श्री समर्थ रामदासस्वामी रचित आरत्या भाग ३

समर्थ रामदास स्वामींचे आराध्य दैवत आहे श्रीराम! श्रीरामांवर त्यांनी नऊ आरत्या रचल्या आहेत. त्या प्रत्येक आरतीमधील आशय वेगळा आहे. त्या व्यतिरीक्त सद्‌गुरु श्रीरामांवर एक आरती आहे. त्याचप्रमाणे श्रीदेव म्हणून श्रीरामांवर आरती आहे. तसेच दासभक्तीचे आदर्श प्रतिक श्री हनुमंतरायांवर एक आरती आहे.

 

हनुमंतांच्या आरतीची सुरवात द्रोणाचल उचलून आणला त्या कथेने केली आहे. यातुन त्यांना हनुमंत हा शक्तीमान, दिलेले काम काहिही करून, जीवाचा आटापीटा करून पूर्ण करणारा होता, हे दाखवून त्याचा आदर्श सर्वांनी ठेवावा हे सांगीतले आहे. तसेच आला गेला कामाला बहुताला भधून आपण सर्वांच्या त्याच्यासारखे उपयोगी पड‌ले पाहिले हे ते सुचवू इच्छितात. म्हणजे यष्टी, समष्टी यांचा विचार केला पाहिजे हाही उपदेश यातून ते देताता. यष्टी = व्यक्ती तर समष्टी मध्ये कुटुंब, समाज, राष्ट्र, वसुधा व संपूर्ण ब्रह्मांड यांचा समावेश आहे. रामकथा सांगून आली. मग श्रीरामांची आरती. रामदास स्वामींनी ती रचुन अगदी स्वत:चा आनंद प्रगट केला आहे. आपल्या डोळयासमोर त्यांनी त्यांचे निकटवर्तिय कुटुंब उभे केले आहे. ते आपल्या या दैवताचे वर्णन करताना पूर्ण तल्लीन झाल्याचे भासते. श्रीराम सुध्दा कुटुंबवत्सल होते. त्या कुटुंबात भक्तगणांचा समावेश होता हे या आरतीतून दृष्टीपथात येते. त्या शामसुंदर श्रीरामांविषयी ते म्हणातात, शामसुंदर शोभे त्रिदश कैवारी । त्यांच्या दक्षिणेकडे शेषनागाचा अवतार लक्ष्मण तर वामांगी सीता सुंदरी आहे. भरत, शत्रूघ्न, माता कौसल्या हे डोळे भरून पहात आहेत. पुढे मारूतीराया हात जोडून बसला आहे. सर्व भक्तगण, टाळ, मृदंग, नगारा व इतर अनेक वाद्ये घेऊन नामघोष करीत आहेत. टाळ्यांचा सुध्दा सुमधुर ध्वनी दुंजन करीत आहे. आणी हे सर्व ऐकून पाहून रामदास अगदी आनंदी झाले आहेत. अशीही शांतरसात वाहून जाणारी ही आरती आहे. 

 

पुढे समर्थ श्रीरामांना आता उठण्याची वेळ झाली आहे. आपल्या उठण्याची वाट पहात आहेत. सर्वजणन तुमच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. हे सांगत आहेत ते वर्णन करतात की, जनकराजांची कन्या म्हणले सीता सोन्याच्या थाळीत दिवा ठेऊन आरती घेऊन सज्ज आहे. उठ रे बाळा असे कौसल्या‌माता सांगत आहे. तुझे मुखकमल पाहण्यासाठी, दर्शनासाठी कोण कोण आले आहेत ते पहा. विवेक संपन्न वशिष्ठ सद्गुरू आले आहेत. साधुसंत, मुनी, यती, ब्रह्मवृंद, योगी तिष्टत आहेत.  ते प्रेमादराने तुझा जयजयकार करत आहेत. जीवाशिवाचे ऐक्य असते तसे तुमचे ऐक्य असणारे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण हे उम्मन होऊन आपल्या दर्शनाची प्रतिक्षा करत आहेत. त्याच रांगेत सात्विक गुणसंपन्नअसा सुमंत प्रधानही ऊभा आहे. नगरगण जमा झाले आहेत. वायुपुत्र हनुमान चरणाची धुळ मस्तकी लावण्यासाठी तिष्टत ऊभा आहे. आणि मग ते श्रीरामांचे वर्णन करतात, ते म्हणतात तू दीनबंधू आहेस, दयाळू कृपाळू, भक्तवत्सल आहेस, तेव्हा आता दर्शन दे. तुझे ते कमलनयन माझ्याकडे स्थिर कर. तू जगजीवन आहेस, तू आनंदरूप होऊन भक्तांना दर्शन दिले तसे मला दे. 

