एक्केहाळी अर्थात सध्याचे जहीराबाद मठाचे मठपती श्री आत्माराम महाराज यांनी श्री दासविश्रामधाम या ग्रंथाची रचना केली आहे . श्री समर्थ रामदास.. कल्याण ..शिवराम.. रामचंद्र आणि आत्माराम अशी ही शिष्य परंपरा होय. आत्माराम महाराजांचे मूळ नाव तीपण्णा. त्यांच्या मुंजीनंतर त्यांना प्रखर वैराग्य प्राप्त झाले. एके दिवशी त्यांचा भाग्योदय होऊन आपचंद मठाचे मठपती रामचंद्र महाराज यांचा त्यांना अनुग्रह झाला .
एक हजार पानांचा हा ग्रंथ एक्केहळी मठाच्या बाहेर नेता येत नाही, अशी त्याची ख्याती आहे. हा ग्रंथ उतरवून घेण्याचे मोठे काम समर्थ हृदय नानासाहेब देव यांचे कडे असलेल्या श्री श्रीधर पंत नाटू टिकले यांनी केले. हा ग्रंथ नक्कल करून घेण्यासाठी त्यांना चार महिने दहा दिवस लागले. 1910 मध्ये या ग्रंथाची नक्कल झाली. आणि पुढे बारा वर्षांनी म्हणजे 1922 मध्ये श्री नानासाहेब देव तथा शंकर श्रीकृष्ण देव यांनी हा ग्रंथ छापून समर्थ भक्तांपुढे आणला .
श्री रामदास स्वामींचे बृहत चरित्र असलेला श्री दासविश्रामधाम या ग्रंथांमध्ये 121 अध्याय असून ओवी संख्या ही सोळा हजार तीनशे एवढी आहे . या ग्रंथात जवळपास 500 अभंग , 230 पदे , 100 श्लोक आणि प्रसंगोपात घेतलेल्या आरत्या , भूपाळ्या अशी सगळी संख्या 17000 ओवींच्या पुढे जाते. या ग्रंथामध्ये श्री समर्थांचे चरित्र आलेले आहे. पण त्यात बालपण , तारुण्य, साधना काळ , समर्थांचे परिभ्रमण, हिंदवी स्वराज्याची स्थापना अशा क्रमाने आलेले प्रसंग दिसत नाहीत . बरीच नाविन्यपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला प्रसंगोपात दिसून येते. अनेक संतांची पदे या ग्रंथामध्ये आपल्याला पहावयास मिळतात.
साडेतीन कोटी जप संख्या झाल्यानंतर माझे दर्शन होईल असे प्रभू श्रीरामांचे वचनाचा संदर्भ या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो . समर्थांनी घेतलेल्या 36 मुद्रांची अर्थात नावांची 36 पदे ओळीने आलेली आहेत, ही एक खासियत या ग्रंथात दिसते.
समर्थ रचित मनाचे श्लोक , त्याचे महत्त्व आणि पद्धत आपल्याला या ग्रंथात विशेषत्वाने सांगितलेली आहे. आद्य कवी मुकूंद राजांच्या विवेक सिंधूचा प्रभाव दासबोधावर आहे याचा प्रत्यय आपल्याला आत्माराम महाराजांनी वर्णन करून सांगितला आहे . या ग्रंथात क पासून क्ष वर्णापर्यंत अक्षर माळीका डफ गाणे आपले लक्ष वेधून घेते . अशा अनेक वैविध्यपूर्ण आणि प्रसंगांची वर्णने असलेला हा ग्रंथ म्हणजे समर्थ संप्रदायाचा एनसायक्लोपीडिया होय. कीर्तनकार , प्रवचनकार , समर्थ भक्त आणि समर्थ वाङ्मयाचे संशोधक यांच्या घरी हा ग्रंथ असणे म्हणजे समर्थांची वांग्मयीन मूर्तीच आपल्या घरी आहे, अशी आनंददायी व भाग्याची बाब समर्थ भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे. धुळे येथील सत्कार्योतेजक सभेने ( श्री नाना साहेब देव मार्ग, राम वाडी, धुळे 424OO1) या ग्रंथाची उपलब्धता सर्वांना करून दिलेली आहे, ही मोठी समाधानाची गोष्ट आहे.
परम पूजनीय अक्का स्वामी वेलणकर यांनी चाळीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे समीक्षक श्री अनिल वाकणकर यांनी महत्प्रयासाने या ग्रंथाचे पीडीएफ केले, तर श्री आनंद जोगळेकर आणि त्यांच्या टीमने श्रीदासविश्रामधाम हा ग्रंथ दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या संकेतस्थळावर जगातील सर्व समर्थ भक्तांना अथक परिश्रमातून उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
समर्थ संप्रदायासाठी एक अभिमानास्पद कार्य या मंडळींनी केले आहे, याचा मोठा आनंद वाटतो.
ग्रंथाची लिंक – https://ramdasswami-sahityashodh.in/shridasvishramdham.aspx
|| जय जय रघुवीर समर्थ ||