पंचमहाभूतांची पंचोपासना उत्तरार्ध

पंचमहाभूतांची पंचोपासना उत्तरार्ध
श्रीमती. सीमाताई रिसबूड
  • January 12, 2026
  • 1 min read

पृथ्वी, आप, तेज या तत्त्वांचा विचार आपण पूर्वार्धात केला, आता उर्वरित तत्त्वांचा विचार करूया.

वायूतत्त्व – ‘वा म्हणजे वाहणे. या धातुपासून ‘वात’ शब्द तयार होतो. वैदिक ऋषींनी वायूदेवतेची स्तुती केली. आध्यात्मिक दृष्टीने ‘वायू’ म्हणजे ‘शरीर संचारी प्राण होय’. शब्दाच्या उच्चारात वायू हवा. बोलण्याची इच्छा, मज्जातंतूची चालना, प्राणाची शक्ति, सूक्ष्म नाद व वैखरीतील शब्द असा शब्दाचा प्रवास आहे. वायू किंवा हवेत धुळीचे कण, कोळशाचे कण, बाष्प असते. हवेला वास किंवा चव नसते. ती सुगंध, दुर्गंध पसरवते. परमार्थ दृष्ट्या वायू, शरीर; प्राण व मन या त्रयीत जिवंत ठेवणारी चित्कला आहे. श्रीसमर्थांची मारुती उपासना ही वायू शक्तीची उपासना आहे. वायू मोठा व्यापक कारभारी आहे. वायूच्या योगानेच पंचभूते एकमेकात मिसळतात. वायू प्रथम ब्रह्मांडात प्रगट होतो. नंतर देवदेवतांमध्ये व पिंडात उतरतो. शेष, वायूमुळे पृथ्वी डोक्यावर तोलतो. हनुमान हा वायूचा मुलगा.  दशक ९ समास ८ मध्ये समर्थ ‘वायू’ शब्द शक्ति या अर्थाने वापरतात. विश्वात वायू शक्तीचा खेळ दिसतो. तिच्या स्थिर रूपाने विश्व अनंत काळ टिकते व गतिमान रूपाने विश्वात घडामोडी होतात. शक्ति जाणीव संपन्न आहे. मूळमाया, स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाणीव रूप आहे. वायू मंत्राना सामर्थ्य देतो. ज्ञानेश्वरांनी अचेतन भिंत वायू शक्तीवर चालवली. सच्चिदानंद बाबांच्या कानात वायू फुंकून त्यांना जिवंत केले. आद्य शंकराचार्य व श्रीसमर्थ रामदास वायू वेगाने संचार करत. 

आकाशतत्त्व – आकाशाचे वर्णन करतांना श्रीसमर्थ त्याला ‘महत् भूत’ म्हणतात. ‘महत्’ म्हणजे ‘सर्वांहून मोठे’ आणि ‘भूत’ म्हणजे अनादि, नित्य, सिद्ध वस्तू होय. ब्रह्म ही वस्तू आत्मारूपाने आपल्यात असते व ती स्वत: सिद्ध म्हणून ती सिद्ध करायला कोणत्या प्रमाणाची गरज भासत नाही. सर्व भूतांमध्ये ‘आकाश’ अतिशय सूक्ष्म, विशाल, निराकार व अमर्याद आहे. म्हणून आत्म्याला आकाशाची उपमा देतात व त्याचा अनुभव यायला आपले मन देखील सूक्ष्म, विशाल निराकार व रिकामे बनले पाहिजे. मनाला आत्म्याच्या निकट स्थिर व्हायला मदत करणे, हीच खरी परमार्थ साधना आहे. आकाश, पिंड व ब्रह्मांडात व्यापून आहे. इंद्रियांचे व्यापार त्याच्यामुळे होतात. शरीररूपी आकाशात काम, क्रोध, शोक, मोह व भय ही तत्त्वे असतात. मानवी शरीरातील आकाशाला जीवात्मा म्हणतात. घटाकाश, मठाकाश व महदाकाश या तीन शब्दांनी आकाशाचे वर्णन करतात. 

