समर्थ भक्तांची चार तीर्थक्षेत्रे

समर्थ भक्तांची चार तीर्थक्षेत्रे
संध्या कोल्हटकर
  • February 9, 2026
  • 1 min read

श्रीसमर्थ भक्तांची चार तीर्थक्षेत्रे, पहिले ‘जांब’ ही श्रीसमर्थांची जन्मभूमी, दुसरी ‘टाकळी’ ही तपोभूमी, तिसरी ‘चाफळ’ ही कर्मभूमी, आणि चौथी ‘सज्जनगड’ हे विश्रांती स्थान !! आज आपण त्या स्थानांची विशेषता बघणार आहोत. 

सूर्याजीपंत व राणूबाई यांना, त्यांची निस्सीम भक्ती आणि तपश्चर्या पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवांनी ब्राह्मणाच्या वेषात दर्शन दिले. सूर्याच्या अंशाने एक आणि मारुतीच्या अंशाने एक असे दोन पुत्र होतील असे आशीर्वाद सूर्यदेवांनी दिले. त्यापैकी सूर्यदेवांच्या अंशाने गंगाधरपंत यांचा जन्म इ.स.१६०५ साली मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला सूर्योदयाच्या वेळेस झाला आणि मारुतीच्या अंशाने इ.स.१६०८ साली रामनवमीच्याच दिवशी दुपारी रामजन्माच्यावेळी नारायणाचा जन्म झाला.

क्षेत्र जांब – ही श्रीसमर्थ रामदासांची जन्मभूमी आहे. अर्थात संतांचा जन्म कुठे झाला याला महत्व नसते. त्याचे कार्य सिद्ध झाल्यावर ते जिथे देह ठेवतात ते तीर्थक्षेत्र बनते. पण जांब या समर्थ जन्मस्थानाला महत्व आले ते समर्थांना तिथे  मिळालेल्या अनुग्रहामुळे! श्रीसमर्थांना वयाच्या अकराव्या वर्षी प्रत्यक्ष श्रीरामरायाने अनुग्रह देऊन त्रयोदशाक्षरी मंत्र दिला आणि त्याचबरोबर, पृथ्वी म्लेच्छमय झाली असून धर्माचा उच्छेद झाला आहे. ह्यासाठी शिशोदे वंशामध्ये शिव नामे करून राजा होईल त्याला अनुग्रह देऊन, कृष्णातीरी राहून धर्मसंस्थापना करावी असा आदेश ही दिला. म्हणून हे क्षेत्र झाले. या अनुग्रहाला विशेष महत्व आहे. श्रीरामाने अनुग्रहाच्यावेळी नारायणाला रामदास हे नाव दिले. नारायणाच्या बाललीला शिक्षण जांब येथे चालू होते. त्यांच्या बाललीलांमधून ते हनुमंताचे अवतार अकरावा रुद्र आहेत हे वारंवार जाणवत असे. नारायणाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, हळूहळू घरात नारायणाच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. लग्नाचा मुहूर्त ठरला. परंतु मुहूर्त वेळी सावधान म्हणताच ‘सावध’ झालेल्या नारायणांनी जांब सोडून टाकळीला प्रयाण केले. 

टाकळी – ‘देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी’ हे लक्षात घेऊन नारायणानी टाकळीला बारा वर्ष तपश्चर्या केली. म्हणूनच तपोभूमी ‘टाकळी’ हे तीर्थक्षेत्र मानले जाते. चिंता करितो विश्वाची असे उत्तर आईला देणाऱ्या नारायणांनी स्वत:चा लौकिक प्रपंच दूर सारून विश्वाचा प्रपंच करायचे ठरविले. गोदावरीच्या पाण्यात लग्नाच्या वेळेला लावलेली हळद धुवून टाकली. ईश्वरप्राप्ती, स्वराज्यसंस्थापना आणि लोकोद्धार या उद्देशासाठी त्यांनी नारायण हे नाव बदलून श्रीरामाने दिलेले रामदास हे नाव धारण केले. श्रीरामाचे दर्शन घेण्याची तीव्र ओढ त्यांच्या मनात होती. रात्री देवळात माणसांची वर्दळ कमी होते हे लक्षात घेऊन ते रात्री काळाराम मंदिरात गेले. सर्व सभामंडप तेजानी भरून गेला. श्रीरामाने त्यांना दर्शन दिले. 

रामदासांनी टाकळी हे गोदावरी व नंदिनीच्या संगमावरील ठिकाण आपल्या तपश्चर्येसाठी निवडले. जवळच एक गुहा होती. तिथे ते रहात होते. सकाळी उठून नंदिनी नदीवर स्नान करून, संध्या आटोपून ते बाराशे सूर्य नमस्कार घालत. काळाराम मंदिरात प्रवचन कीर्तनाला जात. त्यावेळी त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. त्याचा उल्लेख दासबोध ग्रंथात आहे. त्यांनी रामायणासह अनेक ग्रंथ लिहून काढले. व्यायाम जपध्यान, ग्रंथांचा अभ्यास असा त्यांचा दिनक्रम चालू होता. कारण श्रीसमर्थ रामदास हनुमंता प्रमाणेच शक्तीबुद्धीचा निश्चयो होते. हळू हळू त्यांच्या अन्नवस्त्राची आबाळ होऊ लागली. घराची आठवण त्रास देऊ लागली. त्यावेळचे त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या करुणाष्टकामधून पहायला मिळते. पण त्याचवेळी श्रीरामाशिवाय आपल्याला दुसरे कोणी नाही ही भावना दृढ होत होती. त्यांचा हा बद्ध, मुमुक्षू साधक आणि सिद्ध हा प्रवास आपल्याला त्यांच्या करुणाष्टकातून उलगडतो. त्यांनी गायत्रीचे पुरश्चरण केले. श्रीसमर्थांना त्यांचा पहिला शिष्य उद्धव हा टाकळीला लाभला. पुढे तीर्थाटनाला बाहेर पडतांना उद्धव त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह करू लागला. त्यावेळी उद्धवाला गोमयाचा मारुती स्थापन करून देऊन तिथेच राहण्याची आज्ञा दिली. हा श्रीसमर्थांचा पहिला शिष्य व पहिला मठ होय. उद्धवाची मुंज श्रीसमर्थांच्या मांडीवर लागली. 