 

शेवटच्या पांचव्या व सहाव्या कडव्यात खूप मोठे तत्वज्ञान दडले आहे. तू माझ्या जीवाचा जिव्हाळा आहेस तू दिनांचा कैवारी आहेस, दयाळू आहेस मग माझ्यावर कृपा कर. कारण तू भक्त वत्सल आहेस. तू आनंदरूप होऊन दर्शन दिले आहेस. स्वये आनंदरूप होऊनी । भक्ता दर्शन दिधले ।। रामा तू जगजीवन आहेस. यातून ते सांगू इच्छितात की, त्यामुळे आमची श्रध्दा वाढते. आमच्या अंत:करण प्रेमभावना जागृत होते आणि हाच भक्तीचा प्रारंभ होण्याचा क्षण आहे. ऋग्वेदात सांगितले आहे की, मानवाला अंत‌:करणात प्रेम भावना निर्माण होतात, त्याच्या मधे ध्यानप्रधानता येते. या सृष्टीची निर्मिती, पालन पोषण भरण व नियमन, संहार करणारा तो परमात्माच आहे. म्हणून त्या परमात्म्याच्या अवतारात श्रीरामांना सद्‌गुरु रामदासांनी राम तू जगज्जीवन म्हटले आहे. 

 

पुढे ते जेव्हा स्वयं आनंदरूप होऊन भक्तांना दर्शन देतोस असे म्हणतात. तेव्हा तैतिरीय उपनिषदातील ब्रह्मानंदवल्ली मध्ये मानवी आनंदाचे स्वरूप स्पष्टपणे विशद करून सांगितले आहे, त्याची आठवण होते. दासबोधात पहिल्या दशकातील पहिल्या समासात त्यांनी अभ्यासलेल्या ग्रंथांची यादी आहे. त्यात एकोणिसाव्या ओवीत उपनिषदे अभ्यासिली याचा उल्लेख आहे. तैतिरीय उपनिषदातील आनंदवल्ली या विभागातील आठव्या अनुवाकातील (अध्यायातील) दुसरा मंत्र तर जणू मानवी आनंदाची व्याख्या, गाभा प्रकट करणारा आहे. उन्नतीसाठी लागणारी पात्रता, अधिकार या मध्ये स्पष्टपणे सांगितला आहे. उत्कट व भव्य महत्वाकांक्षा हा पहिला गुण, या गुणावरच आयुष्याची सर्व इमारत उभारली जाते. या गुणात काही कमीजास्त झाले तर मानवी जीवनक्रम निस्तेज होतो. दूसरा गुण मनाचा खंबीरपणा नसेल तर महत्वाकाक्षेचा व्हावा तसा उपयोग होत नाही. पुढचा गुण शशिरबळ. हे तर सर्वात महत्वाचे आहे. महत्वाकांक्षा, दृढता, बलसंपन्नता या अनुक्रमे बुध्दी, मन आणि शरीर यांच्या शक्ती असून त्यांची पूर्तता करणे हे या साधकाचे पहिले कर्तव्य आहे. यास जर तेजस्वी विद्या व ओजस्वी शील यांची जोड मिळाली की, खरे मनुष्यत्व प्रकट होते. हीच उन्नतीची पहिली पायरी म्हणून यास मानुष आनंद म्हणतात. 

अशा चढत्या क्रमाने पुढील ८ पायऱ्या ओलांडत्या की, ब्रह्मानंद प्राप्त होतो. ब्रह्मानंद म्हणजे त्या परमात्म्याचे दर्शन घडणे होय. इतका खोल अर्थ राम जगजिवन । स्वये आनंदरूप होऊन । भक्ता दर्शन दिधले ।। असा आहे. म्हणजे श्रीरामांच्या नामाने, शक्तीने, दर्शन घेण्याने आनंद प्राप्त होतो. हे या ठिकाणी भक्तांना सांगू इच्खितात. 

