परि मी आहे जगज्जीवनी निरंतर

परि मी आहे जगज्जीवनी निरंतर
श्रीमती. सीमाताई रिसबूड
  • February 8, 2026
  • 1 min read

असो ऐसे सकळहि गेले । परंतु येकचि राहिले ।

जे स्वरूपाकार जाले । आत्मज्ञानी ।।३-९-५९।।

जन्माच्या वेळी जितक्या सहजपणे जीव देह धारण करतो, तितक्याच सहजपणे तो देहातून बाहेर पडतो; यालाच मृत्यू म्हणतात.  व्यक्तातून अव्यक्तात जाणे व अव्यक्तातून व्यक्तात येणे ही क्रिया अविरत अखंड चालू असते. माणसाला मृत्यूचा काळ माहीत नसतो, मृत्यू नंतर काय होते हे पण माहीत नसते. “लोक मरमरों जाती । वडिलें गेलीं हे प्रचिती” असे समर्थ म्हणतात. मृत्यू ही नेहमी घडणारी घटना पण प्रत्येकाला त्याचे भय वाटते. भारतीय तत्त्वज्ञानात, कठोपनिषदात, छांदोग्य उपनिषदात, प्रश्नोपनिषदात मृत्यूविषयी सखोल चिंतन आहे. भगवद्गीतेच्या ८ व्या अध्यायात, ज्ञानेश्वरीच्या ६ व्या व ८ व्या अध्यायातही हा विचार आहे.  मृत्यू सर्वभक्षक, सर्वनाशक, सर्वंकष आहे. विद्वान संत, पराक्रमी राजे, कलावंत, योगी सर्वांना मृत्यू आहे. म्हणून समर्थ सकळही गेले असे म्हणतात. महाथोर ते मृत्यूपंथेचि गेले या समर्थ वचनात हे रहस्य आहे. 

निसर्गाचा, जीवनाचा समतोल राखण्यासाठी मृत्यू अनिवार्य आहे. उत्पत्ती, स्थिती, विनाश हे चक्र चालूच असते. मृत्यूचा विचार म्हणजे, मर्यादा; दुर्लभ शरीर व दुर्लभ आयुष्य यात प्रत्येक क्षण सत्कर्मात घालविण्याचा विचार. स्वार्थ, हवेपणा, दुष्टपणा, स्पर्धा, वैर भावना, तिरस्कार यालाही मर्यादा येतात. जाते घडी आपुली साधा, काळ मागे लागला, थांबला तो संपला या वचनांप्रमाणे मृत्यूचा विचार सत्कर्माची प्रेरणा देतो. देह थकल्यानंतर, तो कार्य करू शकत नाही, तेव्हा देहाला मृत्यूमुळे चिरविश्रांती मिळते. देहबुद्धी, देहाचा अहंकार नष्ट झाला, ‘आहे तितुके देवाचे’ हा विचार पक्का झाला तर मृत्यूचे भय कमी होते. आपणास आहे मरण । म्हणौन राखावें बरेंपण ।” या समर्थ वचनात दुसर्‍यांना सुखी केल्यानेच आपण सुखी होतो हे सत्य सांगितलेले आहे. 

आत्मज्ञानी संत व योगी, अलौकिक जीवन जगतात व त्यांचे प्रयाणही अलौकीक असते. ज्ञानदेवांनी अल्पायुष्यात ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव व अभंग लिहीले. स्वत:चे कार्य संपल्याच्या जाणिवेत त्यांनी संजीवन समाधीचा निर्णय घेतला. ज्ञानदेवांनी पृथ्वीतत्त्वाला, एकनाथांनी जलतत्त्वाला, मुक्ताईने तेजतत्त्वाला, संत तुकारामांनी आकाशतत्त्वाला, आद्य शंकराचार्यांनी वायूतत्त्वाला देह अर्पण केला.

उत्तम मरण येण्यासाठी जन्मभर भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास करावा लागतो. कृतकृत्य होऊन भगवंताच्या स्मरणात शांतपणे देह सोडण्यासाठी जी साधना करावयाची त्यालाच परमार्थ म्हणतात. दासबोधात दशक ३ समास ९ मध्ये समर्थ रामदास मृत्यूचा विचार प्रभावीपणे, ओघवत्या भाषेत मांडतात. त्यांचे चिंतन सर्वांनी करणे गरजेचे आहे. भगवंत भक्ताचे स्मरण अखंड करतो. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी ८-१३१ मध्ये हा विचार मांडतात. भगवंत मृत्यू समयी भक्ताची परीचर्या करतो. त्याला आत्मबोधाच्या पिंजर्‍यात ठेवतो, स्वस्वरूपाची थंडगार सावली त्याच्या वेदनेचा दाह कमी करते. त्याचा प्राणसमुदाय सोsहं साधनेने टवटवीत असतो. मन प्रफुल्लित असते. ब्रह्म स्वरुपात एकरूप होण्यासाठी तो आतुर असतो. स्थूल शरीर, पंचमहाभूते आपापल्या वाटेने नेतात. इंद्रिये परमात्मस्वरूपा पुढे नतमस्तक होतात व अहंकार नष्ट होतो. पूर्ण आयुष्यभराच्या साधनेचे हे फळ असते. भगवंत अनाहत नादाचे अंगाई गीत गातो. देहाला उन्मनीच्या प्रकाशात आत्मदर्शन होते. भक्त, भगवंत व भक्तीचे ऐक्य होते. हा आनंददायक क्षण असतो. सोलीव सुख ओवी ३० मध्ये कल्याणस्वामी म्हणतात,

