झाडाखाली सिताराम सिताराम म्हणत बसला होता. त्याची विरक्ती पाहून भरद्वाज म्हणाले “भरता, आयुष्यभर केलेल्या उपासनेचे फळ म्हणून मला रामसीतेचे दर्शन झालं व भगवंताच्या दर्शनाचं फळ म्हणून आज तुझ्यासारख्या भक्ताच दर्शन झालं.”  

सर्व प्रजानन, तीन माता, वसिष्ठ, दोन भाऊ, त्यांच्या बायका श्रीकामगिरी पर्वत चढू लागले. लांबून लक्ष्मणाने पाहिले व तो युद्ध करायला सज्ज झाला. रामाच्या सर्व लक्षात आले. राम म्हणाला, अरे, भरत मला मारायला किंवा लढायला नाही, न्यायाला आला आहे. रामाने परत यावे म्हणून भरताने खुप युक्तिवाद केला. हा युक्तिवाद वाल्मिकी रामायणामध्ये वाचण्यासारखा आहे. शेवटी ‘चौदा वर्षे भरताने राज्य करावे, रामाने आपल्या पादुका द्याव्यात’ असे ठरले. “कैकेयी मातेला, भरता; अपशब्द बोलू नकोस”, असे रामाने सांगितले. सगळे जण अयोध्येला परतले. नंदीग्रामात झोपडी बांधून, वल्कल नेसून, कंदमुळे खाऊन भरत रामासारखे जीवन जगू लागला. भरताने विचारलं, ह्या पादुकांचा राज्याभिषेक शास्त्रानुसार करता येतो का ? वसिष्ठ म्हणाले, आजोळहून परत आल्यापासून, मी तुला बारकाईने बघत आहे. तुला शास्त्र बघण्याची गरज नाही. तुझ्या आचरणाप्रमाणे शास्त्रं वागतील. रोज पादुकांचे यथासांग पूजन करून, प्रत्यक्ष राम सिंहासनावर बसले आहेत असे समजून, दिवसभराच्या झालेल्या घटना सांगायच्या. हा अयोध्येचा स्वामी सवल्कल जटाधारी असून वनवासी जीवन जगतोय. जो जितका महान त्याने उपभोगांपासून दूरच रहावे हीच मूळ भारतीय धारणा आहे.

दशरथ राजाच्या चारही मुलांची नावं वसिष्ठांनी ठेवली. पहिल्याचे राम तर दुसऱ्याचे भरत. चातकत्व व हंसत्व याचा संगम आपल्याला भरत चरित्रात बघायला मिळतो. आपल्या भक्तीत काही कमतरता वाटली तर भरताच्या चारित्र्याच चिंतन करावं. भरताचं चरित्र अनुकरणीय आहे. चौदा वर्षानंतर राम परतल्यावर रामाने हनुमानाला भरताकडे पाठवले व त्याचे भाव कसे आहेत याचे निरीक्षण करायला सांगितले. चौदा वर्षे पुरी झाल्यावर दोघांची जेव्हा भेट होते त्यावेळी राम कोणता व भरत कोणता हे ओळखताही येत नव्हते. कारण दोघेही तपस्वी, चारित्र्यनिष्ठ, कुलाभिमानी, संस्कृतीचे उपासक, कर्तव्यनिष्ठ. दोन शरीरे आत्मा एकच म्हणा ना ! चारित्र्याची भव्यता आणि भातृप्रेम यांच्यापुढे वाल्मिकींची लेखणी सुद्धा थिटी पडली…..! 

लक्ष्मण व भरत अतिशय प्रेमळ. दोघेही परम भक्त आहेत. एकाला संयोगाचे भाग्य तर दुसऱ्याला वियोगाचे. भरताने ईश्वरापासून दूर राहून निष्ठेने काम केले आहे. चौदा वर्षे नंदीग्रामात राहून ‘इदं न मम’ या वृत्तीने जीवन जगला आहे. 

