श्रीसमर्थांचा राजधर्म

श्रीसमर्थांनी स्वतः राजकारण केले नसले तरीही राजनीतीच्या स्पष्ट कल्पना व त्यावर सखोल मार्गदर्शन त्यांनी २० ओव्यांच्या  राजधर्म प्रासंगिक अभंगातून केले आहे. 

“नमो मंगळमूर्ति विघ्नहरू | सरस्वतीस नमस्कारू |

सद्गुरू संत कुलेश्वरू | दाशरथी || १ ||”

या काव्याची सुरुवात मंगलाचरणाने केली असून मंगलमूर्ति श्रीगजाननास वंदन केले आहे. श्रीगणेश हे ईश्वराच्या निश्चळ अंगाचे स्वरूप होय. संत साहित्यात श्रीगणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव. माणसाच्या मनात अर्थ समजण्याची पात्रता श्रीगणपतीच्या अधिष्ठानामुळे येते. ज्ञानाचे आकलन होण्यासाठी श्रीगणेश कृपा हवीच. श्रीगणेश बुद्धीदाता आहे. अज्ञान नाहीसे करून मनातील भ्रम घालवून सिद्धीचे फळ देतो. श्रीगणेश विघ्नहर्ता आहे. तेंव्हा हाती घेतलेल्या कार्यात अडचण किंवा विघ्न येऊन ते अर्धवट राहते. कार्य खंड न पडता पूर्णत्वास जाण्यासाठी श्रीगणेशास वंदन केले आहे. 

त्यानंतर माता श्रीसरस्वतीदेवीस वंदन केले आहे. श्रीसरस्वती ही ईश्वराच्या चंचळ अंगाचे स्वरूप होय. ही वेदांची आई, ब्रह्मदेवांची कन्या व वाणीची स्वामिनी आहे. आपल्याला समजलेल्या अर्थाला शब्दरूप देण्याची शक्ति श्रीशारदादेवी मुळेच प्राप्त होते. त्यामुळेच जगातील सर्व कर्तृत्व श्रीशारदादेवीच्या कृपेने चालते. श्रीसरस्वतीदेवी मुळे वेद, शास्त्र, पुराणे इत्यादींना मोठेपणा प्राप्त झाला आहे. यासाठी श्रीसरस्वतीला वंदन केले आहे.        

त्यानंतर सद्गुरूंना वंदन केले आहे. सद्गुरू हे ईश्वराचे अनंत परमात्मस्वरूप होय. सद्गुरुंचे शब्दात वर्णन करणे कठिण आहे. सद्गुरू कृपा प्रसादानेच भगवंताचे दर्शन घडू शकते. आत्मानुभूती प्राप्त होते. साक्षात्काराचा अनुभव सद्गुरू कृपेनेच मिळतो. यामुळे श्रीसमर्थांनी सद्गुरूंना वंदन केले आहे.      

यानंतर श्रीसमर्थांनी संताना वंदन केले आहे. संत आत्मस्वरूप असतात. संत संगत माणूस जन्माचे सार्थक करून देते. त्रैलोक्यात शोधले तरीही सापडणार नाही असे अलौकिक दान संत देतात. त्यामुळे श्रीसमर्थांनी संतांना वंदन केले आहे. आणि श्रीसमर्थांच्या कुळाचा ईश्वर कुळेश्वर दाशरथी श्रीरामाला वंदन केले आहे. कारण सर्व कार्याचा सिद्धीदाता तोच आहे. अशा रीतीने श्रीसमर्थांनी प्रथम चरणात श्रीगणेश, श्रीसरस्वती, श्रीसद्गुरू, श्रीसंत आणि कुळेश्वर दाशरथी श्रीरामाला वंदन करून राजधर्म यास आरंभ केला आहे.   

