समर्थांनी रचलेले हे तिसरे भीमरूपी स्तोत्र, म्हणजे त्यांनी केलेले मारुतीच्या रुद्र रूपाचे वर्णन होय. चाफळ पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या माजगाव येथे समर्थांनी वीर मारुतीची स्थापना केली. या मारुतीचे सुद्धा वळलेले आणि उंचावलेले शेपूट त्याच्या धाडसी स्वभावाचे प्रतीक आहे. शेपूट गुंडाळलेला दुबळा, हताश, दुःखी असा तो नाही. तर, विद्युल्लतेप्रमाणे आहे. दुर्बलतेवर प्रहार करायला शिकवणारा हा माजगावचा मारुती आहे. माजगाव म्हणजे माझं गाव, असं वाटणारं हे गाव आणि गावाला सतर्कपणे पहारा देणारा, गावाच्या वेशीवर असणारा हा मारुती.
समर्थांच्या या तिसऱ्या स्तोत्रात, मारुती गदा घेऊन संकटाचा सामना करायला सज्ज आहे. ही गदा म्हणजे त्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आहे. मारुतीचा आपल्या इष्टदेवतेवर प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे. त्याचे उड्डाण अडचणींना दूर करून धैर्याने संकटाचा सामना करण्याचे शिकवते. माजगावच्या वेशीवर एक खूप मोठी शिळा होती. या शिळेवर वर्षानुवर्षे शेंदुराचा लेप लावून त्या शिळेलाच ग्रामरक्षक मारुती म्हणून गावकरी पूजा करीत. हा ग्रामरक्षक विध्वंसक वृत्तीचा संहार करणारा आहे. हनुमंत लंकेत सीतेला शोधण्यासाठी गेला तेव्हा त्याने अशोक वनाचा, लंकेचा विध्वंस केला. रावणाची अधर्मी विनाशी वृत्ती ठेचून रावणाला जरब देण्यासाठी तो सज्ज झाला. लंकेत आलेल्या संकटांना बुद्धी आणि बल वापरून मारुतीने यशस्वी रीतीने तोंड दिले. त्याच्या प्रत्येक कृतीत रामाच्या विधायक कार्याला समर्पित होण्याचा संकल्प होता. धर्म स्थापनेचा संकल्प होता. त्याचा तो आवेश समर्थांनी या स्तोत्रात वर्णन केला आहे. समर्थांनी या स्तोत्राची सुरुवातच आवेश पूर्ण केली आहे.
“कोपला रुद्र जे काळीं । ते काळीं पाहवेचि ना ।”
रुद्र, म्हणजे हनुमंत जर कोपला, म्हणजे त्याला राग आला तर त्याच्याकडे कोणीही बघू शकत नाही. त्याच्याकडे बघण्याचे सामर्थ्यच कोणाच्या डोळ्यात नाही, मग वाणीने वर्णन तरी कसे करावे. पुढे ते म्हणतात,
“बोलणे चालणे कैचें । ब्रह्मकल्पांत मांडिला ।”
त्याच्याकडे पाहिले, की जणू काही ब्रह्माण्डाचा प्रलय होतो की काय असे वाटावे. त्याच्या मूर्तीवरून हनुमंताची व्यापकता समजते. तो शत्रूवर आक्रमण करतो तेव्हा त्याचे डोळे रक्ताप्रमाणे लाल होतात. दातांचा जबडा आवळला जातो. आणि त्याचे हे रूप नुसते आठवले, तरी भक्ताच्या मनात निर्भयता येते. हनुमंताचा कोप, म्हणजेच राग आणि त्याचे फळ म्हणजे सीतामाईचा शोध, आणि समर्थाच्या कोपाचे फळ म्हणजे आनंदवनभुवनी वसलेले राज्य. दोघांच्याही मनाचा आवेश दाखवणारे हे स्तोत्र आहे.
स्वधर्माचे, स्वराष्ट्राचे, संरक्षण करण्यासाठी समाजाला स्वतःमधील परमेश्वराची ओळख होणे गरजेचे आहे. सह्याद्रीच्या कडे-कपारीत संघटना निर्माण करणे, धर्माभिमान जागृत करणे, स्वराज्य स्थापनेसाठी त्याचा उपयोग करून घेणे, आणि त्याचबरोबर मारुतीचे चरित्र आणि पराक्रम त्याचे गुणगान सामान्य माणसात भिनवणे सोपे नव्हते. पण समर्थांनी मारुतीची शक्ती, भक्ती आणि स्तोत्र याच्या अपूर्व संगमातून हे काम केले.