आहे तितुके देवाचे।ऐसे वर्तणे निश्चयाचे।

मुळ तुटे उद्वेगाचे।येणे रिती।।

आपण भरताचा आदर्श जीवनात कायम ठेवला पाहिजे. निष्काम होऊन ईश्वरी कार्यात निर्लोभ अंतःकरणाने तुटून पडायला हवे. निर्लोभ अंतःकरणाने भरताने जीवनभर जे केले ते आपण शिकायला हवे. साधनेचे शिखर म्हणजे लक्ष्मण ते कदाचित आपल्याला जमणार नाही, पण आपल्याला भरताकडून खूप काही शिकता येईल. 

भारतात एकंदर तीन भरतांची पूजा – उपासना होते

१ . रामायणातील भरत 

२. महाभारतातील भरत म्हणजे दुष्यंतचा मुलगा. अत्यंत शूर. लहानपणी तो सिंहाचे दात मोजायला निघाला. ज्याच्यामुळे आपल्या देशाचे नाव भारत पडले.

३. भागवतातील जडभरत – अत्यंत विद्वान राजर्षी.

भरतामुळे रामायणाला शोभा आली आहे. भरत केवळ रामायणाचा नव्हे तर जगातील संपूर्ण सांस्कृतिक वाङ्मयाचा दागिना आहे. वाल्मिकींनी हा अनुपम आदर्श पुढच्या संस्कृती पूजकांसमोर ठेवला आहे. अश्या या बुद्धिमान, कर्तृत्ववान, शीलवान, गुणवान भरताला माझा नमस्कार. 

लक्ष्मण

राजा दशरथाला चार मुले होती. कौसल्येचा राम, कैकेयीचा भरत आणि सुमित्रेचे लक्ष्मण व शत्रुघ्न. राम–लक्ष्मण जोडी होती तर, भरत–शत्रुघ्न जोडी प्रसिद्ध होती. या चारही पुत्रांची नावं महर्षी वसिष्ष्ठांनी ठेवली होती. ज्येष्ठ सुमित्रानंदनाचे नामकरण केले लक्ष्मण! ‘लक्ष्मीवान स लक्ष्मणः’ याचा अर्थ वाल्मिकींनी ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे तो लक्ष्मण असा सांगितला. त्याच्याकडे एकच संपत्ती होती ती म्हणजे दास्यलक्ष्मी ! कैकर्य हीच लक्ष्मणाची संपत्ती. लक्ष्मी म्हणजे शोभा, ज्याचे जीवन केवळ कैकर्याने सुशोभित केले आहे. एका रामाशिवाय लक्ष्मणाने कशाचेही चिंतन केले नाही. जे रामाला अनुकूल ते लक्ष्मणाला अनुकूल. जे जे रामाला प्रतिकूल, ते मग कोणीही असोत, माता-पिता का असेनात ते लक्ष्मणाचे शत्रू! राम जेव्हा वनवासाला जायला निघाला तेव्हा लक्ष्मण पण बरोबर निघाला, तेव्हा रामाने लक्ष्मणाला सांगितले जा तुझ्या आईला विचारून ये. लक्ष्मण म्हणतो, 

मातारामो मत्पिता रामचंद्रः !

रामाला वडिलांमुळे वनवासात जावे लागले आहे हे कळल्यावर तो म्हणतो “बाबांना तुरुंगात टाका.” रामानेच अयोध्येच्या सिंहासनावर बसले पाहिजे. वनवासात जाताना त्याला आपल्या बायकोला म्हणजे उर्मिलेला भेटावेसे देखील वाटले नाही. कुठलीही भक्ती माणसाला वेडी करते. देशभक्तांचे जीवन आठवा. लक्ष्मण म्हणजे रामाचा बहिश्चर प्राण आहे. लक्ष्मणाचे चरित्र भव्यदिव्य आहे. रामाबरोबर लक्ष्मणाचा कधी संघर्ष झाला नाही. विश्वामित्राने दशरथाजवळ केवळ रामाचीच मागणी केली होती. पण लक्ष्मण रामाबरोबर गेलाच. त्याला वेगळ्या निमंत्रणाची गरज नव्हती. माणसाला बोलवल्यावर त्याची सावली देखील सोबत येते तसेच रामाबरोबर लक्ष्मण येणारच. लक्ष्मण रामाचा उजवा हात होता. दोघांची जोडी खरी. रामात लक्ष्मण आलाच! रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी राम असे नाही म्हणत की “मी राजा होणार.” उलट राम म्हणतो की, “लक्ष्मणा तुलाच राज्य करायचे आहे.” किती ही उच्च भावना! लक्ष्मण मूर्च्छित झाल्यावर राम म्हणतो,

