नरदेह एक रथ – उत्तरार्ध

मागील भागात आपण नरदेहाचे महत्त्व आणि नरदेहाची रथासोबत केलेली तुलना बघितली होती. यमराजांनी नचिकेतला रथाचे हे रूपक समजावून सांगितले होते. आज आपण या देहाला व्यवस्थित कसे सांभाळायचे आणि इंद्रियांवर नियंत्रण का आणि कसे ठेवायचे ते बघणार आहोत. ‘मी देहच आहे’ ही भावना माणसाच्या बंधनास कारणीभूत होत असते. विवेक करून ही भावना उकलावी. मी देह आहे ही भावना जीवाला बांधते, विवेक करून त्या बंधनातून मोकळे होता येते. आपण जर रथापाशी किंवा घोड्यांजवळच थांबून राहिलो तर रथाची वाताहात व्हायला वेळ लागणार नाही, हे आपण मागच्या भागात बघितले होते. स्वतःला देह समजणे कधीही घातकच आहे.

“देह मी वाटे ज्या नरा।  तो जाणावा आत्महत्यारा ।

देहाभिमानें येरझारा। भोगिल्याच भोगी ।।५-६-५५।।”

म्हणून माणसाने हे पक्के लक्षात ठेवावे की, हा देह मला भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळाला आहे. त्याचा योग्य उपयोग मी केला पाहिजे. आपले मन आणि इंद्रियांवर देखील आपला ताबा हवा.

मन भलतीकडे धावें।तें विवेकें आवरावें।

इंद्रियें दमन करावें।तो सत्वगुण।।२-७-७०।।”

देह, इंद्रिये आणि प्राण यांच्यावर नीट नियंत्रण नसेल, तर आध्यात्मिक ताप होतात.

देह इंद्रिय आणी प्राण।यांचेनि योगें आपण।

सुखदुःखें सिणे जाण।या नाव आध्यात्मिक।। ३-६-१३।।”

अशी निरनिराळ्या प्रकारची दुःखे माणसाला विविध कारणांनी भोगावी लागतात. याची कारणे, ताब्यात नसलेली इंद्रिये आहेत. यमराजांनी नचिकेतला हे समजवून सांगितले आहे. केवळ शुद्ध आत्मा भोक्ता असू शकत नाही. शरीर, मन, इंद्रिये, बुद्धी यांनी युक्त असलेला आत्माच भोक्ता आहे असे मनीषी सांगतात. पण जे अविवेकी आहेत, ते गल्लत करून कधी शरीर आणि मनालाच कर्ता, भोक्ता मानतात तर कधी चैतन्य स्वरूप परमात्म्यालाच भोक्ता समजतात. आता या पुढील पाच मंत्रांमधून यमराजांनी नचिकेतला देह-इंद्रिये-मन-बुद्धी यांना योग्य वळण देण्याने मनुष्य अज्ञान दूर करून आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी कसा योग्य बनतो, आणि जर त्याला योग्य वळण लावले नाही, तर कसा संसारात गुरफटतो याचे रहस्य उलगडून दाखविले आहे. या पाच मंत्रांना आता आपण बघणार आहोत –

यस्तु विज्ञानवान् भवति युक्तेन मनसा सदा।

तस्येन्द्रियाणि वश्यानि सदश्वा इव सारथेः।।

यस्त्वविज्ञानवान् भवत्यमनस्कः सदाशुचिः।

न स तत्पदमाप्नोति संसारं चाधिगच्छति।।

यस्तु विज्ञानवान् भवति समनस्कः सदा शुचिः।

स तु तत्पदमाप्नोति यस्माद भूयो न जायते।।

विज्ञानसारथिर्यस्तु मनःप्रग्रहवान्नरः।

अर्थात् – जो बुद्धिरूप सारथी अविज्ञानवान (अविवेकी व असंयत) आहे, त्याच्या मनरूपी लगामावर त्याचा कधीच ताबा रहात नाही आणि मग नाठाळ घोडे जसे सारथ्याच्या नियंत्रणात रहात नाहीत, तशीच इंद्रिये देखील त्या सारथीरूपी बुद्धीच्या ताब्यात रहात नाहीत. जो बुद्धिरूप सारथी विज्ञानवान अर्थात कुशल आणि विवेकी आहे त्याचे मनरूपी लगाम देखील त्याच्या नीट ताब्यात रहातात. आणि मग चांगले घोडे जसे सारथ्याच्या नियंत्रणात रहातात, तशी इंद्रिये देखील त्या सारथीरूपी बुद्धीच्या ताब्यात रहातात. ज्याचा आपल्या बुद्धीवर ताबा नाही, किंवा ज्याची बुद्धी कुशल नाही, आणि ज्याचे मन देखील ताब्यात नसते व त्यामुळे जो सर्वदा अपवित्र असतो, तो या शरीररूपी रथाद्वारे आपल्या त्या परम पदाला न पोहोचता संसारातच भटकत रहातो. आणि ज्याची बुद्धी कुशल आणि आज्ञाधारक आहे, त्याचे मन देखील ताब्यात रहाते व तो सदा पवित्र जीवन जगतो. तो त्या परम पदाला प्राप्त करतो, जिथे गेल्यावर पुनः जन्म घ्यावा लागत नाही. ज्याच्या कुशल सारथ्याने मनरूपी लगामांना नीट ताब्यात ठेवले आहे, तो या संसाराच्या पलीकडे असलेल्या विष्णूच्या परम पदाला प्राप्त करतो.

एकंदरीत, माणसाने परमात्म प्राप्तीचे आपले लक्ष गाठायचे असेल, तर इंद्रियांवर योग्य नियंत्रण मिळवून मन आणि बुद्धीचा योग्य वापर करावा, असे यमराज या रथाच्या रूपकातून सांगत आहेत. माणसाने मी देह आहे असे मानण्यापेक्षा, मी आत्मा आहे असे मानले पाहिजे. रथापाशी किंवा घोड्यांपाशी थांबण्यापेक्षा, रथी असणारा जो जीवात्मा आहे, त्याच्याशी जवळीक करणे आवश्यक आहे.

हित आहे देहातीत।म्हणौनि निरोपिती संत।

देहबुद्धीनें अन्हित।होंचि लागे।।७-२-३७।।

देहबुद्धी आणि आत्मबुद्धी हे शब्द आपण नेहमीच वापरत असतो. निश्चय करणे हे बुद्धीचे लक्षण आहे. मी देह आहे, असा निश्चय करणे याला देहबुद्धी म्हणतात. मी ब्रह्म आहे, असा निश्चय करणे ही आत्मबुद्धी आहे. जन्मोजन्मीच्या संस्कारामुळे आपले मन देहाला चिकटलेले असते, त्यामुळे मी देहच आहे असा आपला समज होतो. आपले अस्तित्त्व या देहाच्या पलीकडे आहे हे आम्हांला माहितच नसते. मनाने आपण देहापासून आणि इंद्रियांपासून निघून आत्म्याकडे जायला हवे आहे. देहबोध नाहीसा होणे हे साऱ्या साधनेचे फलित आहे.

देहचि होऊन राहिजे।तेणें देहदुःख साहिजे।

देहातीत होतां पाविजे।परब्रह्म तें।।८-८-२५।।

देहातीत वस्तु आहे।तें तूं परब्रह्म पाहें।

देहसंग हा न साहे।तुज विदेहासी।।८-८-२८।।

साधना करून साधकाने देहाचा संग सोडावा आणि आपण विदेही आहोत याची प्रचिती घ्यावी. मी देह नाही, मी देहाचा स्वामी आहे, हे कळले की इंद्रियांवर नियंत्रण रहाते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

नरदेह एक रथ – पूर्वार्ध

या मानव देहाला समर्थांनी घबाड, रत्नांची मांदूस आणि परलोकीचे तारू म्हटले आहे. नरदेह इतका महत्त्वाचा आहे, की समर्थांनी नरदेह स्तवनाचा एक समासच दासबोध या ग्रंथात रचला आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या १३ व्या अध्यायात शरीराला क्षेत्र म्हटले आहे, तर जीवात्म्याला क्षेत्रज्ञ म्हणजे या क्षेत्राचा मालक म्हटले आहे.

“शरीरासारिखें यंत्र । आणीक नाहीं”

अशी ग्वाही समर्थ देतात. कठोपनिषदात तर शरीराला रथाची उपमा देऊन त्या रूपकाचे माध्यमातून मन, बुद्धी आणि इंद्रियांचे व त्यांचे विषयांचे महत्त्व समजून सांगितले आहे. समर्थ दासबोधात म्हणतात,

“धन्य धन्य हा नरदेहो।येथील अपूर्वता पाहो।

जो जो कीजे परमार्थलाहो।तो तो पावे सिद्धीतें।।१-१०-१।।”

या नरदेहाच्या सहाय्याने परमार्थ लाभावा म्हणून केलेले सारे प्रयत्न यशस्वी होतात, हे समर्थ या ओवीच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहेत. माणसाच्या शरीराचा, आणि विशेषतः मनाचा कल्पनातीत विकास करता येतो. मनुष्याचा मेंदू इतर प्राण्यांच्या तुलनेत लहान दिसत असला, तरी तो सर्वात उत्तम मेंदू आहे. विलक्षण सामर्थ्य या मानवी मेंदूत साठविलेले आहे. याच्या बुद्धीमत्तेची आणि कल्पनाशक्तीची तर करावी तेवढी प्रशंसा कमीच आहे. साडे तीन हाताचा हा माणूस जगातील सर्व जीवसृष्टीवर आणि निसर्गावर प्रभुत्व गाजवित आहे. पण या मानव देहाचे सार्थक मात्र, आपल्यातील परमात्मा ओळखण्यात आहे. आणि हे आव्हान देखील पेलण्यास हा मनुष्य तयार आहे, नव्हे नव्हे त्याने ते साध्य केले आहे.

“या नरदेहाचेनि संमंधें।बहुत पावले उत्तम पदें।

अहंता सांडून स्वानंदें।सुखी जाले।।१-१०-१९।।”

इतके असून देखील कित्येक लोक या नरदेहाचा योग्य वापर करीत नाहीत. असे का होत असेल ? तर, या देहाबद्दल असलेले अज्ञान. अद्भूत असे घबाड आपल्याला मिळाले आहे, पण आपली गत त्या करंट्यासारखी आहे, ज्याचे घरात सर्वत्र धन पुरून ठेवले आहे, पण त्याला ते माहितच नाही. ही माहिती आपण करून घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा आपण देखील करंटेच ठरू. ही माहिती समर्थांनी दासबोधात दिलेली आहे. दशक एक समास दहा आणि दशक सात समास दोन मध्ये याचे उत्तर आपल्याला गवसते.  याशिवाय कठोपनिषदातील यमराज आणि नचिकेत यांच्या संवादाच्या माध्यमातून हे जाणून घेता येते. कठोपनिषदात नरदेहाला रथाची उपमा दिलेली आहे. हा रथ कसा आहे, त्याचा सारथी कोण, घोडे कोण वगैरे बाबी आज आपण समजून घेऊया.

एक सात-आठ वर्षाचा बालक यमराजाकडे येतो आणि आत्मज्ञान मागू लागतो. हा बालक खरोखर आत्मज्ञान प्राप्त करण्यास लायक आहे किंवा नाही याची परीक्षा घेऊन यमराज त्याला आत्मज्ञान देण्यास तयार होतात. नचिकेतला आत्मज्ञान देण्याआधी यमराज प्रथम त्याला श्रेयस आणि प्रेयसाची तसेच इतर माहिती देऊन, आता देह-देही संबंध विषद करणारे रथाचे रूपक सांगतात. हेच रूपक आपण समजून घेणार आहोत. यमराज नचिकेतला सांगतात.