 

या सगळ्या वरून आपल्या हे लक्षांत येते की, समर्थच्या आरत्यांमधून तत्वज्ञान / सृष्टीची उत्पत्ती, स्थिती लय, ब्रहमाचे स्वरूप, ईश्वराचे गुण विशेष, आढळते. तसेच नीति, विवेचन, भक्तीमार्ग, उपासना मार्ग, इत्यादिचा ही मार्ग आढळतो. त्यांच्या आरत्यांमध्ये काव्यसौंदर्य आहे. कल्पनासौष्ठव आहे. तसेच त्यांचे स्वतःचे कणखर, कधी कोमल व्यक्तीमत्व प्रकट झाले आहे. यात सामाजिकतेचे भान सुध्दा आढळते.

 

प्रसन्न आणि पवित्र वातावरणात देवताची प्रफुल्ल मूर्ति, दीप ओवाळून त्या प्रकाशात पाहताना आणि त्याच वेळी आरतीचे पद्य तोंडाने म्हणताना तादाम्य साधता येते. भक्तात एकाग्रता उत्पन्न होते. असा प्रभाव या आरत्यांचा आहे.

 

समर्थांच्या आरत्यांच्या रचना ही स्फुट रचना असल्याने आणि ती पद्यरूपात उत्तम छंदात बांधलेल्या असल्याने त्या पाठांतरास सुलभ आहेत. हेच त्यांच्या आरत्यांचे वैशीष्ठ आहे.

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्रीसमर्थ रामदासस्वामी रचित आरत्या भाग २

भाग १ व भाग २ मधील आरत्यांचा जर आपण लेखाजोखा घेतला तर आपल्या हे लक्षात येते की, रामदासांच्या आरत्यांमधून १) तत्वज्ञान; २) नीतिचे विवेचन; ३)भक्तीमार्ग; कर्ममार्ग; ज्ञानमार्ग यांचे संतुलन; ४) काव्य-सौंदर्य छंद ही गुण वैशिष्ट्ये आढळून येतात. त्याचा फायदा घेऊन साधक; भक्त; गृहस्थाश्रमी यांची श्रध्दा, ईश्वरावरील निष्ठा; प्रेम; लोभ वृद्धिंगतच होईल. आपण मग असे म्हणू शकतो की, हाच यामागचा रामदासांचा उद्देश-हेतू असावा. त्यांच्या काही आरत्या सर्वश्रूत आहेत तर काही दुर्लक्षित आहेत. त्यांनी नवरात्री; ज्ञानेश्वर; शांतादेवी; आत्माराम; श्रीदेव; सद्‌गुरु; कृष्णा नदी; गणपती; हनुमंत; नृसिंह; सूर्य व त्यांचे आराध्य दैवत श्रीराम यांच्यावर आरत्या रचल्या आहेत.

समर्थांनी शांतादेवीच्या दोन आरत्या लिहिल्या आहेत. “कवण अपराधास्तव जननी केला तू रूसवा’ या आरतीमध्ये त्यांची भेटीची आर्तता दिसून येते. ते म्हणतात, मला अनंत चिंतांनी ग्रासले आहे. तू माझी माता-पिता आहेस, तूच जर दूर लोटलेस तर त्या चिंतेतून मला कोण सोडवेल ? हा भवसागर मी कसा तरून जाऊ ? देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय परमार्थ साधणार नाही. देहबुद्धी म्हणजे मी देह आहे. मग त्या देहाचे कोडकौतुक करायचे. परंतु हे विश्व नाशिवंत आहे, फक्त तो परमात्मा अविनाशी आहे. मग जे नाशवंत आहे त्याच्या नादी न लागता जे अविनाशी आहे त्याची कास धरायची. म्हणजे मग ईश्वराचा साक्षात्कार होतो व जन्ममरणाच्या फेऱ्यातून, त्रितापातून आपली सुटका होते. 