नहि मे जीविते नार्थः सीतया वाजयेन वा।

कोहिमे जीविते नार्थः त्वयिपंचत्वमागते।।

देशे देशे कलत्राणी देशे देशे च बांधवाः।

तं तु देशं न पश्यामी यत्र भ्राता सहोदरः।।

राम शब्द तर लक्ष्मण अर्थ. राम म्हणतो सीता मिळाली नाही तरी चालेल परंतु जर लक्ष्मण गेला तर माझा प्राण जाणारच. ‘यत्र भ्राता सहोदरः’ राम कौसल्येचा तर लक्ष्मण सुमित्रेचा असूनही राम सहोदरः म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले असे म्हणत आहे. लक्ष्मण अतिशय पराक्रमी होता. राक्षसांना मारण्यात त्याचा मोठा सहभाग होता. रामाने रावणाला मारले ह्यात काही विशेष नव्हते, कारण रावणाचा अनेक वेळा पराभव झालेला होता. परंतु लक्ष्मणाने इंद्रजिताला मारले जो अजिंक्य होता. जीवनात इंद्रजिताने कधीही पराभव पाहिलेला नव्हता. अजिंक्य इंद्रजिताचा पराभव महापराक्रमी व बुद्धिमान लक्ष्मणाने केला होता. त्याची बुद्धी अती सूक्ष्म विषयाचा निर्णय करीत असे. राजधर्माच्या बाबतीतील त्याची भाषणे अतिशय श्रेष्ठ आहेत. चौदा वर्षाचा वनवास हा रघुकुळाला शोभणारा नाही त्यामुळे राजगादीच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार आहे. दशरथाला कैदेत टाकावे आणि रामाला गादीवर बसवावे ही त्याची मनिषा होती. राम म्हणाला ही गोष्ट योग्य नाही, हे ऐकल्यावर बोलणे संपले मग नंतर प्रश्न नाही की विचार नाही.  Not to question why? But to do and die! 

खरोखर लक्ष्मणाच्या जीवनाचा अवर्णनीय, अद्भुत आणि अनुकरणीय आदर्श मानव जातीसमोर आहे. भरत सैन्यासह वनात आलाय म्हणजे नक्कीच हा रामाला मारायला आला असेल ना ! असे समजून लक्ष्मण धनुष्य बाण घेऊन भरताला मारायला निघतो. तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणतो, “अरे, भरत मला मारायला नाही तर परत न्यायाला आला आहे, भाऊ कधी भावाला मारेल का ? तुला राज्य हवंय का ?” लगेच लक्ष्मण वरमतो. हीच गोष्ट त्याच्या हृदयाची श्रीमंती दाखवते. 

लक्ष्मण अत्यंत कडक स्वभावाचा होता, परंतु त्याचबरोबर त्याच्याजवळ अंतःकरणाचे औदार्यही होते. अलौकिक चारित्र्य हा रघुकुलाचा परिपाक होता, प्रतिष्ठा होती. लक्ष्मणाचे चारित्र्य अत्यंत दैदिप्यमान आहे. सीतेचे दागिने ओळखण्याचा प्रसंग येतो त्यावेळी दुःखी झालेला राम लक्ष्मणाला विचारतो की सर्व दागिने सीतेचेच आहेत ना? 

नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले।

नूपुरेत्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात्।।

हे वाचल्यावर लक्ष्मणाविषयीची असलेली आपली आदर भावना द्विगुणित होते. अत्यंत पराक्रमी असूनही रामात स्वतः मिळून जाणे हा त्याचा मोठेपणाच आहे.  सीतेला वनात सोडायचे काम रामाने लक्ष्मणावर सोपवले होते, लक्ष्मणाला ते मुळीच पटले नव्हते. सीता कायेने, मनाने शुद्ध आहे ह्याची लक्ष्मणाला खात्री होती. पण रामाची आज्ञा तो टाळू शकला नाही.  

मारीचीच्या आवाजाने सीता बेचैन होते व रामाच्या मदतीला जा असे लक्ष्मणाला सांगते. लक्ष्मणाने मारीचीचा आवाज ओळखलेला असतो. सीता दुःखाच्या भरात अतिशय कठोर शब्द बोलते. सीता म्हणते, “तुम्हाला माझ्या रूपाची अभिलाषा आहे. तुम्ही गेला नाहीत तर मी माझी जीभ कापून मरून जाईन.” शेवटी नाईलाजास्तव मनाच्या विरुद्ध लक्ष्मण जातो. इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची परिस्थिती होते. 

शेवटचा प्रसंग, राम काल पुरुषाशी बोलत असतांना कोणी आत येऊ नये आणि आत आल्यास त्याला मृत्यू दंडाची शिक्षा होईल असे ठरले होते. त्यावेळी दुर्वास मुनी अयोध्येत येतात. त्यामुळे लक्ष्मणाला रामाच्या खोलीत जावेच लागते, कारण मी आल्याचा निरोप नाही दिला तर सगळी अयोध्या जाळून टाकेन असे मुनी म्हणतात. सिंहासनाची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी रामाचा कंठ दाटून येतो. राम सांगतो, “हे लक्ष्मणा अयोध्या सोडून जा.” राम वसिष्ठ मुनींना म्हणतात, “मी बाबांचा, सीतेचा वियोग सहन केला पण मी लक्ष्मणाशिवाय जिवंत राहू शकणार नाही.” राम लक्ष्मणामागे शरयूत जातात. 

लक्ष्मण म्हणजे रामाच्या कीर्तीध्वजाची काठी ! लक्ष्मणामुळेच रामरुपी ध्वज काठीवर फडकत आहे. लक्ष्मणच्या चरित्राचा विचार करीत असताना तर्क आणि प्रज्ञा काम करीत नाही. तर्क आणि बुद्धी ज्या ठिकाणी कुंठित होतील असे महान चरित्र लक्ष्मणाचे आहे. महर्षी वाल्मिकींनी रामाचे चरित्र चित्रण करून मानवासमोर संस्कृतीचे अतिशय उच्च ध्येय ठेवले आहे. तसेच ध्येयाप्रत पोचण्यासाठी लक्ष्मणासारखी उग्र साधना केली पाहिजे हे दाखवले आहे. लक्ष्मणासारखे असामान्य, अलौकिक आणि अपूर्व चरित्र जगाच्या इतिहासात कोणत्याही वाङ्मयात, कोणत्याही ठिकाणी मिळणार नाही. तीक्ष्ण बुद्धी असूनही स्वतःचे चरित्र रामात विलीन केले हाच लक्ष्मणाचा मोठेपणा. साध्य राम साधन लक्ष्मण त्याला माझा नमस्कार!

अयोध्या

श्रीरामप्रभूंचे चरित्र हा समस्त भारतीयांच्या विचारविश्वाचा, भावविश्वाचा केंद्रबिंदू ! आज पासून ८ दिवस आपण रामायणातील काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा पाहणार आहोत. त्यापैकी पहिले पुष्प ‘अयोध्या’ हे आहे. 