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु।

बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च।।

इन्द्रियाणि हयानाहुर्विषयांस्तेषु गोचरान्।

आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः।।


हे नचिकेता, आत्म्याला रथात बसून प्रवास करणारा रथाचा स्वामी जाण. शरीर हाच तो रथ होय. बुद्धी त्या रथाचे सारथ्य करीत असून, मन हा लगाम आहे असे समज. इंद्रिये त्या रथाचे घोडे आहेत असे सांगितले जाते. विषय हे त्यांचे मार्ग आहेत. मनीषी सांगतात की, इंद्रिये व मन यांनी युक्त आत्माच भोक्ता होय. आपण आधी, देह; मन यांनी युक्त आत्मा म्हणजे काय ते बघू. जाणिवेच्या गुहेत दोन आत्मे वास करतात. पैकी, एक परमात्मा असून, दुसरा शरीर मनादी मध्ये त्याचे पडलेले प्रतिबिंब, म्हणजेच जीवात्मा आहे. हा जीवात्मा स्वतःला देह-मनयुक्त मानतो आणि सुख-दुःखांचा भोग घेतो. त्यामुळेच तो जन्म-मरणाला प्राप्त होतो. हा जीवात्मा विविध शरीरांमध्ये सुख-दु:ख भोगत असतो. हाच जीवात्मा जर स्वतःला शरीर-मनादीपासून भिन्न मानेल, तर तो स्वतःच्या प्रयत्नाने मुक्त देखील होऊ शकतो. मुंडक उपनिषदात या दोन आत्म्यांना, एकाच शरीररूपी वृक्षावर बसलेल्या, एकमेकांचे मित्र असणाऱ्या दोन पक्षांची उपमा दिली आहे. त्यातील वरचा पक्षी फक्त साक्षी भावाने खालच्या पक्षाकडे बघत आहे आणि खालचा पक्षी मात्र त्या वृक्षाची कडू-गोड फळे चाखत असतो. फळे चाखणारा हा, जीवात्मा तर वरचा पक्षी परमात्मा आहे.

रथाच्या रूपकात, आपण; आपले शरीर; आपली बुद्धी; आपले मन; आपली इंद्रिये आणि या इंद्रियांचे विषय या सर्व भिन्न भिन्न, पण एकमेकांशी संबंधित गोष्टींचा ऊहापोह ऋषींनी केलेला आहे. या दोन आत्म्यापैंकी जो शरीरादी उपाधींशी जोडला गेलेला आहे, असा संसारी जीवात्मा स्वतःच्या प्रयत्नाने मुक्तीकडे अथवा बंधनाकडे जाऊ शकतो. या दोन्हीकडच्या प्रवासासाठी तो शरीर व मनाचा रथाप्रमाणे वापर करतो. 

हाच जीवात्मा ‘आत्मानं रथिनं’ आहे. हा रथाचा स्वामी, स्वतःला या रथाहून वेगळा समजतो, आपण त्या रथाचे मालक असल्याचे तो समजतो. तो साक्षी आहे, द्रष्टा आहे. तेच परम तत्त्व आहे. हा रथ म्हणजे आपले शरीर होय. आता हा रथ ओढण्यास घोड्यांची आवश्‍यकता असते. आपली इंद्रिये म्हणजे घोडे आहेत तर लगाम म्हणून मन कार्य करीत असते. या लगामाच्या सहाय्याने घोड्यांना हव्या त्या दिशेने, हव्या त्या मार्गावर आणि आवश्‍यक त्या गतीने नेण्याचे काम  सारथी करतो. हे मार्ग म्हणजे विषय आहेत. प्रत्येक इंद्रियांचा एक एक विषय आहे. त्यामुळे ही इंद्रिये रथाला आपापल्या विषयांकडे ओढायचा प्रयत्न करतील, त्यांनी स्वैर जाऊ नये म्हणून बुद्धीरूपी सारथी, मनरूपी लगाम हाती धरून ठेवतो. सारथी हा रथाच्या गतीचे आणि दिशेचे नियंत्रण करीत असतो.

सारथी रथाचे नियंत्रण स्वामीच्या इच्छेनुसार करतो. आम्ही ना स्वामीला ओळखत, ना सारथ्याला ओळखत. आम्ही रथाजवळ आणि घोड्यांजवळच थांबून असतो. रथाला उगीचच सजवायचा आपण प्रयत्न करीत असतो. हे घोडे आपापल्या आवडीच्या विषयांकडे धावायचा प्रयत्न करतात, आणि मग रथाची वाताहात होते. म्हणून लगाम चांगले हवे आणि सारथी सक्षम हवा. अन्यथा आपले जीवन, कलह आणि द्वंद्वाने भरून जाईल. घोड्यांकडून आपले लक्ष काढून बुद्धीकडे नेलं तर रथावर योग्य नियंत्रण मिळविता येईल. आणि सारथ्यापेक्षाही जर आपले लक्ष रथाच्या स्वामीकडे नेले, तो साक्षी असल्यामुळे आपण आपल्या जीवनाचे स्वामी होऊ शकू. आपल्या लक्षात येईल की आपणच सम्राट झालो आहोत. आपल्या जीवनात पीडा, दुःख रहाणारच नाहीत. केवळ शुद्ध आत्मा, भोक्ता असू शकत नाही. शरीर, मन, इंद्रिये, बुद्धी यांनी युक्त असलेला आत्माच भोक्ता आहे असे मनीषी सांगतात. पण जे अविवेकी आहेत, ते गल्लत करून कधी शरीर आणि मनालाच कर्ता; भोक्ता मानतात, तर कधी चैतन्य स्वरूप परमात्म्यालाच भोक्ता समजतात. सारे सुरळीत असेल तर हा रथ नीट चालून आपल्या गंतव्य स्थळी सुखरूप पोहोचेल. पण जर यातील एक किंवा अधिक घटक नियंत्रणाबाहेर गेले तर काय होते ? ते आपण पुढील भागात बघणार आहोत.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

भीमरूपी स्तोत्र ५ – भाग २

समर्थांच्या अकरा स्तोत्रातील पाचव्या क्रमांकाचे हे स्तोत्र स.भ.मोहनबुवा रामदासी यांच्या पुस्तकात पाचव्या क्रमांकावर आहे. काही ठिकाणी ते सहाव्या क्रमांकावर आहे. या स्तोत्राच्या बारा श्लोकांचा अर्थ आपण भाग १ मध्ये बघितला. तेराव्या श्लोकांपासूनचा अर्थ भाग २ मध्ये बघणार आहोत. समर्थ स्थापित हा एकच मारुती दास मारुती आहे. दास मारुतीची स्थापना करताना शिष्याने दासानुदास व्हावे हीच शिकवण समर्थांनी दिली आहे. २४ श्लोकांच्या या स्तोत्रात हनुमंताची स्तुती करताना समर्थ खूप भावोत्कट होतात. स्कंदभागी रामाला वाहून नेणारा, द्रोणागिरी उचलून आणणारा, लंकेत झेप घेणारा अशा हनुमंताच्या कितीतरी छटा समर्थांनी या स्तोत्रात रंगवल्या आहेत.


“कासिली हेमकासोटी घंटा किंकिणी भोवत्या ।

मेखळे जडलीं मुक्तें दिव्य रत्ने परोपरी ।”

समर्थ म्हणतात की, यश संपादन करावे आणि रामावर भार टाकून निवांत रहावे. हनुमंताच्या कमरेला छोट्या घंटांनी किणकिण आवाज करणारी सोन्याची कासोटी ही जन्मजात आहे. ती त्याच्या ब्रह्मचर्याचे प्रतीक आहे. त्याच्या कमरेच्या कंबरपट्ट्यावर निरनिराळ्या प्रकारची रत्ने आणि मोती सुद्धा जडवलेले आहेत. मस्तकावर धारण केलेल्या मुकुटाचे तर काय वर्णन करावे.

“माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले ।”

यामध्ये कोटी चंद्र सूर्य लोप पावतात म्हणजेच नाहीसे होतात, लपून जातात. मुकुट तेजाने एवढा तळपत आहे. कानात दिव्य तेजस्वी कुंडले आहेत आणि गळ्यात मोत्यांची माळ शोभून दिसत आहे. समर्थांनी हनुमंताचे अगदी हुबेहूब वर्णन केले आहे. स्तोत्र म्हणताना तसाच हनुमंत आपल्या डोळ्यापुढे उभा रहातो. कपाळाला केशराचा टिळा लावलेला असल्यामुळे त्याचा हसतमुख चेहरा छान दिसत आहे. बोटांमध्ये अंगठ्या शोभत आहेत आणि कडे घातल्यामुळे हाताला शोभा आली आहे. समर्थ हनुमंताच्या सर्व अवयवांचे वर्णन करताना त्याने घातलेल्या आभूषणाचे सुद्धा वर्णन करतात .

“चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जती ।

कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू ।।”

त्याच्या पायातील वाळे वाजत आहेत आणि तोडा मात्र मोठ्याने आवाज करत आहे. असा हा अनाथांचा कैवारी आहे, रक्षण करणारा आहे, सगळ्यांना मोक्ष म्हणजे मुक्ती मिळवून देणारा ईश्वर आहे. समर्थ म्हणतात की, हनुमंताचे स्मरण केले तरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते. हनुमंताचे तेजच एवढे प्रभावी आहे की ते पाहून आणि त्याचा भुःभुकार ऐकून दैत्य चळाचळा कापतात. तो असुरांना त्वरेने आणि नेटकेपणे खाली पाडतो आणि भूमीवर आपटून मारून टाकतो. हनुमंताला, समर्थ सौमित्र प्राणदाताची म्हणतात. सौमित्र म्हणजे लक्ष्मणाला प्राण देणारा आणि वानरकुळामध्ये शोभून दिसणारा आहे.

 

“दंडिली पाताळशक्ति अहीमही निर्दाळिले ।

सोडिलें रामचंद्रा कीर्ति  हे भुवनत्रयीं ।”

रामायणात या विषयी एक कथा आहे. राम रावण युद्धाच्या वेळी रावणावर बिकट परिस्थिती आली तेव्हा रावणाने अहिरावण, महिरावणाला आणले. अहिरावण हा रावणाचा लहान भाऊ होता आणि पाताळपुरीचा राजा होता. मेघनादच्या मृत्यूनंतर रावणाने अहिरावणाला सांगितले की राम आणि लक्ष्मण या दोघांना पाताळपुरीत घेऊन जाऊन ठार मारा. रावणाच्या आज्ञेने अहिरावणाने श्रीराम आणि लक्ष्मण या दोघांना निद्रिस्त असताना पळवून नेले. तेव्हा बुद्धिमान मारुतीने आदिमायेची करुणा भाकली आणि मारुतीचे सामर्थ्य ओळखून आदिमायेने गिधाडाच्या तोंडून राम लक्ष्मण कोठे आहेत ते सांगितले. मारुतीने पाताळात जाऊन महिरावणाचा वध केला आणि अहिरावणाचा वध रामाकडून करविला. हनुमंताच्या या पराक्रमाने त्याची कीर्ती तिन्ही भुवनामध्ये पसरली. विसाव्या श्लोकापासून स्तोत्राची फलश्रुती सांगितलेली आहे. 

 

“विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी ।

कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती ।।”

सात चिरंजीवात हनुमंत सर्वात श्रेष्ठ आहे कारण तो रामाचा अनन्य सेवक आहे. तो मोक्ष देणारा आहे हे त्याचे ब्रीद आहे, व्रत आहे. त्याचे नाव घेतल्याने आपले कल्याण होते तसेच भूत पिशाच्चे भीतीने थरथर कापतात. साप, विंचू, इतर विषारी प्राणी यांच्यापासून विषबाधा झाली तर मारुतीचे नाव घेतल्याने विषबाधेपासून सुटका होते. पण यासाठी समर्थांनी अट घातली आहे की,

“आवडीं स्मरतां भावें काळकृतांत धाकतो ।”

त्याचे नाव आवडीने आणि भक्तीभावाने घ्यावे. मग काळ म्हणजे मृत्यूसुद्धा भयभीत होतो. या स्तोत्राच्या पठणाने विषबाधा, भूतबाधा, अपमृत्यू, गृहपिडा, दुःख, दारिद्र्य यातून मुक्ती मिळेल.

“पुरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू ।

त्रिकाळीं पठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं ।।” या स्तोत्राचे तीनवेळा पठण करण्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कारण हनुमंत भक्तकामकल्पतरू आहेत. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा तो कल्पवृक्ष आहे. मनापासून भक्ती करा, त्याविषयी कोणताही संशय घेऊ नका. तो समर्थांचा सुद्धा सहाय्यक आहे, पदोपदी सांभाळतो हे समर्थांनी दिलेले वचन आहे. रामाचे खऱ्या अर्थाने दास्यत्व करतो तो रामदासी पण हे दास्यत्व हनुमंतासारखे असावे. साधकाला,भक्ताला, उपासकाला भवसागर पार करून नेण्याचे सामर्थ्य या स्तोत्रात आहे.

१९४७ मध्ये चाफळला भूकंपाचा धक्का बसला पण त्यामानाने मंदिराला फारशी इजा झाली नाही कारण प्रत्यक्ष दासमारुती तिथे संरक्षणाला होता असे चाफळचे रामभक्त मानतात. समर्थ मनाने कणखर असले तरी त्यांचे हृदय रामरायासाठी आणि हनुमंतासाठी संवेदनशील आहे. त्यांच्या हृदयात निष्ठेचा, भक्तीचा टवटवीत अंकुर सदैव फुललेला दिसतो. ‘दासोहम्’ म्हणण्यात त्यांना खूप आनंद होई. हीच संवेदना शब्दरूपात आकार घेऊन एक आदर्श बनून स्तोत्रातून प्रगट होई. या स्तोत्र पठणाचे फळ मिळविण्यासाठी समर्थ एक अट सुद्धा घालतात.

 

“परंतु पाहिजे भक्ति संधे कांहीं धरूं नका ।

रामदासा सहाकारी सांभाळीतो पदोंपदी ।।”

अंतःकरणात भक्ती असली तर मारुती सर्वतोपरी सहाय्य करतो, पण ते म्हणतात संदेह काही धरू नका, मनात कोणतीही शंका न धरता फक्त निर्मळ भक्ती करा. सर्व भक्तांसाठी समर्थ रामरायाला प्रार्थना करतात हे रामराया, मारुती सारखी भक्ती सर्वांना प्रदान कर. तूच निर्माण केलेला जीव प्रपंचासाठी राबेल पण तरीही अंतकाळी भव व्यथेपासून जीवाचे रक्षण करू दे. जीवनाचे सारे सुख ईश्वरार्पण कर्मात आणि भगवंताच्या दास्यत्वात आहे हाच संदेश चाफळचा मारुती देतो. रामनामाचा आश्रय घेत आत्माराम जाणायचा असेल तर संपूर्ण शरणागती हवी आणि जी फक्त भगवंताच्या दास्यभक्तीतूनच मिळवता येते. समर्थ जणूकाही हेच या स्तोत्रातून सांगतात. अतिशय बलवर्धक आणि तितकेच कारुण्य घेऊन ईश्वराच्या चरणावर समर्पित झालेले हे स्तोत्र भक्तांवर चाफळच्या दासमारुतीची कृपा प्रदान करेल यात शंका नाही. स्तोत्र श्रद्धेने म्हणताना समर्थांचा भाव मात्र अंत:करणात असायला हवा. तेवढ्याच अर्थपूर्णतेने ते म्हणावे.

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

मारुती स्तोत्र पाचवे – भाग १

समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी दहा मारुती हे वीर मारुती आहेत. हातात गदा घेतलेले, पुच्छ उंचावलेले असे हे मारुती आहेत. चाफळचा मारुती मात्र दास मारुती आहे. तो, प्रभू रामराया समोर शरणागत होऊन हात जोडून उभा आहे. तो रामाचा दास आहे म्हणून त्याला दास होऊनच जाणावे लागते. या मारुतीसाठी समर्थांनी हे स्तोत्र लिहिले असे म्हटले जाते. या स्तोत्रातील मारुती विनम्र आणि कल्याणकारी आहे. हे स्तोत्र अनुष्टुप छंदात आहे. हे स्तोत्र खूप ठिकाणी सहाव्या क्रमांकावर आहे. पण स.भ. मोहनबुवा रामदासी यांच्या पुस्तकात ते पाचव्या क्रमांकावर आहे. हे स्तोत्र २४ श्लोकांचे असल्याने याचा अर्थ आपण दोन भागात बघणार आहोत.

समर्थांना दासमारुतीची स्थापना करावीशी वाटली यातच समर्थांच्या अंतरंगातील संतत्व आणि दास्यत्व दिसून येते. समर्थांची काव्यरचना, तपस्या, समाजसंघटन, छत्रपतींसोबत रुजवलेले राजकारण अशा अनेक कर्तृत्वांचे कर्तेपण समर्थ आपल्या रघुरायाला बहाल करतात. काम करावे पण कर्तेपणा घेऊ नये, ते काम ईश्वराला अर्पण करावे, हा भगवंताने भगवद्गीतेत सांगितलेला निष्काम कर्मयोग समर्थ या स्तोत्रातून सांगतात.

“तूची कर्ता सकळही” असे म्हणून समर्थांनी ‘कर्ता मी नाही तर तूच आहेस’ असे म्हटले आहे. यातच त्यांचे आत्मसमर्पण दिसते. हनुमंतांचे आणि समर्थांचे कर्तृत्त्व सारखेच आहे. दोघेही आपल्या स्वामी कार्यात खूप तत्पर आहेत. इतर स्तोत्रांपेक्षा या स्तोत्रात समर्थांनी भक्तीरस, पूर्णपणे ओतला आहे. २४ श्लोक असलेल्या या स्तोत्रात हनुमंताचे वर्णन करताना ती अवस्था ते स्वतः अनुभवतात. हे मंदिर मुख्यत: भिक्षेतून बांधले जावे, येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या हृदयात विनम्रता जागृत राहावी, ‘होणारे कर्म ईश्वराचे’ अशी भावना वाढीस लागावी, आणि त्यासाठी रामापायी शरणागती असावी. त्याची कृपा असेल, इच्छा असेल तर मुंगीलाही मेरू पर्वत उचलता येतो हा विश्वास दृढ व्हावा, असा भाव समर्थांच्या कृतीत होता. आणि या विचारातून मंदिर बांधले गेले. दास मारुतीच्या स्थापनेतून गुरुभक्ती करताना शिष्याने दासानुदास व्हावे, हीच शिकवण समर्थ देतात, आणि म्हणूनच हनुमंताची स्तुती करताना समर्थांची वाणी भावोत्कट होते. पहिल्या चार श्लोकांमध्ये त्यांनी मारुतीला अनेक नावाने संबोधले आहे. हनुमानाची सर्व विशेषणे समर्थांनी सांगितलेली आहेत. हनुमंता, रामदूता, वायुपुत्रा, महाबळी, ब्रह्मचारी, कपिनाथा, विश्वंभरा, जगत्पते, कामांतका, दानचारी, शोकहारी, दयानिधी, महारुद्र, मुख्यप्राण, कुळमूर्ती, पुरातना, वज्रदेही, सौख्यकारी, भीमरूपा, प्रभंजना, पंचभुता, मूळमाया अशी २२ विशेषणे समर्थांनी हनुमंताला दिली आहेत. समर्थ म्हणतात, “हनुमंताचे वर्णन करावे तितके कमीच आहे.”

“सांगता वर्णितां येना वेदशास्त्रा पडे ठका ।

शेष तो शिणला भारी नेति नेति परा श्रुती ।।”

वेदशास्त्र, श्रुती ही सगळी त्याचे वर्णन करता करता दमून जातात. सहस्त्रफणा असलेला शेष सुद्धा त्याचे वर्णन करताना थकून जातो. भक्तांसाठी निरनिराळ्या प्रकारांनी घेतलेला दैवी अवताराचा मारुती हा राम कार्यासाठी अतिशय तत्पर आहे. भक्तांचे रक्षण करणारा त्यांचा पाठीराखा आहे. कितीही मोठी संकटे आली तरी तो तत्परतेने धावून जाऊन संकटे दूर करतो. हा अत्यंत दयाळू आणि उदार असून नामस्मरण करणाऱ्यांवर कृपा करतो. म्हणून समर्थ म्हणतात,

“वारीतों दुर्घटें मोठीं संकटीं धांवतो त्वरें ।

दयाळा हा पूर्ण दाता नाम घेतांच पावतो ।।”

त्याच्या शौर्याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात,

“धीर वीर कपी मोठा मागें नव्हेचि सर्वथा ।

उड्डाण अद्भुत ज्याचें लंघिले समुद्राजळा ।।”

हनुमंत हा रणांगणातून कधीही मागे सरकणार नाही, कारण तो कसा आहे ? तर तो धीर, वीर आहे. त्याचे उड्डाण एवढे अद्भुत आहे की त्याने एका उड्डाणात समुद्रपार केला. रामायणात त्या विषयी एक कथा आहे. संपातीने दिव्य दृष्टीने सीतामाईला लंकेच्या अशोक वाटिकेत बघितले आणि सांगितले की, १०० योजनांचा सागर एका उड्डाणात पार करावा लागेल. अंगद म्हणाला की, मी जाऊ शकेन पण परत येऊ शकणार नाही. तेव्हा सगळे हनुमंताला शोधू लागले. हनुमंत एका शिलाखंडावर बसले होते, आणि “माझा भगवंताकरिता काय उपयोग”, असे म्हणून अश्रू ढाळत होते. तेव्हा जांबुवंताने हनुमंताचा पुरुषार्थ जागवला आणि म्हणाला, “उठ ! तूच हे काम करू शकतोस. तुझ्यातच एवढी शक्ती आहे.” तेव्हा हनुमंत एकदम जागे झाले आणि रामकार्याला सज्ज झाले. हनुमंताने समुद्रावरून केलेले उड्डाण ही अतिशय विलक्षण गोष्ट आहे. लंकेहून परत आल्यावर हनुमंताने रामाच्या हातात पत्र देऊन त्याला वंदन केले.

“देऊनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा ।

वाचितां सौमित्र अंगें राम सूखे सुखावला ।।

गर्जती स्वानंदमेळी ब्रह्मानंदें सकळही ।

अपार महिमा मोठा ब्रह्मादिकांसी नाकळे ।।”

मारुती स्वतःचा पराक्रम सांगणार नाही म्हणून ब्रह्मदेवाने मारुतीच्या लंकेतील अफाट कार्याचे वर्णन लिहून एक लखोटा त्याच्या जवळ दिला होता. ते पत्र लक्ष्मणाने वाचून दाखवले. सुंदरकांडात तसे वर्णन आहे. ते पत्र वाचताच रामाला खूप आनंद झाला. सगळेजण आनंदाने गर्जना करू लागले. सगळ्यांना ब्रह्मानंद झाला. हनुमंताचा महिमाच एवढा मोठा आहे की ब्रह्मादी देवांनासुद्धा त्याचे आकलन होत नाही.