मारुतीचे शौर्य, धैर्य, वीर्य, चातुर्य यातून समाजापुढे एक महान आदर्श ठेवला. या मारुती स्तोत्रातून समर्थांच्या बलवान, पण तितक्याच प्रेमळ अंतःकरणाचे दर्शन होते. हे स्तोत्र म्हणताना आपल्या हृदयात सुद्धा तोच भाव निर्माण होतो. समर्थांचे अकरापैकी दहा मारुती हे वीर मारुती आहेत. एक हात हृदयावर ठेवलेला, पुच्छ माथ्यावर मुरडून आलेले, आणि दुसरा हात गदा हातात घेऊन सज्ज आहे. समर्थांची कुळवल्ली हनुमंत असल्याने समर्थ सुद्धा हनुमंताप्रमाणेच धर्म स्थापनेसाठी सरसावले आहेत. आपल्या मनातील संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी समर्थांनी माजगाव येथे या वीर मारुतीची स्थापना केली. मारुतीच्या रुद्र रूपाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात,
ब्रह्माण्डाहून जो मोठा । स्थूळ उंच भयानकु ।
तो ब्रह्माण्डाहून मोठा, स्थूल, उंच आणि भयानक आहे. हे सांगताना ते म्हणतात की त्याची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. क्रोध ही त्याची शक्ती आहे. आणि त्या आवेगात तो अचाट कार्य करतो. समर्थ म्हणतात की हनुमंताप्रमाणे क्रोध हा हितावह असावा, अन्यायाची चीड आणणारा असावा, त्या अन्यायाच्या विरुद्ध काम करण्याचे सामर्थ्य असावे. धर्माचरणावर कोणी आक्रमण करीत असेल तर मारुतीप्रमाणेच आवेश निर्माण व्हावा. हनुमंताच्या क्रोधाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात,
“मार्तंड मंडळा ऐसे । दोन्ही पिंगाक्ष पावले ।
कर्करा घर्डिल्या दाढा । उभे रोमांच उठिले ।।”
क्रोध आला की त्याचे दोन्ही डोळे सूर्या एवढे मोठे होतात, आणि तो करकरा दाढा आणि दात खातो. त्याला बघून अंगावर रोमांच उभे राहतात. संतापाने थरथरणाऱ्या शरीराने तो प्रचंड भूभूःकार करतो. त्या क्रोधामुळे असे वाटते की जणू काही भूमीवर मेघांचा प्रचंड गडगडाट होत आहे. गर्जनेने पर्वतांचे कडे कोसळत आहेत. समुद्र जलहीन झाले आहेत. पण एवढा पृथ्वी आणि आसमंत दणाणून टाकणारा क्रोध आणि आवेश कशासाठी, तर समर्थ या स्तोत्राच्या शेवटी सांगतात,
“धर्म संस्थापनेसाठी । दास तो उठिला बळे ।”
या ओळीतून समर्थांनी मारुती स्थापनेच्या मागचे रहस्य सुद्धा सांगितले आहे. ते म्हणतात की ही माती, हा धर्म तुझा आहे तर त्यावर परकीयांचा अंमल कशासाठी ? या परकीय दडपणातून मोकळा श्वास घ्यायचा असेल, धर्माचे रक्षण करायचे असेल तर सर्व शक्तीनिशी हा दास; समर्थ झाला पाहिजे. त्यासाठी फक्त मारुतीच्या पराक्रमाचे, चरित्राचे स्मरण करावे लागेल. मारुतीप्रमाणे अतुल्य बळ प्रत्येकात आहे हेच या स्तोत्रातून समर्थांना सांगायचे आहे. हा मारुती अपूर्व वीर्य, धैर्य, शक्ती, बुद्धी देतो. चाफळला हा मारुती पश्चिमेकडे रामाकडे तोंड करून उभा आहे. तो रामधर्माचे, रामकर्माचे, राम भक्तीचे, राक्षसी वृत्तीपासून डोळ्यात तेल घालून संरक्षण करीत आहे. रामप्राप्तीच्या वाटेवर चालणाऱ्या सगळ्यांचे हा मारुती रक्षण करतो. अंतकरणातील रामरायाला समजून घ्यावे. साधना करताना मोहाने, लोभाने, क्रोधाने मनाचे पतन होऊ नये म्हणून तो रक्षण करतो. मार्गदर्शन करतो. देहाभिमुख असणाऱ्या जीवाला रामाभिमुख होऊन ईश्वर प्राप्तीच्या मार्गात अडचणी येऊ नयेत म्हणून शक्ती देतो, बुद्धी देतो.
समर्थांच्या प्रत्येक मारुती स्तोत्रातून मिळणारे हे गुप्तधन आहे. मारुतीराया समोर वचनबद्ध होईल, राष्ट्राला घडविण्यासाठी विचाराने; कार्याने; धर्माने; कामाने प्रयत्न करेल त्यालाच ते धन सापडते. असे कार्य करणाऱ्यांबरोबर समर्थ आहेतच. रामराय सुद्धा आहेतच. म्हणून समर्थांच्या अकरा मारुती स्तोत्रांचा अभ्यास आणि परिचय करून घ्यायचा.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।