अतिशय विस्तृत असा कोसल नावाचा प्रदेश शरयू नदीच्या तीरावर वसलेला होता. या प्रदेशात वैवस्वत मनूने हिरवीगार, समृद्ध व धनधान्याने संपन्न अशी सुप्रसिद्ध अयोध्या नगरी वसवली होती. ही नगरी १२ योजने लांब व ३ योजने रुंद होती. या नगरीत रोज संध्याकाळी सुगंधित पाण्याने रस्ते शिंपलेले असत. तसेच त्यावेळी स्वर्गीय अप्सरा विमानातून फुलांचा वर्षाव करीत. कमानदार प्रवेशद्वारे संगमरवरी असून सोन्या रूपाने मढविलेल्या दरवाजांवर मौल्यवान रत्ने जडवलेली होती. अजस्त्र तोफा व गोफणयंत्रे शहराच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी ठेवलेल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा ७ मजली इमारती व मोठमोठ्या बाजारपेठा होत्या. 

कोरीव काम केलेले सुंदर राजवाडे, फुलाफळांनी बहरलेली झाडे, सुरेख बागांमध्ये नगरवासी जन कर्णमधुर संगीत ऐकत बसलेले असायचे. संपूर्ण शहरात भाट, गायक, नर्तक भगवंताच्या कीर्तीचे गुणगान, नृत्य करीत असत. तलावात रंगेबिरंगी कमळे फुललेली असायची. कारंज्यातून सुगंधी तुषार बाहेर पडत असल्याने सर्व नगरवासियांना वाऱ्याने थंडावा मिळत असे. त्यामुळे उन्हाळ्यातही लोकांना त्रास होत नसे. मोर व क्रौंच पक्षांचा गुंजारव सर्वत्र ऐकू येत असे. पिण्याचे पाणी व झाडाझुडपांसाठी पाणी मुबलक असल्याने सृष्टी नेहमी सुजलाम सुफलाम दिसायची. रथी, महारथी, योद्धे हातात शस्त्रास्त्रे घेऊन या महान नगरीचे संरक्षण करायचे. अयोध्येकडे जाणारे रस्ते प्रवाशांनी नेहमीच गजबजलेले असत. 

देशोदेशीचे राजे, राजपुत्र व्यापारासाठी; वार्षिक खंडणी भरण्यासाठी किंवा एकमेकांना भेटण्यासाठी अयोध्येत येत असत. या अयोध्या नगरीत दशरथ नावाचा राजा होऊन गेला. तो वेदोक्ता, दूरदर्शी, महाप्रतापी आणि नगरवासियांचा लाडका होता. इक्ष्वाकु वंशातील दशरथ राजा अतिरथी, यज्ञयाग केलेला, धर्मनिष्ठ, त्रैलोक्य विख्यात राजर्षी, शत्रूंचा नाश केलेला, मित्रांनी युक्त, जितेंद्रीय होता. द्रव्य आणि इतर धान्यादी संचय यांच्या योगाने इंद्र कुबेरांशी बरोबरी करणारा होता. त्याने धर्म, अर्थ आणि काम या त्रिवर्गाचे अवलंबन केले होते. तो सत्य वचनी असून त्याने अयोध्या नगरीचे पालन उत्तमरित्या केले. अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या रघुवंशात राजा दशरथ शोभून दिसत असे. या श्रेष्ठ राजधानीतील लोक बहुश्रुत, धर्मनिष्ठ, आनंदित, समाधानी, संतुष्ट, निर्लोभी आणि सत्यवादी होते. ऐहिक व पारमार्थिक फल प्राप्त न झालेले आणि गाई, अश्व, पशु व धनधान्य यांची समृद्धी नसलेले एकही कुटुंब या नगरीत नव्हते. 

अयोध्येत विषयलंपट, दुष्ट, अविद्वान, नास्तिक असा कोणी आढळत नसे. तेथील सर्व स्त्रिया व सर्व पुरुष शील आणि आचरण यांच्या योगाने महर्षींप्रमाणे निर्मळ असून इंद्रियनिग्रही आणि आनंदी होते. प्रत्येक जण कानात कुंडले, हातात विविध अलंकार, गळ्यात माळा धारण करणारे, चंदनादी सुगंधी उटी लावणारे होते. ब्राह्मण प्रभृती, चारही वर्णातील लोक; देव आणि अतिथी यांचे पुजन करणारे कृतज्ञ; उदार; शूर आणि पराक्रमी होते. लोक दिर्घायु असून स्त्रिया, पुत्रपौत्र यांसह वर्तमान सर्वच धर्म व सत्य यांचा आश्रय करून राहणारे होते. असे अयोध्येचे वर्णन वाचल्यावर तत्कालीन समाज किती श्रेष्ठ, संस्कारसंपन्न, धर्मनिष्ठ, कर्तव्य परायण, ज्ञानसंपन्न, वैभवसंपन्न, शीलसंपन्न होता याची कल्पना येते. 

