श्रीसमर्थकृत सुंदरकांड – पूर्वार्ध

श्रीसमर्थकृत सुंदरकांड – पूर्वार्ध
मोहिनी खोत
  • February 15, 2026
  • 1 min read

महाराष्ट्राच्या संतभूमीत अवतार धारण केलेला एक अमूल्य हिरा म्हणजे समर्थ रामदासस्वामी होय. त्यांनी टाकळी येथील पुरश्चरण काळात वाल्मिकी रामायणाची हस्तलिखीत प्रत तयार केली. त्याबरोबर स्वतंत्र प्रतिभेने सुंदरकांड व युद्धकांड लिहिले.

वाल्मिकी रामायणातील सुंदरकांड कामधेनूच्या दुधाप्रमाणे मधुर आहे. तुलसीदासांनी त्यात साखर घातली. तर समर्थांच्या सुंदरकांडाने केशराचे काम केले. त्रिकुटाचलावरील तीन शिखरांपैकी सुंदर शिखरावर अशोकवाटिका आहे. येथेच हे चरित्र घडले म्हणून सुंदरकांड असे नाव पडले.

“सुंदरे सुंदरी सीता । सुंदरे सुंदर कपि ।”

सुंदरकांडात सारेच सुंदर आहे. सीता शुद्धि (शोध) ही हनुमंताची खास कामगिरी यात वर्णिली आहे. मारूतीचे वाक्चातुर्य, नम्रता, कर्तव्यनिष्ठा, तल्लख बुद्धिमत्ता, वेदशास्त्र पारंगतता, दास्यभक्ति या कशालाच तोड नाही. अशा या हनुमंताच्या पराक्रमाचे वर्णन करणारे हे सुंदरकांड वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्रीसमर्थांच्या या सुंदरकांडात हनुमंताच्या लीलांचे वर्णन आहे. श्रीरामप्रभूंची लीला तर श्रेष्ठ आहेच पण त्यांच्या या दासाची लीलाही सुरस आहे, म्हणून या काव्याला सुंदरकांड नाव दिले आहे. आपल्या भक्ताचा, दासाचा अचाट पराक्रम श्रीरामाला सुंदर वाटतो, प्रसन्नता प्रदान करतो. ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ अशा या रामदूताची थोरवी एक रामदास वर्णन करतो आहे ही कल्पनाच अति हृदयंगम आहे.

सुंदरकांडाच्या १०१ ओव्या आहेत. प्रथम ओवीत मंगलाचरण आहे – ‘नमू सर्व कर्ताचि तो विश्वभर्ता‌’ संपूर्ण विश्वाचे भरणपोषण करणाऱ्या परमेश्वराला नमन केले आहे. सीता शोधासाठी श्रीराम किष्किंधा नगराजवळ आले. ऋष्यमुक पर्वतावर सुग्रीवाने हनुमंताला हे दोन वीर कोण आहेत ? ते बघून ये असे सांगितले. बटूवेषात हनुमंत श्रीरामासमोर येऊन अत्यंत नम्रतेने आपण कोण ? कोठून आलात ? अशी विचारणा करतो. सुग्रीवाचा मी सचिव अशी ओळख देऊन सगळी कथा सांगतो. श्रीराम हनुमंताला ओळखून तो विद्वान आहे असे लक्ष्मणाला सांगतात. हनुमंत रूद्राचा अवतार व श्रीसमर्थ हनुमंताचा अवतार. दोघेही रामाचे दास. हनुमंताचे सगळेच गुण अलौकिक होते. सुंदरकांडात श्रीसमर्थ हनुमंताला महावीर, महारूद्र अशी संबोधने वापरतात. प्रभूराम व सुग्रीव मैत्री, वालीवध हे सगळे आपण जाणतोच. रामकार्य म्हणून सीताशोधासाठी कपिवीर चारी दिशांना निघाले. हनुमंतासह नल, नील, जांबुवंत, अंगद दक्षिण दिशेकडे निघाले. 

“सीता शुद्धि आणावया सिद्ध झाले ।”

समर्थभक्त चिंचोळकर म्हणाले होते सीताशोध न म्हणता सीताशुद्धि असे का म्हटले असेल ? तर खरी सीता ही आदिशक्ति, परमेश्वरी, शक्तीचे प्रतिक; ती नित्य शुद्धच आहे, चिरंतन आहे. तिचा शोध काय घेणार ? रावणाने पळविलेली सीता मायावी होती. दुसरे असे की, परमभक्त हनुमंत इतका मायातीत आहे की; तो मायेला कसा वश होणार ? सीता श्रीरामाच्या अंतःकरणात वास करते, तिला वेगळे कसे शोधणार ? मायारूपी सीतेला रावणाने पळविले होते. मुख्य सीता अग्निच्या स्वाधीन केली होती. म्हणूनच अग्निदिव्यानंतर अग्निदेवतेने सीता परत केली. राजा सुग्रीव व प्रभुरामाच्या आज्ञेने हनुमंत, सोबतच्या कपिवीरांसह निघाला. दक्षिण दिशेला सीतेचा शोध सुरू झाला. नाना देश, कडे, पठारे, डोंगर, दऱ्या सगळीकडे शोध सुरू होता.

