प. पू. आक्कांच्या स्वभावाचे दोन पैलू (प्रेमळ आणि कर्तव्यकठोर आक्का)

प. पू. आक्कांच्या स्वभावाचे दोन पैलू (प्रेमळ आणि कर्तव्यकठोर आक्का)
श्री. अनिल वाकणकर
  • October 21, 2025
  • 0 min read

परमपूज्य आक्का यांना मी जवळपास चार ते पांच वेळा भेटलो आणि त्यांचा सहवास अनुभवला आहे. त्यांचा स्वभाव कोकणातील फणसासारखा किंवा गोड शहाळ्यासारखा होता. त्यांनी कठोरपणाचा मुखवटा धारण केलेला होता. परंतु जेव्हा त्यांचा सहवास प्राप्त होतो तेव्हा त्यांच्यातील प्रेमळपणा जाणवतो. त्यांची माझी पहिला भेट पत्ररुपाने झाली होती. त्यांच्या त्या पत्रातील मजकूरावरून, हातात काठी घेऊन ऊभ्या असलेल्या कडक हेडमास्तरांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर ऊभी राहीली होती. वास्तविक संत हे अतिशय प्रेमळच असतात, मात्र उगीचच कुणीही मागे लागू नये म्हणून रागीट असल्याचा आव आणतात, हे आपण अनेक संताच्या चरित्रात वाचलेले आहे. संत सर्वच अज्ञानी जनांविषयी करूणा बाळगतात. त्या सर्व अज्ञानी जीवांना योग्य मार्ग मिळावा म्हणून प्रसंगी कठोर होतात. त्यांची ही प्रीति ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ।। अशी असते.  

माझे पत्रद्वारा दासबोध अभ्यासचे तिसरे वर्ष संपत आले होते. त्यादरम्यान सज्जनगड मासिक पत्रिके मध्ये दासबोधाचा सखोल अभ्यास बद्दल एका छोट्या चौकटीत माहिती आली होती. ती वाचल्यावर मला तो अभ्यासक्रम करावा अशी इच्छा झाली. या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती मिळावी म्हणून मी परमपूज्य आक्कांना त्यांच्या अंबरनाथच्या पत्यावर एक पत्र टाकले. त्या पत्रात मी माझ्या अभ्यासक्रमासंबधी सर्व शंका विचारल्या होत्या. त्या माझ्या पत्रावर आक्कांनी देखील सविस्तर उत्तर पाठविले होते. ही आमची पहिली अप्रत्यक्ष भेट.

त्या पत्रातील मजकूराचा गोषवार पुढील प्रमाणे होता. त्यातील पहिलेच वाक्य थेट घाव घालणारेच होते. आपले पत्र पोहोचले. प्रश्नपत्रिकेच्या पुस्तकांत फक्त प्रश्नच असणार! आपणास दा. स. अ. बद्दल ज्यांनी माहिती दिली त्यांनी संपूर्ण माहिती दिली नाही. म्हणून हा पत्रव्यवहार वाढला. अभ्यासाकरिता फी नाही. पण फी पेक्षा सुध्दा महत्वाची अट एकच की, संपूर्ण २०० समासांचा अभ्यास करण्यास ८ वर्षे ४ महिने वा अधिक काळ लागणार. प्रपंचात अडचणी असतातच. तरी एकदा सुरु केल्यानंतर कोणत्याही सबबीस्तव बंद करता येणार नाही. हे कटाक्षाने मान्य असेल तरच भाग घ्यावा. प्रबोध पूर्ण झाला की, अभ्यासास सुरवात करुन चालेल. या प्रश्नाचे उत्तर आपण सांगावे.  मला येत नाही, असले उत्तर सखोल अभ्यासात नकोच नको. मात्र दोनपेक्षा जास्त स्वाध्याय कधीच पाठवायचे नाहित. पत्रामधील मजकूरावरुन त्या खूप कडक स्वभावाच्या असाव्यात अशी त्यांची प्रतिमा मनांत निर्माण झाली. त्यानंतर पहिले दोन स्वाध्याय त्यांच्याकडे पाठिविल्यानंतर  त्यांनी मला खोपोलीच्या सौ उज्वला दाबके यांच्याकडे पुढील स्वाध्याय पाठविण्यास सांगितले. त्या देखिल आक्कांच्या अनुग्रहित होत्या. हल्लीच त्या वारल्या असे समजले. 

नियमित स्वाध्याय पाठविण्यास सुरवात झाल्यानंतर सौ. दाबके यांनी शिवथर घळीतिल साधना सप्ताहा संबधी माहिती दिली. त्या सप्ताहास आवर्जुन हजर राहण्याविषयी सूचना केली. त्यांच्या सूचनेनंतर  घळीत सप्ताहाला कोजागिरीच्या दिवशी संध्याकाळी हजर झालो.  त्यावेळी आक्का रेल्वेने वीर रेल्वे स्टेशनला येत असत तेथुन शिवथरला असा त्यांचा प्रवास असायचा. येताना त्या मोठ्या प्रमाणात भाजी घेऊन येत असत. मी घळीत आलो तेव्हा कल्याण मंडपात सर्व अभ्यासार्थी हजर होते. मुखाने रामनाम आणि हाताने भाजी निवडण्याचे काम तेव्हा चालू होते. त्यावेळी आक्कांचे प्रथम प्रत्यक्ष दर्शन झाले. स्वत: आक्का देखिल भाजी निवडत होत्या. त्यावेळी सप्ताहाला पुरुषवर्ग फार कमी असायचा. तेथे बसलेल्या पुरुषांच्या रांगेत शेवटी मी बसलो आणि भाजी निवडण्याचे कामाला लागलो. सर्व भाजी निवडुन झाल्यावर ती रामनामाच्या गजरात एकत्र केली जायची.  

