अलिप्तपण

अलिप्तपण
सौ. मानसी याडकीकर
  • September 14, 2025
  • 1 min read

अलिप्तपण म्हणजे संगात राहूनही निर्विकार असणे. अलिप्तपण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पाण्यातील कमलपत्र येते. जे पाण्यात राहूनही भिजत नाही. आपल्या मूळ स्थितीत तसेच राहते. लिप धातूपासून लिप्त शब्द बनलेला आहे. लिप म्हणजे दूषित करणे, व्यापणे, माखणे. लिप्त म्हणजे माखलेला, बरबटलेला. आणि अ + लिप्त = अलिप्त म्हणजे कशाचाही संसर्ग न झालेला. जन्माला आल्यापासून मनुष्य काही ना काही कर्म करीत असतो. या कर्मा मागची प्रेरणा मन असते. शरीराला केवळ भौतिक सुखे हवी असतात. त्यासाठी मन विषयांकडे सैरभैर धावते. जशी वासना असेल त्याप्रमाणे मनुष्याला व्यक्ती, वस्तू व पदार्थ हवेहवेसे वाटू लागतात. त्यांच्यापासून सुख मिळते या भ्रमाने त्यांच्याबद्दल आसक्ती निर्माण होते. ही आसक्तीच सर्व दुःखाचे मूळ आहे. आसक्तीने लिप्त झाल्यामुळे जीव, व्यक्ती; वस्तूच्या ममत्वाच्या बंधनात अडकतो व दुःख भोगतो. वास्तविक आपले मूळ स्वरूप शुद्ध,पवित्र व आनंदरूप आहे परंतु अज्ञानामुळे मनुष्य हे विसरून मायेच्या पसाऱ्यात गुरफटून जातो व वासनांनी दूषित होतो. यावर उपाय सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात –

ना तरी ते नाना रसी । रिघोनी दर्वी जैसी ।

परी रस स्वादासी । चाखून येणे ।। ज्ञा. १६-२४८ ।।

ज्याप्रमाणे स्वयंपाकघरातील पळी ही प्रत्येक रसात जाते. उदा. कढी, आमटी, श्रीखंड, आमरस, खीर. पण ती कशाचाच स्वाद घेत नाही. ती सर्व रसांपासून अलिप्त असते. त्याप्रमाणे कुठल्याही चांगल्या किंवा वाईट कर्माचे कर्तेपण स्वतःकडे घेऊ नये. सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून कर्म व फळांचा संग सोडला की अलिप्तपणाची स्थिती प्राप्त होते. म्हणूनच श्रीसमर्थ रामरायाजवळ ‘अलिप्तपण मज देरे राम’ असे मागणे मागतात.

ऐहीक जीवनात आपली कर्तव्यकर्मे अलिप्तपणे करून काया, वाचा व मनाने ईश्वरभक्ती करता येते हे संत सावतामाळी यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले आहे. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची धारणा होती. ते कधीही ‘मी कर्ता’ या कर्तुत्व भावनेत अडकले नाहीत.

“न लगे सायास न पडे संकट । नामे सोपी वाट, वैकुंठाची ।।”  असा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव होता. कर्माद्वारेच त्यांनी मोक्ष प्राप्त केला. यावरून हेच सिद्ध होते की अलिप्तपण म्हणजे कर्माचा त्याग नसून त्यामागचा ‘मी कर्ता’ हा अहंकार बाधक असतो. ‘मी करून अकर्ता’  ही भावना जर दृढ असेल तर निंदा-स्तुती, मद-मत्सर इत्यादी विकारांनी मन दूषित होत नाही. प.पू. गोंदवलेकर महाराज अलिप्तपणा कसा राखावा याची सोपी युक्ती सांगताना म्हणतात… 

“नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।

हाची सुबोध गुरुचा भोगा संगे कुठे न गुंतावे ।”

परक्या घरी एखादा पाहुणा आला. तेथे वावरत असताना तेथील सर्व व्यवहार जरी त्याला दिसत असले, तरी आपण वेगळे आहोत या जाणिवेमुळे तो कशातही गुंतून न राहता मोकळ्या वृत्तीने आनंदात राहतो, तसे आपण संसारात निर्लेपवृत्तीने राहिले पाहिजे. शरीर म्हणजे ‘मी’ नाही हा निश्चय एकदा पक्का झाला की, शरीराबद्दल असलेले ममत्त्व संपते. ज्ञानी पुरुषाला शरीर मिथ्यापणाने भासते. म्हणून त्याचे विकार त्यास यत्किंचित बाधत नाहीत. उदा. रामकृष्ण परमहंस यांना कर्करोग झाला होता. त्यांनी त्या व्याधीची पर्वा केली नाही. उलट ‘देहे दुःख ते सुख मानित जावे’ हा भाव ठेवून ते दुःख त्यांनी शांतपणे सहन केले. संत, सज्जन जरी जगात इतरांसारखे वावरत असले तरी त्यांची अंतरस्थिती फार वेगळी असते. त्यांच्या देहाला कष्ट, व्याधी किंवा दुःख झाले तरी त्यांना त्याची तमा नसते. ते आपल्या स्वानंदामध्ये मग्न असतात कारण त्यांना अलिप्तपणाची कला साधलेली असते.

संगत्याग म्हणजेच अलिप्तपण साधले की मन एका भगवंता वाचून कोणालाही चिकटत नाही. सगळ्या बंधनातून जीव मुक्त होतो व सर्वत्र समत्वाने लिप्त असलेल्या परब्रम्हाशी एकरूप होतो. म्हणून संगत्याग व अलिप्तपण एकच होय असे श्रीसमर्थ म्हणतात. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language