मरणाचे स्मरण असावे

मरणाचे स्मरण असावे
ज्योती चित्गोपेकर
  • January 17, 2026
  • 1 min read

अनादि कालापासून भारतीय तत्त्ववेत्त्यांनी व साधूसंतांनी मृत्यूचे रहस्य उकलण्याचा प्रयत्न केला. पण मृत्युनंतर काय ? याचे कोडे अद्याप कुणाला स्पष्ट उलगडले नाही. भारतीय तत्त्वज्ञान पुनर्जन्म मानते. जीवाला त्याच्या वासनेनुसार व बऱ्यावाईट कर्मानुसार जगात पुनःपुन्हा जन्म घ्यावा लागतो. माणूस या जगात प्रवेश करतो तेच मुळात परतीचे तिकीट सोबत घेऊन ! मृत्यू हा अटळ असला तरी मरणाचे स्मरणही नकोसे वाटते हे आश्चर्यच नव्हे काय?… श्रीसमर्थ म्हणतात,

मरणाचें स्मरण असावें | हरिभक्तीस सादर व्हावें |

मरोन कीर्तीस उरवावें | येणें प्रकारें ||१२१०१३ ||“

शेवटचा दिस गोड व्हावा” किंवा सहजसुलभ उत्तम मरण येण्यास जन्मभर हरिभक्तीची, भगवंताच्या अनु‌संधानात रहाण्याची साधना करावी लागते. मृत्यूला निर्भय चित्ताने, शांतपणे सामोरे जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे. ज्ञानी महात्म्यांना तो साधतो.

सरतां संचिताचें शेष | नाहीं क्षणाचा अवकाश |

भरतां न भरतां निमिष्य | जाणें लागे ||३-९-३||”

पूर्वसंचित संपले की यमदूत क्षणभरही थांबत नाहीत. येथे उधारी नाही. तेव्हा अंतर्यामी ही तयारी ठाम हवी. मरणाचे स्मरण ठेवायचे म्हणजे मन उदास, नीरस, रुग्ण ठेवणे असे नसून, या जीवनाची क्षणभंगूरता पटून आसक्ती कमी करणे, अंगी वैराग्य बाणवणे हे होय. मनुष्य किती वर्षे जगला यापेक्षा तो कसा जगला यातच खरे मर्म आहे. म्हणून श्रीसमर्थ सांगतात मरोन कीर्तीस उरवावे”. संसारातच गुंतून अमूल्य आयुष्य व्यर्थ जावयास नको. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे” यानुसार मानवी जीवन म्हणजे बंदिशाळा असून मरण म्हणजे त्यातून मुक्ती ! वास्तवात देहेबुद्धी ते आत्मबुद्धीकरून माणसाने या जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करावा ! त्यासाठी जन्मभर फार मोठी साधना हवी.

मरणाचं स्मरण का करायचं तर तारुण्यात माणूस आपल्याच मस्तीत, गुर्मीत वागतो. मीपणा, माझे-माझे, मलाच सर्व ऐहिक सुखे हवीत म्हणून त्याच्या हातून पापकर्मे, अनाचार घडतो. तो स्वार्थ, मोह, लोभ आदि षड्रिपूत गुंतत जातो, अहंकारी व दुराचारी बनतो. माणसाच्या या घमेंडीला मृत्यू हा जबरदस्त उतारा आहे.

मना पाहतां सत्य हे मृत्यभूमी |

जिता बोलती सर्वही जीव मी मी |

चिरंजीव हे सर्वही मानिताती |

अकस्मात सांडूनिया सर्व जाती ||१५||

अहंकार, गर्व, काम हे सर्वनाशाला कसे कारणीभूत ठरते हे रावणाच्या उदाहरणावरून सिद्ध होते. श्रीसमर्थ “मृत्यूनिरुपण” या समासात आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालीत आहेत.

मृत्य न म्हणे थोर थोर | मृत्य न म्हणे हरिहर |

मृत्य न म्हणे अवतार | भगवंताचे || ३-९-४० ||

गेले विद्येचे सागर | गेले बळाचे डोंगर |

गेले धनाचे कुबेर | मृत्यूपंथें ||३-९-५०||”

असे सगळे गेले तरी शेवटी एकच अमर झाले आहेत ते म्हणजे थोर असे आत्मज्ञानी‘. आत्मसाक्षात्कारी असे संतमहात्मे अजरामर झाले आहेत.

असो ऐसे सकळहि गेले | परंतु येकचि राहिले |

जे स्वरूपाकार जाले | आत्मज्ञानी ||३-१०-५९||”

संत ज्ञानेश्वर, शांतीब्रह्म एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदासस्वामी इ. अव्यक्तरूपाने ते आजही साधकांना मार्गदर्शन करीत आहेत.

मरोन किर्तीस उरवावे”  हे साधायचे असेल तर चंदनासारखे झिजले पाहिजे. सेवावृत्ती, परोपकार, मधूर व नम्र वाणी यांच्या सहाय्याने लोकांना आपलसं केलं तरच किर्ती मिळते. “केवळ स्वतःसाठी जगलात तर मेलात आणि दुसऱ्यासाठी, देशासाठी मेलात तर जगलात” असे सुभाषितकार म्हणतात. यातच साऱ्या जीवनाचं सार आहे. वासनाक्षय झालेले महात्मे मृत्यूला जिंकतात व अमर होतात. आयुष्याची अनिश्चितता पटली की साधक अंर्तमुख होऊन भक्तीमार्गाला लागतो. महाभारतात यक्षाच्या प्रश्नाला उत्तर देताना धर्मराज युधिष्ठिर जगातील आश्चर्य सांगताना म्हणतात की “आसपास नित्य मरणारी माणसे पहात असूनही, मानव; अमरपट्टा घेऊन आल्यासारखा वागतो हे एक कटू सत्य व आश्चर्यच आहे.” सात दिवसांनी मृत्यू येणार हे कळल्यावर परिक्षित राजाने शुकमुनींकडून भागवत श्रवण करून जीवनाचे कल्याण करून घेत मुक्ती मिळविली. आत्मज्ञान न होता मृत्यू आला तर जीवाचे फार नुकसान आहे. म्हणून साधकाने तातडी करावी आणि सत्समागमाने या जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यातून स्वतःची सुटका करून घ्यावी हा अमूल्य संदेश श्रीसमर्थ आपणाला “मरणाचे स्मरण असावे” या ओवीतून देत आहेत. मरणाचे नित्य स्मरण असल्यास हातून गैरवर्तन, पाप न घडता माणूस त्यागाने; प्रेमाने; सेवेने वागेल. त्याच्यात प्रथम आत्मपरिक्षण घडून पुढे आत्मपरिवर्तन घडेल.

संत एकनाथांच्या चरित्रातील एक गोष्ट सर्वांनाच ज्ञात आहे. पैठण गावातील एका दुष्ट, उर्मट सावकाराला त्याचा आठ दिवसांनी मृत्यू होईल असे सांगून त्याचा संपूर्ण कायापालट घडविला व तो अखेर वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणून “मरणाचे स्मरण” असावे. जीवनाची सार्थकता यातच आहे.
|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language