समर्थांचा भक्ती मार्ग

समर्थांचा भक्ती मार्ग
श्री. अनिल वाकणकर
  • February 22, 2026
  • 1 min read

समर्थांनी आपल्या सर्वच वाङ्मयात भक्तीला प्राधान्य दिले आहे. दासबोधाच्या फळश्रृतीमध्ये ते म्हणतात, “भक्तीचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । इये ग्रंथीं ।।” मनुष्यजन्माचे ध्येय जन्ममरणाच्या चक्रातुन मुक्ती मिळविणे हे आहे. अनेक जन्मांची पुण्याई खर्च झाल्यावर हा मनुष्य देह मिळाला आहे. समर्थ म्हणतात, “नाना सुकृताचें फळ । तो हा नरदेह केवळ । त्याहि मधें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ।।२-४-१।।” असा हा पूर्वपुण्याईने मिळालेला देह सार्थकी लावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. “देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जालें । नाहीं तरी हें वेर्थचि गेलें । नाना आघातें मृत्यपंथें ।।१-१०-६१।।” त्याचे सार्थक करण्याकरीता निव्वळ प्रपंचाच्या, वासनापूर्तीच्या मागे न लागता काही परमार्थ केला तरच मुक्ती हे ध्येय गाठणे शक्य आहे. मुक्ती मिळविण्याकरीता आत्मज्ञान होणे गरजेचे असते. ते मिळविण्याकरीता मुख्य तीन मार्ग आहेत, भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग आणि योग मार्ग. हे तीनही मार्ग आपापल्या परीने श्रेष्ठच आहेत.

यातील भक्तीमार्ग हा सर्वांत सोपा असा मार्ग आहे. ज्ञानमार्गामध्ये बुद्धीचातुर्य आवश्यक असते. तर योगमार्गामध्ये शरिराला कष्ट द्यावे लागतात. भक्तीमार्गाला भोळाभाबडा भाव लागतो. भाव हीच भक्तीमधली अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. अशा या भक्तीमार्गाचे मर्म समजून घेण्यासाठी सर्व प्रथम भक्ती म्हणजे काय ते समजुन घेतले पाहिजे. भक्ती हा शब्द तीन प्रकारांनी सिद्ध होते. १) भजन भक्ती २) भागो भक्ती ३) भंजन: भक्तिः। 

भजनं भक्ती म्हणजे भजन करणे, रस घेणे. भागो भक्ती: मधील भाग म्हणजे अंश. जीव हा ईश्वराचा अंश आहे. मी ज‌गाचा नसून भगवंताचा आहे अशी खरी जाणीव निर्माण होणे, याचे नाव भक्ती. तीसरा अर्थ मंजनं भक्ती: म्हणजे, भगवंताच्या चरणी आपल्या अहंचा बळी देणे. भगवंताची सेवा करणे. त्याचाच आश्रय घेणे. अशा अर्थानेही भक्ती शब्द सिध्द होतो. भक्तीमध्ये प्रेम आहे. कारण भगवंताची आवड उत्पन्न झाल्यावर तो भगवंताचे पुन: पुन: चिंतन करतो. भक्तीमध्ये ज्ञान आहे, कारण मी त्याचा आहे हे ज्ञान झाल्यावाचून जीव भगवंताच्या नादी लागत नाही. 

भक्तीमध्ये कर्म आहे कारण, भगवंतासाठी काही केल्यावाचून जीवाला चैन पडत नाही. भगवंताचे चिंतन करता करता जीव ध्यान साधतो, म्हणून भक्तीमध्ये योग देखील आहे म्हणून समर्थ आपल्याला, “भक्तीचेन योगें देव । निश्चयें पावती मानव ।” असे दासबोधात सांगतात. तसेच मनाच्या श्लोकांमध्ये ते म्हणतात, “मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।” भागवत ग्रंथात कपिल मुनी आपली माता देवहुतीला भक्तीयोग सांगताना म्हणतात, आपली जी इंद्रिये, स्पर्श, दर्शन, गुणांचा अनुभव घेतात त्या इंद्रियांचे खरे कार्य म्हणजे, परमात्म्याची सेवा, भक्ती ज्यामुळे होईल अशी कृत्ये करणे हेच होय. हीच मुख्य कृत्ये इंद्रियांकडून केली गेली म्हणजे विशेष प्रयत्न न करता परमात्म्यावर भक्ती जडते. अशी निरपेक्ष भक्तीच लिंगदेह नष्ट करते.