“श्रोती मानेल तरी घ्यावे | अथवा वाचुनि सांडावे |

प्रपंचाकारणे स्वभावे | बोलिलो मी || २ ||”   

श्रीसमर्थ राजाचा धर्म, नेत्याचा धर्म, कर्त्या पुरुषाचा धर्म अर्थात त्यांचे आचरण कसे असावे ते सांगत आहेत. पण हे आचरण कसे असावे हे सांगताना, त्यांचे हे मत स्वीकारण्याची जबरदस्ती श्रीसमर्थ करीत नाहीत. “प्रपंच्याकारणे स्वभावे | बोलिलो मी ||” चांगले व्हावे म्हणून ते मार्गदर्शन करीत आहेत. तरीही ते मार्गदर्शन योग्य वाटले तर स्वीकारावे. मुलगा विचारो अथवा न विचारो, आई- वडिलांच्या अंत:करणात मुलाच्या हिताबद्दल अंतरीक तळमळ असल्यामुळे मायेपोटी ते सांगत असतात. तीच माया श्रीसमर्थांच्या मनात आहे. कर्त्या नेत्याचे कल्याण व्हावे हा त्यांचा हेतू आहे. म्हणून त्यांचे म्हणणे ऐकाच असा आग्रह न धरता ते म्हणतात “श्रोती मानेल तरी घ्यावे”. पटले तर स्वीकारावे आणि नाही पटले तर “दाटुनी सांडावे”, सोडून द्यावे; अशी विनंतीही श्रीसमर्थ करीत आहेत. भांड्यात पाणी काठोकाठ भरलेले असेल, त्यात जागा नसेल तर वरून टाकलेले पाणी खाली सांडून वायाच जाणार. तसेच मनात ऐकण्याचा, शिकण्याचा, समजून घेण्याचा भाव नसेल, गर्वाने – अभिमानाने मन भरलेले असेल, तर त्यात बोधामृत मावणार नाही, तर ते सांडणार हे निश्चित. श्रीसमर्थांचा अधिकार खरे तर खूप मोठा आहे. म्हणून  “प्रपंच्याकारणे स्वभावे | बोलिलो मी ||” असे मायेचे बोलणे श्रीसमर्थ बोलत आहेत.                                                  

“सावधपणे प्रपंच केला | तेणें सुखचि पावला |

दीर्घ प्रेत्ने मोडला | कार्यभाग सांधे || ३ ||”

श्रीसमर्थ आता लोकसंग्राहकाला, नेत्याला, राजाला, प्रमुखाला राजधर्माचे; नेतेपणाचे वर्म सांगत आहेत. प्रपंच, मग तो आपल्या वैयक्तिक कुटुंबाचा असो किंवा देशाचा; तो नेहमीच सावधपणे आणि जागरूकतेने केला पाहिजे. कुटुंबप्रमुख म्हणून कुटुंबाचा तर राजा म्हणून देशाचा. दोन्ही कर्तव्ये सारखीच महत्त्वाची आहेत. त्यांचा तो स्वधर्म होय. हा प्रपंच कारभार अत्यंत काळजीपूर्वक, दक्षतेने सर्वांच्या हिताचा विचार करून केला पाहिजे. सर्वांस समान वागणूक द्यावयास हवी. कमीजास्त असा दुजा भाव नको. अनावधानानेही भेदभाव होऊ न देता, मनात समता ठेवून सतत जागरूक वागावयास हवे. तरच सर्वाना सुख लाभेल. स्वधर्माचे, स्वतःच्या कर्तव्याचे पालन करताना, प्रपंचाचा खर्चाचा हिशोब मांडताना, आईवडील; मुले; स्वतःचा जोडीदार; भागीदार; अत्यंत जवळचे नातलग; सहकारी; मित्रदोस्त; शेजारी आणि समाजातील इतर लोक यांच्याशी वागताना सर्वांची मने सांभाळून वागावे लागते. प्रसंगी त्यांच्या मनाला न पटणारे निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी धैर्याने, जबाबदारीने कर्ता पुरुष म्हणून काही वेळा मन कणखर; कठोर करावे लागते. असे आचरण करताना अंगी चिकाटी असावी लागते. अशा वागण्याचे सातत्य नित्य हवेच. असा अखंड प्रयत्न करीत राहिला तरच हाती घेतलेल्या कार्यात हमखास यश मिळून कार्यभाग साधतो. म्हणून अखंड, सतत सावधपणाने, जागरूकतेने वागल्यास हातून चूक घडत नाही. सर्व आनंदी राहून प्रपंच कुटुंबाचा असो की देशाचा यशस्वी होतो. 

