दासनवमी आणि दासबोध सखोल अभ्यास परिवार

राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांनी माघ वद्य नवमी या तिथीला सज्जनगडावर देह ठेवला. महाबळेश्वर मठाचे अनंतकवी लिहून ठेवतात, 

सोळाशेवरी तीन दुर्मती पहा संवत्सरा अंतरी |

माध्यान्ही शुभ माघ वद्य नवमी त्या मंद वारांतरी|

रामी आत्मनिवेदनी करी वपु सत्कीर्तीची हे ध्वजा |

स्वानंदे सुसमाधी सज्जनगडी श्री रामदासा भजा ||

त्यालाच आपण दासनवमी असे म्हणतो. संतांचे निजधामी जाणे म्हणजे पुण्य पर्वाचा सोहळा असे संप्रदायातील साधकांनी मानले पाहिजे. त्याचे कारण म्हणजे असे अवतारी पुरुष विशेष कार्यासाठी पृथ्वीतलावर जन्माला येतात. समर्थ प्रताप या ग्रंथांमध्ये गिरीधर स्वामी असे वर्णन करतात 

समर्थांशी शिष्य पुसती निर्धारे|

संत साधु ब्रह्मरूप केवी अवतारे |

अरे अवतार धरीजे सर्वेश्वरे|

माया पूर्वपक्ष निरासावया ||

यावरून आपल्याला संताच्या जन्माचे रहस्य समजेल. समर्थ हृदय नानासाहेब देव यांनी तीन शब्दांमध्ये समर्थांचे बृहत चरित्र समास रूपाने वर्णन केले आहे,  ते म्हणजे  तप, व्याप आणि त्याग”. पू. अक्कास्वामी वेलणकर यांनी ४० वर्षांपूर्वी बिजारोपण केलेला दासबोध सखोल अभ्यास परिवार याच तीन शब्दांभोवती आणि रामदास स्वामींनी निर्याणाच्या वेळी केलेल्या  उपदेशाप्रमाणे कार्यरत आहे. ग्रंथराज दासबोध , समर्थ रामदास स्वामींचे चरित्र , मनाचे श्लोक आणि गीता या चतु:सूत्रीवर  मार्गक्रमण करीत साधनेतील उत्कटता अंगी बाणवण्याचा प्रयत्न दासबोध सखोल अभ्यास करतो आहे. करारी शिस्तीचे पालन, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास आणि दातृत्व संपन्नतेचा अलौकिक सेवाभाव साधकांच्या ठाई व्यवच्छेदक लक्षण म्हणून प्रसिद्ध झाला आहे. समर्थ आज्ञा झाली बरवी | श्रीराम कथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी ||”  या आदेशाप्रमाणे अयोध्या मठात परिवारातर्फे दासबोध पारायण करण्यात आले. श्रीरामाचे सगुण लीला संकीर्तन करण्यासाठी श्रीरामकथेचे आयोजन साधक करीत आहेत. 

धन्य तू गा  रघोत्तमा |कोण ते द्यावी उपमा |

सुखाचिया सुखधामा | मी काय जाणे महिमा ||

सोडविले ब्रह्मादिक | तू रे त्रैलोक्य नायक |

दास म्हणे तुझे रंक | सांभाळी आपले लोक ||

समर्थांनी “आधी केले, मग सांगितले” या  उक्ती प्रमाणे आपले जीवन दीपस्तंभा प्रमाणे समाजासमोर ठेवले.  दासबोधामध्ये ते सांगतात,