बारा वर्ष श्रीसमर्थांनी आसेतु हिमाचल पदभ्रमण केले. पदभ्रमणामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण केले. अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली. यवन राजकर्त्यांचे असभ्य, असंस्कृत वागणे, लोकांवर केलेले अत्याचार पाहिले. पराक्रमी राजपूत तसेच मुगल सुलतानाला स्त्रिया देणारे राजपूत पाहिले. जवळ दोन तलवारी बाळगणारे शिखांचे सहावे गुरु हरगोविन्द्सिंह यांची भेट झाली. त्यांच्याकडून जेंव्हा एक तलवार धर्मासाठी आणि दुसरी तलवार स्त्रियांच्या रक्षणासाठी हे समजल्यावर धर्म रक्षणासाठी आपणही शस्त्र वापरले पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी गुप्तीचा वापर सुरु केला. स्वधर्माविषयी अभिमान जरूर असावा. तसेच परधर्माचा आदर करावा.  दुसऱ्याच्या धर्मातील चांगल्या गोष्टी घेण्यास काहीच हरकत नसते. याच काळात त्यांनी आपला संप्रदाय वाढवला. अकाराशे मठांची स्थापना काश्मीर (पहेलगाम) ते कन्याकुमारीपर्यंत केली. अनेक मठ व महंत तयार केले. तसेच शिष्य करताना वयाने लहान पण लिहिता वाचता येणारे अशांना प्राधान्य दिले. त्यांचे अनेक शिष्य होते. स्त्रीशिष्यांना मठाधिपती करून स्त्रीपुरुष समानहक्क ही खरी पात्रता गुणांवर अवलंबून असते. हे दाखवून दिले. 

तिसरे स्थान चाफळ ही कर्मभूमी आहे. स्वराज्य संस्थापनेचा श्रीरामाने दिलेला आदेश सार्थ करण्यासाठी कृष्णेच्या तीरावर श्रीसमर्थांनी वस्ती केली. पहिल्याच भेटीत महाराजांनी श्रीसमर्थांचा अनुग्रह घेतला. श्रीसमर्थांनी शिवाजीराजांना लघुबोध, क्षात्रधर्म सांगितला. सेवकांना सेवकधर्म सांगितला. क्षात्रतेज व ब्राह्मतेज एकत्र आले. शिवरायाची राजवट होती म्हणून श्रीसमर्थ सुखरूप होते. तसेच श्रीसमर्थांचे मजबूत संघटन कौशल्य, गुप्त सल्लामसलती, मार्गदर्शन, मठाचे जाळे, महंतांची नि:स्वार्थी व गुप्तता बाळगून सावधपणे केलेली मदत, या सर्वांचा फायदा शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्य संस्थापनेसाठी झाला. चाफळ येथे अंगापूरच्या डोहात सापडलेल्या श्रीरामाच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. श्रीसमर्थ रामदासांनी इ.स.१६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करून संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले. श्रीसमर्थांच्या मठाचा उपयोग जसा शिवाजी महाराजांना झाला तसेच शिवाजी राजांच्या आश्रयामुळे मठांना स्थैर्य आले. 

चौथे सज्जनगड श्रीसमर्थांचे विश्रांती स्थान. इ.स.१६५० साली श्रीसमर्थ सज्जनगडावर आले होते. पूर्वीचे त्याचे नाव परळीचा किल्ला असे होते. श्रीसमर्थांनी तेथे अंग्लाई देवीचे मंदिर बांधले. श्रीसमर्थ इ.स. १६७६ साली सज्जनगडावर वास्तव्यासाठी आले. त्यानंतर गंगाधर स्वामीं, शिष्या वेणाबाई आणि नंतर शिवाजी महाराजांचे निर्वाण अशा दु:खद घटना घडल्या. शेवटी श्रीसमर्थांनी संभाजीराजांना पत्र पाठवून उपदेश केला आणि नंतर समर्थ रामरायाच्या दर्शनाला चाफळ येथे आले. श्रीरामाचा निरोप घेऊन परत सज्जनगडावर आले. निर्वाणाच्या आधी पंधरा दिवस सर्व शिष्यांना बोलावून घेतले. श्लोकाचे दोन चरण म्हटले. रघुकुलटिळकाचा वेध सन्निध आला | तदुपरी भजनाचा पाहिजे चांग केला | उद्धवाने हा श्लोक पूर्ण केला, अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी | बहुत लगबगीने कार्य सिद्धी करावी || इ.स.१६८२ साली माघ वद्य नवमीला श्रीसमर्थांचे निर्वाण झाले. श्रीसमर्थ रामदासस्वामींचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याजागी समाधी बांधण्यात आली. या चार स्थानांना अवश्य भेट द्यावी. ज्यामुळे आपल्याच इतिहासाची, शिवाजी महाराज व समर्थ यांच्या कर्तृत्वाची आणि वैभवशाली परंपरेची ओळख होईल.

||जय जय रघुवीर समर्थ||

 

Language