सूर्य – ‘सूर्य’ शब्दात ‘सृ’ हा मूळ धातू आहे. त्याचा अर्थ ‘गती’. ‘गती’ म्हणजे चालणे, गमन, ज्ञान, मोक्ष, स्थिति अथवा प्राप्ती होय. जो आकाशात गतिशील आहे. बुद्धीला प्रेरणा देणारा अंधार नष्ट करणारा स्थावर जंगमाला जीवन देणारा, सत्याचे व नियमांचे पालन करणारा, तो ‘सूर्य’. भव्यपणा, प्रचंडपणा, चिरंतन प्रकाश, निष्काम कर्म, निस्वार्थी त्याग, समत्व याची साकार प्रतिमा म्हणजे ‘सूर्य’. वैदिक ऋषी सूर्योपासना करत व त्याला जगाचा आत्मा म्हणत. सूर्यापासून ऊर्जा लहरी पृथ्वी पर्यन्त पोहचतात. रोज सूर्य दर्शनाने निरंतर स्फूर्ति वाढते. माणसाच्या शरीरात हृदय, नाडीचक्र व डोळा यावर सूर्याची सत्ता चालते. कौसल्या सूर्याची उपासना करत असे. सूर्यवंशातील सर्व राजे पराक्रमी व सत्वशील होते. श्रीसमर्थ म्हणतात, 

“ऐसा हा सविता सकळांचा । पूर्वज होय रघुनाथाचा ।

अगाध महिमा मानवी वाचा । काय म्हणोनि वर्णावी ।।१६-२-१९ ।।”

पंचिकरण – विश्वाची रचना व रहस्य याचा विचार पंचिकरणात आहे. पंचमहाभूतांपैकी एक महाभूत एक जिनसीपणाने सांभाळून त्यात बाकीच्या चार भूतांचा समावेश बरोबरीने सांभाळण्याची कला ईश्वर करतो. जगा व जगू द्या हे तत्व त्यामागे आहे. पिंड व ब्रह्मांडात सर्वत्र व्यपून असलेला स्वयंप्रकाश आत्मा पूर्णतत्व म्हणून ओळखला जातो. दशक १७ स. ८ व ९ मध्ये ८२ तत्त्वांचा विचार आहे. मुळात ही पंचमहाभूते अत्यंत सूक्ष्म, अव्यक्त होती, ती परस्परात मिसळली गेली व व्यक्त झाली. या पाच तत्त्वांचा विकास हाच मायेचा विकास ईश्वरी इच्छेनुसार घडून आला. विवेकसिंधू (डॉ. हरिश्चंद्र बोरकर पृष्ठ ५६) 

तत्त्वझाडा – ‘तत्त्व’ म्हणजे पिंड-ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे कारण होय. ‘तत्त्वनिरास’ म्हणजे माया व अज्ञानाचा अंत व सत्याचा स्वीकार व तत्त्वझाडा स्वरुपाच्या शोधासाठी करतात. शरीर हे तत्त्वांचे गाठोडे आहे, पंचमहाभूतांचे आहे. त्यांना नाश आहे व एक आत्माच अविनाशी आहे. या ज्ञानाने व साधनेच्या अनुभवाने “निर्गुण आत्मा तोचि आपण ।। ६-३-३० ।।” हे सत्य कळते. हे कळल्यावर “तेथें निमाली देहअहंता ।। ६-३-२१ ।।” हा अनुभव येतो व मी म्हणजे देह, श्रीसमर्थ म्हणतात,

“सकळ देहाचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला ।

तेथें कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ।। २०-१०-३६ ।।”

व्यापक विचाराने, नारायण असे विश्वी हा विचार पक्का होतो. आनंदाची देवाण घेवाण होते श्रीसमर्थांची रामोपासना व पंचभौतिक उपासना ‘व्यापक व विश्वपाळीती’ होती. श्रीसमर्थ म्हणतात,

“ऐसी माझी उपासना । आणितां नये अनुमाना ।

नेऊन घाली निरंजना । पैलिकडे ।। १५-९-२९ ।।”

विकल्पाचिया मंदिरी दीप नाही । सदा शुद्ध संकल्प दे आत्मदेही ।

यशस्वी दयानंद कल्याणमस्तु । तथास्तु तथास्तु तथास्तु ।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language