त्याच दिवशी रात्री कोजागिरी निमित्ताने निरनिराळे खेळ खेळले जात होते. परंतु तेथे बहूसंख्येने महिला असल्यामुळे मी जरा लांब लांबच होतो. परंतु आक्कांच्या चाणाक्ष नजरेने ते हेरले आणि मला त्या खेळात यायला लावले. लहान मुले खेळतात तसा एकमेकांचा पदर धरुन आगगाडीचे खेळ चालू होता. परत तोच संकोच आड येत होता. तेव्हा आक्कांनी मला त्यांचाच पदर धरुन त्या खेळात भाग घ्यायला लावला. अशा रितीने मी आक्कांचा पदर धरुनच या उपक्रमात सामिल झाला असे म्हणता येईल. त्यानंतर त्याच दिवशी अचानक वारा सुटल्याने माझ्या डोळ्यात काही कचरा गेला होता. तो काढण्याकरीता मी डोळा चोळायला लागलो होतो. ते बघुन आक्कांनी स्वत:च परत त्यांच्या पदराच्या शेवाने माझ्या डोळ्यातील तो कचरा काढला. हे दोन प्रसंग हा योगायोग होता की, त्यातुन आक्कांना मला काही सूचवायचे होते हा प्रश्न आता मला पडतो. 

माझ्या सारख्या असंख्य अज्ञानी अभ्यासार्थिंच्या डोळ्यांत गेलेला कचरा त्यांनी काढला आहे. कदाचित पदर धरुन खेळात सामिल करुन घेणे अथवा डोळ्यांत गेलेला कचरा पदराने साफ करणे असो या कृतीद्वारे त्यांनी मला या परिवारात मायेने आणले. मी माझ्या आईचा पदर कधी धरलेला मला आठवत नाही. परंतु या गुरुमाऊलीने मात्र तो अनुभव दिला. त्यांच्या या प्रेमळ स्वभावाचा पैलू मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला आणि माझ्या मनांत त्यांची असलेली प्रतिमा एकदम बदलून गेली. आक्का कल्याण मंडपात घळीकडे जाणाऱ्या दरवाजाच्या बाजूला बसलेल्या असत. त्यांची तीक्ष्ण नजर सर्वत्र फिरत असे. काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्या पाटीवर लिहून दिल्यावर त्या प्रश्न विचारणाऱ्याचे समाधान होईपर्यंत त्याचे उत्तर किंवा स्पष्टीकरण सांगत असत. जर प्रश्न कॉमन असेल तर प्रवचनांत देखील सांगत असत. त्यावेळी विवेकसिंधूवर प्रवचन देत असत. त्यांच्या त्या प्रवचनात दिवसभरात इतर कार्यक्रमांत साधकांनी केलेल्या काही आगळीका असतील त्याचा त्या थेट उल्लेख न करता पुराणातील दाखल्यांच्या स्वरूपात सांगत असत.

याच साधना सप्ताहात घळीतील समर्थ आणि कल्याण स्वामी यांच्या साक्षीने त्यांनी मला अनुग्रह दिला. त्यानंतर माझ्या नकळत त्या माझा फॉलोअप घेत असत. माझ्या त्यावेळच्या समिक्षक कै. सौ. उज्वला दाबके यांच्या पत्रातुन ते समजत असे. एकदा मी अंबरनाथ येथील त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे मंदिरात कलावती आई यांचे भजन चालू होते. आक्का त्यावेळी त्यांच्या बेडवर बसुन काहीतरी लिहित होत्या. भजन चालू होते म्हणून मी गप्प बसलो होतो. परंतु त्यांनी मला भजन चालू असले तरी बोलायला हरकत नाही असे सूचवले. त्यावेळी त्या पडवीवरचा दासबोध हे पुस्तक लिहीत होत्या. मी त्यांच्या ज्ञानापुढे हिऱ्यापुढे काच असावी असा होतो. परंतु तरीही त्यांनी आपल्या हातातली डायरी मला वाचायला दिली आणि माझे त्यावरचे मत विचारले. वास्तविक त्यांच्या लेखनावर काही अभिप्राय देण्याएवढी माझी लायकीही नव्हती. तरीही त्यांनी मला माझे मत विचारले. त्यावर मी काही तरी गुळमुळित उत्तर दिले. ही त्यांची माझी शेवटची भेट होती.   

मला परमपूज्य आक्कांच्या कठोर किंवा रागिट बाजूचा अनुभव आलाच नाही असे म्हटले तरी चालेल. त्या खरोखरच शहाळ्यासारख्या मधूर स्वभावाच्या होत्या. त्यांनी महिन्याला किती स्वाध्याय पाठवायचे याचा नियम ठरवला होता. त्याबाबतीत त्या काटेखोर देखील होत्या. मात्र त्याला अपवाद केलेला देखील मी पाहिला आहे. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाला एकेचाळीस पूर्ण होण्याच्या कालात, मला आलेला परमपूज्य आक्कांच्या सहवाचा अनुभव मला शेअर करायला परवानगी दिल्या बद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करून विराम घेतो. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language