 

“अद्भुत पुच्छ तें कैसें भोवंडी नभपोकळी ।

फांकडें तेज तें भारी झांकिलें सूर्यमंडळा ।।”

समर्थांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन केले आहे. मारुतीचे पुच्छ अद्भुत आहे, विलक्षण आहे. ते गोलगोल फिरवल्यामुळे गगनात गोल पोकळी निर्माण झाली आहे. त्याचे धगधगीत तेज सर्व दिशांना पसरल्याने त्याने सूर्यबिंब झाकून टाकले आहे. हनुमंताने समुद्रावरून उड्डाण केले तेव्हा त्याचे रूप कसे दिसत होते हे सांगताना समर्थ म्हणतात,

“देखतां रूप पैं ज्याचें उड्डाण अद्भुत शोभलें ।

ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी ।।”

समर्थ म्हणतात की, हनुमंत सीतामाईंना शोधण्यासाठी जेव्हा लंकेला गेला तेव्हा त्याने समुद्रावरून उड्डाण केले. उजव्या हातात ध्वज होता आणि डावा हात कमरेवर ठेवला होता. त्याचे हे रूप बघता समुद्रावरचे विलक्षण उड्डाण त्याला निश्चितच शोभून दिसत होते. असे हे मारुतीच्या रूपाचे आणि पराक्रमाचे वर्णन करणारे हे पाचवे स्तोत्र आहे.

या स्तोत्रामुळे चाफळच्या दास मारुतीची कृपा आपल्या सगळ्यांवर होईल यात शंका नाही. श्रद्धेने म्हणताना समर्थांचा भाव मात्र अंतरंगात असायला हवा ! तेवढ्याच आर्तपणे ते म्हणावे ! हाच श्रद्धाभाव आणि आर्तता या स्तोत्राच्या भाग दोन मध्ये बघूयात.

।। जय जय  रघुवीर समर्थ ।।

वैराग्य

विषय सुखाची आसक्ती कमी करणे म्हणजे वैराग्य. साधन चतुष्ट्यपैकी एक वैराग्य आहे. परमार्थ मार्ग एकदा स्वीकारला की विवेक वैराग्य ह्यांचं बळ अधिक लागतं. तरच परमार्थाची वाट आपण सुरळीत चालू शकतो.प्रपंच करत असताना साधना केली तर जीवाचं सार्थक होतं. साधना करताना साधन चतुष्ट्यचा स्वीकार करावा लागतो. साधनेच्या रथात बसल्यानंतर विवेक आणि वैराग्य ही रथाची दोन चाके फार महत्त्वाची असतात.श्रीसमर्थ म्हणतात _ 

वैराग्या परते नाही भाग्य। वैराग्य नाहीं तें अभाग्य।

वैराग्य नसता योग्य। परमार्थ नव्हे॥१२-७-१७||

श्रीसमर्थ म्हणतात मुळातच अंगी वैराग्य भावना नाही, स्वतःच्या अनुभवाचं ज्यांना ज्ञान नाही, ज्यांचं आचरण शुद्ध नाही, ज्यांना भजन पूजन करायला आवडत नाही. अशांना परमार्थ घडत नाही.

 एखादी जाहिरात नौकरीसाठी वृत्तपत्रात येते.त्यामध्ये पात्रतेसाठी अर्हता आणि पात्रता (qualification & eligibility) हे दोन मुख्य मुद्दे असतात. मग अर्जदाराकडे कितीही चांगले गुण असले पण ह्या दोन पैकी एकाची जरी कमतरता असली तर त्याचा अर्ज स्वीकारल्या जात नाही. तो तात्काळ नाकारला जातो. त्याचप्रमाणे परमार्थात देखील साधकाच्या अंगी विवेक आणि वैराग्य ह्या दोन्ही गोष्टी असायलाच हव्यात.ह्यातली एखादी कमी असून चालत नाही. संत श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

जे वैराग्याची शीव न देखती। विवेका ची भाष नेणती।

ते कैसेनी पावती। मज ईश्वराते॥

आध्यात्मामध्ये साधक श्रीमंत आहे की गरीब आहे, साक्षर आहे की निरक्षर आहे, कोणत्या धर्माचा आहे किंवा कोणत्या संप्रदायाचा आहे, वर्ण कसा आहे, हे काहीच पाहिल्या जात नाही.आध्यात्मामध्ये ह्या गोष्टींना काहीच महत्त्व नाही.फक्त साधकाकडे विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी आहेत का हे पाहतात.ह्या दोन गोष्टींना फार महत्त्व आहे.भगवान रामकृष्ण परमहंस ह्यांनी विवेक आणि वैराग्य ह्या दोन संकल्पना एका छोट्याशा गोष्टीतून समजवून सांगितल्या आहेत.ती गोष्ट अशी :-

लहान बाळ घरात खेळत असतो व त्याची आई तिथेच घरातले काम करत असते. खेळता खेळता बाळ ते खेळणे टाकून देतो व रडायला लागतो. त्याची आई त्याला दुसरं खेळणं देते.पाच दहा मिनिटं तो त्या नवीन खेळण्याशी खेळतो. त्याला लगेच त्या खेळण्याचा कंटाळा येतो.त्याला आई जवळ जायचं असतं.म्हणून तो पुन्हा रडू लागतो. ती त्याला आणखी छान रंगीबेरंगी खेळणं खेळायला देते.तो खेळतो पण लगेच त्याला त्याही खेळण्याचा कंटाळा येतो. तो ते खेळणं फेकून देतो व जोरात रडू लागतो. पण इकडे आईला तर कामं उरकवायची असतात. ह्याचं रडणं काही केल्या थांबत नाही.हे पाहून आई बाळाच्या पाठीत एक धपाटा मारते व त्याला कडेवर घेते.कडेवर घेताच बाळ आईला घट्ट मिठी मारतो व रडायचं थांबतो. जणू काही तो आईला म्हणत असतो, “तार अथवा मार, आता मला तूच हवी आहेस.”  त्या मुलाला फक्त आई हवी असते त्याला विवेक म्हणतात आणि कितीही चांगलं खेळणं असलं तरी ते नको असतं ह्याला वैराग्य म्हणतात.

‘विवेक’ म्हणजे ‘निवड’ आणि ‘वैराग्य’ म्हणजे ‘नावड’ असा अर्थ होतो. साधकाच्या दृष्टीने फक्त भगवंत हवा हा झाला विवेक आणि भगवंता खेरीज दृश्य जगातली कोणतीच वस्तू नको हे झालं वैराग्य. वैराग्यामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी दृश्याचे सगळे विषय भोग म्हणजे अडथळे आहेत. ते दूर करावे लागतात. भक्त प्रल्हादाला भगवंताच्या नाम:स्मरणा शिवाय काहीही नको होतं, संत मीराबाईला भगवंताचं गुणगान गाण्यावाचून दुसरं तिसरं काहीही सुचत नव्हतं.

श्रीदासबोध ग्रंथात द. ३ रा हा मनांत दृश्य जगातील गोष्टी मिळवण्याची नावड निर्माण करणारा आहे.ह्यात संसार कसा दु:खदायक आहे हे सांगितलं आहे.जीवनातले वैमनस्य टाळण्यासाठी भगवंताला शरण जाण्याचा मार्ग भक्तीतून निर्माण होतो.म्हणून पुढचा ४ था दशक हा नवविधा भक्तीचा सांगितला आहे.द. ३ स. १० वैराग्य निरुपणा मध्ये श्री समर्थ म्हणतात:-

जयास वाटे सुखचि असावे।तेणे रघुनाथ भजनी लागावे।

स्वजन सकळहि त्यागावे।दु:खमूळ जे॥३-१०-६३

श्री समर्थ म्हणतात ज्याला खरं सुख हवंय म्हणजे आत्मसुख हवंय त्याने भगवंताचं भजन करावं.वेळप्रसंगी आप्तजनांना देखील सोडावे.जे दु:खाला कारणीभूत आहेत.आपले आप्त कायम आपल्या सोबत राहात नाहीत.म्हणून कठोर वैराग्य पत्करून स्वजनांचा सुद्धा त्याग करावा.त्याग करतांना द्वेष, तिरस्कार निर्माण होणार नाही ही दक्षता देखील साधकाने घेतली पाहिजे.ज्याप्रमाणे झाडाचं पिकलेलं पान गळून पडतं.तसं वस्तूंबद्दलचं प्रेम आपल्याला सोडून देता आलं पाहिजे.वासना वाढवून माणूस स्वतःला स्वतःच्याच हाताने जखमी करत असतो.

लहान मुलं रेती मध्ये खेळताना रेतीचं घर करतात. मनसोक्त त्या तयार केलेल्या घराशी खेळतात. घरी परततांना मात्र ते घर मुले पायाने तुडवून मोडून देखील टाकतात.त्या रेतीच्या घराशी त्यांचं काहीच ममत्व नसतं.हे रेतीचं घर तुडवणे म्हणजे वैराग्य.मुलांना हे घर मोडल्याची अजिबात खंत वाटत नाही.आपल्या खऱ्या घराची आठवण होणे हे झालं मुमुक्षुत्व, आठवण होताच घराकडे धावत सुटणे हे झालं साधकत्व आणि घरी पोहचणे हे झालं सिद्धत्व.घरी पोहचताच त्यांना आनंद होतो, मन सुखावते, निवांत वाटतं.म्हणजेच काय तर वैराग्य ही दुःखदायक संकल्पना नसून आनंद प्राप्त करून देणारी आनंददायी संकल्पना आहे.संग्रह न करणे म्हणजे वैराग्य नाही तर संग्रहाविषयीची च आसक्ती नसणे म्हणजे वैराग्य आहे.” असेल तर असू दे, नसेल तर नसू दे ” ही चित्ताची दशा म्हणजे खरे वैराग्य आहे.दृश्य वस्तूंवर प्रेम नसणे म्हणजे वैराग्य.म्हणजे इथे विवेकाने वैराग्य पत्करावे लागते. १२-४-६ मध्ये श्रीसमर्थ म्हणतात,

विवेकेंविण वैराग्ये केलें।तरी अविवेकें अर्थी घातलेलं।

अवघे वेर्थचि गेलें।दोहिंकडे॥१२-४-६||

विवेका शिवाय वैराग्य केलं तर माणूस संकटात पडेल.त्याची प्रपंचात व परमार्थात दोन्हीकडे फसगत होईल. पुढे ह्याच समासात ओ.क्र.१२ मध्ये श्रीसमर्थ म्हणतात, 

विवेकें अंतरी सुटला।वैराग्यें प्रपंच तुटला।

अंतर्बाह्य मोकळा जाला।नि:संग योगी॥१२-४-१२

ज्यांच्या अंगी विवेक आणि वैराग्य योग्य प्रमाणात असतो तो आत बाहेर मोकळा असतो.त्याचं जीवन प्रभावित होतं.विवेक युक्त आणि वैराग्य युक्त पुरुष आतून बाहेरून मोकळा होतो, बंधन रहित होतो, तोच खरा नि:संग योगी आहे.तो बंधनरहित असल्यामुळे त्याचं जीवन सुसंगत असतं.त्याला येणारे अनुभव तो लोकांना सांगतो.लोकं त्यांच्यावर प्रभावित होऊन सन्मार्गाला लागतात. ओ.क्र २३ मध्ये श्रीसमर्थ म्हणतात, 

विवेक वैराग्य तें ऐसें।नुस्तें वैराग्य हेंकाडपिसें।

शब्द ज्ञान येळिलसें।आपणचि वाटे॥१२-४-१९||

श्रीसमर्थ म्हणतात की वैराग्य प्रखर असलं पाहिजे.स्वानुभवाने मिळालेलं ब्रह्मज्ञान असायला हवं.वैराग्यशील माणसाने आचरणशील असावं.विवेक आणि वैराग्य ह्या दोन्हींची जोड असायला हवी.नुसतंच वैराग्य हे दुराग्रही व वेडपटपणाचं लक्षण आहे आणि केवळ शब्दज्ञान असणं हे ही कंटाळवाणी असतं.असं हे साधनचतुष्य मधलं दुसरे साधन ” वैराग्य” आहे.

