आजच्या काळातही समर्थ विचारांची आवश्यकता

आजच्या काळातही समर्थ विचारांची आवश्यकता
श्रीमती. सीमाताई रिसबूड
  • February 6, 2026
  • 1 min read

वैदिक परंपरा, संत विचार, संत चरित्र, रामायण, महाभारत व भागवतासारखे ग्रंथ कधीच कालबाह्य होत नाहीत. बदलत्या काळातले प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी, आव्हाने पेलण्यासाठी ते साहित्य शक्ती पुरवतात, मार्ग दाखवतात. समर्थ रामदासांचा दासबोध, आत्माराम व मनोबोध हे ग्रंथ काळाची ही गरज पुरवतात.

समर्थांच्या काळात परकीय सत्ता, आक्रमण, विखुरलेला समाज होता. आजही कलियुग आहे. जग जवळ आले आहे पण मने दुरावलेली आहेत. अधर्म, धर्मकार्यात अडचणी आणत आहे. असत्य, सत्याचा बुरखा पांघरून सत्याचा पराभव करत आहे. भ्रष्टाचार, शिष्टाचार झाला आहे. व्यसनाधीनता, महागाई, बेफिकीर वृत्ती, बेशिस्त, विषय वासना, तृप्तीची धडपड वाढत आहे. परकीय आक्रमणे, फंदफितुरी, देशातील स्वकीयांकडून होणाऱ्या देशविघातक कृती अशांती पसरवत आहेत. दूरदर्शन सारखे माध्यम सकारात्मक विचार वाढवण्याऐवजी, विषयवासना, स्वार्थ, ढोंगीपणा वाढवत आहेत. सात्विक अन्नाचा विचार फास्टफुड मुळे लोप पावत आहे. अर्थ, काम, धर्म व मोक्ष यांची चौकट मोडून स्वैराचाराकडे वळत आहे. जाती-जातीतील तेढ, लोकनेते स्वार्थासाठी वाढवत आहेत. “कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी” हे समर्थ वचन आजही प्रकर्षाने आठवत आहे.

समर्थांनी दुर्लभ शरीर, दुर्लभ आयुष्य याची महती सांगितली. “या शरीरासारखे यंत्र आणिक नाही” म्हणून बलोपासना, सात्विक आहार, विहार, चांगल्या सवयी, आजही महत्त्वाच्या आहेत. आयुष्याचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे याची जाणीव महत्त्वाची आहे. जेव्हा शरीरात शक्ती असते, तेव्हा ग्रंथ अभ्यास; उपासना; पाठांतर; ध्यानाची सवय महत्त्वाची असते नाहीतर, ‘नंतर करेन’ या सवयीने पश्चात्ताप होतो. 

व्यवसाय व संसारात अलिप्तपण व अनासक्त वृत्ती महत्त्वाची असे समर्थ म्हणतात. २० दशक व २०० समासाच्या दासबोधाच्या लेखनाचे श्रेय समर्थ घेत नाहीत. मठ करून एके ठिकाणी ते राहिले नाहीत. संसारात व व्यवसायात निवृत्तीचा शांत मनाने स्वीकार करून, आपण वाचन; लेखन; उपासना; ध्यान; अभ्यास; लोकोपयोगी एखादे काम यात वेळ घालवला, तर निवृत्तीनंतरचे जीवन आनंदात जाते. निवृत्ती स्वेच्छेने स्वीकारली तर ताण-तणाव वाढत नाही.

शरीराबरोबरच मनाच्या मशागतीचा विचार समर्थ मनाचे श्लोकांमधून मांडतात. सदाचाराचे नैतिक जीवन, शांती व समाधान देते. देहसुखाच्या मर्यादा ओळखून देहबुद्धीच्या पायावरचे जीवन अपूर्ण, दुःखव्याप्त आहे. भगवंताच्या स्मरणात अखंड कार्य केल्यामुळे निर्भयता व सुरक्षितपणा वाढतो. आजचे जीवन धकाधकीचे, आव्हानाचे आहे. या स्थितीत बाहेर पडताना भगवंत माझ्याजवळ आहे, तो रक्षण करतो हा स्थिर भाव आत्मविश्वास वाढवतो. मन, संकल्प-विकल्प; भीती; स्पर्धा; ईर्ष्या; द्वेष यांनी अशांत होते. एखाद्या ईश्वरी शक्तीच्या, संतांच्या, देवाच्या ठिकाणी मन स्थिर ठेवले तर ते एकाग्र होते. विवेक-वैराग्याने मनाची हाव, धडपड शांत होते, वृत्ती स्थिर होते. सर्व ठिकाणी एकच आत्मचैतन्य आहे या भावनेने मानवी मन विश्व मनाचा विचार करते व माणूस स्वतःशी व इतरांशी सुखसंवाद करण्याच्या प्रयत्नात रहातो.

