तपस्वी मनस्वी बहू पार गेले।
दुजी सृष्टीकर्ते असे थोर मेले।
चिरंजीव अल्पायु गेले किती रे।
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे॥२२॥
सरळ अर्थ — मृत्यु कोणालाही कोणत्याही उपायाने टाळता येत नाही.थोर थोर तपस्वी,संशोधक एवढेच काय पण प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य अंगी असणारे ऋषी सुद्धा मृत्युच्या मार्गाने गेले.अगदी चिरंजीव/दीर्घायुष्य लाभलेले किंवा अत्यंत अल्पायुषी मृत्युच्या वाटेने गेले.जगात सर्वात निःपक्ष मृत्यु आहे.तेव्हा हरे राम हा मंत्र सोपा जपावा हेच खरे.
श्रीसमर्थांचा बोध — ग्रंथराज दासबोधात श्रीसमर्थ मृत्यूनिरूपण समासात ‘ मृत्यू न म्हणे ‘अशी सुरवात करून मृत्यु पावणाऱ्या सर्वांची सविस्तर यादीच देतात.आणि ” सकळ जीवास प्राशन। मृत्यचि करी॥” म्हणत हा ‘मृत्युलोक’ आहे असे दाखवून देतात.उपजे ते नाशे हा सृष्टीचा नियम आहे.आणि त्याला कोणताहीअपवाद नाही. या जगातील एकमेव सत्य म्हणजे मृत्यु.या मृत्युचे एक रूप काळ आहे.हा काळ ईश्वराची विभूती असुन प्रवाही आहे.देह जन्माला आला त्याच क्षणापासून तो मृत्युच्या दिशेने धावत असतो.हा काळ देहाला कसा अलगदपणे मृत्युमुखात नेऊन सोडतो हे कळतही नाही.म्हणुन मृत्युला घाबरायचे नसते तर त्याला सामोरे जायचे असते.आपले आचरण शुद्ध ठेऊन त्याचे नित्य स्मरण ठेवायचे असते.श्रीसमर्थ म्हणतात “मरणाचे स्मरण असावे।हरिभक्तीस सादर व्हावे।” आपल्या देहदुःखाचा,यातनांचा, चिंता-काळजीचा अंत करणारा तो आपला हितैषी आहे हे समजुन घेतले तर त्याची भीती दूर होईल.श्रीसमर्थ याच समासाच्या शेवटी मृत्यूवर मात कोण करु शकतो याचे उत्तर देतात..”असो ऐसे सकळही गेले।परंतु येकचि राहिले।जे स्वरूपाकार जाले।आत्मज्ञानी॥”आणि असे आत्मज्ञानी होण्याची पहिली पायरी आहे ‘ नामस्मरण साधना. ‘ या साठी श्रीसमर्थ आग्रहाने सांगतात हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. जय श्रीराम.
बहू कामधंद्यामधे धाव घेसी।
किती नावारूपा जगी मिरवीसी।
कशाला तुला उंट घोडे नगारे।
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२३॥
सरळ अर्थ — चरितार्थासाठी काही कामधंदा करणे अपरिहार्य आहे.पण माणूस सतत त्यातुन मिळणाऱ्या पैशाच्या मागे लागतो का तर पैसा मुबलक मिळवला,ऐश्वर्य वाढले तर मानमरातब वाढतो,प्रतिष्ठा मिळते,समाजात कीर्ति होते.श्रीसमर्थ या श्लोकातुन सांगतात की,कशाला या भंपक आणि भ्रामक मायाजालात अडकतो! आज जरी कौतुकाचे नगारे झाडताना दिसत असले तरी ते अशाश्वत आहे क्षणभंगुर आहे.शाश्वत/कायमस्वरूपी सुखशांती हवी तर हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.