“आधी मनुष्य ओळखावे | योग्य पाहूनि काम सांगावे |

निकामी तरी ठेवावे | येकीकडे || ४ ||”

या ओवीतून श्रीसमर्थ तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार मांडत आहेत .  

१) आधी योग्य माणसाची पारख करावी.

२ ) त्याला योग्य तेच काम द्यावे. 

३) निकामी लोकांना वेगळे बाजूला काढावे.  

कोणतेही सार्वजनिक काम, राज्य कारभार, लोकसंग्रह करताना आणि घरचे काम करताना सुद्धा, ते काम करण्यासाठी; योग्य माणसाची पारख करता यायला हवी. माणूस कसा आहे, त्याचे आचार-विचार, आवड-निवड कशी आहे हे समजायला हवे. त्याच्या वागण्या-बोलण्यावरुन त्याच्या स्वभावाचा अंदाज येतो. कामाचे स्वरूप काय आहे हे पाहून, योग्य माणसाची निवड करून, त्याला झेपेल असेच काम त्याच्यावर सोपवावे. कारण काम करण्याची क्षमता सर्वांमध्ये सारखीच असते असे नाही तर व्यक्ती-व्यक्ती परत्वे ती भिन्न भिन्न असू शकते. माणूस ओळखून, योग्यता पाहून काम दिल्यास त्या कामात हमखास यश येते. कार्य  यशस्वीरित्या पार पडते. अडचणी कमीतकमी येतात. माणसाची पारख करताना, एखादा माणूस निकामी असेल; कामाचा कंटाळा करणारा; जबाबदारीने काम न करणारा; कामचुकार असेल; निरुपयोगी असेल; तर तो काम करण्यास अयोग्य समजून त्याला त्या कामापासून बाजूला सारावे. इतरांपासून दूर ठेवावे. कारण अशा माणसामुळे इतर काम करणारेही बिघडू शकतात. आणि मग कार्य पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो, कार्य अपूर्णही राहू शकते. म्हणून माणसाची योग्यता, वकूब, कुवत पाहून, त्याची काम करण्याची क्षमता लक्षात घेऊन त्याला योग्य ते काम द्यावे. तरच कार्य तडीस जाते, पूर्णत्वास जाते. अन्यथा कुचर, आळशी, निकामी माणसामुळे कार्य अपूर्ण राहते.   

क्रमशः 


|| जय जय रघुवीर समर्थ ||

|| श्रीराममंत्राचे श्लोक ||

शास्त्र, वेद इत्यादी पेक्षा ही रामनाम श्रेष्ठ आहे  असे श्रीसमर्थांचे श्रीराममंत्राचे एकूण ४९ श्लोक आहेत. कलियुगातील धकाधकीच्या जीवनशैलीत, राममंत्रश्लोक म्हणजे सुखी शांत समाधानी जीवन जगण्याचा श्रीसमर्थांनी दाखवलेला अत्यंत सुंदर सोपा मार्ग आहे. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे |’ हे चरण घेत मंत्राचे महत्व सांगितले आहे. यात माणसाने काय करु नये याची यादीच दिली आहे. पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगण्यासाठी बहुपुण्याने नरदेह मिळाला आहे तो विषयात, प्रपंचात न गुंतवता त्याचे सार्थक करावे यासाठी राममंत्राचे प्रयोजन. 

      

बालपण खेळ व शिक्षणात जाते. तारुण्यात आधी स्वतःचे लग्न, नंतर मुलांचे शिक्षण, मुंज, लग्न या प्रपंचासाठी नोकरी व्यवसाय करताना, यश; किर्ती; वैभव; स्थावर जंगम; प्राप्तीसाठी, घाण्याला बैल जुंपल्याप्रमाणे आयुष्य रात्रंदिवस खर्ची घालतो. खूप द्रव्य कमावतो कधी पत्नीप्रेमात मातृपितृऋण विसरतो. गुळाला मुंगळे तसे द्रव्यासाठी आप्तइष्ट चिकटतात. लोकेषणेत साधुसंत यांना मदाने बोलतो. आपल्या अवतीभोवती असलेल्या काही वृद्ध तर काही तरुणांचे मृत्यु पहावे लागतात. काहींच्या वाट्याला स्वतःच्या मुलांचे क्रियाकर्म करण्याचे दुर्दैव येते. यातच तारुण्य संपून वृद्धावस्था येते. 

