आपला संप्रदाय, स्वरूप संप्रदाय; आपले दैवत श्रीरघुनाथ आणि आपली उपासना मारूतीची, हे श्रीसमर्थांनी सुस्पष्टपणे सांगितले आहे. कोदंडधारी रामरायांचा आदर्श श्रीसमर्थांनी सर्व समाजापुढे ठेवला. श्रीरामरायांच्या चरणी, ज्यांनी आपल्या कृतीने भक्तीमार्गातील दास्य भक्तीचा मापदंड सर्वांसमोर प्रस्थापित केला, त्या श्रीमारुतीरायांची उपासना श्रीसमर्थांनी नेमस्तपणे केली. श्रीसमर्थ आणि मारुतीराय या दोघांची युगायुगांची परंपरा भविष्योत्तर पुराणात सांगितली आहे.
कृते तु मारुताख्याश्च त्रेतायां पवनात्मजः।
द्वापरे भीमसंज्ञश्च रामदासः कलौयुगे।।
कृतयुगात जो मारूती या नावाने, त्रेतायुगात जो पवनात्मज नावाने, द्वापारयुगात ज्याला भीम असे संबोधले गेले, तेच कलीयुगात रामदास झाले. श्रीसमर्थ व मारूतीराय यांच्यात असे अद्वैत होते. अंतरीचे तत्त्व उभयतात एकच होते.
श्रीसमर्थांच्या जीवनकाळात त्यांनी मारूतीरायाची निस्सीम भक्ती केली व मारूतीरायांनीही त्यांना उदंड साथ दिली, मार्गदर्शन केलं. श्रीसमर्थ, अर्थात तेव्हाचा छोटा नारायण जेव्हा तीन दिवस; तीन रात्री उपाशीपोटी; तहानभूक विसरून रामरायांचा दर्शनासाठी अविचल बसलेला पाहून, मारूती मंदिरातील मारूतीरायांनीच मग प्रभूश्रीरामचंद्रांना दर्शन देण्याची विनंती केली. त्यानंतर प्रभूश्रीरामचंद्र प्रकट झाले. बाल नारायणास अनुग्रह देऊन, त्याला ‘रामदास‘ हे नाव देऊन, प्रभूंनी त्याला रामनामी शाल पांघरली. कानांत मंत्र सांगितला व त्याला मारूतीरायांकडे सोपवले. त्याला सांभाळा असा आदेश देत ते अंतर्धान पावले. तेव्हापासून मारूतीराय नारायणाच्या पाठीशी सदैव सज्ज होते. पुढे नारायणाला समाजात सन्मान मिळू लागला. श्रीसमर्थ अशी बिरुदावली प्राप्त झाली. शेवटपर्यंत त्या दोघांमधील अनुबंध अत्यंत मधुर राहिले. ‘माझा सखा सहोदर‘ ही त्यांची उत्कट भावना होती, ते सतत मारुतीरायांना आळवीत राहिले.
तुजविण मज पाहें पाहतां कोण आहे।
म्हणउनि मन माझें रे तुझी वाट पाहे।।
मज तुज निरवीलें पाहिजे आठवीलें।
सकळिक निजदासांलागिं सांभाळवीलें।।
(कफनाशक हनुमान स्तोत्र)
बलभीमाच्या, मारुतीरायांच्या ठायी शक्ती; बुद्धी; युक्ती यांचा एकत्र संगम आहे. ते ‘बुद्धिमतां वरिष्ठम्‘ आहे तसेच ‘ज्ञानीनां अग्रगण्य‘ आहेत. कडकडीत ब्रह्मचर्य पाळणारे आहे. अशा मारूतीरायांचा आदर्श श्रीसमर्थांनी मनी मानसी जपला, समाजापुढे ठेवला व मारूती उपासना नेमस्त करण्याचा आग्रह धरला. ही उपासना त्रिविध प्रकारांनी सांगितलेली आहे.
आधिदैविक उपासना : त्रेतायुगात रावणाने पृथ्वीवर उत्पात माजविला होता. नवग्रहांना पालथे घालून त्यावर त्याने स्वत:चा मंचक ठेवला होता. देवांना पराभूत करून त्यांना बंदी बनविले होते. तेव्हा भयभीत पृथ्वीला अभय देत भगवान नारायणांनी एक योजना ठरविली. त्यासाठी महादेवांना मदतीचे आवाहन करीत म्हटले, “,देवाधिदेवा महादेवा ! मी अयोध्येचा राजपुत्र म्हणून राजा दशरथांच्या पोटी जन्म घेतो. आपण आपल्या अकराव्या अंशापासून अंजनी व केसरी यांचा पुत्र म्हणून वानर जमातीत अवतार घ्यावा.” अयोध्येला रामचंद्रांचा व अंजनीपुत्र हनुमंताचा वानर जमातीत जन्म झाला. हा रूद्रावतार, अधिदैवत मारुतीराय शंकरांचा अकरावा अंश; म्हणून श्रीसमर्थ संप्रदायात अकरा या संख्येला महत्व आहे.
आध्यात्मिक उपासना : श्रीराम हा भगवान विष्णूंचा अवतार तर मारूतीराय शिवशंकरांचा अवतार. श्रीरामांना जर आत्मा म्हटले तर मारूतीराय हा त्यांचा बहिश्चर प्राण ! येथे ज्ञानदेवांनी केलेला उल्लेख महत्वाचा आहे. त्यांनी देहातील कुंडलिनी शक्तीला मारूती म्हटले आहे. योगाच्या सहाय्याने मूलाधार चक्रापाशी असलेली कुंडलीनी शक्ती जागृत करून तिला उर्ध्वमुखी केले की, तिचा उलट दिशेकडे प्रवास सुरु होतो, तो सहस्त्रधार चक्रापर्यंत ! चैतन्याला आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलीनी केवळ प्राणवायूरूप होते. देह वायुरूप होतो, देह इतका हलका होतो की, आकाशातही संचार करू शकतो. मारुतीरायाचे हे आध्यात्मिकरूप आहे. याच रुपात त्याची उपासना करतात.
आधिभौतिक उपासना : यामध्ये मारुतीरायाची १) दास मारूती २) वीर मारूती ही दोन रूपे येतात. पैकी दासमारुती श्रीरामांसमोर दास होऊन हात जोडून उभा असतो. नवविधा भक्तीतील दास्य भक्तीचा तो आदर्श आहे. वीर मारूती म्हणजे दुष्ट विचार व दुष्ट शक्ती यांना चिरडून टाकणारा. वीर, पराक्रमी, साहसी, निर्भय असे हे मारूतीरायाचे रूप आहे. श्रीसमर्थांनी तत्कालीन समाजाची हरवलेली वा लोप पावलेली अस्मिता पुन्हा जागृत करण्यासाठी मारूतीरायाच्या ह्या रूपाची खूप भलावण केली आहे. धर्म संस्थापना करणे हेच श्रीसमर्थांचे मुख्य उद्दीष्ट होते. त्यासाठी रुद्रावतारी मारूतीरायाची उपासना त्यांनी नेमस्तपणे केली व समाजालाही सांगितली.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।