अग्नि निरुपण

अग्नि निरुपण
सौ. पुष्पाताई कदम
  • July 12, 2025
  • 1 min read

सप्ततिन्वय या १६ व्या दशकात समास ५ ‘अग्नि निरुपण’ समर्थांनी वर्णन केला आहे. सप्तसप्ति असे सूर्याचे एक नांव आहे. सूर्य आपल्याला उष्णता व प्रकाश देतो. उपासनेच्या पातळीवर असणाऱ्या प्रत्येक साधकाला आत्मानात्मविवेक आणि सारासार विचार करावा लागतो.

अग्नि आपल्या रोजच्या वापरात असतो. अग्नि शिवाय आपला एक दिवसही चालणार नाही. प्रभूरामचंद्भगवान व सुग्रीव यांची मैत्री अग्निच्या साक्षीनेच झाली होती. आपल्या मुला मुलींचे विवाह, अग्निला साक्षी मानूनच होतात. लग्नात अग्नीच्या सहाय्याने फटाके उडवतात व आनंद व्यक्त करतात. 

अग्नी हे सीतेचे वडिल होत. रामचंद्रांचे सासरे होत. १४ वर्षे वनवासातून प्रभूरामचंद्र आले तेव्हा, सीतामातेला अग्नीपरीक्षा द्यावी लागली होती. त्यावेळी अग्नी प्रकट झाले व रामांना म्हणाले ही माझी कन्या आहे. रावणाकडे अशोक वनांत राहिली तरी ती पवित्र आहे.

पूर्वीच्या काळी काडेपेटीचा शोध लागला नव्हता, तेव्हा गारगोटी एकमेकावर घासून, आग तयार करत. मानव त्या अग्निवरच मांस भाजून खात असे. थंडीत शेकण्यासाठी आगीची गरज लागते. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक वापरली तर तिचा चांगलाच उपयोग होतो, अन्यथा उन्हाळयात आगी लागण्याचे प्रकार आपण पहातोच. 

“धन्य धन्य हा वैश्वानरु  । होये रघुनाथाचा श्वशुरु  । विश्वव्यापक विश्वंभरू । पिता जानकीचा ।। १६-५-१ ।।” प्राचीन आर्य हे अग्निपूजक होते. भारतीय संस्कृती मध्ये अग्नीला ३ देवांचे प्रतिनिधी मानतात. याला ३ पाय, ६ हात आहेत. अग्निने  दिलेल्या उष्णतेने माणसाच्या शरीरातील सर्व क्रिया चालतात. अग्नि अत्यंत पवित्र आहे. तो अंत्यजाच्या घरचा जरी वापरला तरी तो पवित्रच आहे. अग्नि अंधार, थंडी, रोग निवारण करतो. अग्निमुळे सृष्टी चालते. त्याच्यामुळे लोक जिवंत रहातात व तृप्त होतात. अग्नि विश्व व्यापून आहे, तो जगाचे व जिवांचे पोषण करतो. तो ईश्वराचे मुख आहे. 

ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायात, जेव्हा भगवंतानी अर्जुनाला दर्शन दिले, तेव्हा भगवंताच्या, मुखातून अग्नि बाहेर पडत होता. कारण अग्नि भगवंताचे मुख आहे. म्हणूनच होळीची पोळी आपण अग्नित टाकतो, तो अति पवित्र आहे. सर्व यज्ञयाग अग्निमुळे चालतात. ऋषींना तपश्चर्येचे फळ तोच देतो. पृथ्वी अग्निपासून निर्माण झाली. देहाला तोच व्यापून राहतो, त्याच्या मुळेच भूक लागते.

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: ।

प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ।। गीता १५-१४ ।।

बरोबर बारा वाजता आपल्याला भूक लागते. कारण नाभिस्थानावर वैश्वानर म्हणजे अग्निच विराजमान आहेत. आपण जे जे खातो ते सर्व अन्न पचविण्याचे काम तो करतो. चतुर्विध म्हणजे भक्ष्य, भोज्य, लेह्य, चोष्य असे चार प्रकारचे अन्न तो पचवतो. भक्ष्य म्हणजे पोळी, भात, वरण अशा प्रकारचे अन्न. भोज्य म्हणजे लाडू, जिलेबी, श्रीखंड, बासुंदी असे पदार्थ. लेह्य म्हणजे ताक, सांबार असे पातळ पदार्थ. चोष्य म्हणजे चोखून खायचे पदार्थ. उदा. आंबा, जांभूळ. आपण शेंगदाणे, फुटाणे असे कडक पदार्थ खातो तरी पचतात. ऊस दाताने खातो. काहीही खा, वैश्वानर पचवतो. भाजी, भाकरीचे लालभडक रक्त तयार होते. हे विशेष आहे की नाही ? 

दिवे अग्नीच्या सहाय्याने लागतात व जळतात. अंधारात व थंडीत तोच उपयोगी पडतो. त्याच्या जोरावर शत्रूस जिंकता येते. ऊष्ण औषधाने रोग हरण होतात. महारोग देखील बरा होतो. अग्नि जसा उपाय करतो, तसा अपाय पण करतो. सूर्य व अग्नी ही मोठी दैवते आहेत. जिवंतपणी जसे तो रक्षण करतो, तसेच मेल्यावर देहाचे भस्म करतो. जगात अग्नीदिव्य प्रसिध्दच आहे. अष्टधाप्रकृति व तिन्ही लोक अग्नीने व्यापले आहेत. 