देह विषयभोगात रमला तर पुढे अनेक रोग होतात. म्हातारपणी डोळे, कान, नाक, दात क्षीण होतात. इंद्रियांवर ताबा राहिला नाही की मुले कन्या, सून नातवंडे बोलू लागतात. घरातील सर्वांनाच कंटाळा येतो. शेजारीपाजारी बोलू लागतात. आयुष्य लोडाला टेकून ऐश्वर्यात घालवलेले, पण म्हातारपणाचा काळ कठिण जातो. सगळे आपल्या मृत्युची वाट पाहत आहेत, हे पाहून वाईट वाटते. पण दिवसही संपतासंपत नाहीत. अंतसमयी कोणी कोणाचे नाही हेच सत्य आहे. पण काळाच्या हातात मापदंड आहे. काटेकोर तराजू घेऊन तो मोजमाप करीत असतो म्हणून त्याला मापारी म्हटले आहे. 

 

काळ कसा आहे ? काळा, गोरा की सावळा, उंच की बुटका ? जीवास एकदम न सांगता घेऊन जातो म्हणून वेडा की; न सांगता आपले कार्य चोख बजावतो म्हणून शहाणा ? काळ नेमका कसा आहे हे कोणीही पाहिले नाही. पण तो त्याचे अस्तित्व दाखवतो म्हणून आहे हे निश्चित. हा काळ पक्षी नसला तरी त्याच्या गतीला आकाश सुद्धा कमी पडते. त्याच्या गतीला कोणीही बाधा आणू शकत नाही, आणि या काळापासून कोणीही कोणालाही वाचवू शकत नाही. या काळाचे सावज चराचरातील सगळे जीव आहेत. म्हणून समर्थ विनवणी करतात की काळाची गती ओळखा. आपण त्याचे सावज आहोत. तो पक्षासारखा कधीही येऊन झडप घालून माणूसरूपी त्याचे भक्ष घेऊन जातो. तेव्हा आताच सावध होऊन काळाची गती ओळखा. म्हणून समर्थ म्हणतात ‘रवीसुत ते दूत विक्राळ येती |’ रवीसुत म्हणजे सूर्यपुत्र यमराजा. यमराजाचे यमदूत आपल्याला सांगून येत नाहीत. त्यांच्याकडे आपल्या कर्माचा अगदी शंभर टक्के बरोबर हिशोब असतो. तिथे कोणालाही दयामाया, क्षमा, माफी नाही. ‘दशग्रीव लंकापुरी मस्त जाला |’ सोन्याची नगरी असलेला लंकापती  रावण यालाही मृत्यु आला. पण द्वेषाने का असेना अखंड रामाच्या स्मरणात दिवस गेल्याने मोक्ष मिळाला. आणि नित्य रामनामस्मरणात रमणारा बिभीषण चिरंजीवपद पावून लंकेचा राजा झाला. 

तपस्वी मनस्वी भले पार गेले | दुजी सृष्टिकर्ते असे थोर मेले |

चिरंजीव कल्पायु गेले किती रे |२२||

मृत्युसमयी काळ कोणाचेही रूप, संपत्ती, महती, तपाचरण या कशाचाही विचार न करता एका क्षणात घेऊन जातो. मग पुढे केलेल्या कर्माचे फळ भोगणे आले. पापकर्म केले तर यमयातना भोगाव्या, पुण्यकर्म केले तर स्वर्गलोक भोगावा. पण दोन्ही ठिकाणचे  भोग भोगून संपले की पुन्हा या भुलोकावर जन्माला येणे आहेच, मोक्ष नाही. जन्ममृत्यु चक्रातून सुटका नाही. प्रारब्ध संचित या प्रमाणे नवा जन्म.

