भारतीय जीवनाचा अंतीम आदर्श म्हणजे सीता ! महात्मा गांधीना प्रार्थनेनंतर एकीने प्रश्न विचारला की, “आम्ही स्त्रियांनी आमच्या जीवनात कोणाचा आदर्श ठेवावा ?” गांधीजी म्हणाले, “तुम्हीच काय पण जगातील कोणत्याही स्त्रीने सती सीतेचा आदर्श ठेवावा.” लगेच तिने विचारले की, “पुरुषाने रामाचा आदर्श ठेवावा का ?” गांधीजी “नाही” म्हणाले. पुढे ते म्हणतात, “माझा असा विश्वास आहे की सीतेच्या जीवनातून राम जन्माला येतो. रामाच्या जन्मासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.”
जनकराजांना एकदा भूमी नांगरताना एक लाकडाची पेटी मिळाली. त्यात अत्यंत सुंदर, तेजस्वी मुलगी होती. नांगराच्या फाळाच्या टोकाला सीत म्हणतात. भूमीत सीत अडकून पेटी मिळाली म्हणून नाव पडले सीता. जनकाची मानसकन्या म्हणून जानकी, मिथिलेची राजकन्या म्हणून मैथिली आणि विदेहराजाची लाडकी कन्या म्हणून वैदेही!
रामायणात सीतेचा उल्लेख प्रथम सीता स्वयंवराच्यावेळी आला. राम लक्ष्मण मिथिलेत विश्वामित्रांबरोबर आले असताना, दोघे भाऊ गुरुदेवांना पूजेसाठी फुले आणायला म्हणून बागेत गेले होते. तिथे राम-सीता प्रथम भेटले. पाहता क्षणीच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. स्वयंवरासाठी जनक राजाने एक कठीण पण लावला होता. शिवधनुष्याला जो भंग करेल त्याला सीता द्यावयाची. शिवधनुष्याला उचलणे महा सामर्थ्यवान मनुष्याला देखील शक्य नव्हते. परंतु रामाने त्याचा भंग केला. सुवर्णासारख्या तेजस्वी व्यक्तीला जनकाने सीतेसारखे लावण्यरत्न अर्पण केले.
दांपत्य जीवनाचे सर्व गुण राम-सीतेजवळ होते. राम-सीता सामान्य व्यक्ती नव्हत्या. रामापुढे सीतेला जगातल्या सर्व गोष्टी, स्वर्ग आणि मोक्ष सुद्धा तुच्छ होत्या. रामाची सुद्धा सीतेविषयी तीच भावना होती. सासरी जाताना सीतेची आई, सुनयनाने केलेला उपदेश खूप छान आहे.
१. घरातील सर्व मोठ्या लोकांची सेवा कर.
२. ‘सम्राज्ञी श्वशुरे भव’ – तू घराची सम्राज्ञी व्हावेस.
३. रामाने दुसरे लग्न केले तरी तू सवती बरोबर बहिणीसारखी वाग.
४. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असे समजू नकोस.
५. एखाद्या गोष्टीला जर तुझ्या पतीने नकार दिला तर एकदम चिडू नकोस. तू शांत रहा.
६. हात उदार ठेव.
७. अन्नदान उत्तम दान समज.
एक मुलगा चांगला निघाला तर कुळाचा उद्धार होतो पण एक मुलगी चांगली निघाली तर ती दोन्ही कुळांचा उद्धार करते. अयोध्येत आल्यावर राम सीतेने बारा वर्ष तेजस्वी संसार केला. जगात सौंदर्य आणि गुण एकत्र आलेले क्वचितच पहायला मिळतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सीता ! सीता तिन्ही सासवांची लाडकी सून होती. सर्वांनाच ती आदर्श स्त्री वाटायची.
सीतेच्या महालात, राम ‘वनात जायला निघालो’ हे सांगायला आणि तिचा निरोप घ्यायला जातो. अगं सीते, मला आता अयोध्येचे नाही; वनाचे राज्य मिळालं आहे; हे सांगताना कधीचे आवरून धरलेले अश्रू रामाच्या डोळ्यात आले. ते बघून सीता रामाला म्हणते, “अहो, रडता कशाला ? जेथे राघव तेथे सीता ! तुम्ही बरोबर असल्यावर अयोध्या काय किंवा वन काय ? दोन्हीही सारखेच. नाथ ज्या दिवशी दैवाने तुमच्याशी माझी गाठ घालून दिली ती सुखदुःखात साथ देण्यासाठीच. जंगलातल्या वाघ सिंहाची भीती मला दाखवू नका. बाहुबलाने, एका स्त्रीचे रक्षण करायला असमर्थ असल्यामुळे राम सीतेला वनात बरोबर घेऊन गेला नाही; अशी बेअब्रू होऊ नये म्हणून मला यायलाच हवे.” राम म्हणतो, “माझ्या बरोबर यायचे असेल तर सर्व संपत्ती त्यागावी लागेल.” भारतातील पतिव्रता दुबळी नाही. सीतेने सर्व संपत्तीचे दान दिले परंतु, राजस्नुषा असल्यामुळे वसिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे सीता सौभाग्य अलंकार घालून बाहेर पडली.
