भीमरूपी स्तोत्र क्र. ४ – त्रिकूट जिंकिला भला

भीमरूपी स्तोत्र क्र. ४ – त्रिकूट जिंकिला भला
डॉ. सदानंद चावरे
  • December 29, 2025
  • 1 min read

“अंजनी सुत प्रचंड । वज्रपुच्छ काळदंड ।
शक्ति पाहतां वितंड । दैत्य मारिले उदंड ।। १ ।।”

या स्तोत्रात अंजनी मातेच्या सुताचे/पुत्राचे, त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे. त्याचे रूप भव्य आहे आणि
पुच्छ हे वज्रासमान आहे. त्याची प्रहार करण्याची क्षमता मोठी आहे. रावणाने मारुतीच्या शेपटीला कापड
बांधून त्यावर तेल लावून पेटविले तरी त्याला अग्नीने काही इजा झाली नाही. त्या अग्नीचा प्रयोग रावणाच्या
लंकेवर झाला आणि एक तृतीयांश लंका मारुतीने आपल्या प्रज्वलित पुच्छाने जाळून टाकली. अनेक राक्षस तर
या वज्र दंडाच्या तडाख्याने गारद झाले. यावरून त्याच्या अतिप्रचंड शक्तीचा अंदाज येतो. काळ दंड म्हणजे
यमाने दिलेला दंड, म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच. मारुतीचे महाशक्तीशाली पुच्छ, ताडणे; चिरडणे; उचलून फेकून देणे;
अशा अनेक मार्गांनी असुरांना मारत राहिले.

“धगधगीतसी कळा । वितंड शक्ति चंचळा ।
चळचळीतसी लिळा । प्रचंड भीम आगळा ।। २ ।।”

मारुतीने केलेल्या लीलांचे वर्णन यापूर्वीच्या भीमरूपी स्तोत्रात आले आहे. त्याचे पर्वत शिखरांवरून
उड्या  मारणे, वृक्षाच्या फांद्यांवरून उड्या मारताना वृक्ष कोसळणे आणि सर्वात विशेष म्हणजे सूर्य बिंब धरायला झेपावणे इ. हे त्याचे इतर वानरात आगळे-वेगळेपण; त्याच्या साहसात आणि धैर्यात दिसतेच. अति शक्तीशाली पुच्छ हे सुद्धा त्याचे वेगळेपण आहे. मारुती तेजस्वी आहे. हे तेज वैराग्याचे आहे व तेही कडकडीत असे आहे. त्याची धावण्याची गती, ही वायूसमान आहे. “वितंड” हे विशेषण पहिल्या श्लोकात, पुच्छाच्या शक्तीसाठी आणि प्रस्तुत श्लोकात मारुतीच्या विद्युत वेगाने धावणे; संचार करणे यासाठी आले आहे.

“उदंड वाढला असे । विराट धाकुटा दिसे ।
त्यजूनि शून्य मंडळा । नभांत पिंड आगळा ।। ३ ।।
लुळीत बाळकी लिळा  गिळोनि सूर्यमंडळा ।
बहूत पोळतां क्षणीं । थुंकिलाचि  तत्क्षणीं ।। ४ ।।”

या श्लोकांचा संदर्भ मारुती जन्मतःच सूर्य बिंब हस्तगत करायला झेपावला त्याचा आहे. त्याला त्याच्या पाळण्यातून सूर्य एखाद्या फळाच्या आकाराचा दिसला. पण जेव्हा मारुती आकाशात उंच उंच गेला, तेव्हा त्याला सूर्य बिंबाचा आकार आणि त्याची दाहकता दोन्हीही जाणवले. सूर्य बिंब याला श्रीसमर्थ शून्य मंडळ म्हणतात. ते शून्याकार आहे. तुरीय स्थितीत जो साक्षीभाव असतो त्याला श्रीसमर्थ शून्य स्थिती म्हणतात व साधकाने तीही ओलांडून पुढे जायला हवे म्हणजे भेद पूर्ण संपून, मीपणा संपूर्ण नाहीसा होऊन साधक
परब्रह्माला/स्वस्वरूपाला प्राप्त होतो असे श्रीसमर्थ दासबोधात सांगतात. मारुतीरायांच्या शून्य मंडळ ओलांडून पलीकडे जाणे याला असा अर्थही असू शकेल.  असे मोठे फळ खाणे हे एक रूपक म्हणूनही पहाता येईल.
श्रीसमर्थ म्हणतात की, मारुती विशाल होत गेला. त्याच्या पुढे विराट म्हणजे ब्रह्मांड ठेंगणे दिसू लागले. त्याने ते फळ गिळले आणि टाकूनही दिले. अनुभव घेतला आणि ते जितक्या सहजतेने गिळले तितक्या सहज फेकून दिले.
गिळणे आणि टाकणे हेही प्रतिकात्मक घ्यायला हवे. त्या त्या अवस्थेतील ज्ञान प्राप्त झाल्यावर तिथे अडकून न
पडता अलिप्त होता आले पाहिजे तरच पुढील प्रगती घडू शकेल. त्या फळाच्या आशेने झेपावणे उत्कट बाल
सुलभ उत्कंठा असली तरी त्याची दाहकता समजल्यावर ते फेकून देणे योग्य, हा विवेकही आहे. श्रीसमर्थ म्हणतात, नभात मारुतीचा हा जो खेळ होता तो आगळावेगळा असाच होता. मारुतीचे हे ब्रह्मांडाहून विशाल
होणे हे त्याचे मूळ परब्रह्माशी असलेले नाते दर्शवते.