देहबुद्धी म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या ज्ञान देणाऱ्या म्हणजे ज्ञानेंद्रियांचे पाच विषय गुण होत. या पाच विषयांपासू‌न शरीराचा आराम; मान-सन्मान; नावाचा मोठेपणा यापासून सुख घेण्याला भोग म्हणतात. व ते भोग घेण्यासाठी पदार्थ; रुपये; पैसा; घर; इ. जो संग्रह केला जातो त्याला ऐश्वर्य म्हणतात. जे लोक भोग आणि ऐश्वर्य यात गुंग असतात; रममाण असतात, त्यांना देहबुद्धीचे लोक म्हणतात. ते देहाला, शरिरालाच प्राधान्य देतात. आपल्या कल्याणात कोणती बाधा असेल तर ती आहे भोग व ऐश्वर्य म्हणजे संग्रह याची. कोळ्याच्या जाळ्यात जसा कीटक अडकतो व तो सुटू शकत नाही, तसेच भोग आणि ऐश्वर्यात अडकलेल्या माणसाची स्थिती होते. तो परमात्म्याकडे, त्या साधनेकडे वाटचाल करु शकत नाही. समर्थांना या सामान्य माणसाची चिंता आहे. या संकटातून त्यांना त्याला बाहेर काढायचे आहे, लोकसंग्रह करायचा आहे. आईच्या चरणी सर्वांना लीन करायचे आहे. म्हणून त्या सामान्य माणसाला जागृत करण्याच्या हेतूने येथे ती उपाययोजना केली आहे. सर्वांना ते नि:श्रेयस व श्रेयस यांचे संतुलन साधून परमात्म्याकडे वळवू इच्छितात. आणि म्हणून वेद, शास्त्रे, पुराणे यातील तत्वज्ञानाचा पुरावा देऊन ते सुमती मागतात, बुध्दी मागतात.

श्रीरामदास आई शांतादेवीला शांते असे हक्काने म्हणतात. यात त्यांचे तिच्यावरील अनुराग, प्रेम व्यक्त होते. श्रीआद्य शंकराचार्य याला ‘प्रेमयोग’ असे म्हणतात. त्यात ते भगवंतावरील निस्सिम प्रेम हीच मूलभूत कल्पना मांडतात. यालाच सख्यभक्ती म्हणतात.

शांतादेवीवरील दुसऱ्या आरतीची सुरूवात श्रीसमर्थ ‘नवखणांचा पलंग शांते शोभतो बरा’ म्हणून करतात.  नऊ खण ही कल्पना अप्रतिम आहे. या ठिकाणी त्यांनी शांतादेवीला मूळमायेच्या रूपात पाहिले आहे. म्हणजे तिच्यातील शक्ती काम करते. अचेतनांमध्ये वीज, उष्णता, ध्वनी, प्रकाश इत्यादी रूपे घेऊन कार्य करते. सचेतना, प्राण, संकल्प, विचार, कल्पना, वासना या रूपांनी ती कार्य करते. परंतु अज्ञानी व्यक्तीला या शक्तीचा प्रत्यक्ष परिचय होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, या नऊ खणांच्या पलंगावर कार्य करीत ही मूळमाया लोकांना दिसत नाही, जणू ती झोपली आहे. तो पलंग तिला शोभत आहे. पुढे ते म्हणतात की, ‘सुमनांचे परिवारी शांते शयन करा’ म्हणजे तुम्ही सु+मने = शुद्ध मने यांचे मनात, वसतीस्थान करा. सौम्य शब्दात तिला या देह-मंदिरात यायची, ते तिला सर्व भक्त, साधक यांच्या वतीने विनंती करतात. पुढच्या पदात तर ते हक्काने लहान मूल जसे आईला, तू आत्ताच्या आत्ता मला जवळ घेच हे फर्मान सोडते, त्याच हक्काने भक्तजनांची ही आज्ञाच आहे असे सांगतात. पुढे ते म्हणतात, ‘मानस सुखी दशम स्थाने निद्रा हो केली’ म्हणजे त्या शक्तीने ५ ज्ञानेंद्रिये  व ५ कर्मेंद्रिये उद्दीपित केली तर मनुष्य प्राणी सुखी होईल. कारण आईने निद्रा घेत तेथेच मुक्काम ठोकला आहे. यामुळे त्या इंद्रियांचे मुख बाह्य पदार्थांकडे न वळता अंतर्मुख होईल व आपोआप इंद्रिय निग्रह होईल व मग शांता ध्यानी राहील. म्हणजे देवीची उपासना आपोआप होईल. चरणी मन एकाग्र होईल. म्हणजे समर्थ वारंवार देहबुद्धितून आत्मबुद्धित प्रवास करा हे सांगतात तेच येथेही आरतीतून सांगत आहेत.  

