स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते समर्थ रामदास

श्रीसमर्थ रामदासस्वामींनी अध्यात्माची उपासना तर केलीच पण त्याच बरोबरीने ज्ञानोपासना देखील केली. ज्ञानोपासनेसाठी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना केली होती. श्रीरामाच्या उपासनेबरोबरच ज्ञानाची उपासना करणारा ‘रामदासी संप्रदाय’  हा एक नवीन संप्रदाय त्यांनी स्थापन केला. त्या संप्रदायाची नियमावली रामदासांनी आखून दिली होती. तिला ‘श्रीसंप्रदायाची वीस लक्षणे’ असे म्हणतात.

ज्ञानोपासनेसाठी श्रीसमर्थांनी अनेक ठिकाणी मठांची स्थापना केली. या मठांमध्ये त्यांनी लोकशिक्षणाची व्यवस्था निर्माण केली. या व्यवस्थेमध्ये कोणताही वर्णभेद, लिंगभेद, जातीभेद नव्हता.

रामदासी संप्रदायात असंख्य तरुणांच्या बरोबरीने समाजातल्या विविध स्तरातील, विविध वर्गातील आणि विविध वर्णातील स्त्रियादेखील सहभागी झाल्या होत्या. त्या स्त्रियांमध्ये गृहस्थाश्रमी महिलांबरोबरच अनेक बालविधवा, विधवा आणि परित्यक्ता स्त्रियांचादेखील समावेश होता.

स्त्रियांनी नेतृत्व करावे

श्रीसमर्थ  रामदासांनी आपल्या मठांमध्ये जे नियम घालून दिले होते त्यापैकी एक नियम होता, रामदासी संप्रदायातील अनुग्रहित किंवा उपासक स्त्रियांना मठातील स्वयंपाक वा स्वयंपाकाशी संबंधित कोणतीही कामे  न देण्याचा. त्यामुळे मठात स्वयंपाक करण्यापासून ते जेवण वाढण्यापर्यंतची सर्व कामे पुरुष उपासकच करत. नित्यनियमाने त्यांच्याकडून केली जाणारी स्वयंपाकादी कामे किंवा स्वच्छतेची कामे स्त्रियांना न देण्याचा आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रातील कामे करण्याचा पायंडाच श्रीसमर्थांनी आपल्या मठांमध्ये पाडला.

याशिवाय, उपासक म्हणून रामदासी मठांमध्ये आलेल्या स्त्रियांना लिहिण्या-वाचण्यासारखी बौद्धिक व दफ्तरी कामे देण्याचा नियम श्रीसमर्थांनी आखून दिला होता.  हा नियम देशभरातील आठ राज्यात शिल्लक असलेल्या २५० हून अधिक मठांमधून आजही पाळला जातो !

पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही परमार्थाचा अधिकार आहे असे श्रीसमर्थांचे मत होते. स्त्रियांनी धर्म आणि अध्यात्म या दोन्ही ठिकाणी नेतृत्व करावे अशी एक वेगळीच भूमिका श्रीसमर्थ रामदासांनी मांडली होती आणि त्यानुसार त्यांनी आचरणही केले. मठांवर मठाधिपती म्हणून श्रीसमर्थांनी स्त्रियांची नेमणूक केली. ज्या स्त्रियांना लिहिता- वाचता येत नसे त्यांना रामदासी मठामध्ये लिहायला व वाचायला शिकविले जाई. लिहिण्या-वाचण्यास आल्यानंतर त्या स्त्रियांना विविध ग्रंथांचा अभ्यास, पारायणे, जप-जाप्य -अनुष्ठाने करू दिली जात. उपासक स्त्रियांना लिहिण्या-वाचण्यास शिकवून श्रीसमर्थांनी स्त्रियांचे सबलीकरण केले !

स्त्रियांची निंदा करणाऱ्या एका वृद्धाला रामदासांनी,

“बहुता दिसांच्या वयोवृद्ध मूला| जनी बायकोच्या गुणे जन्म तूला |

तये जन्ननीच्या कुळा निंदितोसी |वृथा पुष्ट तू मानवामाजि होसी ||”

या शब्दात फटकारले आहे ! श्रीसमर्थांच्या नंतरच्या मठपतींनीही स्त्री- उपासकांच्याबाबतीत समर्थांनी घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे परांडा येथील रामदासी मठाचे सातवे मठपती हंसराजस्वामी ! या हंसराजस्वामींनी विधवा असलेल्या मनाबाई रजपूत या अशिक्षित, विधवा स्त्रीला लिहिण्या- वाचण्यास तर शिकविलेच पण मनाबाईंना त्यांनी वेदांतातील मंत्रही शिकविले. त्यावर आधारित ‘ कथाकल्पलता ‘ नावाचा एक ग्रंथ मनाबाईंनी लिहिला हंसराजस्वामींनी हा ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून अनेक शिष्यांना अध्ययनासाठी दिला.

