समर्थांच्या जीवनातील अकरा-अकरा

समर्थांच्या जीवनातील अकरा-अकरा
संध्या कोल्हटकर
  • February 1, 2026
  • 1 min read

आपल्या सद्गुरूंना म्हणजे श्रीरामाला ‘समर्थ’ म्हणणारे, रामदास आपल्या कर्तृत्वाने व ज्ञानाने ‘समर्थ’ झाले. श्रीरामांच्या आदेशावरून कार्य करणारे समर्थ, श्रीरामाचे दास्यत्व पत्करून त्याचे ‘दास’ झाले/रामदास झाले. “मुख्य हरिकथा निरुपण” हे लक्षात घेऊन निद्रिस्त समाजाला, आध्यात्मिक अधिष्ठान ठेऊन जागृत करण्यासाठी त्यांनी बोध केला; तो ‘दासबोध’ लिहून ! अशा समर्थ व्यक्तिमत्वाला लोक आपणहून ‘समर्थ रामदास’ म्हणू लागले. त्यांच्या जीवनातील ‘अकरा’ चे महत्व असे आहे.

“आक्रा आक्रा बहु आक्रा | काये आक्रा कळेचि ना |

गुप्त ते गुप्त जाणावे | आनंदवन भूवनी ||१७||”

समर्थ रामदासस्वामींनी  लिहिलेल्या आनंदवनभुवनी ह्या काव्यातील या ओळी आहेत.‘वनभुवन’ हे काशीचे पूर्वीचे नाव होते. समर्थांनी शिव राज्याभिषेकाचे स्वप्न तिथे पाहिले होते. काशीला पडलेल्या स्वप्नाचा आनंद त्यांनी या काव्यातून व्यक्त केला आहे. समर्थांच्या जीवनात या ११/११ चे महत्व आपल्याला खूप वेळा पहायला मिळते. श्रीसूर्यनारायण व श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने सूर्याजीपंत व राणूबाई यांना दोन पुत्र झाले. जेष्ठ पुत्र गंगाधर व लहान नारायण ! नारायण म्हणजे रामदासस्वामी हे हनुमंताचे अवतार होते. त्यांना अकरावा रुद्र म्हणतात.

“कृतेतू मरुताख्यश्च्य | त्रेतायांपवनात्मज |

द्वापरे भीम संज्ञश्च | रामदास कलौयुगे ||”

असे पुराणातील भविष्य परंपरा सांगताना बखरकारांनी म्हटले आहे. 

फाल्गुन वद्य षष्टी या दिवशी एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दनस्वामी यांची पुण्यतिथी असते. या दिवशी सूर्याजीपंत व राणूबाई दोघंही पैठणला जात. राणूबाई व एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरीजाबाई या बहिणी–बहिणी होत्या. अकरा महिन्याच्या नारायणाला त्यांनी नाथांच्या मांडीवर दिले, तेव्हा ते गहिवरले. एकनाथमहाराज प्रेमाने राणूबाईना म्हणाले, “हा मुलगा प्रत्यक्ष ईश्वरी अवतार आहे. अवघ्या महाराष्ट्रात याची कीर्ती पताका फडकत राहील.” अकराव्या महिन्यात नाथांचे आशीर्वाद मिळालेला असा हा अकरावा रुद्र !

बाल नारायण ‘श्रीराम जोशी’  यांचेकडे शिक्षणासाठी जात असे. नारायणाचे शिक्षण म्हणजे बाळबोधवाचन, लेखन, संध्या, गायत्री, पुरुषसूक्त, पवमान, ग्रंथसंहिता वगैरे. त्यांच्या शिक्षणाबद्दल गिरीधर स्वामी ‘समर्थप्रताप’ ग्रंथामध्ये सांगतात,

“समर्थे अकरा धड्यात केले धुळाक्षर |

अकरा प्रहरात वळिले अक्षर |

अकरा दिवसात केला जमाखर्च |

ब्रह्मांडकुळकर्ण चालवाया ||”

इथेही ‘अकाराचा’ उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. समर्थांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करताना, तसेच समर्थांनी लवकर शिक्षण पूर्ण केले याचे वर्णन करताना, समर्थांच्या जीवनातील अकराचे महत्व सांगायला गिरीधरस्वामी विसरत नाहीत. समर्थांचे वडील सूर्याजीपंत ठोसर हे ‘कुलकर्णी’ हे पद भूषवित होते. म्हणून गिरीधर स्वामींनी समर्थांच्या बाबतीत ‘ब्रह्मांड कुळकर्ण’ असे सांगून त्यांच्या अफाट अध्यात्मिक शक्तीचे वर्णन केले आहे. “अकरा प्रहरात वळिले अक्षर” सांगतांना  अक्षर गिरवणे या साक्षरतेबरोबरच आत्ताचा नारायण म्हणजे अ-क्षराची ओळख करून घेणारा महायोगी होणार आहे, असेही त्यांना सुचवायचे असावे. समर्थ चरित्रात त्यांच्या लहानपणाच्या गोष्टी वाचतानासुद्धा अकराचा उल्लेख आढळतो. ‘अकरा ताकाची मडकी’, ‘अकरा धान्याची पोती’ असा कथाभाग आढळतो.