श्री समर्थांनी कृष्णा नदीवर आरती करून आपले तिच्या प्रती प्रेम व्यक्त केले आहे. ते या कृष्णा मातेला सुख, समृद्धीची सरिता म्हणतात. त्यामुळे ती गुणसंपन्न आहे. दु:खाचे निवारण करणारी आहे. ज्याने सर्वस्वाचा, त्याग केला आहे अश्यांसाठी ती चिद्गंगा, भवगंगा आहे. सर्वांना पावन करणारी ती नदी आहे. कृष्णा नदीचा संगम हा हरि व हर यांचाच जणू संगम आहे अशी भावना ते व्यक्त करतात. अशा संगमात जे तन; मनाने स्नानादि कर्मे, अर्घ्य देणे, उपासना करणे करतात व त्या संगमालाच आपलेसे मानतात ते पूजनीय वंदनीय असतात. सद्‌गुरू आरतीमध्ये श्रीसमर्थांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार संतांना सदगुरू मानले आहे. प्रत्येकाच्या  वैशिष्ट्यपूर्ण  गुणांचे वर्णन केले आहे. त्यांनी या समाजासाठी आपले आत्मजीवन ओवाळून टाकले आहे, असे प्रतिपादन केले आहे.

मुक्ताबाई म्हणजे ब्रह्मीचा म्हणजे साक्षात स्त्री शक्तीचाच अवतार आहे. त्यामुळेच मला सद्‌गुरू ध्यान प्राप्त झाले असे ते म्हणतात. ब्रह्मी म्हणजे तू मूळमायेचेच रूप आहेस असे ते म्हणतात. चांगदेवांना तुझे अव्यक्त रूप दिसले.

निवृत्तिनाथांबाबत ते म्हणतात की, त्यांच्यामुळे माझ्यातील अहंभाव गळाला. माझा या संसारातील मोह सुटला म्हणजे माझी देहबुद्धि नष्ट झाली. ‘मी म्हणजेच आत्मा’ हा सोsहंभाव माझ्यामध्ये आला. तुम्ही केलेल्या गायत्रीच्या उपासनेने तुम्हांला आदिनाथांचा म्हणजे साक्षात भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळाला व गहिनीनाथांनी अनुग्रह दिला. शारदामातेने आशीर्वाद दिला. तसा तुम्ही मला द्या. सोपान महाराजांना सुध्दा ते धन्य धन्य म्हणतात.

ज्ञानदेवांबाबत ते म्हणतात, ते तर सद्गुरू. सद्गुरूसारखे दैवत नाही. आपण ज्ञानाचे सुद्धा देव आहात. ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण आहात. आपण विदेही आहात. देहबुद्धी मध्ये निर्माण होणारी कल्पना, बद्ध व मुक्त साधक अशी असते. पण ब्रह्मज्ञानी; आत्मज्ञानी हा देहाच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्माशी समरस झाल्याने तो भेदातीत व संदेहरहित असतो, म्हणजेच तो विदेही असतो. असे आरत्यांद्वारे समर्थ आपणास सांगतात. पुढील भागात आपण हनुमंत आणि श्रीरामांच्या आरत्यांचा परामर्श घेऊ.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्रीसमर्थ रामदास स्वामी रचित आरत्या भाग १

मराठी भाषेतील आरत्या हे भक्तीरसप्रधान काव्य मंदिरातील एक स्वतंत्र असे देवघर आहे. या देवघरात परमेश्वराचे सुरम्य, सगुण स्वरूप आणि भक्त याशिवाय इतर काही दिसत नाही. देव आणि भक्त यांच्या मधील पूज्य पूजक संबंधाची साक्षात दर्शन घडविणारे आरसे म्हणजे आरत्या होय, असे ल.रा. पांगारकर यांनी म्हटले आहे.

श्रीसमर्थांच्या सर्व आरत्या या कसोटीत चपखलपणे बसतात. नारद भक्तीसूत्रात सांगितल्याप्रमाणे भक्ती ११ प्रकारे करता येते. हे सर्व प्रकार श्रीसमर्थांच्या निरनिराळ्या आरत्यांमध्ये आपणास आढळून येतात. तसेच नारद भक्तीसूत्रे सुध्दा त्यामध्ये दिसून येतात. श्रीसमर्थांच्या आरत्या ह्या भावनात्मकता, एकाग्रला वाढविणाऱ्या, अंतरंगास स्पर्श करणाऱ्या रचना आहेत. त्यांच्या स्फूट रचनेने त्या पाठांतरास सोयीच्या आहेत. त्यांमध्ये एक गेयता आहे. त्या म्हणताना टाळ, मृदुंग, झांजा यांची साथ घेतली तर; म्हणणारा भक्तीत लीन होतो, नादब्रह्मात तल्लीन होतो. आणि म्हणून आबालवृद्ध सर्वजण या आरत्या म्हणतात. याचे उदाहरण गणपतीची आरती आहे. “सुखकर्ता दुखहर्ता वार्ता निघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।” या आरतीचे वैशिष्ट्य असे आहे की, यात नारद भक्तीसूक्तात भक्तीचे जे अकरा प्रकार सांगितले आहेत त्यातील खूप यात लक्षात येतात. 