 

॥जय जय रघुवीर समर्थ॥

आंतरराष्ट्रीय महिला दिन श्रीसमर्थांनी केलेले महिला सक्षमीकरण

आजची स्त्री सर्व क्षेत्रात आघाडीवर दिसून येते. राजकारणातील तिचा सहभागही वाढलेला दिसून येतो. परंतु राष्ट्रोन्नतीच्या कार्यात भाग घेण्यास पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा अवसर ठेवला पाहिजे हा विचार श्रीसमर्थ रामदासस्वामींनी साडेतीनशे वर्षांपूर्वी कृतीत आणला. आपल्या जंबूद्वीपात (भारतखंडात) गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, अरुंधती, अपाला, उभयाभारती, . सारख्या अनेक विदुषी होऊन गेल्या. पण काळाच्या ओघात स्त्रियांचीही विद्वत्ता झाकोळली गेली

एका प्रतिकूल कालखंडात महात्मा फुले,सावित्रीबाई, भारतरत्न अण्णासाहेब कर्वे यांनी स्त्रीशिक्षणासाठी जे परिश्रम केले ते नि:संशय गौरवास्पदच आहेत. परंतु या कालखंडा पूर्वीही स्त्रीशिक्षणचा पुरस्कार झालेला दिसून येतो. परंतु त्यावर काळाचा पडदा पडल्यामुळे ते लक्षात येत नाही. स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते म्हणून ज्यांचे नाव घ्यावे लागेल ते म्हणजे श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचे.

भारतीय इतिहासाच्या एका अत्यंत भयावह कालखंडात स्त्रियांच्या उद्धाराचा श्रीसमर्थांनी केलेला विचार आणि कृती अधिक गौरवास्पद आहे. श्रीसमर्थांचा काळ म्हणजे भारतवर्षावरील यावनी आक्रमणाचा काळ. हे आक्रमण फक्त भौगोलिक नव्हते, तर ते आक्रमण समाजाच्या मनावर, बुद्धीवर आणि विचारांवर होते. समाज सत्त्वहीन झाला होता. समाजामध्ये अनेक अनिष्ट प्रकार होत होते. त्यात कठोरता, निंद्यता होती. बालविधवांची समस्या अत्यंत गंभीर होती. या बालविधवांना उठताबसता अपमानाची वागणूक सहन करावी लागत होती. ज्या वयात विवाह म्हणजे काय, हेही माहित नाही, त्या वयात विधवा होण्याचे संकट त्यांच्यावर येत असे. गोठ्यातील जनावरांप्रमाणे त्यांचे हाल होत असत. अशा सर्व स्त्रियांना श्रीसमर्थांनी आपल्या संप्रदायात सामील करून त्यांना आत्मनिर्भर बनविले. त्यांच्यावर प्रेमळ पित्या प्रमाणे माया केली.रामायण, महाभारत, भागवत, गीता इत्यादींचे शिक्षण या अबलांना देऊन त्यांना सबला बनविण्यावर श्रीसमर्थांचा भर होता. यातील काही स्त्रियांना त्यांनी मठाधिपती बनविले. बाइयाबाई, अक्काबाई, अंबिकाबाई, द्वारकाबाई, मनाबाई, आपाबाई, सखाबाई, अंताबाई, कृष्णाबाई, इत्यादी अनेक स्त्रिया रामदासी संप्रदायात मानाचे स्थान मिळवून होत्या

श्रीसमर्थ शिष्या वेण्णाबाईंनी दोनशेहून अधिक ग्रंथ लिहून काढले. त्या मिरज मठाच्या मठाधिपती होत्या.स्त्रीमहंतां पैंकी कीर्तन करण्याचा अधिकार फक्त वेण्णाबाईंना होता. तेंव्हापासूनच स्त्री कीर्तनकार परंपरा सुरू झाली असावी. वेण्णाबाईंनी लिहिलेलासीतास्वयंवरहा ग्रंथ प्रसिद्ध आहे.अंबिकाबाई दोन मठांच्या मठाधिपतीही जबाबदारी सांभाळत होत्या. श्रीसमर्थशिष्या अक्काबाई यांनी श्रीसमर्थांच्या हयातीत चार दशके आणि निर्वाणा नंतर चार दशके सज्जनगड आणि चाफळच्या मंदिरमठाची व्यवस्था उत्तम रीत्या पार पाडली. अक्का आणि वेण्णाबाई यांच्या शिवाय श्रीसमर्थांच्या अनुगृहीत स्त्री शिष्या त्यांचा अनुग्रह घेतलेल्या अनेक स्त्रियाच नव्हे, तर पुरुषही होते. यावरून या स्त्रीशिष्यांचा अधिकार लक्षात येईल. याचे मोठे उदाहरण म्हणजे श्री समर्थ चरित्रकार समर्थप्रतापकार गिरिधर हे होत. गिरीधर यांचीही ग्रंथसंपदा मोठी आहे. त्याची ओवी संख्या २४ हजारांवर आहे. अशा ग्रंथकाराला अनुग्रह देणाऱ्या बाइयाबाई त्यांच्याही गुरू वेण्णाबाई यांचा पारमार्थिक अधिकार किती मोठा होता याची कल्पना करता येते.

स्त्री कितीही आत्मनिर्भर झाली तरी तिने आपल्या मनातील स्त्रीसुलभ वात्सल्य भावना जपलीच पाहिजे.जन्मापूर्वी आणि नंतर बाळाला पोषण देऊन वाढविण्याचे कार्य केवळ माताच करू शकते. आजच्या काळातील स्त्री हे काही अंशी विसरली आहे की काय असं चित्र सध्या समाजात दिसत आहे. जणू हे भविष्य जाणूनच की काय श्री समर्थ दास बोधात म्हणतात

प्रपंच विचारें पाहातां।हें सकळ जोडे जोडे माता।

हें शरीर जयेकरितां।निर्माण जालें।।३३८।।

एकंदरीत प्रपंचाबद्दल विचार केला तर असे दिसून येते की, प्रपंचात सर्व काही मिळेल; पण या शरीराला (आपल्याला) जिने जन्म दिला ती आई मात्र (एकदा गेली की) पुन्हा मिळणार नाही.” 

बाळकास वाढवी जननी।हें तों नव्हे पुरुषाचेनी।

उपाधी वाढे जयेचेनी।ते हे वनिता।।१७२६।।

वीट नाहीं कंटाळा नाहीं।आलस्य नाहीं त्रास नाहीं।

इतुकी माया कोठेंचि नाहीं।मातेवेगळी।।१७२७।।

नाना उपाधी वाढऊं जाणे।नाना मायेनें गोऊं जाणे।

नानाप्रीती लाऊं जाणे।नाना प्रपंचाची।।१७२८।।

वात्सल्य हा प्रेमाचा प्रकार असल्याने आई मुलाला सांभाळते. पुरुषाला ते जमत नाही. आई झालेल्या पत्नी मुळेच प्रपंचाचा विस्तार होतो. मातेला मूल सांभाळण्याचा वीट येत नाही. कंटाळा, आळस, त्रास यातील काहीच होत नाही. हे प्रेम आई शिवाय इतरत्र कोठेच दिसत नाही. स्त्रीला प्रपंचाचा व्याप कसा वाढवावा सांभाळावा ते कळते. वात्सल्य, प्रेम, ओढ, कणव, . प्रकारे कुटुंबातील सर्वांना ती एकत्र ठेवते सर्वांना प्रपंचा विषयी प्रेम निर्माण करते. उल्लेखनीय अशी गोष्ट म्हणजे ज्या काळात स्त्री म्हणजे परमार्थ मार्गातील धोंड समजली जात होती, 

स्त्रियांचा तो संग नको नारायणा।काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या।

दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे।लावण्य ते खरे दुःखमूळ।।

असे सर्वच  मानत होते, त्या काळात श्रीसमर्थ स्त्रियांबद्दल गौरवोद्गार काढतात. स्त्रियांविषयी एकही अनुद्गार समग्र श्रीसमर्थ वाङ्मयात दिसून येत नाही. उलट स्त्रीनिंदा करणाऱ्या वयोवृद्धलोकांना ते म्हणतात,

बहुता दिसांच्या वयवृद्धमुला।

जनीं बायकांच्या गुणें जन्म जाला।

तये जननीच्या कुळा निंदितोसि।

वृथापृष्ट तूं मानवांमाजि होसी।।१।।

वयोवृद्ध होऊनही तुला अजून अक्कल आली नाही. मुला प्रमाणेच तुझी बुद्धी अपरिपक्व आहे. ज्या स्त्रीमुळे तुला जन्म आला त्या जननीच्या कुळाला म्हणजे स्त्रीजातीला तू निंदितोस त्या अर्थी मनुष्यामध्ये तू वृथापुष्ट झालास. शरीर वाढले तरी विवेक वाढला नाही.”

जनी पाळिती सर्वनारी नराला।

तया निंदिती शुद्धि नाहीं खराला।।५।।

पुरुषांना स्त्रियाच वाढवितात. त्यांची निंदा करणारे गाढव पुरुष शुद्धीवर नसतात. या ओव्यांवरून श्रीसमर्थांचा स्त्रीविषयक उदार दृष्टिकोन स्पष्ट होतो. भगवंताच्या उक्तीला अनुसरून स्त्रीला परमार्थ मार्गातील धोंड समजता त्यांनाही भगवत्स्वरूपाच्या प्राप्तीचा अधिकार आहे असे ते मानत होते

स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्।।गीता९३२।।

 

।।जय जय रघुवीर समर्थ।।

होळीपंचक समर्थांचे उत्तरार्ध

होळीपंचकामध्ये  मागील ओवीचा संदर्भ घेऊन पुढे सुरवात करूया. एक उडी घालूं जाती | लंडी चुकोनी पडती ||७|| याचा अर्थ आपण पहिला होता आता ओवी आठचा अर्थ पाहू. 

एक देहाचें पांगलें | तेचिं आगीं हुर्पळले ||८||

एक देहाचें पांगले – देहबुद्धीचा अहंकारं ज्याच्या अंगातून पूर्णपणे बाहेर गेला नाही त्याला हे खोबरे कसे मिळणार? अहंकार हा परमार्थातील मोठा अडसर आहे. ज्ञानेश्वरमाऊली आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांना नमस्कार लिहावा का आशिर्वाद या संभ्रमात असणारे चांगदेव, त्यांनी कोरा कागद पाठवला. कथा परिचित आहे. निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून त्या कोऱ्या कागदावर ज्ञानदेवांनी ओव्या लिहून पाठविल्या ज्याला चांगदेव पासष्टी म्हणतात. यात पूर्ण तत्वज्ञान भरलेले आहे. त्यात ते असे म्हणतात,

 

चांगदेवा तुझेनी व्याजे | माऊलिया श्रीनिवृत्ती राजें |

स्वानुभव रसाळ खाजें | दिधले लोभे || चां.पा. ६१||

चांगदेवा तुला मोठ्या प्रेमाने मधुर रसयुक्त शब्दखाद्य पाठविले आहे. ते गोड खाजे खाऊन,  द्वैत अद्वैत हे परोक्ष संवादही आपल्या स्वानुभवी अपरोक्ष दृष्टीनी जिरवून पुष्ट हो. परोक्षज्ञान म्हणजे ग्रंथ वाचनातून, श्रवणातून मिळालेले ज्ञान (पर+इक्ष) दुसऱ्याने जे पाहिले, समजले, अनुभवले ते आपल्याला सांगितले ते परोक्ष ज्ञान असते. पण जेंव्हा स्वत:ला अनुभूती येते त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. पण हे ‘खाजे’ त्यांना अहंकार बुद्धीमुळे प्रथम जिरवता, पचवता आले नाही. व्याघ्रावर स्वार होऊन, सर्प हाती घेऊन ते ज्ञानदेवांच्या भेटीस गेले. सजीवांवरील आपली सत्ता दाखवण्याच्या मोह त्यांना टाळता आला नाही. पण ज्यावेळी निर्जीव भिंतीवर बसून ही चार छोटी भावंडे येतांना पाहिली तेंव्हा अचंबित होऊन माउलींना शरण आले. मुक्ताबाईनी गुरूउपदेश केल्यावर त्या रसाळ खोबऱ्याचा स्वाद चांगदेवांना समजला. गुरूउपदेशाने ह्या मायेच्या होळीतील खोबऱ्याची चव घेता येते.