दासबोधाच्या अभ्यासाने शाश्वताचा मार्ग स्वीकारला जातो. नित्य-अनित्याचा विचार दृढ होतो. देहाला, बालपण; तारुण्य; वृद्धपण आहे. तो पंचभौतिक आहे, त्याला मृत्यू आहे या सत्याचे भान रहाते. देह साधन म्हणून वापरावयाचा आहे. आपले जीवन, पृथ्वी; आप; तेज; वायू; आकाशाशी निगडित आहे. त्यामुळे निसर्गात समतोल आहे. आपल्या देहाला पंचभौतिक शक्तीची देणगी ईश्वराने दिली आहे. तेव्हा मी, माझा देह व निसर्ग याचा सखोल विचार आपण दासबोधामुळे करतो. मुक्त अवस्था व मृत्यू याबद्दलचे गैरसमज व भीती नष्ट होते. व्यवस्थापनाचे अमूल्य असे भरपूर विचार दासबोधात आढळतात. व्यक्ती म्हणून आपला सर्वांगीण विकास दासबोधातून साधता येतो. विवेक, विचार सावधानता, एकाग्रता, एकांताची आवड कशी जोपासावी हे दासबोधातून कळते. प्रपंच-परमार्थ, व्यक्तिगत जीवन, सामूहिक जीवन, कुटुंब व व्यावसायिक क्षेत्र या दोन्ही क्षेत्रात समतोल राखायला मदत होते. अखंड चाळणा हा समर्थांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. त्यांच्या जीवनात असहायता, निराशा, थकवा, अगतिकता यांना थारा नव्हता. निरंतर ध्यास, उत्कट ध्येय, मनन, चिंतन, निरीक्षण, परीक्षण, प्रचिती, प्रबोध व तेजस्वी वाणी हे त्यांचे गुण आपल्याला आत्मसात करता येतात. दासबोधात धर्म, उपासना, पिंड व ब्रह्मांडाचे रहस्य, व्यवहार, समाजशास्त्र, मानसशास्त्र याचे एकत्र रसायन सापडते. व्यक्ति बरोबरच समाजाचे कल्याण, समाजाची बांधिलकी, समाजाविषयी प्रेम हे विचारही आपल्याला कळतात. समर्थांचे विचार हे ब्रह्मांडाला गवसणी घालण्याइतके व्यापक आहेत. 

“आपल्या पुरुषार्थ वैभवें | बहुतांस सुखी करावें |”

हा विचार आजच्या जागतिक अशांतीच्या परिस्थितीत महत्त्वाचा आहे. आजच्या काळात आपण युद्धामुळे होणारी मनुष्यहानी, स्त्रिया व मुलांचे उध्वस्त जीवन, कष्टाने उभ्या केलेल्या इमारती नष्ट होणे हा संहार; विश्वव्यापक उपासनेने टाळता येऊ शकतो. “पृथ्वीमध्ये जितुके शरीरे | तितुकी भगवंताची घरे” हा विचार फक्त भारतात रुजू शकतो व इतरांना तो देता येतो.

समर्थ विचार Specific व Time Bound आहेत. आत्मकल्याण हे ध्येय व त्यासाठी प्रयत्न व त्याचे मूल्यमापन आपणच करायचे आहे. समर्थ विचारांच्या श्रवणाने आपल्यात बदल व्हावा. “जगदीश्वरे अनुक्रमे | सकळ केले |” हे आश्वासन समर्थ देतात. त्यात कर्तुत्वाचा हुंकार, भक्तीचा आग्रह, उपासनेचे सातत्य आहे कारण समर्थांचे जीवन तेजोमय, सूर्य बिंबासारखे निर्मळ व प्रेरक, जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर करणारे आहे.

“देश काळ वर्तमान | हा तो अवघाचि अनुमान ||१||

भक्ति करावी देवाची | घडी जाते सोनयाचि || धृ ||

काळ वेळचि पाहतो | सदा सन्निध राहातो ||२||

रामी रामदास म्हणे | देह आहे जाईजणें ||३||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language