संगत्याग

संगत्याग
सौ. मानसी याडकीकर
  • June 8, 2025
  • 1 min read

संगत्याग आणी  निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।

सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तही येकरूप ।। ४-४-८ ।।

परमार्थ शास्त्रामध्ये ‘संग’ शब्द फार व्यापक अर्थाने आलेला आहे. सर्वच संतांनी संगाचे स्वरूप, मर्यादा व परिणाम आपल्या वाङ्मयातून विस्तृतपणे मांडलेले आहेत. संग म्हणजे काय? संगत्याग कसा करायचा?, त्याने काय साध्य होते? या प्रश्नांचा सखोल विचार करीत गेल्यावर असे लक्षात येते की, मनुष्याला जीवनात शांती, समाधान हवे असते. जन्मभर त्यासाठी तो धडपडत असतो. परंतु नक्की काय करावे? म्हणजे त्याचा अनुभव येईल हे त्याला उमगत नाही. त्यासाठी मुळातूनच संगत्यागाचा विचार करणे गरजेचे आहे. संग हा शब्द ‘संज’  धातूपासून बनला आहे. संज म्हणजे चिकटणे. कोणत्याही दोन घटकांचा जेव्हा संबंध येतो तेव्हा त्याला ‘संग’ असे म्हणतात. संग या शब्दाचे एकत्र येणे, संयोग, संबंध, मैत्री, आसक्ती असे अर्थ निर्वाण लघुकोशात दिलेले आहेत. ज्याच्या संगतीत आपण राहतो, मग ती व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ यापैकी काहीही असले तरी त्यांची संगत आपल्या शरीरावर व मनावर परिणाम करते हा जीवनाचा नियमच आहे. जसे, हातात कात्री घेतली तर काहीतरी कापावेसे वाटेल, या उलट हातात जपमाळ घेतली तर मुखाने नामच घ्यावेसे वाटेल हा झाला संगाचा स्थूल परिणाम. अशाच प्रकारे सकाळी एखादे गाणे ऐकले तर दिवसभर ते गाणे मनात रेंगाळत राहते हा झाला संगाचा सूक्ष्म परिणाम. म्हणजे संगाशिवाय व्यवहारिक जीवन चालूच शकत नाही. संग हा संसर्गजन्य आहे. संपर्कात आलेल्या वस्तू लगेच आपले गुणधर्म एकमेकांवर लादतात. त्याचे विपरीत परिणाम आपण अनुभवतो. 

संगाचे प्रामुख्याने दोन प्रकार होतात – १) बाह्य संग २) अन्तःसंग.

१) बाह्य संग म्हणजे दृश्य, स्थूल वस्तूंचा, पदार्थाचा किंवा व्यक्तीचा संग. उदाहरणार्थ –  घरदार, बायका-मुले, संपत्ती व सर्व व्यवहारिक गोष्टींचा संग. संगाला कमीत कमी दोन जण लागतात.  मग ती व्यक्ती असो की वस्तू किंवा पदार्थ असो. ह्या बाह्य गोष्टींपासून सुख मिळेल अशी जीवाची धारणा असते. त्यामुळे देहाला मिळणारे सुखच खरे सुख मानून त्यासाठी विषयसुख देणाऱ्या साधनांचा संग्रह करण्यात मनुष्य आयुष्य घालवतो. यातून वासनांचे गाठोडे तयार होत जाते व जीव जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतो. येथे श्रीसमर्थ सांगतात-  

संसारसंगें सुख जालें । ऐसें देखिलें ना ऐकिलें ।

ऐसें जाणोन अनहित केलें । ते दुःखी होती स्वयें ।। ५-३-१०१ ।।

जीव मूळचा सच्चिदानंदस्वरूप असूनही अज्ञानामुळे तो स्वतःला देहापुरताच सीमित समजतो व दुःख भोगतो. यासाठी संत साधकाला ‘परिसंग सोडून सुखी राहावे’ असा उपदेश करतात.

संग सोडायचा म्हणजे दृश्य जगातले सर्व सोडून दूर कुठेतरी लांब निघून जायचे असे नाही, तर आसक्ती; ममत्व; स्वामित्वाच्या भावनेतून मनाने सुटले पाहिजे. वस्तूंचा त्याग करणे एक वेळेस सोपे आहे, परंतु मनाने ज्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत; मग त्या अनुकूल असो अथवा प्रतिकूल असो; त्यांचा त्याग करणे अवघड असते. कारण मनाने या सर्व गोष्टींचा वर्षानुवर्ष संग केलेला असतो. म्हणून मनाची गुंतवणुक ही मोठी त्रासदायक असते.  यासाठी श्रीसमर्थ म्हणतात – मना सर्वही संग सोडून द्यावा..  