नवा जीव मातेच्या उदरात नऊ महीने ‘अधोमुख विष्ठेमधे मायपोटी’ गर्भयातना भोगतो. श्रीसमर्थांनी या देहाला केतकीचे बन म्हटले आहे कारण जीव जेव्हा जन्मास येतो तेव्हा केतकीसारखा सोन्यासारखा शुद्ध स्वरुप असतो. नंतर मोठा होताना अहंकाराचे-षड्रिपुचे एकेक डाग लागत त्याचे स्वरुप बदलत जाते. 

सोsहं सोsहं म्हणणारा जीव कोsहं कोsहं म्हणत राहतो. जन्माला येताना एकटे येतो. मृत्युनंतर जाताना स्मशानापर्यंत सोबत येतात, पुढे एकटा प्रवास. जन्माला येताना कमजोर येतो. वृद्धापकाळी जाताना कमजोरच जातो. जन्माला येताना पैसा, सामान काहीही न घेता येतो. जातानाही पैसा, सामान, कुटुंब, जायदाद काहीही सोबत येत नाही. जन्माला आल्यावर पहिले स्नान दुसऱ्याच कोणी घातलेले असते. शेवटचे स्नान पण दुसरेच घालतात. आयुष्य हे असेच आहे. मग त्यात षड्रिपु, अहंकार, विषयवासना एषणा कशाला हव्या ? आपण या जगात काही ठराविक काळापूरते आलो म्हणून जीवन इतर फालतू कामात घालवणे पढतमूर्खपणा आहे. ‘कसी जन्मुनी माय त्वां वांझ केली’  वंशाला लाजिरवाणा असा भूमीला भार जणू धोंडा. धोंडा तरी काही कामाला येतो.

म्हणून समर्थ या राममंत्राचे श्लोकातून काय करु नये ते सांगताना म्हणतात – 

नको योग अष्टांग तो रोध प्राणा | नको कृच्छचांद्रयणी हट्ट जाणा ||

अपभ्रंश हा मार्ग की वोखटा रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||१७||

तसेच ‘ नको तू कदापी करु तीर्थयात्रा | तनूदंडणी क्षीणता सर्व गात्रा |

करी ग्रस्त आयुष्य तू कोणसारे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||२०||

अलंकारमानी तनू सजवीतो | मना दर्पणी पाहुनी रंजवितो |

कळेना जळे सर्पणी रूप ते रे |

म्हणून हा मनुष्य देह सजवण्यापेक्षा आत्मा ‘राममंत्राने’ सजव. समारोपात समर्थ म्हणतात-

‘महाघोर हा थोर संसार मोठा | कळे संतसंगे समुळीच खोटा |

कळे भक्ति मुक्ती विरक्तीच गा रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||४६||

हे संत सद्गुरू पंचाक्षरी मांत्रिक आहेत. निःसंशय ते मिथ्या संसाराची भूतबाधा काढून टाकून, युक्तीने देहबुद्धीची राखरांगोळी करीत आत्मबुद्धी जागृत करीत, रामनामबीजमंत्राने पश्चातापदग्ध करुन, अनुतापाच्या चटक्याने जागे करीत, विवेकरूपी फोकाचे मार देत, धि:काराची धुरी देऊन साधकातील दोष काढून टाकतात. अंतराची तगमग वाढवून, जीवावर पुन्हापुन्हा येणाऱ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या  संकटाची जाणीव करुन देत, मातृवत्सल भावाने त्यातून निश्चितपणे सोडवत मोक्ष प्राप्त करुन देतात. यासाठी हे माणसा ! सगळी  साधने सोडून देवून फक्त मनोमनी रामनाम मंत्राला वंदन करीत रामनामबीजमंत्र जप. या भवसागरातून सोडवणारा तोच एकमेव रामबाण उपाय आहे. 

कली साधने याविणे सर्व निंदी | हरे राम हा मंत्र जो त्यासि वंदी |

हरे राम हे माळिका साध का रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||४९||

प्रभूप्राप्ती कुलूपाची खरी मूळ किल्ली रामनाम हीच आहे. रामनामापुढे वेद, शास्त्रे, पुराणे ग्रंथाभ्यास सर्व त्यागून ‘राम’ हा एकच नाममंत्र जो अखंड जपतो, त्याला निश्चित मोक्ष प्राप्त होतो.  

|| रामकृष्णहरी ||

Language