होळीपंचकामध्ये मागील ओवीचा संदर्भ घेऊन पुढे सुरवात करूया. एक उडी घालूं जाती | लंडी चुकोनी पडती ||७|| याचा अर्थ आपण पहिला होता आता ओवी आठचा अर्थ पाहू.
एक देहाचें पांगलें | तेचिं आगीं हुर्पळले ||८||
एक देहाचें पांगले – देहबुद्धीचा अहंकारं ज्याच्या अंगातून पूर्णपणे बाहेर गेला नाही त्याला हे खोबरे कसे मिळणार? अहंकार हा परमार्थातील मोठा अडसर आहे. ज्ञानेश्वरमाऊली आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांना नमस्कार लिहावा का आशिर्वाद या संभ्रमात असणारे चांगदेव, त्यांनी कोरा कागद पाठवला. कथा परिचित आहे. निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून त्या कोऱ्या कागदावर ज्ञानदेवांनी ओव्या लिहून पाठविल्या ज्याला चांगदेव पासष्टी म्हणतात. यात पूर्ण तत्वज्ञान भरलेले आहे. त्यात ते असे म्हणतात,
चांगदेवा तुझेनी व्याजे | माऊलिया श्रीनिवृत्ती राजें |
स्वानुभव रसाळ खाजें | दिधले लोभे || चां.पा. ६१||
चांगदेवा तुला मोठ्या प्रेमाने मधुर रसयुक्त शब्दखाद्य पाठविले आहे. ते गोड खाजे खाऊन, द्वैत अद्वैत हे परोक्ष संवादही आपल्या स्वानुभवी अपरोक्ष दृष्टीनी जिरवून पुष्ट हो. परोक्षज्ञान म्हणजे ग्रंथ वाचनातून, श्रवणातून मिळालेले ज्ञान (पर+इक्ष) दुसऱ्याने जे पाहिले, समजले, अनुभवले ते आपल्याला सांगितले ते परोक्ष ज्ञान असते. पण जेंव्हा स्वत:ला अनुभूती येते त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. पण हे ‘खाजे’ त्यांना अहंकार बुद्धीमुळे प्रथम जिरवता, पचवता आले नाही. व्याघ्रावर स्वार होऊन, सर्प हाती घेऊन ते ज्ञानदेवांच्या भेटीस गेले. सजीवांवरील आपली सत्ता दाखवण्याच्या मोह त्यांना टाळता आला नाही. पण ज्यावेळी निर्जीव भिंतीवर बसून ही चार छोटी भावंडे येतांना पाहिली तेंव्हा अचंबित होऊन माउलींना शरण आले. मुक्ताबाईनी गुरूउपदेश केल्यावर त्या रसाळ खोबऱ्याचा स्वाद चांगदेवांना समजला. गुरूउपदेशाने ह्या मायेच्या होळीतील खोबऱ्याची चव घेता येते.
उडी अवघ्यांचीच पडे | परि तें हातांस न चढे ||९||
एके थोर धीर केला | खाजें घेऊन पळाला ||१०||
अशा या मायारुपी होळीमध्ये उड्या घेण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण असतात, पण खोबरे सगळयाच्याच हाती लागते असे नाही. कारण वैराग्यपूर्ण जीवन जगणे सहज साध्य नसते. हे ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी अहंकार, कामना, आसक्ती, संकल्प विकल्प या सर्व द्वैतांचा त्याग करावा लागतो. संगत्याग करून संगनि:संगातीत व्हावे लागते. मन बुद्धीवर नियंत्रण असावे लागते. द्वंद्वातीत व्हावे लागते. तेव्हाच हे परब्रह्म रुपी खोबरे हातात येते.
एखादा एकटाच ते खोबरे घेऊन पळून जातो. आणि एकटाच खातो. परब्रह्माचे ज्ञान झालेले काही योगी तपस्वी एकांतात राहून त्या परब्रह्मात आत्मसंतुष्ट होतात. हिमालयासारख्या ठिकाणी जाऊन एकांत सेवन करतात त्यामुळे दुसऱ्यांना ते ज्ञान सांगण्याचा प्रसंग येत नाही. आणि हे अनुभवामृत दुसऱ्याला मिळत नाही. पण सगळेच तसे नसतात समर्थांसारखे काही लोकांतात राहून एकांत सेवन करणारे असतात.