धन्य धन्य हा नरदेहो| याची अपूर्वता पाहो |

जो जो की जे परमार्थ लाहो| तो तो पावे सिद्धीते ||

तर श्री समर्थ प्रतापकार लिहितात, 

समर्थे श्रीराम काजी दिव्य देह समर्पिले |

श्री रामदास्य श्री गुरुरूपे केले |

आधी केले मग सांगितले | दासबोध  ग्रंथार्थे ||

याच मार्गावरून दासबोध सखोल अभ्यास परिवार ब्रह्मांडाचे फळ असे मिळालेला दुर्लभ नरदेह त्याला हरी भजनी लावून समाजाचे संघटन आणि ज्ञानाचा प्रसार, प्रचार करतो आहे. संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे ” नरदेहाचेनी साधने|सच्चिदानंद पदवी घेणे | ऐसा अधिकार “नारायणे”| कृपावलोकने दिला असे ||”  याची प्रचिती परिवारातील सदस्य घेत असतात. सोळाशे तीनच्या चैत्र वद्यात श्री कल्याण स्वामींनी वीस दशकी दासबोध पुरा करून समर्थांना दाखवण्यासाठी आणला. रामदास स्वामींनी हा ग्रंथ पाहून १२_१० मध्ये एक ओवी समाविष्ट केली,

आमची प्रतिज्ञा ऐसी | काही न मागावे शिष्यासी |

आपणामागे जगदीशासी | भजत जावे ||

ही श्रीसमर्थांची शेवटची आज्ञा दासबोध सखोल अभ्यास परिवार उरी शिरी बाळगतो आहे.

फ्रेंच विचारवंत रुसोने १८ व्या शतकात सामाजिक करारातून राज्य निर्मिती व्हावी हा विचार मांडला. समर्थ रामदास स्वामींनी सोळाव्या शतकात सामूहिक सत्संकल्प हेच राज्याचे अधिष्ठान आहे आणि लोककल्याण हे त्याचे मुख्य कार्य आहे ही संकल्पना हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरली. समर्थांनी हा विषय आपल्या विशेष शैलीमध्ये तपशीलाने मांडलाच पण समाज संघटनेचा स्वतंत्र उद्योगही केला. 

श्री रविकिरण साने यांनी आपल्या “आधुनिक राष्ट्रवादाचे उद्गाते समर्थ रामदास या ग्रंथांमध्ये हा विषय साकल्याने मांडला आहे. ते म्हणतात, महाभारतानंतर एवढ्या आग्रहपूर्वक बुद्धीयोग, अभ्यास योग फक्त समर्थांनीच पुरस्कारला आहे. म्हणून ते या दोन्ही योगाचे श्रेष्ठ प्रणेते ठरतात. क्षमतेनुसार काम हा व्यावसायिक बाणा समर्थांनी संघटनेत उत्पन्न केला. 

आज दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या परिवारात वेगवेगळ्या क्षेत्रातले स्त्री, पुरुष साधक समर्थांना अभिप्रेत असलेल्या महंताप्रमाणे ब्लॉग लिहिणे, ग्रंथलेखन,  समर्थांच्या पद्यांना संगीताची जोड देणे, व्याख्याने, प्रवचने, संकेतस्थळ आणि त्यावरील शब्द शोध सारखी अद्भुत कार्ये अशा अनेक आयमांवर कार्यरत आहेत ही समर्थ कृपाच होय. या व्यापामुळे समर्थ  वांग्मय विश्वातल्या पन्नास पेक्षा जास्त देशांमध्ये  पोचले आहे. समर्थांनी घालून दिलेला ” सामाजिक विषमतेला नकार पण विविधतेचा साधन म्हणून उपयोग ” या आदर्श पंथाचा वापर आज हा परिवार करीत आहे.

भारतीय ग्राहक चळवळीची मुळाक्षरे देशाला देणारे ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी एका ग्रंथात म्हणतात, ” रामदासांचा विचार दैववादी नाही. प्रयत्न,  अफाट प्रयत्न आणि त्यासाठी चळवळ , मात्र त्या चळवळीला धर्माचे अधिष्ठान आणि पारदर्शक व्यवहाराचे आचरण तसेच ’ मी नाही रामकर्ता ’ ही साधकाची भूमिका दासबोध सखोल अभ्यास परिवारात जागोजागी दिसून येते. एक्केहळी मठाचे, श्रीरामदास पंथ क्रमसार या ग्रंथाचे कर्ते श्री आत्माराम महाराज यांच्या वचनाप्रमाणे 