  1. ईश्वराच्या विशेषांचे गुणगान – पहिली ओळ – सुख व दु:ख यापासून विश्व, दुःख, इत्यादि गोष्टींपासून आपला बचाव करून, आपल्याला सुखी करणारा, आपल्यावर कृपाछत्र धरणारा, आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा.
  2. ईश्वरस्वरूप – दर्शनमात्रे मन कामनापुरती.
  3. स्वगूण स्वरुपाची उपासना – जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती.
  4. ईशसेवा – त्या मंगलमूर्तीला खूप सजवले आहे, सर्वांगाला शेंदूर फासला आहे. वस्त्र, अलंकार अर्पण केले आहेत.
  5. सख्यत्व – तो वक्रतुंड आहे त्याला ३ डोळे आहेत, पण तरी त्याचे रुप लोभस वाटते ते सख्यत्वामुळे. 
  6. ईश्वराविषयी आपलेपणा – दास रामाचा वाट पाहे सदना ! आपण घरी आपल्या माणसाची वाट पाहतो. त्यातून 
  7. ईशचिंतन 
  8. ईश्वरावरचे प्रेमही व्यक्त होते. एवढेच नाहीतर, 
  9. ईश्वरापासून दूर झाल्याची खंतही व्यक्त होते. 
  10. त्या गणपती बाप्पाशी एकरूप होऊन ते आपल्या मनातील भावना इच्छा व्यक्त करतात. संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, असे मागणे मागतात. 

या मागणी मध्ये खूप मोठे तत्वज्ञान दडले आहे. संकटी पावावे म्हणजे कोणते संकट ? तर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, परिग्रह इ. जे शत्रु आहेत त्यांच्या पासून वाचव. अहंकार, बल, दर्प हे माझ्यापासून दूर ठेव. हट्टीपणा, दुराग्रहीपणा, क्रुरता, नीचपणा, द्वेष वाटणे, अधमपणा, दुराचारीपणा इ. अवगुणाची वस्ती माझ्यामध्ये होऊ देऊ नको. या संकटापासून मला वाचव. माझे अंतःकरण, मन, बुद्धी, इंद्रिये ही शुध्द सात्विक गुणांनी भरू दे. माझे अगदी निर्वाणतेने रक्षण कर. मला निर्भय बनव. ही निर्भयता कशी तर, छांदोग्य उपनिषदात सत्यकाम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सत्याची कास धरण्याची असावी. मी भगवंतात अनुरागीत होऊन माझ्या अंतःकरणात सम्यक बुद्धी नांदो. म्हणजे भगवंताप्रती माझ्या मनात फक्त प्रेमभाव निर्माण होवो. यालाच स्वामी विवेकानंद प्रेमयोग म्हणतात. माझ्या मनात भगवन्नामाचा जप सतत चालू दे. म्हणजे माझ्याकडून स्वाध्याय होऊ दे. अहिंसा, राग, क्रोध न धरणे, संसाराच्या कामनेचा त्याग मला करू दे. माझे अंत:करण शांत असू दे, मला कोणाची चहाडी, चुगली करायची सवय, इच्छा न होवो, माझ्यामध्ये भूतदया निर्माण होऊ दे. मला सांसारिक विषयात लालसा उत्पन्न न होवो. माझे अवयव, वाणी, प्राण, नेत्र, कर्ण आणि माझ्यातील सामर्थ्य, सर्व इंद्रिये तेजस्वी म्हणजे पुष्ट होवोत. माझ्यामध्ये दया, क्षमा, धृति म्हणजे अनुकुल प्रतिकूल परिस्थितीत धैर्यवान, अचल राहणे हे गुण विकसीत होवोत. माझ्यातील वैरभाव नष्ट होवो. असा मला गुणसंपन्न करुन तू माझे रक्षण कर.