“धगधगीत बूबुळा । प्रत्यक्ष सूर्यमंडळा ।
कराल काळमूख तो । रिपूकुळांसि दु:ख तो ।। ५ ।।
रूपें कपि अचाट हा । सुवर्ण कट्टचास तो ।
फिरे उदास दास तो । खळास काळ भासतो ।। ६ ।।”

मारुतीच्या कृद्ध स्वरूपात त्याचे डोळे सूर्याप्रमाणे तेजस्वी दाहक असे भासले. त्याचे मुख हे कराल आहे, जणू ते काळाने विनाशासाठी उघडले आहे. रावणादि असूरांना अत्यंत दु:ख देणारे असे हे रूप आहे. त्याना
दंडीत करणारे हे रूप आहे. असूर कितीही बलशाली असोत, संख्येने अधिक असोत त्यांचे निर्दालन होणारच असा सज्जनांसाठी दिलासा आहे. मारुतीने वानर सेनेचे अग्रभागी राहून नेतृत्व केले. वानरांना युद्ध सक्षम बनवले. त्यांच्यात रण आवेश फुंकला. सीतामाईची सुटका, आपणच करायची आहे असा दुर्दम्य आत्मविश्वास
त्यांच्या मनात उत्पन्न करणे हे मारुतीरायांचे मोठे कार्य आहे. श्रीसमर्थांना तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीशी
झुंज घेणारा असा समाज निर्माण करायचा होता. त्यासाठी हे स्तवन महत्वाचे आहे. मारुती शत्रूला धडकी भरवणारा असला तरी त्याची मूळ प्रवृत्ती उदास म्हणजे अनासक्त, विरक्त अशीच आहे. राम कार्यार्थ त्याचा आवेश आहे. पण मारुतीचे नित्य स्वरूप कोणते तर रामाचा दास हेच आहे. भक्तांना त्याचे सौम्य रूपच
अनुभवास येते.

“झळक झळक दामिनी । वितंड काळ कामिनी ।
तयापरी झळाझळी । लुळीत रोमजावळी ।।७।।”

आकाशात तळपणारी वीज लोभस असते पण ती जिथे कोसळते तिथे विद्ध्वंस करते. जाळपोळ करते.
मारुती आकाशात उड्डाण करतात तेव्हा आकाशातील विजेचा प्रकाश अंगावर पडून त्याच्या अंगावरील लव
चमकून उठते असे वर्णन श्रीसमर्थ करीत आहेत. श्रीसमर्थांनी त्यांच्या भावविभोर अवस्थेत हे असे अनेक प्रसंग
प्रत्यक्ष अनुभवले असणार. अतिशय प्रत्ययकारी वर्णन आहे. वितंड काळ कामिनी म्हणजे विजेचा लोळ असे
श्रीसमर्थ म्हणत आहेत. मृत्यूची भयानकता आणि देवतेची लोभसता दोन्ही वर्णन करतात.

“समस्त प्राणनाथ रे । करी जना सनाथ रे ।
अतूळ तूळणा नसे । अतूळ शक्ति वीलसे ।। ८ ।।”

मारुती पवन पुत्र आहेत. वायुरूप आहेत. अखिल विश्वाचा प्राण आहेत. हनुमान हे असामान्य,
अतुलनीय अशा शक्तीने युक्त आहेत. त्यासम तेच. हनुमान ही शक्तीची देवता आहे. भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण
आहे. म्हणून जे बलोपासना करतात त्यांना आणि जे प्रभूश्रीरामांची भक्ती करतात त्या दोघांना मारुतीराय
सहाय्य करतात, त्यांच्यावर आलेली संकटे निवारतात.

“रूपें रसाळ बाळकू । समस्त चित्त चाळकू ।
कपी परंतु ईश्वरू । विशेष लाधला वरू ।। ९ ।।
स्वरूद्र कोपल्यावरी । त्यास कोण सांवरी ।
गुणागळा परोपरी । सतेज रूप ईश्वरी ।। १० ।।”

श्रीसमर्थ या दोन श्लोकात मारुतीचे लोभस बाल रूप आणि त्याचे रुद्रासम रौद्र रूप याचे वर्णन करतात. वानर
असूनही मारुतीला विशेष वर प्राप्त आहे. चिरंजीव रहाण्याचा वर त्यांना प्राप्त आहे. ध्रुव, प्रल्हाद, बिभीषण
आणि अश्वत्थामा हे सारे नरदेहधारी आहेत. मारुतीची अनन्य भक्ती आणि राम काजातील अपूर्व योगदान
यामुळे मारुतीने विशेष वर प्राप्त करून घेतला आहे. मारुतीचे कोपलेल्या रुद्राचे रूप हे कळीकाळाला अनावर
असे आहे, तर त्याचे बाल रूप; दास रूप मोठे लोभसवाणे आहे. ईश्वरी तेजस्वी रूप लाभले आहे.

“समर्थदास हा भला । कपीकुळांत शोभला ।
सुरारिकाळ क्षोभला । त्रिकूट जिंकिला भला ।। ११ ।।”

हनुमान अतिशय ज्ञानी आहे, रामाचा दास झाल्यामुळे वानर कुळाला अभिमान वाटावा असा आहे.
देवांच्या शत्रूंवर मात्र काळ होऊन तुटून पडणाऱ्या मारुतीने लंकेवर विजय मिळवला.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
संदर्भ – सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे, डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे

Language