 

उडी अवघ्यांचीच पडे | परि तें हातांस न चढे ||९||

एके थोर धीर केला | खाजें घेऊन पळाला ||१०||

अशा या मायारुपी होळीमध्ये उड्या घेण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण असतात, पण खोबरे सगळयाच्याच हाती लागते असे नाही. कारण वैराग्यपूर्ण जीवन जगणे सहज साध्य नसते. हे ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी अहंकार, कामना, आसक्ती, संकल्प विकल्प या सर्व द्वैतांचा त्याग करावा लागतो. संगत्याग करून संगनि:संगातीत व्हावे लागते.  मन बुद्धीवर नियंत्रण असावे लागते. द्वंद्वातीत व्हावे लागते. तेव्हाच हे परब्रह्म रुपी खोबरे हातात येते.   

एखादा एकटाच ते खोबरे घेऊन पळून जातो. आणि एकटाच खातो. परब्रह्माचे ज्ञान झालेले काही योगी तपस्वी एकांतात राहून त्या परब्रह्मात आत्मसंतुष्ट होतात. हिमालयासारख्या ठिकाणी जाऊन एकांत सेवन करतात त्यामुळे दुसऱ्यांना ते ज्ञान सांगण्याचा प्रसंग येत नाही. आणि हे अनुभवामृत दुसऱ्याला मिळत नाही. पण सगळेच तसे नसतात समर्थांसारखे काही लोकांतात राहून एकांत सेवन करणारे असतात. 

 

एक आपणचि खाती | एक सकळांते वांटिती ||११||

एक घेउनि पळाले | तंव त्यावरि पडे जाळें ||१२||

रामीरामदास होळी | केली संसाराची धुळी ||१३||

काहीजण सर्वांना वाटून त्यातच आनंद मिळवतो. प्रपंच व परमार्थ साधणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज शांतचित्ताने विवेक विचाराने होळीतील खाजे अलगद मिळवतात. तर संत तुकारामांसारखे प्रपंच्याच्या भडकलेल्या होळीतून खाजे बाहेर काढतात. तुकारामासारखे अतिशय सहनशील संत हा प्रसाद सर्वच बालगोपालांना (चौदा टाळकऱ्याना) आणि बहेणाबाई, निळोबा, कान्होबा रामेश्वरभट्ट अशा शिष्यांना वाटतात. पण ते खाजे खाण्यासाठी आलेल्या शिवाजीराजांना प्रेमाने, समर्थ रामदासांसारख्या राजकारण, देवकारण, धर्मकारण, करणाऱ्या थोर संतांकडे जाऊन त्या खोबऱ्याचा आस्वाद घे असे सांगतात. सद्गुरू निवृत्ती नाथांकडून ज्ञानदेवांनी हे खोबरे अगदी बालवयातच मिळवले आणि मिळालेले हे परब्रह्म रुपी खाजे, ज्ञानेश्वर माउलीनी आनंदानी नामदेव, मुक्ताबाई, सोपान सर्वांना प्रेमानी दिले. 

 

म्हणून समर्थ होलीपंचकात म्हणतात, एखादा एकटाच ते खोबरे घेऊन पळून जातो. त्यांच्या मागे सर्वजण लागतात. हिसकाहिसकी ओढाताण करून आपल्याला काही मिळवता येते का ते बघतात. अगदी कबीरासारखे !! रामानंद स्वामी अत्यंत कर्मठ होते. ते  कबिरांना हे परब्रह्मरुपी खाजे द्यायला तयार नव्हते. तरीही कबीराने ते हिसकून घेऊन पटकावलेच की !! रामानंद रोज सकाळी गंगास्नानाला जात. मुखाने श्रीराम श्रीराम म्हणत हे कबिरांना माहित होते गुरुमुखातून मंत्र मिळवण्यासाठी कबीर पहाटेच्या वेळी गंगेच्या पायऱ्यांवर आडवे झाले. रामानंदाचा चरणस्पर्श त्यांना झाला आणि त्यांच्या मुखातून ‘श्रीराम’ शब्द बाहेर पडले. तोच गुरुमंत्र मानून कबीर त्यांना गुरु म्हणू लागले. कबीर अत्यंत तर्कनिष्ठ होते. त्यांनी विचार केला गुरु करणे हे कर्मकांड असून त्यापेक्षा गुरु मानून गुरुमंत्र श्रवण करणे, तो आत्मसात करणे आणि गुरुआज्ञेनी वागणे, हे जास्त श्रेष्ठ आहे.  म्हणून समर्थ म्हणतात, ‘एक घेउनी पळाले |’  कबीराने हे खाजे रामानंदांकडून पळवूनच आणले. अर्थात ह्यात धारिष्ट नक्कीच आहे. शिवाय हे खाजे एकट्यानेच न खाता भगवानदास, कमाल, कमाली (शेखतुकींची मुलगी) जीवदास, रामकृपाल या शिष्यांनाही दिले.  

 

समर्थ रामदास स्वामीं मात्र या संसाराच्या होळीमध्ये पाऊल टाकताक्षणीच खोबरे घेऊन बाहेर आले. लग्नमंडपात सावधान म्हणताच सावध होणाऱ्या समर्थानी त्या होळीतले खोबरे सुद्धा सावधपणे आणि विवेकविचाराने सहज हस्तगत केले. विवेक आणि वैराग्य यांनी मिळवलेले खोबरे, अगदी आनंदानी सर्वांना वाटून तर दिलेच, पण ते खाजे म्हणजे ब्रह्मज्ञान कसे मिळवायचे ह्याचे उत्तम मार्गदर्शनही आत्माराम, दासबोध यातून केले. आपल्यासारखेच अनेक शिष्य व महंत तयार केले. कल्याणस्वामी, गिरीधरस्वामी, उद्धवस्वामी, आक्कास्वामी, वेण्णास्वामी किती नावे सांगावीत, ज्यांनी समर्थांनी दिलेल्या खोबऱ्याचा आनंद लुटला. श्रीरामाचा दास झाले, म्हणून समर्थ होऊन, जगाचे स्वामी बनलेले हे समर्थ रामदास स्वामी !! त्यांचे होळीपंचक या तापत्रयाच्या  आणि मायेच्या होळीतून बाहेर पडून, आपल्या सर्वाना परमार्थ मार्गाकडे वळवण्याची प्रेरणा नक्कीच देईल. 

||जय जय रघुवीर समर्थ||

होळीपंचक समर्थांचे पूर्वार्ध

फाल्गुन महिन्यात येणारी होळीपौर्णिमा हा उत्सव आपल्याकडे उत्साहात साजरा केला जातो. होळी रे होळी, पुरणाची पोळी असे म्हणत पुरणपोळीचा स्वाद घ्यायचा आणि होळीसमोर सर्वांच्या नावाने बोंबा मारायच्या !! कोणाला दुखावण्याचा हेतू नसतो. होळीच्या निमित्ताने आज आपण समर्थ रामदासांनी लिहिलेले होळीपंचक पाहणार आहोत. या पंचकातसुद्धा मायारूपी होळी भोवती सर्वजण कसे बोंबा मारतात त्याचे वर्णन आहे. 

समर्थांच्या होळीपंचकात आपल्याला प्रापंचिक माणसाची आणि साधुसंतांची होळी पहायला मिळते. मायेची बोंब मारली की ती भ्रमरूप मायासुद्धा निघून जाते. आणि आपल्याला परब्रह्मापर्यंत जाता येते, हेच समर्थांनी या होळीपंचकात सांगितले आहे. जरी पंचक म्हटले असले तरी यात १३ ओव्या आहेत    

अवघेंचि बोंबलती | होळीच्या भोंवती भोंवती ||१||

माया होळी प्रज्वळली | सृष्टी वेव्हारें लाविली ||२|| 

होळी छान पेटलेली आहे. ज्वाळा वरपर्यंत जात आहेत. सर्व लोक भोवती उभे राहून बोंब मारत आहेत. ही  मायेची होळी इथे जन्म घेणाऱ्या सर्वांनी पेटवलेली आहे. त्यात ममतेची, आसक्तीची, आशेची, अहंकाराची बोंबाबोंब चालू आहे. ज्या मायेबद्दल सर्वजण बोंब मारत आहेत ती माया खर तर नाहीच आहे !! ‘या नास्ति सा माया |’ भ्रमरूपाने भासते म्हणून माया !! जी नाहीच आहे तिच्याबद्दल बोंबाबोंब करण्याचे काहीच कारण नाही. पण भ्रमात गुंतलेले सर्व प्राणी ‘ती आहेच’ असे मानतात. जे बोंब मारत आहेत ते तरी शाश्वत आहेत का? तेही नश्वर आहेत. तरीही आपण चिरकाल राहणार आहोत असे वाटून ते धडपडत आहेत. त्यामुळे ही होळी लोकेषणा, वित्तेषणा, दारेषणा, पुत्रेषणा या सर्व ज्वाळांनी उग्र झाली आहे. प्रत्येकाला या व्यावहारिक जगामध्ये जगतांना प्रसिद्धीची हाव आहे. सर्वांनी आपल्याला मान द्यावा, मोठेपणा द्यावा म्हणून काय काय करामती करत असतात. वित्तेषणा याबद्दल तर काही बोलायलाच नको, इशावास्य उपनिषदात सांगितल्याप्रमाणे ‘तेन त्यक्तेन भून्जीथा’ हे फारच दूर राहिले. उलट आत्ता पुढच्या सात पिढ्यांची सोय करण्याची स्वार्थी वृत्ती वाढत आहे. दारेषणा, पुत्रेषणा संसारात आसक्तीने रमण्याचे, देहबुद्धीचे लक्षण आहे. सर्वजण मायेची ममतेची आसक्तीची बोंबाबोंब करत आहेत. असा हा सर्व सृष्टीचा व्यवहार आहे.

 

ज्या कारणें गुंडाळती | तेंचि वाचें उच्चारिती ||३||

होळीमध्यें खाजें आहें | तें तूं विचारूनि पाहे ||४||

सत्य तत्त्वाला सर्वसामान्यजनांनी मायेमध्ये गुंडाळून ठेवले आहे आणि ‘आम्हाला तो ईश्वर दिसत नाही. नक्की आहे का तो?’ म्हणून बोंबाबोंब करत आहेत. माया होळीच्या अज्ञानरूपी आवरणामुळे त्या होळीत असलेले खाजे म्हणजे खोबररुपी आत्मतत्व सापडत नाही याचा आरडओरडा करत आहेत. खर तर त्यांच्यावर असलेल्या पंचकोशाच्या आवरणामुळे ते सापडत नाही. ते सापडावे म्हणून सर्वजण प्रयत्न करत आहेत. होळीच्या आत जो नारळ टाकला जातो, ते खमंग खोबरे, खाण्यासाठी सर्व टपलेले आहेत. पण ते मिळणे इतके सहज सोपे नाही. ही तापत्रयाची होळी आहे. अध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक ताप आहेत. संसाराची आग भडकली की माणूस हाय हाय करतो. रडतो ओरडतो, तरीही त्याच संसाराभोवती फिरत राहतो. अगदी होळी भोवती प्रदक्षिणा घालतात तसा !! बायको मेली तरी पुन्हा पुन्हा लग्न करतो. मुलासाठी नवस सायास करतो. मुलं मोठी झाल्यावर विचारत नाहीत म्हणून एकटाच बोंब मारतो. अशी छोटी कौटुंबिक होळी प्रत्येकजण आपापल्या घरी पेटवत असतो.