अकरा वर्षाचा नारायण घराच्या अंगणात खेळत होता. तिथे एक मोठे वानर आले. त्याने सक्तीने ओढत ओढत नारायणाला मंदिरात नेले. तिथे पालखीत प्रभू रामचंद्र व सीतामाई बसले होते. ते वानर म्हणजे प्रत्यक्ष हनुमंत होते. प्रभू रामचंद्रांनी नारायणाला “अहं ब्रह्मास्मि” चा उपदेश केला तोही अकराव्या वर्षीच ! असे दिनकर स्वामींनी आपल्या ‘स्वानुभव दिनकर’ या ग्रंथात म्हटले आहे. तर प्रत्यक्ष अकरावा रुद्र असलेल्या हनुमंतांनी, समर्थांना श्रीराम प्रभू यांच्यापर्यंत नेले.

“मुख्य हरिकथा निरुपण | दुसरे ते राजकारण” असे म्हणणाऱ्या समर्थांनी दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी आसेतु हिमाचल मठांची स्थापना केली, त्याची संख्या सुद्धा अकराशेच होती. मठातून बुद्धिमान, विवेकी, शिस्तप्रिय मठाधिपतींची नेमणूक करून, त्यांनी परमार्थ व राजकारण यांचा समन्वय साधला. ते मठाधिपती महंत होते. आणि या सर्वांनी धर्माधिष्ठित निरपेक्ष राजकारण करताना शिवबांच्या स्वराज्य संस्थापनेला मदत केली.

प्रत्येक बुद्धिमान माणूस हा बलवान सुद्धा असला पाहिजे, असा समर्थांचा आग्रह होता. समर्थांनी ‘गाव तिथे मारुती’ ही संकल्पना राबवली. त्यांनी अनेक मंदिरे उभारून त्यात व्यायामशाळा सुरु केल्या. परंतु समर्थ स्थापित अकरा मारुतींचे महत्त्व काही वेगळेच आहे. ‘आनंद वनभुवनी’ मधील वर उल्लेखलेली ओवी या मारुतींनाही लागू पडते. समर्थांनी या अकरा मारुतींची अकरा स्तोत्रे लिहिली आहेत. त्यातील ‘भीमरुपीमहारुद्रा’ हे स्तोस्त्र प्रसिद्ध आहे. ही सर्व मंदिरे बलोपासना व राष्ट्राचे सामर्थ्य वर्धिष्णू होण्याच्या दृष्टीकोनातून निर्माण करण्यात आली. ही सर्व मारुती मंदिरे शिवसमर्थ भेटीची तसेच समर्थांच्या गुप्त राजकारणाची आठवण देतात. चाफळच्या मंदिरात आजही शिवाजीराजे व समर्थ यांच्या गुप्त चर्चेची जागा पहायला मिळते. इथे वीर मारुती व दास मारुती असे दोन मारुती आहेत. शिंगणवाडीच्या मारुतीच्या इथे समर्थांनी शिवबाला अनुग्रह दिला होता. बाहेगावच्या मारुतीच्या इथे समर्थांनी भिमाकुंडात जलस्तंभिनी विद्येचे प्रदर्शन केले होते व अकरा प्रहर डोहाच्या  तळाशी बसून होते. बाहेबोरगाव येथे समर्थांनी ‘अद्वैत तत्वज्ञान’ वेणास्वामींना  संक्रमित केले होते. त्याचे वर्णन करताना गिरीधरस्वामी म्हणतात,

“अकरा दिवस एक अंगी मेखला राहे |

उद्धव महंत अकरा दिवस वाट पाहे ||”

अकरा हा आकडा विशेष आहे. एक सद्गुरू आणि एक शिष्य यांचे एकरूप होणे आहे. अनंतदास रामदासी म्हणतात,

“येकी येक ऐक्य ब्रह्म | गुरुशिष्य दोनी परब्रह्म |

येकादेश हे अंकवर्ण | सहजसमाधी सांगितले ||”

एकावर एक अशा दोन आकड्यांचे जसे ऐक्य झाले तसे गुरुशिष्य मिळून एक परब्रह्मच आहे. स्वामी-सेवक, देव-भक्त, पुरुष-प्रकृती अशा जोड्या एकावर एक अकरा प्रमाणे एकरूप आहेत. समर्थांना प्रिय असणारे मारुतीराय हे अकरावे महारुद्र आहेत म्हणून समर्थांना अकरा हा आकडा प्रिय आहे. हे सर्व पाहता त्यांच्याच काव्यातील, 

“आक्राआक्रा बहु आक्रा | कायेआक्रा कळेचि ना |

गुप्त ते गुप्त जाणावे | आनंदवन भूवनी ||१७||”

ही ओवी किती सार्थ आहे हे लक्षात येते.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language