श्रीसमर्थांचा बोध — श्रीसमर्थ द्रष्टे होते याची प्रचिती दासबोधात पदोपदी येते.चारशे वर्षापुर्वीच त्यांना आजची परिस्थिती समोर दिसत होती.म्हणुनच त्या काळी लिहुन ठेवलेले आज अनुभवाला येत आहे.उदरभरणासाठी कामधंदा करणे अपरिहार्य आहेच परंतु केवळ धनावर/पैशावर दृष्टी ठेऊन सर्वकाळ काम-धंदा करित राहाणे म्हणजे भगवंताने विशेष हेतुने दिलेले हे जीवन वाया घालवणे होय.होते काय की,चरितार्थ चालवण्यासाठी माणूस काम-धंदा करू लागतो,त्यातुन त्याला पैसा मिळतो,सतत तेच काम केल्यावर सहजच त्यात प्राविण्य येते व सहाजीकच त्याचे कौतुक होते.वाहवा होते.अभिमान वाटतो.हळुहळु त्याची सवय नव्हे चटक लागते.अहंकार वाढतो.भगवंताचे अनुसंधान सुटते आणि मनुष्य त्या कामातच गढुन जातो.बरं हे काम,उद्योग कर्मयोग म्हणुन न करता मान,मरातब,लौकीक,पद-प्रतिष्ठा ,असे अनेक स्वार्थमुलक हेतु अंतरी दडलेले असतात.जनसेवा, समाजसेवा या नावाने स्वतःची तुंबडी भरली जाते.त्या काळात श्रीसमर्थांनी हे बघितले आहे.आजची परिस्थिती तर आपण बघतोच आहोत.नोकरी धंद्याच्या मागे,नवनव्या ‘पॅकेजेसच्या’ मागे धावपळ करताना खाण्यापिण्याची शुद्ध रहात नाही.समोर नावलौकिक,प्रसिद्धी,पद-प्रतिष्ठा, सत्ता,ऐश्वर्य, यांचे मृगजळ दिसत असते. त्यापाठी धावताना शब्दशः दमछाक होते.खायच्या प्यायच्या वयात, पैशापाठी धावताना वेळ नसतो,तर वेळ मिळतो तेव्हा खाण्यापिण्यावर बंधने येतात.मग प्रश्न येतो की,का कशासाठी ही धावपळ?मानवी जन्माचा मुळ हेतु तर बाजुलाच पडतो.साधा आनंद सुद्धा उपभोगता येत नाही,आत्मिक समाधान कसे मिळणार? म्हणुनच श्रीसमर्थ या श्लोकातुन त्याची जाणीव करून देतात की मानसन्मानाच्या अपेक्षेत स्वतःचे नुकसान करून घेण्याऐवजी साधा सुलभ असा हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.जय श्रीराम.
म्हणे देश माझे भूमी गाव वाडे।
शिबीकासनी बैससी उंच लोडे।
कसा उंच तू मंचकी लोळसी रे।
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥२४॥
सरळ अर्थ — नशीबाने म्हणा किंवा पुर्वसुकृताने सधन घरात जन्म झाला.बालपण लाडाकोडात गेले.तारुण्यात कोणताही पुरूषार्थ न करता, वडिलांच्या कमाईवर ऐषारामात,हे घर माझे,गाव माझे,जमीनजुमला ऐश्वर्य सारे माझे. काहीही न करता माझे म्हणतोस.बरं खर्या अर्थाने काहीही आपले नसताना मस्तवालपणे हे माझे,ते,माझे ,असे ऐदखाऊ असुनही गाद्यागिरद्यावर लोळत लोळत गर्वाने म्हणतोस.यातले मृत्युनंतर कण सुद्धा बरोबर नेता येत नाही हे एकदा लक्षात घे. सहजी मिळालेल्या नरदेहाचे सार्थक फक्त आणि फक्त रामनाम स्मरणात आहे.मंचकी आरामात लोळण्या पेक्षा हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.असे श्रीसमर्थ कळवळ्याने सांगत आहेत.
श्रीसमर्थांचा बोध — माणसाला कुठे आणि कसा जन्म मिळावा हे त्याच्याच पुर्वकर्माचे फळ असते.मी मी माझे माझे करण्यात,नाना उपभोग घेण्यात ,तसेच ऐत्या पीठावर रेघोट्या मारण्यात कसला आलाय पुरूषार्थ ? आज भोगलालसा टोकाला पोहोचली आहे.माझे ते माझेच आणि तुझे ते ही माझेच ही वृत्ती समाजात फोफावलेली दिसुन येते. भोगाने त्यागावर मात केली आहे.” दुल्लभ शरीरी दुल्लभ आयुष्य।याचा करू नये नास।” असे दासबोधात श्रीसमर्थ ठामपणे बजावतात. ‘घबाड’ हाती आले आहे तर त्याचा पुर्ण लाभ करून घ्यावा. अर्थात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातुन स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अंतःकरणपुर्वक उपासना केली पाहिजे. भगवंताचे अनुसंधान राखले पाहिजे.नुसते “माझे माझे आणि भ्रमाचे ओझे” या म्हणीप्रमाणे मी माझे चे गाणे आधी बंद करावे लागेल. “पापपुण्य समता घडे।तरीच नरदेह जोडे।” असे जर आहे .तर ऐषोआराम झटकुन या दुर्मिळ संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत नामाला लागणे महत्वाचे ठरते.या साठीच श्रीसमर्थ येथे म्हणतात हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. जय श्रीराम.
॥जय जय रघुवीर समर्थ ॥