नृसिंहाच्या आरतीत रामदासांनी प्रल्हादाची पूर्ण कथा सांगितली आहे. ही कथा सांगताना त्यांनी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला त्रास दिला, त्याचा छळ केला हे सांगून देवाला, त्या ईश्वरा‌ला त्या बालकाचे हे दु:ख सहन झाले नाही, त्याला राहवले नाही, व त्याने नृसींह अवतार धारण करून प्रल्हादास वाचविले. येथे देव हा त्याच्या भक्तांचा कैवारी आहे हे रामदासांनी देव भक्तांचा कैवारी साचा’ असे शब्द वापरून म्हटले आहे. येथे रामदास स्वामी आपल्याला, आपण जर परमात्म्याची भक्ती केली, त्याच्यावर आपली पूर्ण श्रध्दा, निष्टा ठेवली तर तो आपले रक्षण करतो, हे सांगितले आहे. म्हणजे आपण त्याचे नामस्मरण भजन, कीर्तन, लीलांचे गुणगान, मनन, निदिध्यासन करून त्याचे स्मरण केले पाहिजे. आपण भक्त होण्यास स्वत:ला पात्र केले पहिले असे ते सुचवितात.

ज्ञानेश्वरांच्या आरतीत ते श्रीकृष्णांनी स्वत: ज्ञानेश्वरांच्या रुपात अवतार घेतला आहे असे म्हटले आहे. भगवद्गीता प्राकृतात आणून अज्ञानाचा अंध:कार दूर केला. अविद्या नष्ट केली. ब्रह्मज्ञानाने मत्सर दीप मालवले असे स्पष्ट केले आहे. आत्मारामाच्या आरतीत आत्मारामाचा महिमा विशद केला आहे. पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्व उजागर केले आहे. तसेच आत्माराम हा खूप पूरातन, सनातन आहे हे सांगायला ते विसरले नाहीत. 

सूर्याच्या आरतीमध्ये सूर्याचे गुणगान त्यांनी केले आहे. त्याचे तेज हे असंभाव्य आहे असे ते कटाक्षाने उद्धृत करतात. त्याच्या सूर्यमंडला बद्दल ते म्हणतात की,  ते अतुलनीय आहे. सूर्याची उपासना ही अतुलनीय आहे  कारण, सूर्यनमस्कार घातल्याने आपले शरीर सुदृढ होते. धष्ट पुष्ट बनते. तसेच सूर्याची उपासना केल्याने मन सुध्दा सक्षम बनते. या सर्व ज्ञानाचे विज्ञान त्यांनी अनुभवले होते. म्हणून ते म्हणतात, सूर्याची उपासना केल्याने मी सूर्याचा वंशजच झालो आहे. म्हणजे ते सूर्याप्रमाणे निष्काम कर्मयोगी झाले आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर आत्मनात्म‌निवेक बुध्दीने ते देहबुध्दीतून आत्मबुध्दी पर्यंत पोहोचले आहेत. म्हणजे त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे. त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे.

नवरात्रीच्या अंबाबाईच्या आरतीत त्यांनी या स्त्रीशक्तीचे पूजन, ब्रह्मा, विष्णू, रूद्र करतात असे प्रतिपादित केले आहे. ब्रह्मा म्हणजे निर्माता, विष्णू पालन कर्ता, व रुद्र हा संहारक व नियामक होय. विष्णू या सृष्टीचे/ब्रह्मांडाचे पालन करतो, त्याची काळजी घेतो. तर रूद्र म्हणजे शिव जो कल्याणकारी आहे, ज्ञानमय आहे. ऋग्वेदामध्ये या रूद्र देवावर अनेक सूक्ते आहेत. असे हे सर्वश्रेष्ठ विश्वंभर सुध्दा या जगन्मातेला पूजतात, असा तिचा महिमा समर्थ आपल्याला सांगू इच्छितात.  या आरतीमध्ये समर्थ रामदासांनी नऊ दिवस-रात्रींचे वर्णन खूपच काव्यमय गुंफले आहे. नवरात्रीतील पूजा-अर्चा, कथा त्यांनी थोडक्या शब्दांत पण आशयघन रचली आहे. षष्ठीला दिवट्या नाचवून, कवड्या अर्पण करतात. सप्तमीला पूजार्चन जाई, जुई, शेवंती इ. फुलांची आरास करतात. नवमीला पारणे; सप्तशती; होम, दशमीला म्हणजे दसऱ्याला सीमोल्लंघन असे अगदी रसभरीत वर्णन केले आहे. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language