विज्ञान

विज्ञान
सौ. मानसी याडकीकर
  • January 4, 2026
  • 1 min read

पारमार्थिक क्षेत्रात ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, विज्ञान इत्यादी शब्द बरेचदा कानावर पडतात. परंतु त्यांचा शास्त्रीय अर्थ आपल्याला माहिती नसतो. त्यामागील संकल्पना स्पष्टपणे कळलेल्या नसतात. त्या संकल्पना नीटपणे कळल्या, तरच संतांच्या ग्रंथातील खरा अर्थ आपल्याला समजतो. श्रीसमर्थ म्हणतात,

“येक ज्ञान येक अज्ञान । येक जाणावें विपरीत ज्ञान ।

हे त्रिपुटी होये क्षीण । तेंचि विज्ञान ।। १४-९-१६ ।।”

पारमार्थिक भाषेत बोलायचे झाले तर विपरीत ज्ञान हे भ्रमरूप असते. वस्तू आहे तशी न दिसणे म्हणजे भ्रम. उदा. अंधारात दोरी सापासारखी दिसते. अज्ञानामुळे भ्रम होतो. परंतु दोरीवर उजेड पडला की तो साप नसून दोरी आहे याचे ज्ञान होते. याचप्रमाणे अज्ञानामुळे जीव ‘देह म्हणजेच मी’ असे समजतो. परंतु आत्मज्ञान झाले की जीवाला आपले खरे स्वरूप कळते. अज्ञान, विपरीत ज्ञान व ज्ञान या तीनही दृश्य विश्वाच्या अनुभवातील कल्पना आहेत. त्या सर्व नाहीशा झाल्या की ब्रह्मसाक्षात्कार घडतो. त्या अवस्थेला ‘विज्ञान’ असे म्हणतात. व्यवहारामध्ये आपण ज्ञान हा शब्द बऱ्याच गोष्टींच्या संदर्भात वापरतो. ज्ञान म्हणजे एखादी गोष्ट, वस्तुस्थिती, विषय समजणे, त्याचे आकलन होणे. प्रापंचिक ज्ञान व  पारमार्थिक ज्ञान यात मूलतः फरक आहे. प्रापंचिक ज्ञान होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. १) वस्तू किंवा व्यक्ती, २) जाणणारा.

व्यवहारी ज्ञानामध्ये जाणणारा आणि जाणली जाणारी वस्तू किंवा व्यक्ती यांच्यातील द्वैत कायम राहते. जोपर्यंत ज्ञानासाठी ज्ञाता, ज्ञेय व इंद्रिये यांची गरज आहे, तोपर्यंत त्या ज्ञानाला केवळ माहितीचे स्वरूप असते. परंतु पारमार्थिक ज्ञानात मात्र परमात्मवस्तू व तिला जाणणारा एकरुप होऊन जातात. ‘थेंबुटा सागरी मिळाला’ याप्रमाणे ज्ञात्याचे स्वतंत्र अस्तित्त्व शिल्लक उरत नाही, द्वैत संपते,  त्यामुळे ‘मी जाणले’ ही जाणीवही नष्ट होते. यालाच ‘आत्मज्ञान’ म्हणतात. 

आध्यात्मिक परिभाषेत ‘मी ब्रह्म आहे’ ही भावना हे ज्ञान होय, तर ‘मी देहच आहे’ ही वृत्ती म्हणजे अज्ञान असे मानले जाते. तसे पाहिले तर ज्ञान व अज्ञान दोन्ही वृत्ती रूपाने समान आहेत. श्रीसमर्थ म्हणतात,

“ज्ञान आणि अज्ञान । वृत्तिरूपें हें समान ।

निवृत्तिरूपें विज्ञान । जालें पाहिजे ।। २०-१-२८ ।।”

जसे, पंखा मला त्याच्या आकारावरून कळतो. पण तो कसा बनवला व कोणत्या तांत्रिक बाबींमुळे तो फिरतो याचे अज्ञान आहे. म्हणजे पंख्याच्या बाह्य रूपाचे ज्ञानही आहे आणि अंतरंगाचे अज्ञानही आहे. ज्ञानही मलाच होते आहे आणि अज्ञानही मलाच आहे.  दोन्हीतही ‘मी’ पणाची जाणीव आहे. मीपणाची जाणीव सुद्धा नाहीशी झाली की उरणारे केवळ अनुभवरुपी ज्ञान म्हणजे विज्ञान होय.  संतांनी जे ज्ञान सांगितले त्याची सोपी व्याख्या करताना श्रीसमर्थ म्हणतात,

“ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।

पाहावें आपणासि आपण । या नाव ज्ञान ।। ५-६-१ ।।”

‘पहावे आपणासी आपण’ म्हणजे मी कोण ? कुठून आलो ? येण्याचे प्रयोजन काय ? या गोष्टींचा विचार करणे. असा विवेकयुक्त विचार करीत असताना ‘खरा मी’ म्हणजे देह नसून आत्मरूप चैतन्य आहे हे कळते. यापैकी टिकणारे काय व तात्पुरते काय हे पाहिले असता, देह नाशिवंत आहे हे लक्षात येते. देहात असेपर्यंत ‘मी ब्रह्मस्वरूप आहे’ असा अनुभव घेणे, हेच आपल्या जन्माचे प्रयोजन आहे. अशाप्रकारे आपणच आपल्या अंतरंगात उतरून ‘खऱ्या मी’ चे ज्ञान करून घ्यावे असा श्रीसमर्थांचा आग्रह आहे. सर्वसामान्यपणे मनुष्य देहासंबंधी विचार करतो. ‘मी देहच आहे’ या घट्ट भावनेने त्याचे सर्व व्यवहार सुरू असतात. या अज्ञानामुळे ती व्यक्ती, वस्तू व दृश्य जगाच्या संगाने बांधली जाते. त्या संगात अडकल्यामुळे त्या व्यक्तीला परमार्थ साधत नाही.

मनुष्याचे सुख-दुःख हे दुसऱ्या कशावर, कुणावर तरी अवलंबून असते. यामुळेच त्याच्या समाधानाला उणेपणा येतो. म्हणून जोपर्यंत देहबुद्धीचा संग सुटत नाही तोपर्यंत आनंदमय असलेल्या आत्मस्वरूपाचा जीवाला अनुभव येत नाही. नि:संग झालेल्या ‘खऱ्या मी’ ला भगवंताच्या चरणी समर्पित करणे हाच आत्मसाक्षात्काराचा राजमार्ग आहे. शरणागतीची ही युक्ती ज्याला साधते, त्याच्या जीवनात अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात. 

असा आत्मज्ञानी पुरुष देहात असूनही अलिप्तपणे राहून विदेहस्थिती भोगतो. कर्मफल कोणतेही असो, अनुकूल किंवा प्रतिकूल असे न मानता; जे आपल्या वाट्याला येईल ते आनंदाने स्वीकारतो. हीच त्याची सहज स्थिती असते. एकदा का साधक मनाच्या निर्विकल्प अवस्थेला पोहोचला की तेथे मन शिल्लकच रहात नाही. मग ‘आनंदाचे डोही । आनंद तरंग’ अशी त्याची अवस्था होऊन जाते. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात,

“संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।

सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तहि येकरुप ।। ४-४-८ ।।”

या सातही संकेताद्वारे साधक अखंड समाधानाची स्थिती अनुभवू शकतो.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language