एक आपणचि खाती | एक सकळांते वांटिती ||११||
एक घेउनि पळाले | तंव त्यावरि पडे जाळें ||१२||
रामीरामदास होळी | केली संसाराची धुळी ||१३||
काहीजण सर्वांना वाटून त्यातच आनंद मिळवतो. प्रपंच व परमार्थ साधणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज शांतचित्ताने विवेक विचाराने होळीतील खाजे अलगद मिळवतात. तर संत तुकारामांसारखे प्रपंच्याच्या भडकलेल्या होळीतून खाजे बाहेर काढतात. तुकारामासारखे अतिशय सहनशील संत हा प्रसाद सर्वच बालगोपालांना (चौदा टाळकऱ्याना) आणि बहेणाबाई, निळोबा, कान्होबा रामेश्वरभट्ट अशा शिष्यांना वाटतात. पण ते खाजे खाण्यासाठी आलेल्या शिवाजीराजांना प्रेमाने, समर्थ रामदासांसारख्या राजकारण, देवकारण, धर्मकारण, करणाऱ्या थोर संतांकडे जाऊन त्या खोबऱ्याचा आस्वाद घे असे सांगतात. सद्गुरू निवृत्ती नाथांकडून ज्ञानदेवांनी हे खोबरे अगदी बालवयातच मिळवले आणि मिळालेले हे परब्रह्म रुपी खाजे, ज्ञानेश्वर माउलीनी आनंदानी नामदेव, मुक्ताबाई, सोपान सर्वांना प्रेमानी दिले.
म्हणून समर्थ होलीपंचकात म्हणतात, एखादा एकटाच ते खोबरे घेऊन पळून जातो. त्यांच्या मागे सर्वजण लागतात. हिसकाहिसकी ओढाताण करून आपल्याला काही मिळवता येते का ते बघतात. अगदी कबीरासारखे !! रामानंद स्वामी अत्यंत कर्मठ होते. ते कबिरांना हे परब्रह्मरुपी खाजे द्यायला तयार नव्हते. तरीही कबीराने ते हिसकून घेऊन पटकावलेच की !! रामानंद रोज सकाळी गंगास्नानाला जात. मुखाने श्रीराम श्रीराम म्हणत हे कबिरांना माहित होते गुरुमुखातून मंत्र मिळवण्यासाठी कबीर पहाटेच्या वेळी गंगेच्या पायऱ्यांवर आडवे झाले. रामानंदाचा चरणस्पर्श त्यांना झाला आणि त्यांच्या मुखातून ‘श्रीराम’ शब्द बाहेर पडले. तोच गुरुमंत्र मानून कबीर त्यांना गुरु म्हणू लागले. कबीर अत्यंत तर्कनिष्ठ होते. त्यांनी विचार केला गुरु करणे हे कर्मकांड असून त्यापेक्षा गुरु मानून गुरुमंत्र श्रवण करणे, तो आत्मसात करणे आणि गुरुआज्ञेनी वागणे, हे जास्त श्रेष्ठ आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ‘एक घेउनी पळाले |’ कबीराने हे खाजे रामानंदांकडून पळवूनच आणले. अर्थात ह्यात धारिष्ट नक्कीच आहे. शिवाय हे खाजे एकट्यानेच न खाता भगवानदास, कमाल, कमाली (शेखतुकींची मुलगी) जीवदास, रामकृपाल या शिष्यांनाही दिले.
समर्थ रामदास स्वामीं मात्र या संसाराच्या होळीमध्ये पाऊल टाकताक्षणीच खोबरे घेऊन बाहेर आले. लग्नमंडपात सावधान म्हणताच सावध होणाऱ्या समर्थानी त्या होळीतले खोबरे सुद्धा सावधपणे आणि विवेकविचाराने सहज हस्तगत केले. विवेक आणि वैराग्य यांनी मिळवलेले खोबरे, अगदी आनंदानी सर्वांना वाटून तर दिलेच, पण ते खाजे म्हणजे ब्रह्मज्ञान कसे मिळवायचे ह्याचे उत्तम मार्गदर्शनही आत्माराम, दासबोध यातून केले. आपल्यासारखेच अनेक शिष्य व महंत तयार केले. कल्याणस्वामी, गिरीधरस्वामी, उद्धवस्वामी, आक्कास्वामी, वेण्णास्वामी किती नावे सांगावीत, ज्यांनी समर्थांनी दिलेल्या खोबऱ्याचा आनंद लुटला. श्रीरामाचा दास झाले, म्हणून समर्थ होऊन, जगाचे स्वामी बनलेले हे समर्थ रामदास स्वामी !! त्यांचे होळीपंचक या तापत्रयाच्या आणि मायेच्या होळीतून बाहेर पडून, आपल्या सर्वाना परमार्थ मार्गाकडे वळवण्याची प्रेरणा नक्कीच देईल.
||जय जय रघुवीर समर्थ||