भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायातील पुरुषोत्तम आणि श्रीसमर्थांचा उत्तमपुरुष

भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायातील पुरुषोत्तम आणि श्रीसमर्थांचा उत्तमपुरुष
डॉ. सौ. साधना गोखले
  • July 5, 2025
  • 1 min read

गीता सुगीता कर्तव्या किमन्यै: शास्त्रविस्तरै: ‌|

या स्वयं पद्मनाभस्य मुख्यपद्मादि्वनि:सृता |‌| ४‌ ||

पुण्यपावनी भगवद्गीतेची महानता यथार्थतेने व्यक्त करणारा हा श्लोक आहे. भगवद्गीता हे वेदांचं सार. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून हे सार बाहेर पडलेलं आहे. त्यातही पंधरावा अध्याय हे “गुह्यतम्” शास्त्र असल्याची ग्वाही भगवंत स्वत:च देत आहेत. हे जाणणारा बुध्दिमंत “कृतार्थ, कृतकृत्य” व्हावा ही अपेक्षाही व्यक्त झाली आहे. हा पंधरावा अध्याय “पुरुषोत्तम योगा”चा आहे.

“पुरुषोत्तम योग” हा अत्यंत व्यापक विचार आहे. “पुरुषोत्तम” म्हणजे सच्चिदानंदरुप, सर्वव्यापक, अनादि, अनंत, शाश्वत परमतत्व/परब्रम्ह/सद्वस्तू. “योग” म्हणजे जोडणे. मीलन, एकरुपत्व. (युज् – युज्यते = जोडला जाणे). म्हणून “पुरुषोत्तम योग” म्हणजे त्या परब्रम्हाशी मीलन, जीव-शिव ऐक्य, एकरुपता ! जीव हा मुळात शिवरूपच आहे, पण अज्ञानाचे आवरण आल्याने तो “स्वरुप” विसरला आहे. हया स्वरुपाची जाण होण्यासाठी कोणता मार्ग अनुसरला पाहिजे हे “रहस्य” भगवंतांनी विशद केले आहे, म्हणून हे रहस्य जाणून घ्यायला हवेच.

“ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।

छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ।। १५-१ ।।”

पहिल्या तीन श्लोकांत संसारवृक्षाचे सुंदर रुपक मांडून, जन्ममृत्यूच्या चक्रात जीव कसा गुरफटतो तो विचार सांगितला आहे. हया दृश्य विश्वरुप अश्वत्थ वृक्षाचे मूळ वर (दृश्याच्या पल्याड) अन् फांद्या खाली पसरलेल्या आहेत. रसमय वेद ही त्याची पाने अन् त्रिगुणात्मक विषयरुप ही त्याची कोवळी पालवी ! हया संसाररुप अश्वत्थाच्या रमणीयतेला भुललेले जीव तेथेच रममाण होतात आणि आपल्या कर्मांनी कर्मबंधनात पुन्हा पुन्हा अडकत जातात. ज्यांना ह्यातून स्वत:ची सुटका करुन घ्यायची आहे, मुक्त व्हायचं आहे त्यांना भगवंतांनी सुटकेचा उपायही सांगितला आहे. “असंगरुप शस्त्राने दृढतापूर्वक हा वृक्ष तोडून टाका!” 

असंगता (निरासक्तता) :- संग दोन प्रकारचा असतो. (१) बाहेरचा, (२) आतला. सारे जीव पंचज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने शब्द, स्पर्श, रुप, रस गंधादिंचे सेवन करीत असतात. सर्व जीवांची ओढ सुखाकडे असते. जोपर्यंत देहबुध्दी आहे तोपर्यंत हया बाहयसुखांना तो खरी सुखे मानतो व त्यातच रममाण होतो. पण परमभाग्याने सदगुरुंची भेट झाली तर हया साऱ्या सुखांचे क्षणिकत्व त्याला समजते. त्याचे देहभान गुरुंनी दिलेल्या ज्ञानाने संपते व आत्मभान जागे होते आणि “अर्थ व कामा”तच गढलेला तो बाहयसंग सोडून अंतर्मुख होतो.

बाहयसंगाप्रमाणेच जीवाला बांधून ठेवणारा आतला संग असतो आसक्तींचा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्ररिपू सारखे त्याच्या अंत:करणावर आघात करत  रहातात. “रात्रंदिन हा युध्दाचा प्रसंग” चालूच असतो. विविध ईषणा त्याच्या चित्ताचा ताबा घेत असतात. वित्तेषणा, कामेषणा… कनक, कांता व कीर्ती, हया “क”कारांच्या संगाच्या मगरमिठीमधून सुटका होते, तीही गुरुपदेशातूनच. बाहय अंत:संगातून मुक्त झालेला जीव मग नि:संग होतो, निर्मोही होतो. त्याच्या साऱ्या कामभावना निवृत्त होतात. त्याचे अंत:करण निर्मळ बनते व ते आत्मतत्वाला सन्मुख होते.

निर्द्वंद्वत्व :- जीवाचं ओढाळ मन सतत इंद्रियसुखांकडे त्याला खेचत रहातं. त्यामुळे अनुकूल संवेदनेने ते सुखावतं अन् प्रतिकूल संवेदनेने ते दुखावतं. सुख-दु:ख, आशा-निराशा, मान-अपमान, लाभ-हानी, जय-पराजय हया परस्परविरोधी भावनांच्या हिंदोळयावर हिंदोळत रहातं. हया द्वंद्वातून मुक्त होण्यासाठी चित्ताला स्थिर करणारी बुध्दी, व्यावसायात्मिका बुध्दी, ऋतंभरा प्रज्ञा वाढीस लावावी लागते. येथेही सद्गुरुंनी दाखविलेली भक्तीची शक्तीच उपयोगी पडते. कर्माला भक्तीची जोड देऊन समर्पणवृत्तीने प्रज्ञा “स्थिर”, “प्रतिष्ठित” केली की इंद्रियांची धाव संपते, भावनांचे आंदोलन थंडावते व वृत्तीला स्थिरता येते. सद्गुरुकृपेने अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो. ज्ञानचक्षू उन्मिलीत होतात.

“अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांञ्जजनशलाकया |

चक्षुरुन्मीलितं येनतस्मै श्रीगुरवे नम: ||”

सद्गुरुकृपेने कर्माला भक्तीची, उपासनेची जोड मिळाली की त्या भक्तियुक्त कर्मातूनच आत्मज्ञान प्राप्त हाते. 

“आधी तें करावें कर्म | कर्मामार्गें उपासना |

उपासकां सांपडे ज्ञान | ज्ञानें मोक्षचि पावणें  ||”

असा ज्ञानी उपासक ज्या “अव्ययपदाकडे” जाऊ पाहतो त्या अव्ययपदाचे वर्णन भगवंतांनी खालील श्लोकातून प्रत्ययकारकतेने वर्णिले आहे.

“न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः ।

यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।। १५-६ ।।”

ज्ञानी भक्ताला जी अनुभूती येते ती भगवंतांनी पुढे विशद केली आहे. 

“सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।

वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५-१५ ॥”

“जें जें भेटिजे भूत | तें तें मानिजे भगवंत” हाच भगवंतांच्या सांगण्याचा भावार्थ ! असा “विश्वात्मक देव” पाहणारा ज्ञानी भक्त क्षर व अक्षर यांना यथार्थतेने जाणतो.

“द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च |

क्षर: सर्वाणि भूतानि कूटस्थोsक्षर उच्यते || १५-१६ ||”

भगवान स्पष्ट करतात की, या जगात दोन प्रकारचे पुरुष आहेत. नाशवंत (क्षर) व अविनाशी (अक्षर). सर्व नाशवंत जगत् म्हणजे क्षर आणि नाशवंत देहातील जीवात्मे हे अक्षर होत. हया क्षर-अक्षराच्या पलीकडे आहे तो उत्तम पुरुष अर्थात् “पुरुषोत्तम”! अनादी, अनंत, अविनाशी, शाश्वत, सच्चिदानंदरुप पुरुषोत्तम!

असंगत्व निर्द्वंद्वत्व प्राप्त केलेला असा ज्ञानी भक्तच जीवनाचे कर्म पार पाडतच “पुरुषोत्तमाशी” “योग” साधतो, एकरुप होतो. हया एकरुपत्वामुळे ‘पुरुषोत्तमाचे दिव्यत्व’ त्याच्यात संक्रमित होते. तो स्वत:च पुरुषोत्तम होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “देव पहाया गेलो | तो देवचि होऊनि ठेलो ||”

भगवदगीतेतला पुरुषोत्तम सर्वव्यापक आहे, सत्‍चिदानंदरुप; अविनाशी; अनादी; अनंत आहे. तो दृश्य विश्वाच्या पलीकडे आहे. तो निर्गुण निराकारी आहे. तो दृश्य विश्वाचा उत्पत्तीकर्ता, स्थितीकर्ता व लयकर्ताही आहे. तो चक्षुगोचर नाही. चर्मचक्षूंना दिसत नाही. त्याला पाहण्यासाठी ज्ञानचक्षूंचीच गरज असते.

पुरुषोत्तमातील दिव्यत्व प्राप्त केलेला समर्थांचा उत्तमपुरुष मात्र चक्षुगोचर आहे. तो भूलोकावरच राहतो. सर्वांमधलाच एक असतो. सर्व पुरुषांतलाच एक असतो. पण आपल्यातल्या गुणांनी तो “उत्तम पुरुष” म्हणून मान्यता पावलेला असतो.

थोडक्यात सांगायचे तर, विश्वव्यापक ईश्वराचे – परब्रम्हाचे निर्गुण निराकार रुप म्हणजे “पुरुषोत्तम”, तर त्याचे सगुण साकार मानवी रुप म्हणजे “उत्तम पुरुष”. विश्वातील कोणत्याही पुरुषाला “उत्तम पुरुष” होणे शक्य आहे. ते कष्टसाध्य जरुर आहे, पण असाध्य मात्र नाही. पुरुषाचा “उत्तम पुरुष” कसा होऊ शकतो हयाचे प्रत्ययकारी वर्णन श्रीसमर्थांनी दासबोधात केले आहे.

“पुनरपि जननं पुनरपि मरणं” हया जन्ममरणाच्या अखंड चक्रात जीव गरगरत असतो. अशा चक्रगतीत नरदेहप्राप्ती हा अद्भूत टप्पा आहे. नरदेहप्राप्ती दुर्लभ खरीच, पण या नरदेहात आल्यावर जीवापुढे दोन वाटा असतात. १) ईशमार्ग व २) असुरमार्ग. ईश मार्गाने गेल्यास तो नराचा “नारायण” होतो. पण दुसऱ्या मार्गाने गेल्यास तो नराचा “नराधम” होतो. कोणत्या मार्गाने जायचे याचे संपूर्ण स्वातंत्र्य नराला आहे. जो ईशमार्गाने जातो तो उत्तम पुरुष होय. उत्तम पुरुषात पुरुषोत्तमाचे सर्व गुण दिसून येतात.

Language