काही सार्वजनिक होळ्या मोठ्या असतात. गावाची होळी चव्हाट्यावर किंवा गावाच्या वेशीवर पेटवतात. सर्वच गावकरी मिळून बोंब मारतात. घरातील होळीपेक्षा तिची आग मोठी असते. ती सर्वसंगपरित्यागाची होळी असते. ही होळी संसारावर, मुलाबाळावर कुठलीही आसक्ती न धरता पेटवलेली असल्यामुळे त्याची झळ जास्तच असते. ह्यातील परब्रह्मस्वरुप, अमृतमय ‘खाजे’ मिळवणे फार अवघड असते. 

 

खाजें खातां सुख होय | परि कठीण हातां नये ||५||

खोल दृष्टीनें पाहिलें | खाजें त्याच्या हातां आलें ||६||

आसक्ती, संसाराबद्दलचे ममत्व, उपभोगात्मक आकर्षण, ह्या सर्वांचा संगत्याग केल्यानंतर मिळणारे शुद्ध विमलब्रहम अतिशय आनंदरूप असते. पण ते सहजसोपे नाही. त्याकडे ज्ञानचक्षूंनी, दिव्यदृष्टीने पाहावे लागते. तेंव्हा ते दिसत आहे असे वाटते. पण प्रत्यक्षात मूळ माया आणि ब्रह्म यात शून्याचा पडदा आहे. ते शून्य म्हणजे ब्रह्म आहे असा भास होतो. परब्रह्म सूक्ष्मात सूक्ष्म आहे. जो तद्रूप होतो, त्याची त्रिपुटी नष्ट होते, श्रीसमर्थांच्या शब्दात सांगायचे तर जगीं पाहतां पाहणें जात आहे ||म.श्लो.१४९|| अशी ज्याची स्थिती असते त्यालाच हे परब्रह्मरुपी खोबरे मिळू शकते. 

 

एक उडी घालूं जाती | लंडी चुकोनी पडती ||७||

एक देहाचें पांगलें | तेचिं आगीं हुर्पळले ||८||

मायेच्या होळीत उपासना, नामस्मरण, श्रवण, मनन, यांनी हे खोबरे कुठे थोडेफार दृष्टीस पडते आहे असे वाटू लागते. छान खरपूस भाजलेले हे चविष्ट खोबरे सर्वांनाच खावेसे वाटते. पण आत हात घालून खावे म्हटले तर हात भाजतो. तसेच हे परब्रह्मरुपी खोबरे खाण्यासाठी काहीजण विचार विवेक न करता उडी मारतात. त्यावेळी मात्र ते तोंडघशी पडतात. विश्वामित्र ऋषींनी असेच हे खाजे खाण्यासाठी त्या होळीत जोराने उडी मारली होती. परंतु मेनेकेच्या पायात पाय अडकून तोंडघशी पडले होते. असे आदरणीय कृष्णाजी नारायण आठल्ये म्हणतात. वशिष्ठ ऋषींप्रमाणे आपल्याला ब्रह्मर्षी पद मिळावे हा हेतू होता. पण मनातील कामक्रोधादी विकार गेल्याशिवाय आणि मनाचे उन्मन झाल्याशिवाय ब्रम्हपद मिळणे अवघड असते. पंचवीस वर्षे तप करूनही मेनकेच्या सात्विक सौंदर्यामुळे, रंभेवरील क्रोधामुळे त्यांचा तपोभंग झाला. गायत्री मंत्राचे द्रष्टे असणाऱ्या विश्वामित्र ऋषींची जिद्द आणि चिकाटी वाखाणण्यासारखी आहे, विश्वामित्र म्हणजे मूर्तिमंत प्रयत्नवाद हे आपण लक्षात घ्यायला हवे. अनेक परिश्रमानंतर त्यांना ब्रह्मर्षी पदवी, परब्रह्मरुपी खाजे मिळाले. 

काहीजण त्या धगीला बघून मागे सरतात. त्यांना कशाचे खोबरे आणि काय !! ते नुसतेच हात चोळत बसतात. अर्थात असे प्रापंचिकांच्या बाबतीतही घडते. ते लांबूनच होळी बघतात. त्यांना परब्रह्मस्वरुप खोबरे खाता येणार नाही याची कल्पना असते. साधकाच्या बाबतीत साधना अपुरी असते म्हणून तर काही साधक अष्टसिद्धी मिळवतात आणि त्यातच रममाण होतात त्यामुळे त्यांना परब्रह्मापर्यंत पोहोचता येत नाही. याच ओवीचा संदर्भ घेऊन नंतर उत्तरार्धाची सुरवात करूया. 

||जय जय रघुवीर समर्थ||

राम मंत्र श्लोक २२-२३-२४

तपस्वी मनस्वी बहू पार गेले।

दुजी सृष्टीकर्ते असे थोर मेले।

चिरंजीव अल्पायु गेले किती रे।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे॥२२॥

सरळ अर्थ  — मृत्यु कोणालाही कोणत्याही उपायाने टाळता येत नाही.थोर थोर  तपस्वी,संशोधक एवढेच काय पण प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य अंगी असणारे ऋषी सुद्धा मृत्युच्या मार्गाने गेले.अगदी चिरंजीव/दीर्घायुष्य लाभलेले किंवा अत्यंत अल्पायुषी मृत्युच्या वाटेने गेले.जगात सर्वात निःपक्ष मृत्यु आहे.तेव्हा हरे राम हा मंत्र  सोपा जपावा हेच खरे.

श्रीसमर्थांचा बोध — ग्रंथराज दासबोधात श्रीसमर्थ मृत्यूनिरूपण समासात ‘ मृत्यू न म्हणे ‘अशी सुरवात करून मृत्यु पावणाऱ्या  सर्वांची सविस्तर यादीच देतात.आणि ” सकळ जीवास प्राशन। मृत्यचि करी॥” म्हणत हा ‘मृत्युलोक’ आहे असे दाखवून देतात.उपजे ते नाशे हा सृष्टीचा नियम आहे.आणि त्याला कोणताहीअपवाद नाही. या जगातील एकमेव सत्य म्हणजे मृत्यु.या मृत्युचे एक रूप काळ आहे.हा काळ ईश्वराची विभूती असुन प्रवाही आहे.देह जन्माला आला त्याच क्षणापासून तो मृत्युच्या दिशेने धावत असतो.हा काळ देहाला कसा अलगदपणे मृत्युमुखात नेऊन सोडतो हे कळतही नाही.म्हणुन मृत्युला घाबरायचे नसते तर त्याला सामोरे जायचे असते.आपले आचरण शुद्ध ठेऊन  त्याचे नित्य स्मरण ठेवायचे असते.श्रीसमर्थ म्हणतात “मरणाचे स्मरण असावे।हरिभक्तीस सादर व्हावे।” आपल्या देहदुःखाचा,यातनांचा, चिंता-काळजीचा अंत करणारा तो आपला हितैषी आहे हे समजुन घेतले तर त्याची भीती दूर होईल.श्रीसमर्थ याच समासाच्या शेवटी मृत्यूवर मात कोण करु शकतो याचे उत्तर देतात..”असो ऐसे सकळही गेले।परंतु  येकचि राहिले।जे स्वरूपाकार जाले।आत्मज्ञानी॥”आणि असे आत्मज्ञानी होण्याची पहिली पायरी आहे ‘ नामस्मरण साधना. ‘ या साठी श्रीसमर्थ आग्रहाने सांगतात हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. जय श्रीराम.

 

बहू कामधंद्यामधे धाव घेसी।

किती नावारूपा जगी मिरवीसी।

कशाला तुला उंट घोडे नगारे।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥२३॥

सरळ अर्थ  — चरितार्थासाठी काही कामधंदा  करणे अपरिहार्य आहे.पण माणूस सतत त्यातुन मिळणाऱ्या  पैशाच्या मागे लागतो का तर पैसा मुबलक मिळवला,ऐश्वर्य वाढले तर मानमरातब वाढतो,प्रतिष्ठा मिळते,समाजात कीर्ति होते.श्रीसमर्थ या श्लोकातुन सांगतात  की,कशाला या भंपक आणि भ्रामक मायाजालात अडकतो! आज जरी कौतुकाचे नगारे झाडताना दिसत असले तरी ते अशाश्वत आहे क्षणभंगुर आहे.शाश्वत/कायमस्वरूपी सुखशांती हवी तर हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे.

श्रीसमर्थांचा बोध — श्रीसमर्थ द्रष्टे होते याची प्रचिती दासबोधात पदोपदी येते.चारशे वर्षापुर्वीच त्यांना आजची परिस्थिती समोर दिसत होती.म्हणुनच त्या काळी लिहुन ठेवलेले आज अनुभवाला येत आहे.उदरभरणासाठी कामधंदा करणे अपरिहार्य आहेच परंतु केवळ धनावर/पैशावर दृष्टी ठेऊन सर्वकाळ काम-धंदा करित राहाणे म्हणजे भगवंताने विशेष हेतुने दिलेले हे जीवन वाया घालवणे होय.होते काय की,चरितार्थ  चालवण्यासाठी माणूस काम-धंदा करू लागतो,त्यातुन त्याला पैसा मिळतो,सतत तेच काम केल्यावर सहजच त्यात प्राविण्य येते व सहाजीकच त्याचे कौतुक होते.वाहवा होते.अभिमान वाटतो.हळुहळु त्याची सवय नव्हे चटक लागते.अहंकार वाढतो.भगवंताचे अनुसंधान सुटते आणि मनुष्य त्या कामातच गढुन जातो.बरं हे काम,उद्योग कर्मयोग म्हणुन न करता  मान,मरातब,लौकीक,पद-प्रतिष्ठा ,असे अनेक स्वार्थमुलक हेतु अंतरी दडलेले असतात.जनसेवा, समाजसेवा या नावाने स्वतःची तुंबडी भरली जाते.त्या काळात  श्रीसमर्थांनी हे बघितले आहे.आजची परिस्थिती तर आपण बघतोच आहोत.नोकरी धंद्याच्या मागे,नवनव्या ‘पॅकेजेसच्या’ मागे धावपळ करताना खाण्यापिण्याची शुद्ध रहात नाही.समोर नावलौकिक,प्रसिद्धी,पद-प्रतिष्ठा, सत्ता,ऐश्वर्य, यांचे मृगजळ दिसत असते. त्यापाठी धावताना शब्दशः दमछाक होते.खायच्या प्यायच्या वयात, पैशापाठी धावताना वेळ नसतो,तर वेळ मिळतो तेव्हा खाण्यापिण्यावर बंधने येतात.मग प्रश्न येतो की,का कशासाठी ही धावपळ?मानवी जन्माचा मुळ हेतु तर बाजुलाच पडतो.साधा आनंद सुद्धा उपभोगता येत नाही,आत्मिक समाधान  कसे मिळणार? म्हणुनच श्रीसमर्थ या श्लोकातुन त्याची जाणीव करून देतात की मानसन्मानाच्या अपेक्षेत  स्वतःचे नुकसान करून घेण्याऐवजी साधा सुलभ असा हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.जय श्रीराम.

 

म्हणे देश माझे भूमी गाव वाडे।

शिबीकासनी बैससी उंच लोडे।

कसा उंच तू मंचकी लोळसी रे।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥२४॥

सरळ अर्थ  — नशीबाने म्हणा किंवा पुर्वसुकृताने सधन घरात जन्म झाला.बालपण लाडाकोडात गेले.तारुण्यात कोणताही पुरूषार्थ न करता, वडिलांच्या कमाईवर ऐषारामात,हे घर माझे,गाव माझे,जमीनजुमला ऐश्वर्य सारे माझे. काहीही न करता माझे म्हणतोस.बरं खर्या अर्थाने काहीही आपले नसताना मस्तवालपणे हे माझे,ते,माझे ,असे  ऐदखाऊ असुनही गाद्यागिरद्यावर लोळत लोळत गर्वाने म्हणतोस.यातले मृत्युनंतर कण सुद्धा बरोबर नेता येत नाही हे एकदा लक्षात घे. सहजी मिळालेल्या नरदेहाचे सार्थक फक्त आणि फक्त रामनाम स्मरणात आहे.मंचकी आरामात लोळण्या पेक्षा हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे.असे श्रीसमर्थ कळवळ्याने सांगत आहेत.

