श्रीसमर्थ रामदास स्वामी हे साक्षात्कारी संत वा स्वानुभवसंपन्न ब्रहज्ञानी होते. वय वर्षे बारा ते चोवीस या प्रारंभीच्या बारा वर्षांच्या काळात नाशिक जवळच्या टाकळी येथे कठोर तप साधना करून त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले. पुढील बारा वर्षे त्यांनी आसेतु हिमालय प्रदभ्रमण केले. समाजाचे सूक्ष्म अवलोकन केले. अस्मानी, सुलतानी संकटांनी भरडून निघालेली, हीनदीन, लाचार, आपापसातील कलहाने ग्रासलेली, फंदफितुरीने पोखरलेली, परवशतेची खंत नसलेली, मतामतांच्या गलबल्यात भ्रमलेली समाजस्थिती पाहून श्रीसमर्थ अत्यंत व्यथित झाले, अस्वस्थ झाले. अशा विपरित स्थितीत स्वत:च्याच आनंदात, ब्रह्मानादात मग्न न रहाता, समाजाचे पुनरुत्थान करण्याचे असिधारा व्रत त्यांनी मनोमन स्वीकारले. समाजाच्या स्वधर्म व संस्कृतीचे जागरण ही काळाची गरज ओळखूत त्यांनी आपले विचार मांडण्यास सुरुवात केली.
श्रीसमर्थांच्या अंगी जबरदस्त प्रतिभा होती. ती सदासर्वदा जागृत असे. स्वधर्म व संस्कृतीचा जणू विसरच पडलेल्या समाजाची मनोभूमी निकोप होणे गरजेचे होते. त्यासाठी भक्तीची शिकवण देताना “भक्तिचेन योगे देव । निश्चयें पावती मानव ।।” अशी त्यांची भूमिका होती. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, व आत्मनिवेदन या नवविध भक्ती प्रकारांचा विस्तृत परीचय त्यांनी करून दिला आहे. त्यांचा भक्तीमार्ग विलक्षण बुद्धीप्रधान असल्याने, त्यांनी प्रपंच व परमार्थ यांची उत्तम सांगड घातली आहे.
आधीं प्रपंच करवा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।
येथें आळस करूं नका । विवेकी हो ।।
प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला ।।
हे खरंच, पण त्याच बरोबर “परमार्थ सांडून प्रपंच करिसी । तरी तूं येमयातना भोगीसी । अंतीं परम कष्टी होसी ।।” हे ही खरेच आहे. म्हणून प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणे हाच खरा विवेक हे ते स्पष्ट करतात.
श्रीसमर्थांचे सर्वच प्रतिपादन सरळ अन रोखठोक आहे. भाषा ओघवती, गतिमान आहे. मराठी बरोबरच हिंदी, उर्दू, फारसी, अरबी, संस्कृत शब्दांचा ते सहज उपयोग करताना दिसतात. त्यांना शब्दांची कधीच अडचण भासत नाही. जणू शब्द हात जोडून त्यांच्या पुढे उभे आहेत असे वाटते. मोजक्या शब्दात अगदी नेमका अर्थ अगदी निःसंदिग्धपणे सांगण्याची त्यांची हातोटी, त्यांचे शब्दसामर्थ्य विलक्षण होते.
तत्कालीन समाजातील देवत्वाबद्दलच्या व साधुत्वाबद्दलच्या रूढ आणि भोंगळ कल्पना विवेकाच्या शस्त्रानेच कापून काढीत खरा देव कोणता ते त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाच्या अंतरंगात वास करणारा अंतरात्मा अर्थात् आत्माराम हाच खरा देव आहे हे त्यांनी ठासून सांगितले. संत व साधुत्वा बद्दलचे त्यांचे विचार असेच सुस्पष्ट होते. संत साधू कोणास म्हणावे?
जो जाणेल भगवंत । तया नाव बोलिजे संत ।
जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ।।६-१-१६।।
चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव ।
तोचि जाणिजे माहानुभाव । संत साधु ।।६-१-१७ ।।
नरदेह दुर्लभ आहे याची त्यांना जाणीव होती, म्हणून “वरकड देहे हें काबाड । नरदेह मोठें घबाड ।” असे ते सांगतात, नरदेहाला रत्नपेटी म्हणून त्याचा गौरव करतात आणि त्याचवेळी या दुर्लभ नरदेहाचे सामर्थ्य जाणा; त्याचे सार्थक करा असेही अगदी कळकळीने सांगतात. कोणताही माणूस सर्वगुण संपन्न नसतो. त्यात काही गुण व काही अवगुण यांचे मिश्रण असते, हे त्यांना मान्य आहे. पण त्याच वेळी, “अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभ्यासितां येती ।” हा त्यांचा विश्वास आहे. बाह्य शृंगारापेक्षा अंतरंग सत्त्वगुणांनी शोभिवंत करण्याचा ते आग्रह धरतात.
