चाफळ पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले उंब्रज हे गाव. त्या गावातील हनुमंताचे वर्णन समर्थांनी अकरा कडव्यांच्या स्तोत्रात केले आहे. या स्तोत्रात मारुतीच्या सामर्थ्याचे वर्णन केले आहे. हा मारुती जवळपास सहा फूट उंचीचा आहे, आणि वीर; पराक्रमी; चपळ स्वरूपातील आहे. त्याचे डोळे थोडे लहान आहेत. सभोवतालच्या परिस्थितीचा विचारपूर्वक अभ्यास करून सुजाण नागरिक व्हावे हेच समर्थांना यातून सुचवायचे आहे.
हनुमंताचे वैशिष्ट्य हे आहे की, हनुमंत दास्यभक्तीचे जसे योग्य आणि चपखल उदाहरण आहे तसेच उत्तम मैत्रीचे सुद्धा उदाहरण आहे. सुग्रीवाचे भाग्य एवढ्यासाठीच थोर आहे की, त्याच्याकडे हनुमंतासारखा मित्र आहे. म्हणूनच त्याला सहजपणे विजय प्राप्त झाला. महाभारतात सुद्धा भगवंतांनी हनुमंताला अर्जुनाच्या रथावर बसवले ते एवढ्यासाठीच. हनुमंताची कृपा असल्यावर विजय प्राप्त होणार हे निश्चित आहे. समर्थांनी ही मूर्ती चुना, वाळू आणि ताग यांपासून तयार केली आहे. मठामध्येच मारुतीची स्थापना केल्यामुळे मंदिराला वेगळा कळस नाही. हा मारुती जागृत असून प्रभूरामचंद्रांनी समर्थांच्या रक्षणासाठी पाठवला होता.
यामागे एक कथा आहे. समर्थ एकदा कृष्णेच्या घाटावर स्नानाला गेले आणि बुडालो बुडालो असे ओरडू लागले. त्यांचा आवाज लोकांच्या कानापर्यंत पोहोचण्याआधी समर्थांच्या रक्षणासाठी मारुतीराय स्वतः आले आणि खडकावरून उडी मारून त्यांनी समर्थांना वाचवले. ते समर्थांना म्हणाले रामरायांनी तुझा सांभाळ करण्याची मला आज्ञा केली आहे. दोघेही रामाचे भक्त ! भगवंताची सेवा अनेक जण करतात. पण भगवंत ज्या भक्तांची सेवा करतो त्यांच्या भक्तीला साष्टांग दंडवत. प्रत्यक्ष रामाने मारुतीला आईच्या ममतेने समर्थांचा सांभाळ करायला सांगावे, यातच समर्थांच्या भक्तीचे मोठेपण आहे. भगवंत प्रेम करतो पण त्यासाठी समर्थांसारखे दास व्हावे लागते. ज्या खडकावरून उडी मारून मारुतीरायांनी समर्थांना वर काढले, तिथे हनुमंताची पाऊले उमटली आहेत असे म्हणतात. उंब्रजच्या मारुतीच्या जागृतीची प्रचिती सांगणाऱ्या अनेक कथा इथे घडल्या आहेत. सश्रद्ध मनासाठी आजही उंब्रजचा मारुती जागृत आहे.
उंब्रज हे कृष्णामाईच्या पाण्याने ओले आणि पवित्र झालेले आहे. समर्थांना उंब्रजच्या मारुती प्रमाणेच कृष्णेचे सुद्धा खूप कौतुक होते. त्रिकाल स्नानामध्ये समर्थांचे एक स्नान कृष्णेच्या कुशीत असायचे. उंब्रज हे अंतर दहा किलोमीटर, पण एवढे अंतर पार करून समर्थ स्नान उंब्रजला कृष्णेच्या पात्रात करत. स्नानाच्या निमित्ताने जनतेचे मनोगत जाणणे, गुप्त हेरांसारख्या रामदासींकडून घटनांचा आढावा घेणे, ही त्यांची कामे असत. कृष्णामाईच्या घाटावर स्नान-संध्या करून समर्थ मारुतीचे पूजन करत. एकदा समर्थांनी सतत तेरा दिवस मारुती समोर कीर्तन केले. सतत फिरणाऱ्या समर्थांना मारुतीरायाने सलग तेरा दिवस आपल्याजवळ बांधून ठेवले, हीच हनुमंताच्या जागृतीची खूण आहे. समर्थांना त्यांच्या कार्यासाठी या मारुतीच्या स्थापनेबरोबरच उंब्रज मठासाठीही काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. समर्थांनी येथे मठ स्थापन करून भक्ती आणि शक्तीचा संगम करून दिला. उंब्रजचा भाग हा आदिलशाही अधिपत्याखाली होता. यवनांचे उग्र दडपण सातत्याने शेजारी असल्याने हा मठ समर्थांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. अशा या मारुतीचे वर्णन समर्थांनी या चौथ्या स्तोत्रात केले आहे. अंजनीसुत कसा आहे हे सांगताना ते म्हणतात,
“अंजनीसुत प्रचंड वज्रपुच्छ काळदंड ।
शक्ति पाहतां वितंड दैत्य मारिले उदंड ।। १ ।।”