“समाधी पादुका की प्रसादाते | प्रत्यक्ष गुरु चि मानिजे  त्याते ||

समर्थ संप्रदायातील इतिहासात पहिल्यांदा दासबोध सखोल अभ्यास परिवारातर्फे समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यपर्वकाळात एक अद्भुत आणि अलौकिक प्रसंग घडला. श्री रामदास स्वामी स्थापित महाबळेश्वर मठातील समर्थांच्या चरण पादुका, कुबडी आणि तुंबा या सद्गुरु रूपात असलेल्या दुर्मिळ वस्तू सध्याचे मठपती आदरणीय श्री दिवाकर देशपांडे गोसावी यांनी पुण्यातील किवळे येथे आणल्या. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी पहाटे काकड आरती, मनाच्या श्लोकांची प्रभात फेरी, भजन, प्रवचन, ग्रंथ प्रकाशन, कीर्तन आणि शेजारती असा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला.
500 पेक्षा जास्त धर्मप्रेमी भक्तांनी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले. महाबळेश्वर मठासाठी एक लाख ऐंशी हजार एवढा निधी जमा झाला. अत्यंत देखणा आणि भव्य दिव्य असा हा सोहळा दासबोध सखोल अभ्यास परिवारासाठी परिवाराच्या कारकिर्दीत एक मानाचा तुरा म्हणून शोभून दिसेल .

श्री समर्थ रामदास स्वामींच्या सेवेच्या एक अनोखा प्रसंग यानिमित्ताने समाजाच्या पुढे उभा राहिला .

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

परम पूजनीय आक्का वेलणकर

 

परम पूजनीय आक्का वेलणकर अर्थात तीर्थरूप आशालता चिंतामणराव वेलणकर या थोर कृष्ण भक्त होत्या. पण त्यांनी आपले आयुष्य समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार करण्यात घालवले. पू. आक्कांनी जवळपास ५०० भागवत कथा केल्या. भागवत कथा पुष्पमाला आणि इतर काव्यमय ग्रंथांची रचना त्यांनी केली. पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमानंतर साधकांच्या मागणीप्रमाणे त्यांनी १९८४ मध्ये ‘दासबोध सखोल’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. पाहता पाहता ४० वर्ष या उपक्रमाला झाली. समर्थ वाङ्मयाचा सखोल आणि शिस्तबद्ध अभ्यास करणाऱ्यांचा परिवार म्हणून दासबोध सखोल उपक्रमाकडे पाहिले जाते.

पू. आक्कांना मी पहिल्यांदा नांदेड येथे ‘आत्माराम’ या ग्रंथावर त्यांची प्रवचने चालू असताना पाहिले. नऊवार पांढरी साडी, तिला बारीक निळे काठ, नेसलेली एक सोज्वळ मूर्ती मी पाहिली आणि माझ्या मनात अत्यंत सात्त्विक भाव निर्माण झाला.

आत्माराम ग्रंथावरचे त्यांचे प्रवचन मला त्यावेळी तसे फारसे उमगले नाही. पण त्यांची छबी मात्र माझ्या मनावर कायमची कोरली गेली. प्रवचनासाठी एकदा मांडी घातली की दोन अडीच तास ती हलत देखील नसे. नांदेड शहरात ज्यांनी दोन तपे समर्थ संप्रदायाचा प्रचार प्रसार केला, त्या माढेकर परिवारांच्या घरी  पू. आक्का रहात असत. मी नांदेडला ज्या भागात राहत होतो तेथे आजूबाजूला शेती असल्यामुळे मी पू. आक्कांना स्कूटरवरून घरी नेऊ शकलो नाही. पू. आक्कांची पाय धूळ माझ्या घरी पडली नाही हे माझे दुर्दैव.

