समर्थांच्या अकरा स्तोत्रातील पाचव्या क्रमांकाचे हे स्तोत्र स.भ.मोहनबुवा रामदासी यांच्या पुस्तकात पाचव्या क्रमांकावर आहे. काही ठिकाणी ते सहाव्या क्रमांकावर आहे. या स्तोत्राच्या बारा श्लोकांचा अर्थ आपण भाग १ मध्ये बघितला. तेराव्या श्लोकांपासूनचा अर्थ भाग २ मध्ये बघणार आहोत. समर्थ स्थापित हा एकच मारुती दास मारुती आहे. दास मारुतीची स्थापना करताना शिष्याने दासानुदास व्हावे हीच शिकवण समर्थांनी दिली आहे. २४ श्लोकांच्या या स्तोत्रात हनुमंताची स्तुती करताना समर्थ खूप भावोत्कट होतात. स्कंदभागी रामाला वाहून नेणारा, द्रोणागिरी उचलून आणणारा, लंकेत झेप घेणारा अशा हनुमंताच्या कितीतरी छटा समर्थांनी या स्तोत्रात रंगवल्या आहेत.
“कासिली हेमकासोटी घंटा किंकिणी भोवत्या ।
मेखळे जडलीं मुक्तें दिव्य रत्ने परोपरी ।”
समर्थ म्हणतात की, यश संपादन करावे आणि रामावर भार टाकून निवांत रहावे. हनुमंताच्या कमरेला छोट्या घंटांनी किणकिण आवाज करणारी सोन्याची कासोटी ही जन्मजात आहे. ती त्याच्या ब्रह्मचर्याचे प्रतीक आहे. त्याच्या कमरेच्या कंबरपट्ट्यावर निरनिराळ्या प्रकारची रत्ने आणि मोती सुद्धा जडवलेले आहेत. मस्तकावर धारण केलेल्या मुकुटाचे तर काय वर्णन करावे.
“माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले ।”
यामध्ये कोटी चंद्र सूर्य लोप पावतात म्हणजेच नाहीसे होतात, लपून जातात. मुकुट तेजाने एवढा तळपत आहे. कानात दिव्य तेजस्वी कुंडले आहेत आणि गळ्यात मोत्यांची माळ शोभून दिसत आहे. समर्थांनी हनुमंताचे अगदी हुबेहूब वर्णन केले आहे. स्तोत्र म्हणताना तसाच हनुमंत आपल्या डोळ्यापुढे उभा रहातो. कपाळाला केशराचा टिळा लावलेला असल्यामुळे त्याचा हसतमुख चेहरा छान दिसत आहे. बोटांमध्ये अंगठ्या शोभत आहेत आणि कडे घातल्यामुळे हाताला शोभा आली आहे. समर्थ हनुमंताच्या सर्व अवयवांचे वर्णन करताना त्याने घातलेल्या आभूषणाचे सुद्धा वर्णन करतात .
“चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जती ।
कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू ।।”
त्याच्या पायातील वाळे वाजत आहेत आणि तोडा मात्र मोठ्याने आवाज करत आहे. असा हा अनाथांचा कैवारी आहे, रक्षण करणारा आहे, सगळ्यांना मोक्ष म्हणजे मुक्ती मिळवून देणारा ईश्वर आहे. समर्थ म्हणतात की, हनुमंताचे स्मरण केले तरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते. हनुमंताचे तेजच एवढे प्रभावी आहे की ते पाहून आणि त्याचा भुःभुकार ऐकून दैत्य चळाचळा कापतात. तो असुरांना त्वरेने आणि नेटकेपणे खाली पाडतो आणि भूमीवर आपटून मारून टाकतो. हनुमंताला, समर्थ सौमित्र प्राणदाताची म्हणतात. सौमित्र म्हणजे लक्ष्मणाला प्राण देणारा आणि वानरकुळामध्ये शोभून दिसणारा आहे.
“दंडिली पाताळशक्ति अहीमही निर्दाळिले ।
सोडिलें रामचंद्रा कीर्ति हे भुवनत्रयीं ।”
रामायणात या विषयी एक कथा आहे. राम रावण युद्धाच्या वेळी रावणावर बिकट परिस्थिती आली तेव्हा रावणाने अहिरावण, महिरावणाला आणले. अहिरावण हा रावणाचा लहान भाऊ होता आणि पाताळपुरीचा राजा होता. मेघनादच्या मृत्यूनंतर रावणाने अहिरावणाला सांगितले की राम आणि लक्ष्मण या दोघांना पाताळपुरीत घेऊन जाऊन ठार मारा. रावणाच्या आज्ञेने अहिरावणाने श्रीराम आणि लक्ष्मण या दोघांना निद्रिस्त असताना पळवून नेले. तेव्हा बुद्धिमान मारुतीने आदिमायेची करुणा भाकली आणि मारुतीचे सामर्थ्य ओळखून आदिमायेने गिधाडाच्या तोंडून राम लक्ष्मण कोठे आहेत ते सांगितले. मारुतीने पाताळात जाऊन महिरावणाचा वध केला आणि अहिरावणाचा वध रामाकडून करविला. हनुमंताच्या या पराक्रमाने त्याची कीर्ती तिन्ही भुवनामध्ये पसरली. विसाव्या श्लोकापासून स्तोत्राची फलश्रुती सांगितलेली आहे.
“विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी ।
कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती ।।”
सात चिरंजीवात हनुमंत सर्वात श्रेष्ठ आहे कारण तो रामाचा अनन्य सेवक आहे. तो मोक्ष देणारा आहे हे त्याचे ब्रीद आहे, व्रत आहे. त्याचे नाव घेतल्याने आपले कल्याण होते तसेच भूत पिशाच्चे भीतीने थरथर कापतात. साप, विंचू, इतर विषारी प्राणी यांच्यापासून विषबाधा झाली तर मारुतीचे नाव घेतल्याने विषबाधेपासून सुटका होते. पण यासाठी समर्थांनी अट घातली आहे की,
“आवडीं स्मरतां भावें काळकृतांत धाकतो ।”
त्याचे नाव आवडीने आणि भक्तीभावाने घ्यावे. मग काळ म्हणजे मृत्यूसुद्धा भयभीत होतो. या स्तोत्राच्या पठणाने विषबाधा, भूतबाधा, अपमृत्यू, गृहपिडा, दुःख, दारिद्र्य यातून मुक्ती मिळेल.
“पुरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू ।
त्रिकाळीं पठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं ।।” या स्तोत्राचे तीनवेळा पठण करण्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कारण हनुमंत भक्तकामकल्पतरू आहेत. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा तो कल्पवृक्ष आहे. मनापासून भक्ती करा, त्याविषयी कोणताही संशय घेऊ नका. तो समर्थांचा सुद्धा सहाय्यक आहे, पदोपदी सांभाळतो हे समर्थांनी दिलेले वचन आहे. रामाचे खऱ्या अर्थाने दास्यत्व करतो तो रामदासी पण हे दास्यत्व हनुमंतासारखे असावे. साधकाला,भक्ताला, उपासकाला भवसागर पार करून नेण्याचे सामर्थ्य या स्तोत्रात आहे.
१९४७ मध्ये चाफळला भूकंपाचा धक्का बसला पण त्यामानाने मंदिराला फारशी इजा झाली नाही कारण प्रत्यक्ष दासमारुती तिथे संरक्षणाला होता असे चाफळचे रामभक्त मानतात. समर्थ मनाने कणखर असले तरी त्यांचे हृदय रामरायासाठी आणि हनुमंतासाठी संवेदनशील आहे. त्यांच्या हृदयात निष्ठेचा, भक्तीचा टवटवीत अंकुर सदैव फुललेला दिसतो. ‘दासोहम्’ म्हणण्यात त्यांना खूप आनंद होई. हीच संवेदना शब्दरूपात आकार घेऊन एक आदर्श बनून स्तोत्रातून प्रगट होई. या स्तोत्र पठणाचे फळ मिळविण्यासाठी समर्थ एक अट सुद्धा घालतात.
“परंतु पाहिजे भक्ति संधे कांहीं धरूं नका ।
रामदासा सहाकारी सांभाळीतो पदोंपदी ।।”
अंतःकरणात भक्ती असली तर मारुती सर्वतोपरी सहाय्य करतो, पण ते म्हणतात संदेह काही धरू नका, मनात कोणतीही शंका न धरता फक्त निर्मळ भक्ती करा. सर्व भक्तांसाठी समर्थ रामरायाला प्रार्थना करतात हे रामराया, मारुती सारखी भक्ती सर्वांना प्रदान कर. तूच निर्माण केलेला जीव प्रपंचासाठी राबेल पण तरीही अंतकाळी भव व्यथेपासून जीवाचे रक्षण करू दे. जीवनाचे सारे सुख ईश्वरार्पण कर्मात आणि भगवंताच्या दास्यत्वात आहे हाच संदेश चाफळचा मारुती देतो. रामनामाचा आश्रय घेत आत्माराम जाणायचा असेल तर संपूर्ण शरणागती हवी आणि जी फक्त भगवंताच्या दास्यभक्तीतूनच मिळवता येते. समर्थ जणूकाही हेच या स्तोत्रातून सांगतात. अतिशय बलवर्धक आणि तितकेच कारुण्य घेऊन ईश्वराच्या चरणावर समर्पित झालेले हे स्तोत्र भक्तांवर चाफळच्या दासमारुतीची कृपा प्रदान करेल यात शंका नाही. स्तोत्र श्रद्धेने म्हणताना समर्थांचा भाव मात्र अंत:करणात असायला हवा. तेवढ्याच अर्थपूर्णतेने ते म्हणावे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।