सहजस्थिती

सहजस्थिती
सौ. मानसी याडकीकर
  • November 30, 2025
  • 1 min read

सहजावस्था ही सिद्ध महापुरुषाची सर्वोच्च अवस्था होय. या अवस्थेमध्ये जीवाचा कर्म करणे किंवा न करणे यामागे कोणताही स्वार्थ नसतो. तसेच कर्म फळाविषयी सुख हवे, दुःख नको या भावना त्याच्या अंतकरणात उमटत नाहीत. त्यामुळे अनुकूल व प्रतिकूल घटनांमध्ये त्याची चित्तवृत्ती स्थिर असते. यालाच वेदांतात ‘सहजस्थिती’ म्हणतात. या अवस्थेचे वर्णन करतांना आपल्या ‘आगमसार’ या ग्रंथात प.पू. हंसराजस्वामी म्हणतात,

“जैसे प्रारब्धे देह व्यापारे । तैसे वर्तेना का बा रे ।

होय नव्हे करणे सरे । हे सहजस्थिती ।।”

दासबोधातील नवव्या दशकातही सहजस्थितीचे लक्षण स्पष्ट केलेले आहे. अनेक जन्मांच्या पूर्वसंस्कारामुळे जीवाला दृश्य जग खरे वाटते. ते डोळ्यांनी दिसते, अनुभवता येते. त्या संबंधाने त्याचे दैनंदिन व्यवहार होत असतात. त्यामुळे भ्रमाने जीव त्यात रममाण होतो. प्रारब्धानुसार देहाला, मनाला त्रिविध ताप भोगावे लागतात. यातून सुटण्यासाठी जीव अनेक आधार शोधतो. परंतु कुणीही यातून कायमचे सुटण्याचा मार्ग दाखवू शकत नाही. कुठलीच गोष्ट मनुष्याला शाश्वत, अखंड समाधान देऊ शकत नाही. समाधान हे ‘साधूजनाचेनी योगे’च प्राप्त होत असल्यामुळे आधी संतांची संगत धरली पाहिजे.

“सुन्यत्वातीत शुद्धज्ञान । तेणें जालें समाधान ।

ऐक्यरूपें अभिन्न । सहजस्थिती ।। ६-१०-३९ ।।”

आत्मज्ञानी संतच आपल्याला ‘मीपणा’ तून बाहेर येण्याची कला शिकवतात. त्यासाठी आधी वृत्ती सर्व मायिक पसाऱ्यातून निवृत्त करावी लागते. मग वासनांचा समूळ नाश होतो. ‘राम कर्ता’ म्हणून कर्म केले की, कर्तृत्व; भोक्तृत्व; भ्रांतीतून सुटका होते. ‘खरा मी कोण’ याचे एकदा निश्चयरूप ज्ञान झाले की जीव देहाद्वारे होणाऱ्या सर्व व्यवहाराकडे अलिप्तपणे बघू लागतो. याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

“माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेलें ।

तया पाणिया ऐसें केलें । होआवें गा ।। १२- १२० ।।”

पाण्याचा गुणधर्म सरळ वहाणे हा आहे. परंतु माळी जसे वळण देईल तसे ते निमूटपणे वहाते. त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म करताना भगवंताची इच्छा समजून वागले तर मनात कुठलेच संकल्प-विकल्प निर्माण होत नाहीत. अशी सहजस्थिती प्राप्त झालेला साधक प्रारब्ध असेपर्यंत अखंड आनंदात जीवन व्यतीत करतो. त्याची देहाबद्दलची आसक्ती, जगाबद्दलची ओढ आणि कर्तृत्वाची/कर्तेपणाची भावना पूर्णपणे नाहीशी झालेली असते. स्वतःच्या देह व अंतःकरणाचे व्यवहार बाधित झालेले असतात. बाधित होणे म्हणजे दृश्य जग हे परिवर्तनशील असून येथील एकही गोष्ट टिकाऊ नाही व जे दिसते तो केवळ भास आहे, असा बुद्धीचा पक्का निश्चय होणे.

“बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण ।

ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ।। ज्ञाने. ५-८७  ।।”

असा निश्चय मनात दृढ झाला की, देह, मन व बुद्धीचे सर्व व्यवहार त्रयस्थपणे होतात. जीव सुखदुःखात अडकत नाही. अशी सहजस्थिती लाभलेले ज्वलंत उदाहरण म्हणजे राजा जनक. त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग असा –

एकदा जनकाच्या नगरीला आग लागली आणि त्यांच्या पायाला चटका बसला. तेव्हा ते म्हणाले, “माझा पाय जळतो आहे, परंतु माझ्या आत्म्याला काहीही झालेले नाही. म्हणजे राजा जनकाने ज्ञानाची अंतिम अवस्था प्राप्त केली होती. जे विषय ‘असार’ आहेत म्हणजे मृगजळाप्रमाणे ‘मिथ्या’ आहेत हे कळल्यानंतर त्या विषयांबद्दल कुठल्याच प्रकारची आसक्ती शिल्लक रहात नाही. ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणे ब्रह्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट संपते. सहजस्थिती ही अंतःकरणाची अवस्था आहे. हिचा संबंध अंतरंगाशी आहे. सर्वसामान्य मनुष्याचा व ज्ञानी पुरुषाचा देह वरकरणी जरी सारखा दिसत असला तरी, मुख्यत्वे त्यांच्या मनोभूमिकेत फरक असतो.

“देह भावितां देहचि दिसे । परी अंतर अनारिसें असे ।

तयास शोधितां नसे । जन्ममरण ।। ९-३-२४ ।।”

त्यांच्या ठिकाणी अविद्येचा मागमूसही नसतो. देहधारी असल्यामुळे त्यांच्याही वाट्याला नाना प्रकारच्या यातना, दुःखे व संकटे येतात हे उघडपणे दिसते. परंतु ‘मी ब्रह्म आहे’ या निश्चयापासून ज्ञानी पुरुष कधीही ढळत नसल्यामुळे ते जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकत नाहीत. संत तुकाराम महाराजांनी जातीयतेचे चटके, आर्थिक दिवाळखोरी, आप्तांचे मृत्यू इत्यादी प्रकारचे आत्यंतिक दुःख सहन केले. तरी भोगून-अभोक्ता अशीच त्यांच्या अंतःकरणाची स्थिती होती. परमात्म्याच्या स्वरूपासंबंधीची किंवा भगवत्प्राप्तीची अनावर ओढ हळूहळू त्यांना ऐहिक जगाच्या आसक्तीपासून दूर घेऊन गेली. त्यामुळे संसार करीत असूनही ते त्यापासून अलिप्तच राहिले. सहजस्थिती व अलिप्तपण ही नित्यमुक्ताची लक्षणे त्यांच्या अंगी पुरेपूर भरलेली होती. अशाप्रकारे जीवन मुक्त हा भजनात तल्लीन झालेला असो की भोगात रमलेला दिसो, तो अंतर्बाह्य मोकळाच असतो. याविषयी एकनाथ महाराज म्हणतात,

“अथवा तो इंद्रियसंगती । दैवे अनेक विषयप्राप्ती ।

भोगीताही अहोराती । ब्रह्मस्थिती भंगेना ।। ए.भा. २८-३२९ ।।”

अशा पुरुषाला विषयांचे ध्यान नसते. त्यामुळे त्याला त्यांचा संग नसतो. संग नसल्याने काहीतरी मिळावे अशी इच्छा नसते. तरी प्रारब्धामुळे त्याला भोग भोगावेच लागतात. परंतु आत्मज्ञानी पुरुष नित्यतृप्त व सुखरूप असल्याने त्याला भोगातून सुख मिळण्याची अपेक्षा नसते. प्रतिकूल भोगातून दुःख वाट्याला येईल अशी भीतीही नसते. भोग कमी किंवा जास्त मिळाले तरी त्याबद्दल खंत नसते.

स्वामी विवेकानंदांना परदेशात कधी उपाशी पोटी रहावे लागले तर कधी राजे, महाराजांकडे स्वादिष्ट रुचकर पक्वान्नेही खायला मिळाली, कधी पायपीट करावी लागली तर कधी बोटीचा प्रवासही झाला. परंतु याही परिस्थितीत त्यांची मन:शांती भंग पावली नाही. सहज स्थिती ही अशी अवस्था आहे, की त्यात नाशिवंत पदार्थांचे वृत्तीने जरी ज्ञान होत असले तरी पदार्थ व वृत्ती बाधित होऊन वस्तूतंत्र आत्मा अनुभव रूपाने रहातो. अंतकरणासह दृश्य जग भ्रामक, नश्वर आहे या दृढ, स्थिर व प्रत्यक्ष निश्चयामुळे कुठलेही कार्य करीत असताना किंवा कुठल्याही कार्यामुळे सहज स्थिती बदलत नाही. या स्थितीत राहून संतांनी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता, 

“ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ।।”

या भूमिकेतून जगदुद्धाराचे महान कार्य केले. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language