श्रीसमर्थांचा बोध — माणसाला कुठे आणि कसा जन्म मिळावा हे त्याच्याच पुर्वकर्माचे फळ असते.मी मी माझे माझे करण्यात,नाना उपभोग घेण्यात ,तसेच  ऐत्या  पीठावर रेघोट्या मारण्यात कसला आलाय पुरूषार्थ ? आज भोगलालसा  टोकाला पोहोचली आहे.माझे ते माझेच आणि तुझे ते ही माझेच ही वृत्ती समाजात फोफावलेली दिसुन येते. भोगाने  त्यागावर मात केली आहे.” दुल्लभ शरीरी  दुल्लभ आयुष्य।याचा करू नये नास।” असे दासबोधात श्रीसमर्थ ठामपणे बजावतात. ‘घबाड’ हाती आले आहे तर त्याचा पुर्ण लाभ करून घ्यावा. अर्थात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातुन स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अंतःकरणपुर्वक उपासना केली पाहिजे. भगवंताचे अनुसंधान राखले पाहिजे.नुसते “माझे माझे आणि भ्रमाचे ओझे” या म्हणीप्रमाणे मी माझे चे गाणे आधी बंद करावे लागेल. “पापपुण्य समता घडे।तरीच नरदेह जोडे।” असे जर आहे .तर ऐषोआराम झटकुन या दुर्मिळ संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत नामाला लागणे महत्वाचे ठरते.या साठीच श्रीसमर्थ  येथे म्हणतात हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे. जय श्रीराम. 

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

समर्थांचा भक्ती मार्ग

समर्थांनी आपल्या सर्वच वाङ्मयात भक्तीला प्राधान्य दिले आहे. दासबोधाच्या फळश्रृतीमध्ये ते म्हणतात, “भक्तीचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । इये ग्रंथीं ।।” मनुष्यजन्माचे ध्येय जन्ममरणाच्या चक्रातुन मुक्ती मिळविणे हे आहे. अनेक जन्मांची पुण्याई खर्च झाल्यावर हा मनुष्य देह मिळाला आहे. समर्थ म्हणतात, “नाना सुकृताचें फळ । तो हा नरदेह केवळ । त्याहि मधें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ।।२-४-१।।” असा हा पूर्वपुण्याईने मिळालेला देह सार्थकी लावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. “देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जालें । नाहीं तरी हें वेर्थचि गेलें । नाना आघातें मृत्यपंथें ।।१-१०-६१।।” त्याचे सार्थक करण्याकरीता निव्वळ प्रपंचाच्या, वासनापूर्तीच्या मागे न लागता काही परमार्थ केला तरच मुक्ती हे ध्येय गाठणे शक्य आहे. मुक्ती मिळविण्याकरीता आत्मज्ञान होणे गरजेचे असते. ते मिळविण्याकरीता मुख्य तीन मार्ग आहेत, भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग आणि योग मार्ग. हे तीनही मार्ग आपापल्या परीने श्रेष्ठच आहेत.

यातील भक्तीमार्ग हा सर्वांत सोपा असा मार्ग आहे. ज्ञानमार्गामध्ये बुद्धीचातुर्य आवश्यक असते. तर योगमार्गामध्ये शरिराला कष्ट द्यावे लागतात. भक्तीमार्गाला भोळाभाबडा भाव लागतो. भाव हीच भक्तीमधली अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. अशा या भक्तीमार्गाचे मर्म समजून घेण्यासाठी सर्व प्रथम भक्ती म्हणजे काय ते समजुन घेतले पाहिजे. भक्ती हा शब्द तीन प्रकारांनी सिद्ध होते. १) भजन भक्ती २) भागो भक्ती ३) भंजन: भक्तिः। 

भजनं भक्ती म्हणजे भजन करणे, रस घेणे. भागो भक्ती: मधील भाग म्हणजे अंश. जीव हा ईश्वराचा अंश आहे. मी ज‌गाचा नसून भगवंताचा आहे अशी खरी जाणीव निर्माण होणे, याचे नाव भक्ती. तीसरा अर्थ मंजनं भक्ती: म्हणजे, भगवंताच्या चरणी आपल्या अहंचा बळी देणे. भगवंताची सेवा करणे. त्याचाच आश्रय घेणे. अशा अर्थानेही भक्ती शब्द सिध्द होतो. भक्तीमध्ये प्रेम आहे. कारण भगवंताची आवड उत्पन्न झाल्यावर तो भगवंताचे पुन: पुन: चिंतन करतो. भक्तीमध्ये ज्ञान आहे, कारण मी त्याचा आहे हे ज्ञान झाल्यावाचून जीव भगवंताच्या नादी लागत नाही. 

भक्तीमध्ये कर्म आहे कारण, भगवंतासाठी काही केल्यावाचून जीवाला चैन पडत नाही. भगवंताचे चिंतन करता करता जीव ध्यान साधतो, म्हणून भक्तीमध्ये योग देखील आहे म्हणून समर्थ आपल्याला, “भक्तीचेन योगें देव । निश्चयें पावती मानव ।” असे दासबोधात सांगतात. तसेच मनाच्या श्लोकांमध्ये ते म्हणतात, “मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।” भागवत ग्रंथात कपिल मुनी आपली माता देवहुतीला भक्तीयोग सांगताना म्हणतात, आपली जी इंद्रिये, स्पर्श, दर्शन, गुणांचा अनुभव घेतात त्या इंद्रियांचे खरे कार्य म्हणजे, परमात्म्याची सेवा, भक्ती ज्यामुळे होईल अशी कृत्ये करणे हेच होय. हीच मुख्य कृत्ये इंद्रियांकडून केली गेली म्हणजे विशेष प्रयत्न न करता परमात्म्यावर भक्ती जडते. अशी निरपेक्ष भक्तीच लिंगदेह नष्ट करते.


विसृज्य सर्वान्यान्श्च मामेवं विश्वतोमुखम् ।

भजनत्यन्याया भक्त्या तान्मृत्योर्तिपराये ।। श्रीमद्भागवत ३/२५/४० ।।

ते म्हणतात, “माते ! जे भक्त धन, पशु, घर, अन्य पदार्थ किंवा अन्य संग्रहित वस्तू यांना सोडून अनन्य भक्तीने माझेच भजन करतात, त्यांना मी या संसार सागरातून पार नेतो.” समर्थ देखील या समासात सांगतात, “व्हावया ज्ञानाची प्राप्ती । आधीं केली पाहिजे भक्ति । भक्ती घडलिया मुक्ती । पाठी लागे ।।पंचसमासी ४-२।।” ज्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याने भगवंताला अथवा सद्गुरूंना अनन्यभावाने शरण जावे. भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, “अनन्याश्चिन्तयन्तो मां” किंवा “न मे भक्तः प्रणश्यति” अनन्य भक्तीने भगवंत प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला आपल्या हृदयात धारण करतात. आत्मज्ञान झाले, जीवशिवाची भेट झाली की; वासना शिल्लकच रहात नाहीत; मग परत परत जन्माला येण्याचे कारणच उरत नाही. वासनांच्या जाळ्यात फसलेला जीव भक्तीयोगाने मुक्त झाला.

संत एकनाथ महाराज म्हणतात, “भावें करितां भगवद्‌भक्ती । भक्त मुक्तीही न वंछिती । तरी त्यांपाशी चारी मुक्ती । दास्य करिती सर्वदा ।। एकनाथी भागवत २-६२३।।” भावपूर्ण भक्ती करणारा जरी मुक्तीची इच्छा धरीत नसला तरी चारही मुक्ती त्याच्या दास होतात. तुकाराम महाराज अभंगगाथेमध्ये म्हणतात, “करा हरिभक्ती परलोकीं ये कामा । सोडवील यमापासोनियां ।।३९००।। भोळे भक्तीभाव धरिती मानसीं । त्यासी हृषीकेशी जवळी च ।।४०२९।। भक्तीवीण जिणें जळो लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखमूळ ।।४४२०।।”

नामदेव महाराज भक्तीच्या संदर्भात त्यांच्या ‘उपदेश’ या प्रकरणात म्हणतात, “न धरावी चाड मानसन्मानाची । आवडी भक्तीची रूढवावी ।। अंतींचा लाभ आधींच साधिजे । देह असतां कीजे हरिभक्ती ।। भक्तीविणें जिणें जळों लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखरूप ।। भक्तीविण मोक्ष नव्हे हा सिद्धांत । वेद बोले हात उभारोनि ।।” 

अशा या भक्तीमार्गामध्ये सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती असे परत दोन प्रकार आहेत. यातील सगुण भक्ती ही सर्वसामान्य साधकांसाठी सोपी भक्ती आहे. येथे भक्त आणि भगवंत हे वेगळे असतात. त्यामुळे परमेश्वराची अर्चना करणे, नामस्मरण करणे हे शक्य होते. निर्गुण भक्ती मध्ये भक्त आणि भगवंत हे एकरूप असतात. त्यामुळे त्यात थोडी रूक्षता येते.  अशा या भक्तीमार्गाने जाण्यासाठी नवविधा भक्तीरूप एक नऊ पायऱ्यांचा सोपान सांगितला आहे. भक्त प्रल्हादाने आपल्या पित्याला भक्तिचे महत्व पटवुन देताना सांगितले होते, 

 

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्  ।।

इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा । क्रियेत भगवत्यद्धा तन्मन्येऽधीतमुत्तमम् ।। श्रीमद्भागवत ७-५-२३,२४।।”

पंचसमासीमध्ये समर्थ म्हणतात, “मोक्षभुवन अतिसुंदर । आनंदरूप मनोहर । तेथें जावयाचा विचार । ऐक बापा ।। तेथें नऊ पायर्‍या उत्तम । ऐक पायरी प्रथम । जे चढतां तुटे भ्रम । निःशेष जीवांचा ।। पंचसमासी समास ४-३,४।।” मोक्षभवन अतिसुंदर असून आनंदरुप मनोहर असल्याचा आपला अनुभव समर्थांनी सांगितला आहे. त्या ठिकाणी जाण्याकरीता नऊ पायऱ्यांचा सोपान आहे. यातील प्रत्येक पायरी महत्वाची आहे. साधक किंवा भक्त एक एक पायरी चढत चढत आत्मनिवेदन या अंतीम पायरीवर पोचतो. अंतीम पायरीवरून तो थेट आनंदरूप असणाऱ्या अतिसुंदर असणाऱ्या मोक्षभुवनात प्रवेश करतो. भागवतात भगवंत म्हणतात, “आध्यात्मिकानुश्रवणात् नामसङ्कीर्तनाच्च मे । आर्जवेनार्यसङ्गेन निरहङ्क्रियया तथा ।। भागवत ३/२९/१८।।” या भक्ती नऊ प्रकारच्या आहेत. १) श्रवण, २) कीर्तन, ३) नामस्मरण, ४) पादसेवन ५) अर्चन, ६) वंदन, ७) दास्य, ८) सख्य, ९) आत्मनिवेदन. या पायऱ्यांवरून चढत चढत मुक्तीभुवनात पोहोचता येते किंवा प्रत्येक पायरी किंवा भक्तीच्या कोणत्याही एका प्रकाराने देखील मुक्ती मिळू शकते. अशा या नविविधा भक्तीमार्गाचा विचार आपण दुसऱ्या लेखात करूया. 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language