वंदनीय आक्का यांनी दासबोध सखोल अभ्यास उपक्रम सुरू केला, त्यानंतरचे पहिले संचालक आदरणीय वसंतराव तथा तात्यासाहेब गाडगीळ; समर्थ रामदास स्वामी आणि मी; आंम्हा सगळ्यांचे गोदावरीशी एक वेगळे नाते आहे. पू. आक्कांनी नांदेडला देह ठेवला आणि मी सुद्धा नांदेडला नाभीस्थान असलेल्या गोदाकाठीच रहात असे. आता संभाजीनगरला आलो असलो तरी येथून जवळच गोदावरी आहे. 

तीर्थरूप तात्यासाहेब गाडगीळ यांनी घालून दिलेल्या शिरस्त्याप्रमाणे आणि पू. आक्कांच्या शिस्तीप्रमाणे दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची यशोगाथा चढत्या वाढत्या आलेखाने समर्थ संप्रदायात चालू आहे. या उपक्रमाचा कुटुंब प्रमुख म्हणून मला मोठा अभिमान आणि समाधान आहे. समर्थ संप्रदायामध्ये दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन म्हणून नोंदणी झाली. उपक्रमातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ जाणकार यांनी तयार केलेल्या रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळाचे चढते वाढते कार्य पाहून, समर्थ संप्रदायच नव्हे तर इतर अनेक संतांची काव्य आणि वाङ्मय यांचा सुद्धा संकेतस्थळावर समावेश केला आहे. या संकेतस्थळामुळे अध्यात्मिक क्षेत्रात अनेक गोष्टी सहज आणि सुलभ झाल्या आहेत. 

दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या उपक्रमातील अनेक साधक आणि समीक्षक हे लेखक, प्रवचनकार व निरूपणकार म्हणून समाजात पुढे येत आहेत. २०२१ मध्ये पू. आक्कांची जन्म शताब्दी मोठ्या उत्साहाने देश, विदेशात साजरी करण्यात आली. पावणे दोनशे वर्षांपूर्वी पूजनीय योगीराज महाराजांनी हैदराबाद येथे समर्थांचे ओवीबद्ध चरित्र सांगितले तो ग्रंथ म्हणजेच श्री दासलीला आणि इतर अनेक ग्रंथांचे प्रकाशन या वर्षभरात फाउंडेशन तर्फे करण्यात आले. 

श्री सुंदरमठ सेवा समिती, शिवथरघळ येथे आलेला मोठा प्रलय आणि झालेली पडझड यात खारीचा वाटा म्हणून पू. आक्कांचा दास्य भक्तीचा आदर्श घेऊन दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन तर्फे रुपये अकरा लाख एवढा निधी तेरा दिवसांमध्ये जमा झाला, ही एक मोठी उपलब्धी होय. त्याचप्रमाणे पूजनीय स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी अयोध्येत समर्थांच्या नावे वेद पाठशाळा काढण्याचे  घोषित केल्यानंतर आपला खारीचा वाटा म्हणून अकरा लाख रुपयांचा निधी स्वामीजींना पुण्यातील मोशी येथील दिमाखदार सोहळ्यात श्री दासनवमी अर्थात २२ फेब्रुवारी, २०२५ या दिवशी अर्पण करण्यात आला. त्यापूर्वी फाउंडेशनच्या शंभर साधकांनी नोव्हेंबर मध्ये अयोध्येत जाऊन समर्थ संप्रदायातील प्रस्थानत्रयी ग्रंथाचे पारायण केले. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची आकाशात फडकत असलेली ही ध्वजा पाहून  पू. आक्कास्वामी वेलणकरांना नक्कीच आनंद होत असणार. फाउंडेशनचा हा उपक्रम अभ्यासाची खोली आणि शिस्तीची पातळी वर्धिष्णू ठेवत दातृत्व संपन्न असा ‘समर्थ भक्तांचा परिवार’ समाजापुढे येतो आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करीत कोजागिरी पौर्णिमेपासून पासून सात दिवस साधना सप्ताह साजरा करणारा  समर्थ भक्तांचा हा मेळा पू. अक्का स्वामींच्या ध्येयाप्रमाणे उत्कट साधक तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