२) अंतःसंग – ममत्व, आसक्ती, अहंता, कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादींची जाणीव हे अंतःसंगाचे मुख्य घटक आहेत. स्वरूपाचा व अज्ञानाचा संबंध आला की जीव ‘मी’ म्हणजेच देह असे समजतो. माझेपणाची व्याप्ती देहापासून सुरू होऊन देह संबंधाने येणाऱ्या स्थूल गोष्टी, तसेच अंतःकरण संबंधाने येणाऱ्या सूक्ष्म गोष्टी म्हणजे माझे मन, माझी बुद्धी, माझे चित्त इत्यादी पर्यंत वाढत जाते. अहंता म्हणजे स्वतः विषयीच्या विशेष जाणिवा. जसे, मी बुद्धिमान, मी कर्तव्यदक्ष, मी सुगरण इत्यादी. अशा अहंतेचा संबंध तोडणे म्हणजे संगत्याग होय. संगत्यागाशिवाय परमार्थ साधत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात –

”न करी रे संग। राही रे निश्चळ ।

लागो नेदी मळ । ममतेचा ।”

संगत्याग कसा करायचा याचे मार्गदर्शन करतांना संत आपल्याला आत्मानात्मविवेक करायला सांगतात. ‘यदृष्टं तं नष्टं’ या नियमाप्रमाणे जे जे काही निर्माण होते ते सर्व नाश पावते. मग संग विनाशी वस्तूंचा करायचा की अविनाशी परब्रह्माचा करायचा हे साधकाने ठरविले पाहिजे. श्रीहंसराज स्वामी आपल्या ‘आगमसार’ या ग्रंथात संगत्यागाचे वर्णन करताना म्हणतात –

 ”संग म्हणिजे मीपण । जें मुक्तपणाचे बंधन ।

तेंचि सांडील्या वाचून । संगत्याग कैसा ।।

दीप-कापुरा मिळणी । कापूर जाता जळूनी ।

ज्योती काजळी दोन्ही । किमपी उरेना ।।

तैसे अज्ञान स्वानुभव ज्ञाने । जाळून आपण लया जाणे ।

अनुभवेंवीण जें का असणे । हाची संगत्याग ।। ”

मी व माझेपणाचा कल्पनेने धरून ठेवलेला संग सोडल्याशिवाय जीव देहासकट सर्व दृश्य व विनाशी  वस्तूंच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. जसे, अग्नी व कापुराचा संबंध आला की कापूर क्षणभरात जळून जातो. तेथे ज्योत किंवा काजळी काहीही मागे उरत नाही. त्याचप्रमाणे एकदा का आत्मज्ञान झाले की देहबुद्धी नष्ट होते, व मी ब्रम्हाचा अनुभव घेतला असे म्हणायलाही कोणी शिल्लक राहत नाही. कारण अनुभव म्हटलं की द्वैत आले. जोपर्यंत साधकाचा द्वैताचा निरास करण्याचा प्रयत्न चालू आहे, तोपर्यंत जीव; आत्मा व ब्रह्म हे तिन्ही एकरूप आहेत असा अनुभव येत नाही. व्यवहाराच्या दृष्टीने जेव्हा कशाचा तरी, कुणाला तरी आणि काहीतरी अनुभव येतो. तेंव्हा तेथे अनुभव, अनुभविता आणि अनुभवी अशी त्रिपुटी उत्पन्न होते. मी संगत्याग करतो हा अनुभव त्रिपुटीतच मोडतो. म्हणून त्रिपुटीमध्ये आत्मानुभव नसतो. 

मानवी जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे जीवनमुक्ती. ते साध्य करण्यासाठी काय करायचे हे सांगतांना आद्य शंकराचार्य म्हणतात – 

” सत्संगत्वे निस्संगत्वं, निस्संगत्वे निर्मोहत्वम् ।

निर्मोहत्वे निश्चलतत्वं, निश्चलतत्वे जीवनमुक्तिः ।। ”

सज्जनांच्या संगतीत राहिले की, संसाराबद्दलची आसक्ती क्षीण होते. त्यामुळे मोह मायेचा नाश होतो. मोह नष्ट झाला की चित्त शांत व स्थिर होते व अश्या निश्चल चित्तामध्ये जीवनमुक्तीचा अनुभव येतो. असे जीवन्मुक्त असणे हीच अत्यंत संगरहित असण्याची खूण आहे.

Language