नाना वस्त्रे नाना भूषणें । येणें शरीर शृंघारणें ।
विवेकें विचारें राजकारणें । अंतर शृंघारिजे।
त्यासाठी हवा प्रयत्न. प्रयत्न, प्रबोधन व प्रचिती यांवर त्यांचा विशेष भर होता. केल्याने होत आहे रे । आधी केलेची पाहिजे । यत्न तो देव जाणावा । अंतरी धरिता बरे । क्रियेवीण वाचाळतां व्यर्थ आहे । प्रयत्नांच्या आड येतो तो आळस. निद्रा, आळस व दुश्चितपणा यांना दूर ठेवलेच पाहिजे. श्रीसमर्थांनी स्वत:चे आचरण तसेच ठेवले. “स्वये करून करवावे” हेच सूत्र त्यांनी स्वतः सांभाळले व समाजाला सांभाळण्यास उद्युक्त केले.
समाज मनाला चेतना आणण्यासाठी त्यांनी विचारपूर्वक श्रीराम, श्रीहनुमान, व तुळजाभवानी ही उपासना दैवते निवडली. सर्व शस्त्रधारी दैवते ! बुद्धी व शक्तीचा संगम असलेली ! नारी शक्ती बरोबरच नम्रता व समर्पण वृत्तीही हवी. त्यासाठी हनुमानाचा आदर्श पुढे ठेवला. वीरमारूती व दासमारूती ही मारूतीरायाची दोन्ही रूपे त्यांना फार प्रिय होती. गावोगावी त्यांनी हनुमान मंदिरे व जोडीला व्यायाम शाळा उभारल्या. अकराशे मठांची स्थापना केली. हे मठ म्हणजे ज्ञानोपासनेची विद्यापीठेच होती. त्यांचे मठपती अर्थात महंत समाजाचे नेतृत्व करणारे नेतेच होते. त्यांच्या मार्फत समाजात चेतनेची स्फुल्लिंगे फुलू लागली. श्रीसमर्थ सांगू लागले, “वन्ही तो चेतवावा रे । चेतविताची चेततो ।”, “धीर्धरा धीर्धरा तकवा । हडबडूं गडबडू नका ।”, “सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।”, “मराठा तितुका मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ।” श्रीसमर्थाचे हे संदेश समाजात दूर दूर पसरू लागले. ‘जय जय रघुवीर समर्थ’ ही गर्जना समाजात चैतन्य आणू लागली.
अवघ्या महाराष्ट्राचे सुदैव म्हणून श्रीसमर्थ व शिवाजी राजांची भेट झाली. राजांनी श्रीसमर्थांचा अनुग्रह प्राप्त केला. स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा या श्रध्देने व निष्ठेने मावळ्यांचे संघटन करून निजामशहा, आदिलशहा आणि दिल्लीच्या बादशहा यांच्याशी मोठ्या शर्थीने झुंझणाऱ्या राजाला श्रीसमर्थांनी अध्यात्मिक बळ दिले. दैवी आधिष्ठान प्राप्त करून दिले. “राजकारण बहुत करावें । परंतु कळोंच नेदावें ।” या सूत्रानुसार श्रीसमर्थ व शिवाजीराजे यांच्यामध्ये गुप्तपणे सल्लामसलती होत आणि त्यातून अचुक मार्गदर्शन होई. श्रीसमर्थांचे सर्वदूर फिरणारे शिष्य म्हणजे जणू गुप्तहेरांचे नेटवर्कच होतं ! याचं उत्तम उदाहरण अफजलखानच्या स्वारीचे वेळचं. श्रीसमर्थांचे पत्र राजांना रवाना झाले. वरवर पहाता काव्यातून अध्यात्मिक उपदेश, पण त्या काव्याची आद्याक्षर होती – “विजापूरचा सरदार निघाला आहे.” केवळ आद्याक्षर एवढ्या सांकेतिक शब्दाने राजांना अचूकपणे माहिती मिळाली. राजांनी भेटीसाठी कोणती खबरदारी घ्यावी, हेही असेच चातुर्याने सांगितले गेले. “नाना वस्त्रे नाना भूषणें । येणें शरीर शृंघारणें”, “अंतरीं नस्तां च्यातुर्यबीज । कदापि शोभा न पवे ।” (बीज म्हणजे चिलखत.) राजे, आपण चिलखत घालून भेटीस जावे. अफजलखानाचा स्वभाव विशेष असाच सांगितला. श्रीसमर्थाच्या शब्दांच्या सामर्थ्याचा हा निखळ पुरावाच !
।। जय जय रघुवीर समर्थ ।।