१४ वर्षे राम वनवासात गेल्यावर अतिव दुःखाने राजा दशरथाने राम राम म्हणत प्राण त्याग केला. त्यावेळी भरताला त्याच्या मामाकडून परत आणण्यासाठी वसिष्ठ ऋषी गेले. भरताला वस्तुस्थितीची काहीच कल्पना नव्हती. त्याला दिसले की शेतात लोक काम करत नाहीत. उद्याने रिकामी पडली आहेत. लोक गायन वादनाचा आस्वाद न घेता आपापसात गंभीर चर्चा करीत आहेत. नेहमीचा आनंद उत्साह जाणवत नव्हता. अयोध्येत पक्षांचा किलबिलाट सतत असायचा पण आता सर्वदूर शांतता पसरलेली भरताने बघितली. रस्ते अस्वच्छ होते, दुकाने बंद होती, मंदिरे ओस पडली होती. लोक भरताबद्दल एकमेकांशी कुजबुजत होते. काहीतरी अघटीत घडले आहे हे अयोध्येतील वातावरणावरून भरताने ओळखले व तो कैकयी मातेच्या महालात गेला. अयोध्येतून राम निघून गेल्यावर भरताला अयोध्येचे जे दुःखी दर्शन झाले त्याने तोही दुःखी झाला. अयोध्येलाही रामाचा, दशरथाचा विरह सहन झाला नाही. 

लंकेत रामाने रावणाचा वध केला, बिभीषण लंकेचा राजा झाला. बिभीषण रामाला विनंती करतो की तुम्ही आता अयोध्येला परत जाऊ नका, लंकेचा राजा व्हा. राम म्हणतात, बिभीषणा, मला सोन्याच्या लंकेचा मोह नाही. मला स्वर्गाचाही मोह नाही. मला माझी अयोध्या पहायची आहे. माझ्या मातांना, भरताला, शत्रुघ्नाला, त्यांच्या भार्याना भेटायचे आहे. अयोध्या माझी मातृभूमी आहे. स्वर्गाचे वैभवही अयोध्येपुढे तुच्छ आहे. 

अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी।।

मातृभूमीवर किती प्रेम करावे ते राजाकडून शिकावे. कितीही शिका मोठे व्हा पण भारत भूमीला विसरू नका. इथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेची आठवण होते – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’

त्रेतायुगातील हे अयोध्येचे वर्णन आपण पाहिले. पण कलियुगातही जगाच्या नकाशावर आज अयोध्या चमकत आहे. त्रेतायुगातील अयोध्या म्हणजे जेथे युद्ध नाही ती अयोध्या ! पण गेली अनेक वर्ष अयोध्येने खूप युद्धे पाहिली. रामाच्या मुक्तीसाठी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. पण रामाच्याच कृपेने २२ जानेवारी २०२४ या सुवर्ण दिवशी ५०० वर्षांच्या वनवासानंतर भव्य मंदिरात रामाची प्रतिष्ठापना अयोध्येत झाली. आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. देशविदेशातील पाऊले अयोध्येत रामाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अयोध्येचा कायापालट झाला आहे. शरयूचे घाट सुंदर बांधले आहेत.

सरयू तीरावरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी

इक्ष्वाकू-कुल-कीर्ती-भूषण, राजा दशरथ धर्मपरायण

त्या नगरीचें करितो रक्षण, गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी

रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली अयोध्या, जिथे शरयू नदीत राम आणि त्याची भावंड डुंबली असतील त्या पवित्र शरयूला मी साष्टांग वंदन करते.


।। जय श्रीराम ।।

Language