मठपती म्हणून स्त्रियांची नेमणूक

शक्तिस्तोत्रांत श्रीसमर्थ रामदास लिहितात —

रामवरदायिनी माता| दासे धुंडुन काढली|

वोळखी पाडितां  ठाई| भिन्न भेद असेचिना ||

रामदासांनी हा श्लोक नुसता लिहिला नाही तर तो अंमलातदेखील आणला!  समर्थांनी त्यांच्या संप्रदायातल्या प्रत्येक स्त्रिला तिच्या बौद्धिक  क्षमतेला शोभणारे स्थान दिले.

श्रीसमर्थ रामदासांनी एक-दोन नव्हे तर अठरा स्त्रियांना रामदासी मठांचे मठपती म्हणून नेमले. या सर्व स्त्री- मठपतींचा उल्लेख ‘ गिरिधर- बखरी ‘ मध्ये आहे.  वेणाबाई व बाईयाबाई ( मिरज मठ ), अंबिकाबाई ( राशिवडे व वाळवे ), नबाबाई ( तापीतीर, गुजरात ), मनाबाई ( राजांगणी ), सखाबाई व कृष्णाबाई ( चाफळ ), अन्नपूर्णाबाई ( टाकळी ),  सतीबाई ( महाबळेश्वर ), आपाबाई , द्वारकाबाई,  गंगाबाई, मुधाबाई, बाकुबाई,  भीमाबाई, गोदाबाई अंताबाई ( कृष्णातीर )आणि  चिमणाबाई ऊर्फ आक्काबाई ( सज्जनगड मुख्यालय ) या  त्या अठरा स्त्री-मठपती होत.

चिमणाबाई ऊर्फ आक्काबाई या स्त्री-मठपतीचा उल्लेख सांप्रदायिक दफ्तरात ‘आक्कास्वामी’ असा आढळतो. या आक्कास्वामी लिहिण्या-वाचण्याबरोबरच दफ्तरी कामे, घोडेस्वारी, तलवारबाजी यात अतिशय निपुण होत्या. समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यतिथीला ‘दासनवमी’ उत्सवाचे स्वरूप आक्कास्वामी ऊर्फ आक्काबाईंनीच दिले आहे. याच आक्काबाईंनी, भारतात सर्वदूर पसरलेल्या मठांच्या मुख्यालयाचे काम, समर्थांच्या पश्चात सुमारे ३९ वर्षे अत्यंत समर्थपणे पेलले ! देशभरातील मठपतींशी  सज्जनगडावरून संपर्क साधण्याची एक विलक्षण यंत्रणा आक्काबाईंनी निर्माण केली होती.

श्रीसमर्थांच्या संप्रदायातल्या स्त्रियांना मठपती होण्याबरोबरच उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकारही होता. श्रीसमर्थांच्या काळात खरं तर स्त्रियांना आपल्याच घरात मोकळेपणी वावरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. अशा काळात समर्थांच्या शिष्या मठपती तर बनल्याच पण मठपती म्हणून मंदिरांमध्ये उभे राहून कीर्तनाद्वारे समाजाला त्या आध्यात्मिक ज्ञानही देऊ लागल्या. ही गोष्ट त्या काळात क्रांतिकारी अशीच होती. कीर्तन करणाऱ्या त्या स्त्रियांमध्ये गृहस्थाश्रमी स्त्रियांबरोबरच विधवा आणि परित्यक्ता स्त्रियादेखील होत्या. रामदासी मठात सहभागी झालेल्या या सर्व स्त्रिया समर्थांच्या आधुनिक विचारांना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या ठरल्या! म्हणूनच श्रीसमर्थ रामदास स्वामींना स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असंच म्हटलं पाहिजे.

       || जय जय रघुवीर समर्थ ||

 

मन परिवर्तनासाठी वाचा मनाचे श्लोक

आपल्या हिंदू  धर्मामध्ये म्हटल्या जाणाऱ्या विविध स्तोत्रांमध्ये, अभंगांमध्येभजनांमध्ये, श्लोकांमध्ये एक प्रकारचं सामर्थ्य आहे. गायत्री मंत्रासारख्या मंत्राचं सामर्थ्य तर वैज्ञानिक दृष्टीनेदेखील सिद्ध झालं आहे. स्तोत्रे, भजने, श्लोक म्हटल्यामुळे-  ऐकल्यामुळे किंवा वाचल्यामुळे व्यक्तीचा भौतिक दृष्टीने काहीही फायदा होत नाही किंवा व्यक्तीच्या जीवनात कोणतेही चमत्कार घडत नाहीत ! भौतिक लाभ प्राप्त होण्यासाठी कष्ट करावे लागतात. 