सूर्य सकळांहून विशेष | सूर्याउपरी अग्नीप्रकाश |

रात्रभागीं लोक अग्नीस | साहें करिती || १६-५-११ ||

सूर्य मावळल्यावरही अग्नीच प्रकाश देतो. रात्रीच्या वेळी लोक अग्नीचीच मदत घेतात.

माऊली म्हणते, “म्हणूनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां । आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ।। ज्ञानेश्वरी ६-५१।।” अग्नीसेवा न सोडता, किंवा कर्माची मर्यादा न ओलांडता, आपले योगसुख आपल्याजवळच आहे. अग्नीमुळे सृष्टी चालते. अग्नीमुळे लोक तृप्त होतात. अंगातील उष्णता नाहिशी झाली तर सगळे प्राणी मरून जातात. प्रथम देहातील अग्नि मंद होतो, नंतर प्राण्याची प्रकृति बिघडते.

युध्दाचे वेळी मिसाईल म्हणजे क्षेपणास्त्र यात अग्निच असतो. अग्नी तृप्त झाला की, मग तो अति प्रसन्न होतो. देव‌, दानव, मानव या सर्वांचे व्यवहार अग्नीच्या बळावरच चालतात. सर्व लोकांना अग्नी हाच तारक उपाय आहे. जगात मोठमोठ्या यात्रा भरतात, त्या दारुकामानेच शोभतात.

सूर्य व अग्नि हे ब्राह्मणाचे सर्वस्व होय. “लोकामध्यें जठरानळु | सागरीं आहे वडवनाळु | भूगोळाबाहेर आवर्णानळु | शिवनेत्रीं विद्युल्यता || १६-५-१८ |”| शरीरात जठराग्नी असतो. सागरामध्ये वडवानल असतो. भूगोलाबाहेर आवरणानल असतो. आणि शंकराच्या डोळ्यात वीजरूपी अग्नी असतो. काचेतून अग्नी निघतो. तसा तो आरशातूनही प्रकट होतो. लाकडावर लाकूड घासल्याने आणि चकमकीने अग्नी प्रकट होतो. आग्या सर्पाच्या तोंडातील अग्नी डोंगरदऱ्या जाळून टाकतो.

अष्टधा प्रकुर्तीं लोक तिन्ही । सकळ व्यापून राहिला वन्ही । अगाध महिमा वदनीं । किती म्हणोनी बोलावा ।। १६-५-२८ ।।” तिन्ही लोक व अष्टधा प्रकृती यास अग्नीने व्यापले आहे. त्याचा महिमा मुखाने किती वर्णन करावा ? प्रलयकाळचा अग्नी सर्व सृष्टीचा संहार करतो. त्या अग्नीपुढे काही शिल्लक रहात नाही. दिपाराधने आणि निरांजने पेटवून लोक देवाला ओवाळतात. अग्नीदिव्य करूनच खरे खोटे, न्याय निवा‌डा होत असतो. कडकडीत तापलेल्या तेलात सोन्याचे नाणे टाकायचे, व हाताच्या बोटांनी ते बाहेर काढायचे, हे अग्नीदिव्य  होय.

समर्थांनी अग्नीचे वर्णन छान केले आहे. अग्नीशिवाय आपले काहीच चालत नाही. कामाग्नी, क्रोधाग्नी, भडाग्नी असे अग्निचे अनेक प्रकार आहेत. पुरुरव्याने पुढे तीन अग्नीचा शोध लावला. गार्हपत्य (घरातही चोवीस तास असलेला), आहवनिय (यज्ञ कार्यासाठी गृहपत्नीने आणावयाचा), तिसरा दाक्षिणाग्नी असे अग्नीचे प्रकार आहेत. 

संत श्रीगजानन महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग आहे. गजानन महाराज मुलांबरोबर संवाद साधत होते तेव्हा त्यांना चिलिम ओढण्याकरीता अग्नि हवा होता, म्हणून त्यांनी मुलांना जवळच्याच सोनाराकडून अग्नि आणायला सांगितला. परंतु त्या जानकीराम सोनाराने अग्नि देण्यास नकार दिला. म्हणून महाराजांनी मुलांना चिलमीवर नुसती काडी धरायला सांगितली. तेव्हा अग्नि प्रकट झाला आणि चिलिम धूर सोडू लागली.

ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, “जयाचेनि बोले धर्मु जिये । दिठी महासिध्दिते विये । देख स्वर्गसुखादि ईये । खेळू जयाचा ।।” ज्यांच्या बोलण्याने धर्म जागतो, त्या संतांची नुसती दृष्टि महासिध्दीना जन्म देते. “मूळव्दारी दादा स्थापिला गणपती । माया ही उत्पत्ती कैशी झाली । वेदाचें जन्मस्थान तेंचि बाई । दहा पवनांचा एक झाला मेळा । रेणूचा जिव्हाळा सर्वांसी हा ।।” दहा पवन म्हणजे पंचतन्मात्रा व पंचमहाभूते ध्यानात हे सर्व एक होते. अणू म्हणजे माया. रेणू म्हणजे चित्शक्ती. सूर्य धगधगीत आहे. त्याची उर्जा मूळ स्वयंभू आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language