अंजनी सुत म्हणजे अंजनीचा मुलगा शक्तिमान आहे. वज्रदेही आहे आणि त्याचे पुच्छ काळदंडाप्रमाणे आहे. त्याच्या शेपटीचा एक तडाखा यम सदनाला नेतो. लंकेत राम-रावण युद्धात या शेपटीच्या तडाख्याने त्याने कित्येक दैत्यांना यम सदनाला पाठवले. त्याच्यामध्ये भयंकर मोठी ऊर्जा शक्ती आहे. पहिल्या तीन कडव्यांत समर्थांनी हनुमंताच्या शक्तीचे वर्णन केले आहे. अवकाशात झेप घेणारा त्याचा देह प्रचंड आहे. पण तो अवकाशालाही भेदून जातो. समर्थ म्हणतात की,
“नभांत भीम आगळा ।। ३ ।।”
त्याचं वेगळेपण असणे हीच त्याची ओळख आहे. समर्थांनी चौथ्या श्लोकात हनुमंताच्या लहानपणीची गोष्ट सांगताना म्हटले आहे की,
“लुळीत बाळकी लिळा गिळोनि सूर्यमंडळा ।
बहुत पोळतां क्षणीं थुंकीलाचि तत्क्षणीं ।। ४ ।।”
लहानपणी याचे खेळणे काय ? तर एकदा हनुमंताने सूर्य गिळला. गळ्यात खूप आग व्हायला लागली आणि त्याने तो थुंकून टाकला. सगळ्याच गोष्टी या कल्पनेच्या पलीकडच्या. शत्रूला मारताना त्याच्या डोळ्यात वीररस उतरतो. डोळे जणू काही आग ओकत असतात. उंब्रजचा हा वीर मारुती खूप रुबाबदार, देखणा आणि विरक्त वृत्तीचा आहे. समर्थांनी या स्तोत्रात त्याच्या सौंदर्याचे सुद्धा खूप छान वर्णन केले आहे. ते म्हणतात,
“झळक झळक दामिनी वितंड काळकामिनी ।
तयापरी झळाझळी लुळीत रोमजावळी ।। ७ ।।”
हनुमंताच्या शरीरावरची लव इतकी सुंदर आणि तुकतुकीत आहे की अंधारात तळपणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती नेत्राला आनंद देते. स्वतःच्या कर्तुत्वाच्या, पराक्रमाच्या आदेशाने तो निर्भय बनवतो. जन्माने वानर असून सुद्धा कर्माने ईश्वराचे अंतरंग असणारा हा हनुमंत. ब्रह्मदेवाने सुद्धा त्याला इच्छामरणाचे वरदान दिले, ते केवळ त्याच्या दास्यभक्तीने प्रसन्न होऊन. आपली माता अंजनी हिच्या आशीर्वादाने तो चिरंजीव आहे. ज्यांना आईचे आशीर्वाद असतात त्यांच्यावर कोणतेच संकट येत नाही आणि यश त्यांच्यासमोर हात जोडून उभे असते.
या स्तोत्रात मारुतीचा प्रताप आणि विनय हे दोन्ही गुण दिसतात. निकुंभाचल, सुवेलाचल आणि त्रिकुटाचल यांच्या पठारावर वसलेल्या लंकेला हनुमंताने आपल्या प्रतापाने गर्भगळीत केले. संपूर्ण लंका जाळली. सीतेसमोर मात्र तो रामसेवक म्हणून प्रकट झाला. अन्यायाच्या विरोधात रुद्रावतार धारण करणारा हा हनुमंत भक्तासाठी मात्र स्नेहाळू, तेजाळू, कनवाळू असा आहे. त्याच्या प्रतापाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात,
“समस्त प्राणनाथ रे करी जना सनाथ रे ।
अतूळ तूळणा नसे अतूळशक्ति वीलसे ।। ८ ।।”
या स्तोत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या स्तोत्रात ‘ळ’ हे अक्षर ३५ वेळा आले आहे. यातून समर्थांचे शब्द आणि साहित्य यावर असणारे वर्चस्व आपल्याला दिसते. हनुमंताचे रूप सांगताना समर्थ म्हणतात,
“रूपें रसाळ बाळकू समस्त चित्तचाळकू ।
कपी परंतु ईश्वरू विशेष लाधला वरू ।। ९ ।।”
तो रसाळ आहे, बालक आहे, मनाला प्रसन्न करणारा आहे. कपी आहे पण ईश्वर आहे. हनुमंताने रुद्रावतार धारण केला की त्याला कोणीही आवरू शकत नाही. समर्थांनी हनुमंताच्या रूपाला सतेजरूप ईश्वरी असे म्हटले आहे. समर्थांना मारुतीरायाचा खूप अभिमान आहे. हा अभिमान व्यक्त करताना ते म्हणतात,
“समर्थदास हा भला कपी कुळांत शोभला ।
सुरारि काळ क्षोभला त्रिकूट जिंकिला भला ।। ११ ।।”
या श्लोकातून समर्थांना स्वतःचे आणि मारुतीचे ऐक्य दाखवायचे आहे. दोघेही रामाचे भक्त ! यातून दासावर असलेली मारुतीची कृपा दिसते. त्यांचा कृतज्ञ भाव दिसतो. उंब्रजचा हा असा मारुती संपूर्ण जगाचा प्राणनाथ आहे. समर्थ कृपेने या स्तोत्राचे मनन चिंतन करता आले हे भाग्यच म्हणावे लागेल. हनुमंताप्रमाणे शरणागत भाव ठेवता यावा हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।