श्री दासविश्रामधाम …………….. समर्थ संप्रदायाचा एन्सायक्लोपीडिया

एक्केहाळी अर्थात सध्याचे जहीराबाद मठाचे मठपती श्री आत्माराम महाराज यांनी श्री दासविश्रामधाम या ग्रंथाची रचना केली आहे . श्री समर्थ रामदास.. कल्याण ..शिवराम.. रामचंद्र आणि आत्माराम अशी ही शिष्य परंपरा होय. आत्माराम महाराजांचे मूळ नाव तीपण्णा. त्यांच्या मुंजीनंतर त्यांना प्रखर वैराग्य प्राप्त झाले. एके दिवशी त्यांचा भाग्योदय होऊन आपचंद मठाचे मठपती रामचंद्र महाराज यांचा त्यांना अनुग्रह झाला .
एक हजार पानांचा हा ग्रंथ एक्केहळी मठाच्या बाहेर नेता येत नाही, अशी त्याची ख्याती आहे. हा ग्रंथ उतरवून घेण्याचे मोठे काम समर्थ हृदय नानासाहेब देव यांचे कडे असलेल्या श्री श्रीधर पंत नाटू टिकले यांनी केले. हा ग्रंथ नक्कल करून घेण्यासाठी त्यांना चार महिने दहा दिवस लागले. 1910 मध्ये या ग्रंथाची नक्कल झाली. आणि पुढे बारा वर्षांनी म्हणजे 1922 मध्ये श्री नानासाहेब देव तथा शंकर श्रीकृष्ण देव यांनी हा ग्रंथ छापून समर्थ भक्तांपुढे आणला .
श्री रामदास स्वामींचे बृहत चरित्र असलेला श्री दासविश्रामधाम या ग्रंथांमध्ये 121 अध्याय असून ओवी संख्या ही सोळा हजार तीनशे एवढी आहे . या ग्रंथात जवळपास 500 अभंग , 230 पदे , 100 श्लोक आणि प्रसंगोपात घेतलेल्या आरत्या , भूपाळ्या अशी सगळी संख्या 17000 ओवींच्या पुढे जाते. या ग्रंथामध्ये श्री समर्थांचे चरित्र आलेले आहे. पण त्यात बालपण , तारुण्य, साधना काळ , समर्थांचे परिभ्रमण, हिंदवी स्वराज्याची स्थापना अशा क्रमाने आलेले प्रसंग दिसत नाहीत . बरीच नाविन्यपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला प्रसंगोपात दिसून येते. अनेक संतांची पदे या ग्रंथामध्ये आपल्याला पहावयास मिळतात.

साडेतीन कोटी जप संख्या झाल्यानंतर माझे दर्शन होईल असे प्रभू श्रीरामांचे वचनाचा संदर्भ या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो . समर्थांनी घेतलेल्या 36 मुद्रांची अर्थात नावांची 36 पदे ओळीने आलेली आहेत, ही एक खासियत या ग्रंथात दिसते.

समर्थ रचित मनाचे श्लोक , त्याचे महत्त्व आणि पद्धत आपल्याला या ग्रंथात विशेषत्वाने सांगितलेली आहे. आद्य कवी मुकूंद राजांच्या विवेक सिंधूचा प्रभाव दासबोधावर आहे याचा प्रत्यय आपल्याला आत्माराम महाराजांनी वर्णन करून सांगितला आहे . या ग्रंथात क पासून क्ष वर्णापर्यंत अक्षर माळीका डफ गाणे आपले लक्ष वेधून घेते . अशा अनेक वैविध्यपूर्ण आणि प्रसंगांची वर्णने असलेला हा ग्रंथ म्हणजे समर्थ संप्रदायाचा एनसायक्लोपीडिया होय. कीर्तनकार , प्रवचनकार , समर्थ भक्त आणि समर्थ वाङ्मयाचे संशोधक यांच्या घरी हा ग्रंथ असणे म्हणजे समर्थांची वांग्मयीन मूर्तीच आपल्या घरी आहे, अशी आनंददायी व भाग्याची बाब समर्थ भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे. धुळे येथील सत्कार्योतेजक सभेने ( श्री नाना साहेब देव मार्ग, राम वाडी, धुळे 424OO1) या ग्रंथाची उपलब्धता सर्वांना करून दिलेली आहे, ही मोठी समाधानाची गोष्ट आहे.