स्तोत्रे, भजने, श्लोकअभंग पठणामुळे- वाचनामुळे- ऐकण्यामुळे जर कोणताच भौतिक लाभ होत नाही, तर मग नेमका कोणता लाभ होतो असा प्रश्न निर्माण होतो. माझ्या मते, या गोष्टींच्या पठणामुळे- ऐकण्यामुळे- वाचनामुळे सर्वात मोठा लाभ होतो तो मन परिवर्तनाचा. याशिवाय मानसिक शांती मिळणे, मन खंबीर होणे, जीवनात सकारात्मकता निर्माण होण, आशावादी होणेभौतिक गोष्टींबद्दलची आसक्तीकमी होणे, वाईट कृत्ये न करणे हे आणि यासारखे विविध लाभ स्त्रोतांच्या, भजनांच्या, श्लोकांच्य, अभंगांच्या पठणामुळे – ऐकण्यामुळे – वाचनामुळे होतात असे मला वाटते. 

श्रीसमर्थ रामदासस्वामी रचित मनाच्या श्लोकांमध्ये सामर्थ्य आहे मनपरिवर्तनाचे. मनाच्या श्लोकांमधून आपल्याला मार्गदर्शन मिळते. एखाद्या प्रसंगात आपण कसे वागले पाहिजे, कोणता निर्णय घेतला पाहिजे याचेही मार्गदर्शन आपल्याला मिळते.

मनाचे श्लोक लयबद्ध पद्धतीने आणि स्पष्ट आवाजात म्हटल्याने  मन शांत होते असा माझा अनुभव आहे. मनाचे श्लोक  रोजच्या रोज वाचल्याने आपण त्या श्लोकांशी, हळूहळू एकरूप होऊ लागतो. मनाच्या काही श्लोकांचा अर्थ चटकन समजत नाही,पण मनाचे श्लोक म्हणण्यात सातत्य ठेवले की, मनाच्या सर्व श्लोकांचा अर्थ आपल्याला कळू लागतो. श्लोकांचा अर्थ समजल्यामुळे आपण अंतर्मुख होत जातो. आपल्या चुका आपल्या लक्षात येऊ लागतात. मनाचे श्लोक थोडे मोठ्या आवाजात म्हटल्याने मनाची तल्लीनता वाढून आपण त्या श्लोकांशी एकरूप होतो. मनाचे श्लोक म्हणताना एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्याभोवती निर्माण होऊ लागत. आपल्या मनाला धीर मिळतो. मनाला आलेले नैराश्य आणि शरीराला आलेला आळस दूर होतो. आपल्यामध्ये सकारात्मक शक्तीचा आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव वाढत जातो. त्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगाला आपण सहजपणे सामोरे जातो आणि त्यातून तरुनही जातो.

मनाच्या श्लोकांच्या नित्य पठणामुळे बुद्धी तल्लख बनते.

 

“मनाची शते ऐकता दोष जाती । मतीमंद ते साधना योग्य होती ॥

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी । म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी ||२०५||”

मनाच्या श्लोकांच्या नित्य पठणामुळे आपण साधना करण्यास सक्षम होतो. आपल्या मनात आध्यात्मिक ज्ञान, वैराग्यभाव आणि आध्यात्मिक मार्गावर चालण्याचे सामर्थ्य उत्पन्न होते.  भौतिक गोष्टींबद्दल आपल्याला वाटणारी आसक्ती कुठल्याकुठे निघून जाते. मनाला एक प्रकारचे वैराग्य प्राप्त होते. आपली वाटचाल आध्यात्मिक मार्गाकडे होऊ लागते. परिणामी मोक्षाचा मार्ग खुला होतो.

समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक म्हणजे मनाला केलेल्या सूचनाच आहेत. मनाच्या श्लोकांचा अर्थ समजावून घेऊन जर आपण त्याप्रमाणे वागलो तर भरकटणारे आपले मन आपल्या ताब्यात येते. आपल्या मनात परिवर्तन होते. आपल्या हातून वाईट कृत्ये होत नाहीत, चांगलेच कर्म घडत जाते.  त्याचे फळही आपल्याला चांगलेच मिळते. चांगल्या कर्मामुळे आपल्या अंगी सात्विक वृत्ती वाढीस लागते. परिणामी आपल्यात अध्यात्माची आवड निर्माण होऊन मनाला एक प्रकारचे समाधान व शांती मिळते.   