“पुरे पट्टणे अट्टणे धुंडिताती ।

कपिवीर दाही दिशा हिंडताती ।।”

शोधासाठी महिनाभराचा वेळ मिळाला होता. वने, भुवने, कपाटे, विवरे सगळीकडे शोधून कपि दमले; थकून गेले. दीनवाणे होऊन समुद्र किनाऱ्यावर येऊन बसले. सीतेचा शोध लागला नाही तर परत कसे जाणार ? त्यापेक्षा मरण पत्करणे बरे, असे सगळे एकमेकांशी बोलत आहेत तोच जांबुवंताने हनुमंताला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली. एकाच उड्डाणात तू समुद्र उल्लंघून, पुन्हा परत येशील तेव्हा लवकर जा. हे बोलणे ऐकून हनुमंताला स्फुरण चढले. त्याची शक्ती जागृत झाली.म्हणे मारोती वीर हो स्थिर बैसा ।

तिन्ही लोक पाहून येतो तमासा ।।

हनुमंताचे बाहू स्फुरण पावले. तो थोडा मागे सरकला व त्याने उंच उड्डाण केले. समुद्रपार करताना या दासाला मैनाक पर्वताने अडविले, सुरसा राक्षसीने खाण्यासाठी तोंड वासले. या सगळ्या अडचणींवर मात करून हनुमंत समुद्र पार करून गेलाच. स्वामी कार्य करताना कितीही संकटे आली तरी दास आमिषांनाही बळी पडत नाही. सगळ्या अडचणी पायदळी तुडवून दास आपले स्वामी कार्य पूर्ण करतोच.

“भयासूर तो भीम सिंधू उडाला ।

त्रिकूटाचळाहुनि पैलाड गेला ।”

सुंदरकांडात समर्थांनी सुंदर वर्णन केले आहे. 

“अकल्पित लंकापुरी कांचनाची ।

पुढे देखिली सौख्यदाती मनाची ।।”

आखीव, रेखीव अशा सुंदर लंकानगरीचे वर्णन केले आहे. गोपुरे, देऊळे, मोठमोठे महाल, भव्य राजवाडे, बघून हनुमंत आश्चर्यचकित झाला. अत्यंत सूक्ष्मरूप घेऊन त्याने लंकापुरीत प्रवेश केला.

“गुहे गोपुरे  पाहिल्या धर्मशाळा ।

अकस्मात त्या देखिल्या बंदीशाळा ।।

हिणासारखे देव ते दीन जाले ।

नसे शक्ति ना युक्ति पोटी गळाले ।।”


‘बहु सज्ज ते राज्य लंकापुरीचे‌’ बघून हनुमंत क्षणभर थबकला. आपले कार्य कसे करावे यासाठी मनात विचार केला. योजना तयार केली. त्यासाठी सूक्ष्मरूपाने सगळी लंका पालथी घातली व पुढील कार्यासाठी सिद्ध झाला. हनुमंताने लंकेचे बारकाईने निरीक्षण केले. बंदीशाळेत असलेले देव बघून हनुमंत व्यथित झाला. रावणाने शनिदेवाला पायातळी घातले तर ‘गणेश गाढवे वळी‌’ असे वर्णन नाथांनी केले. ‘सुराकारणे कोप भीमासि आला‌’ त्याला दुःख झाले, रागही आला. तो म्हणाला हे राक्षस ‘बहु बळाने मातले’ त्याने ठरविले- ‘तया झोडितो दास मी राघवाचा’  वाल्मिकींच्या मताप्रमाणे रामाने सीता सोडविण्याच्या उद्देशाने लंकेवर स्वारी केली. पण समर्थ म्हणतात, देवांना बंदीवासातून मुक्तता देणे हा खरा उद्देश होता. हीनदीन अशी देवांची अवस्था पाहून हनुमंताने रावणाला धडा शिकवावा असे ठरविले. देवांना बंधनातून मुक्त करावे ह्या उद्देशाने श्रीरामाने लंकेपार स्वारी केली. पुढे अचाट पराक्रम केला, तो पुढच्या भागात उत्तरार्धात पाहूया. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language