विसृज्य सर्वान्यान्श्च मामेवं विश्वतोमुखम् ।

भजनत्यन्याया भक्त्या तान्मृत्योर्तिपराये ।। श्रीमद्भागवत ३/२५/४० ।।

ते म्हणतात, “माते ! जे भक्त धन, पशु, घर, अन्य पदार्थ किंवा अन्य संग्रहित वस्तू यांना सोडून अनन्य भक्तीने माझेच भजन करतात, त्यांना मी या संसार सागरातून पार नेतो.” समर्थ देखील या समासात सांगतात, “व्हावया ज्ञानाची प्राप्ती । आधीं केली पाहिजे भक्ति । भक्ती घडलिया मुक्ती । पाठी लागे ।।पंचसमासी ४-२।।” ज्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याने भगवंताला अथवा सद्गुरूंना अनन्यभावाने शरण जावे. भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, “अनन्याश्चिन्तयन्तो मां” किंवा “न मे भक्तः प्रणश्यति” अनन्य भक्तीने भगवंत प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला आपल्या हृदयात धारण करतात. आत्मज्ञान झाले, जीवशिवाची भेट झाली की; वासना शिल्लकच रहात नाहीत; मग परत परत जन्माला येण्याचे कारणच उरत नाही. वासनांच्या जाळ्यात फसलेला जीव भक्तीयोगाने मुक्त झाला.

संत एकनाथ महाराज म्हणतात, “भावें करितां भगवद्‌भक्ती । भक्त मुक्तीही न वंछिती । तरी त्यांपाशी चारी मुक्ती । दास्य करिती सर्वदा ।। एकनाथी भागवत २-६२३।।” भावपूर्ण भक्ती करणारा जरी मुक्तीची इच्छा धरीत नसला तरी चारही मुक्ती त्याच्या दास होतात. तुकाराम महाराज अभंगगाथेमध्ये म्हणतात, “करा हरिभक्ती परलोकीं ये कामा । सोडवील यमापासोनियां ।।३९००।। भोळे भक्तीभाव धरिती मानसीं । त्यासी हृषीकेशी जवळी च ।।४०२९।। भक्तीवीण जिणें जळो लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखमूळ ।।४४२०।।”

नामदेव महाराज भक्तीच्या संदर्भात त्यांच्या ‘उपदेश’ या प्रकरणात म्हणतात, “न धरावी चाड मानसन्मानाची । आवडी भक्तीची रूढवावी ।। अंतींचा लाभ आधींच साधिजे । देह असतां कीजे हरिभक्ती ।। भक्तीविणें जिणें जळों लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखरूप ।। भक्तीविण मोक्ष नव्हे हा सिद्धांत । वेद बोले हात उभारोनि ।।” 

अशा या भक्तीमार्गामध्ये सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती असे परत दोन प्रकार आहेत. यातील सगुण भक्ती ही सर्वसामान्य साधकांसाठी सोपी भक्ती आहे. येथे भक्त आणि भगवंत हे वेगळे असतात. त्यामुळे परमेश्वराची अर्चना करणे, नामस्मरण करणे हे शक्य होते. निर्गुण भक्ती मध्ये भक्त आणि भगवंत हे एकरूप असतात. त्यामुळे त्यात थोडी रूक्षता येते.  अशा या भक्तीमार्गाने जाण्यासाठी नवविधा भक्तीरूप एक नऊ पायऱ्यांचा सोपान सांगितला आहे. भक्त प्रल्हादाने आपल्या पित्याला भक्तिचे महत्व पटवुन देताना सांगितले होते, 

 

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्  ।।

इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा । क्रियेत भगवत्यद्धा तन्मन्येऽधीतमुत्तमम् ।। श्रीमद्भागवत ७-५-२३,२४।।”

पंचसमासीमध्ये समर्थ म्हणतात, “मोक्षभुवन अतिसुंदर । आनंदरूप मनोहर । तेथें जावयाचा विचार । ऐक बापा ।। तेथें नऊ पायर्‍या उत्तम । ऐक पायरी प्रथम । जे चढतां तुटे भ्रम । निःशेष जीवांचा ।। पंचसमासी समास ४-३,४।।” मोक्षभवन अतिसुंदर असून आनंदरुप मनोहर असल्याचा आपला अनुभव समर्थांनी सांगितला आहे. त्या ठिकाणी जाण्याकरीता नऊ पायऱ्यांचा सोपान आहे. यातील प्रत्येक पायरी महत्वाची आहे. साधक किंवा भक्त एक एक पायरी चढत चढत आत्मनिवेदन या अंतीम पायरीवर पोचतो. अंतीम पायरीवरून तो थेट आनंदरूप असणाऱ्या अतिसुंदर असणाऱ्या मोक्षभुवनात प्रवेश करतो. भागवतात भगवंत म्हणतात, “आध्यात्मिकानुश्रवणात् नामसङ्कीर्तनाच्च मे । आर्जवेनार्यसङ्गेन निरहङ्क्रियया तथा ।। भागवत ३/२९/१८।।” या भक्ती नऊ प्रकारच्या आहेत. १) श्रवण, २) कीर्तन, ३) नामस्मरण, ४) पादसेवन ५) अर्चन, ६) वंदन, ७) दास्य, ८) सख्य, ९) आत्मनिवेदन. या पायऱ्यांवरून चढत चढत मुक्तीभुवनात पोहोचता येते किंवा प्रत्येक पायरी किंवा भक्तीच्या कोणत्याही एका प्रकाराने देखील मुक्ती मिळू शकते. अशा या नविविधा भक्तीमार्गाचा विचार आपण दुसऱ्या लेखात करूया. 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language