परम पूजनीय अक्का स्वामी वेलणकर यांनी चाळीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे समीक्षक श्री अनिल वाकणकर यांनी महत्प्रयासाने या ग्रंथाचे पीडीएफ केले, तर श्री आनंद जोगळेकर आणि त्यांच्या टीमने श्रीदासविश्रामधाम हा ग्रंथ दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या संकेतस्थळावर जगातील सर्व समर्थ भक्तांना अथक परिश्रमातून उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

समर्थ संप्रदायासाठी एक अभिमानास्पद कार्य या मंडळींनी केले आहे, याचा मोठा आनंद वाटतो.

ग्रंथाची लिंक  – https://ramdasswami-sahityashodh.in/shridasvishramdham.aspx

|| जय जय रघुवीर समर्थ ||

प्रास्ताविक

दि. ०७/१२/२०२४
(चंपाषष्ठी)

राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींचे चरित्र, वाङ्मय आणि या श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथत्रयींचा चिकित्सक अभ्यास म्हणजे “दासबोध सखोल अभ्यास उपक्रम”! श्री समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणार्‍या अनेक व्यासपीठांमध्ये “दा.स.अ.” फाउंडेशन गुणवत्ता आणि शिस्त या दोन्ही आयामांवर उच्चस्थानी विराजमान आहे याचा सार्थ अभिमान वाटतो.

विश्वातल्या सहा देशांमध्ये आणि देशातल्या नऊ राज्यांमध्ये अभ्यासार्थी असलेले “दासबोध सखोल अभ्यास फाऊंडेशन” आता आपली कार्यध्वजा “संकेतस्थळाच्या” माध्यमातून जगभरातील साधकांपर्यंत सहजपणे फडकवित ठेवणार याचा मोठा आनंद वाटतो आहे. “दा.स.अ. संकेतस्थळाच्या” रुपाने समर्थ रामदासस्वामींचे तत्वज्ञान संपूर्ण विश्वातील मानवाला ऐहिक आणि पारमार्थिक पातळीवर उच्चस्थान मिळवून देईल यात शंका नाही. “मागील पाच हजार वर्षात श्री दासबोधासारखा मानवी जीवनाच्या प्रत्येक आयामाला स्पर्श करुन ते जीवन सुखकर करणारा ग्रंथ झाला नाही” या प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या मुखारविंदातून निघालेल्या वाक्याचे मला येथे स्मरण होत आहे. साध्या यःकश्चित भाजीच्या व्यवहारापासून मानवी जीवनाचे अंततोगत्वा ध्येय म्हणजे मोक्षा पर्यंतचा विचार ज्या अलौकिक आणि अद्भूत वाङ्मयात केला , ते म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले ४५००० हजार पेक्षा जास्त ओवी संख्या असलेले हे साहित्य !

मानवी जीवनाचे आत्मभान जागृत करणारे हे अक्षर वाङ्मय प.पू. अक्कास्वामी तथा आशालता चिंतामणराव वेलणकर यांनी चाळीस वर्षांपूर्वी रुजवलेल्या “दासबोध सखोल अभ्यास फाऊंडेशन संकेतस्थळाच्या” रुपाने जगासमोर येत आहे याचा सात्विक अभिमान आणि आनंद आम्हास वाटतो.
“दा.स.अ. संकेतस्थळासाठी” कार्यरत असलेल्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो. या अलौकिक व अथक कार्यासाठी अभिनंदन करण्याचे आणि धन्यवाद देण्याचे भाग्य मला मिळाले हा माझ्यासाठी कृतार्थ क्षण होय !

– विजय लाड

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language