प्रत्येक माणसाला आपल्या जीवनात मानसिक समाधान आणि शांती हवी असते.  मनाचे श्लोक या दोन गोष्टी आपल्याला पुरेपूर मिळवून देतात. 

मनाच्या श्लोकांबाबतचा माझ्या एका मित्राचा अनुभव त्याच्याच शब्दात इथे सांगतो, तो जरूर वाचा.

मी एका खासगी कंपनीत नोकरीला होतो. निवृत्त होण्यास दहा वर्षे बाकी होती. काही  कारणाने कंपनीच्या मालाला मागणी कमी झाली. कंपनीने माझ्यासह अनेक कर्मचाऱ्यांना कमी केले. घरात एकदम सुतकी वातावरण निर्माण झाले. माझी दोन मुले अनुक्रमे इंजीनियरिंगला आणि बारावीला होती. 

मी व माझ्या पत्नीने घरखर्च कसा चालवावा याबद्दल बराच विचार केला. कंपनीकडून मला ग्रॅच्युईटीची रक्कम बँकेत ठेवावी व त्यातून येणाऱ्या व्याजावर घर चालवावे असा निर्णय आम्ही घेतला. त्याप्रमाणे ती रक्कम मी बँकेत ठेवली. त्या रकमेतून मिळणाऱ्या व्याजातून घर खर्च कसाबसा चालत होता. मात्र आजारपणंमुलांचे शिक्षण, सणासुदीनिमित्त होणारा खर्च काही आम्हाला झेपत नव्हता.  अखेर  एखादी खासगी नोकरी करावी असा निर्णय मी घेतला. नोकरीच्या शोधात फिरत असतानाच मी माझ्या एका मित्राच्या पुस्तकाच्या दुकानात गेलो. तेथे समर्थ रामदास स्वामी रचित मनाच्या श्लोकांचे छोटेसे पुस्तक माझ्या हाती पडले. ते छोटेसे पुस्तक मी विकत घेतले आणि घरी आलो . त्याच रात्री मी त्या पुस्तकातले सर्वच्या सर्व म्हणजे २०५ श्लोक वाचून काढले. सर्वच श्लोकांचा अर्थ काही समजला नाही.  पण तरीसुद्धा मनाचे श्लोक रोज वाचण्याचा निर्णय मी घेतला आणि त्याप्रमाणे हे श्लोक मी रोज वाचू लागलो.

मनाचे श्लोक वाचता वाचता माझ्यात कमालीचे परिवर्तन होऊ लागले. मनावरचे दडपण नाहीसे होऊन माझे मन हळूहळू शांत होऊ लागले. चिंता करणे हळूहळू कमी झाले. नोकरी मिळवण्याचे माझे प्रयत्न एकीकडे चालूच होते. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले !

पंधरा दिवसातच मला एका सराफी दुकानात अकाउंटंटची नोकरी मिळाली. आम्हा सर्वांना हायसे वाटले ! लवकरच मी माझ्या कामाने मालकांचा विश्वास संपादन केला. त्यांनी मला सहा महिन्यातच मोठी पगारवाढ दिली. 

त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षी माझा मुलगा इंजिनियर होऊन नोकरीला लागला. धाकट्या मुलाला बारावीनंतर पॉलीटेक्निकला प्रवेश मिळाला. आमच्या घराला हळूहळू स्थैर्य मिळाले. सराफी दुकानात  मॅनेजर म्हणून मी वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत काम केले. दोन्ही मुलांचे विवाह झाले, आम्ही दोघे आजी-आजोबा झालो. आता सर्व काही सुरळीत चालू आहे.

असे असले तरी मनाच्या श्लोकांचे पठण मी,  माझी पत्नी आणि मुलांसह नियमितपणे आजही करीत आहे. नातवांनाही मी मनाचे श्लोक हळूहळू शिकवीत आहे. 

मनाच्या श्लोकांच्या पठणामुळे माझे मन आता कमालीचे शांत व स्थिर झाले आहे. काळजी करणे मी आता सोडले आहे. बिकट प्रसंगांवर आम्ही मात केली आहे. आता कोणत्याही सुखाची अपेक्षा नाही. एक प्रकारचे वैराग्य सध्या मी अनुभवत आहे.  भरून पावलो’ या भावनेने मी आणि माझी पत्नी आता कृतकृत्य जीवन जगत आहोत ! ” 

मुखीं राम विश्राम तेथें चि आहे |

सदानंद आनंद होऊनि राहे |

तयाविण तो सीण  संदेहकारी |

निजधाम हें नाम शोकापहारी || ( मनाचे श्लोक : ८६ ) 

Language