“ऐसे सुख योगिया लाधले । तेव्हा देहाचे मरण गेले ।

सांगणे ऐकणे मुराले । एकत्वपणे एकचि ।।

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर समर्थ रामदास उदास झाले. १६०३ चैत्र वद्यात ते सज्जनगडावर आले. 

माघ वद्य नवमी । जाणे आहे परंधामी ।

केला निश्‍चय अंतर्यामी । ऐसा असे ।।

असे त्यांच्या मनात होते. या दहा महिन्यात दासबोध ७ दशक व उरलेले १३ दशक जोडून पूर्ण केला. समर्थ उद्धवस्वामींना म्हणाले, रघुकुळटिळकाचा वेध सन्निध आला. उद्धव स्वामी म्हणाले अनुदिन नवमी हे मानसी धरावी. समर्थ, तंजावर येथून घडवून येणाऱ्या पंचधातूच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमंताच्या मूर्तींची वाट पहात होते. त्या गडावर माघ वद्य पंचमीला आल्या. समर्थांनी मूर्ती पाहिल्या, श्रींचे मुखावलोकन केले; प्राणप्रतिष्ठा केली; यथासांग पूजन केले. समर्थांचे सगुण भक्तीचे प्रेम या प्रसंगात दिसते. 

समर्थांनी अभंगातून श्रीरामाशी हितगुज केले. रामा माझे तू इतके दिवस पालन पोषण केलेस. बालपणापासून मी तुझ्या कृपेसाठी वेडा झालो आहे. तू मला आधार दिलास, सनाथ केलेस. आता माझे चित्त तुझ्या भेटीसाठी उतावीळ झाले आहे. प्राण त्यागाच्या वेळेस तू मला सांभाळ. तुझ्या स्वरूपदर्शनात माझा देह पडावा. माझ्या मागे तुझ्या भक्तांना तू सांभाळ, जे कोणी १३ कोटी श्रीराम नामाचा जप करतील त्यांना दर्शन दे.

माघ वद्य नवमी दुपारी २ वाजता त्यांनी तीन वेळा  रामनामाचा घोष केला, जो सर्व गडाच्या आसमंतात निनादला व समर्थ राम स्वरुपात एकरूप झाले. माघ वद्य नवमी म्हणजेच दासनवमी. या दिवशी सज्जनगडावर उत्सव असतो. श्रीसमर्थ म्हणजे मारूतीचा अवतार ते चिरंजीव आहेत. 

समर्थांचा पांचभौतिक देह पंचमहाभूतात विलीन झाला तरी दासबोध, आत्माराम, मनोबोध, स्फुट काव्य व अभंगांच्या रूपात ते आजही आपल्यात आहेत. प्रपंचरूपी मातीतून पारमार्थिक अत्तर काढायला त्यांनी शिकवले. माझा दाता राम आहे या निश्चयातून ते राहिले. समर्थांच्या काळी उपासना धर्माचरण याचे स्वातंत्र्य नव्हते. आज स्वातंत्र्य आहे, पण मन व बुद्धी बाह्य विषयात रमण्याचा धोका जास्त आहे. दूरदर्शन, बाहेरील आकर्षण वाढवतो; म्हणून मनाचा समतोल, स्थिरता, सूक्ष्मात जाण्याची वृत्ती  वाढविण्यासाठी समर्थांच्या ग्रंथांचा अभ्यास गरजेचा आहे. जो श्रीरामाचा दास होतो त्यालाच हे ग्रंथ आवडतात. श्रीरामाचा दास व्हायला त्याच्या नामाची गोडी, नामावर विश्वास व नामावर प्रेम असावे. समर्थ म्हणतात,

“श्रीराम देवार्चन सिद्धचि आहे ।

ग्रंथराज दासबोध सामर्थ्य सिद्धचि आहे ।

जो जो महंत येथे निश्चये राहे ।

तो तो लाहे साक्षात्कारु ।।”


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language