गंगापार केल्यावर केवटाला द्यायला हातातील अंगठी काढून सीतेने रामाला दिली. वाटेत ते अत्रि-अनुसूयेच्या आश्रमात येतात. अनसूया सीतेला विचारते, “काय देऊ ?” सीता म्हणते, “मला काही नको. ज्याला काही कमी असते ती मागते. पतीच्या सहवासात माझ्या जीवनात कोणतीच उणीव नाही. मी क्षत्रिय आहे, दान घेण्यासाठी माझा हात खाली येणार नाही. दान देण्यासाठी हात वर राहील” असे बाणेदार उत्तर सीता देते.
सीतेच्या बुद्धीप्रगल्भामुळे रामाला अनेक वेळा तिच्याबरोबर शास्त्रार्थांची, सिद्धांताची चर्चा करावी लागत असे. रावण सीतेला घेऊन जातो त्यावेळी रावण सीतेला म्हणतो, “राम क्षुद्र आहे, मी किती मोठा आहे. लंकेत सर्व देव माझी शुश्रुषा करीत आहेत.” सीता म्हणते, “तू कोल्हा आहेस पण मी सिंहीण आहे. देव तुला मारू शकत नसले तरी सुद्धा माझा राम तुला मारील.” केवढी निर्भयता ! रामाच्या सामर्थ्यावर केवढा विश्वास !!
आत्यंतिक धर्मनिष्ठ आणि उत्कट कर्तव्यनिष्ठ असल्यामुळेच सीता रघुकुळाची अब्रु वाचविण्यासाठी रावणाला दान द्यायला जाते व त्याच्या तावडीत सापडते. तिच्याकडे मूर्खपणा, वेडेपणा, भोळेपणा नसून ती विचारी होती. ती कोठे आहे, हे रामाला कळावे म्हणून, ती आपले नुपूर, दागिने वगैरे रस्त्याने टाकत जाते. रावणाला कधी सीता घाबरली नाही. त्याच्याशी बोलताना सीता हातात समोर काडी धरायची, याचा अर्थ तू मला कस्पटा समान आहेस ! ती त्याच्या डोळ्याला डोळा लावून बोलायची नाही. रावणाला एकदा ती म्हणाली, “तू काजवा आहेस. सूर्यासमान असणाऱ्या माझ्या पतीशी काय तुलना करतोस ?” एकदा म्हणाली, “मी राजहंस आहे, आणि तू डोमकावळा आहेस.” अशोकवनात तिच्या अवतीभवती दुष्ट, अक्राळ विक्राळ राक्षसिणी असूनही ती त्यांच्याशी हिंमतीने वागे. रावण वधानंतर हनुमान सीतेला म्हणतो, “आई, मी सर्व राक्षसिणींना मारून टाकतो.” तर ती म्हणते, “त्यांची काय चूक ? त्या सगळ्या हुकमाच्या ताबेदार आहेत.”
सीता सौजन्यमूर्ती होती, तितकीच ती हृदयाची उदारही होती. रावण वधानंतर रामाने तिच्याविषयी अविश्वास प्रगट केला. खरंतर सीता शुद्ध, पवित्र आहे हे रामला माहित होते; पण सोन्याची परीक्षा रामाला दाखवायची होती. सीता रामाला म्हणते, “तुम्हाला माझा जर त्याग करायचा होता, तर तसा निरोप हनुमानाबरोबर पाठवायचा होता; म्हणजे मी माझ्या जीवनाचा त्याग केला असता. म्हणजे तुमच्यावर इतका त्रास, इतके दुःख सहन करण्याची पाळी आली नसती. लंकेला यावेच लागले नसते.” सौजन्यमूर्ती सीतेला पाहून मस्तक विनम्र होते व रामापेक्षाही सीतेचे चरित्र दिव्य आहे असे वाटते.
लोकापवाद टाळण्यासाठी राम सीतेचा त्याग करतो. सीता म्हणते, “ज्या कर्तव्यनिष्ठेमुळे रामाने माझा त्याग केला त्या पौरजनांशी तुम्ही प्रेमाने वागा. त्यांच्यावर रागावू नका. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. “वाणीमध्ये काय तेज आहे सीतेच्या !!
लव कुशांसाठी सीता परत अयोध्येत येते व भयंकर मोठी प्रतिज्ञा करते.
मनसा कर्मणा वाचा यदी राम समर्चये ।
तदा मे माधवी देवी विवरं दातु मर्हति ।।”
कर्माने, मनाने आणि वाणीने मी दुसऱ्यावर प्रेम केले नाही. हे सीतेचे जाज्वल्य चारित्र्य सांगते. इतक्यात सिंहासन घेऊन भूमीतून वसुंधरा बाहेर येते. सीता भूमी प्रवेश करते. अश्यातऱ्हेने सीतेचा अंतही अलौकिक आहे. तिचे बलिदान हा अमर व दिव्य करुण प्रसंग आहे. जोपर्यंत सत्य आहे तोपर्यंत रामायण आहे. जोपर्यंत रामायण आहे तोपर्यंत सीता आहे. त्या कोमल पुष्पाचा सुगंध पूर्वीपासून दरवळतो आहे. पुढेही असाच दरवळणार ! त्या भगवती सीतेला माझा नमस्कार !
।। जानकीजीवन स्मरण जयजय राम ।।