हरीचिंतने मुक्तिकांता वरावी

हरीचिंतने मुक्तिकांता वरावी
श्रीमती. सीमाताई रिसबूड
  • May 4, 2025
  • 1 min read

मुक्ति नावाच्या वधूशी भक्त विवाह करतो व जीव–शिव ऐक्य भोगतो. प्रपंचात द्रव्य, कांता, देहसुख, मी, माझे, या कल्पनांचे वर्चस्व असते. आदर्श गृहस्थाश्रमाचे वर्णन समर्थ “संसारी असताच मुक्त | तो चि जाणावा संयुक्त | अखंड पाहे युक्तायुक्त | विचारणा हे” या ओवीत करतात. गृहस्थाश्रमात त्याग, समर्पण, आनंद, प्रयत्न, प्रेम, आपुलकी याला स्थान दिले तर असा गृहस्थ व त्याची पत्नी संन्यासीच असतात. ही कल्पना “मुक्तिकांता वरावी” या चरणात आहे. संत तुकाराम म्हणतात “ तुका म्हणे मुक्ति परिणली नोवरी | आता दिस चारी खेळीमेळी | म्हणजे आता मुक्ति नावाच्या स्त्रीशी मी विवाह केला आहे. या वैवाहीक जीवनात फक्त सुख व समाधानच आहे. 

आद्य शंकराचार्य म्हणतात “ योग रतो वा भोग रतो वा | संगस्तो वां संगविहीन | यस्य  ब्रह्मणि रमते चित्त | नंद ति नंद ति नन्द्त्येव” म्हणजे ज्याची अंत:करण वृत्ती ब्रह्मानुसंधानात रमलेली आहे तो भोगात रमलेला असला किंवा एकांतात असला तो पूर्णानंदात आनंदरूपच असतो. जनक राजा , मंडन मिश्र, अत्री अनूसूया, श्रीराम-सीता, शंकर-पार्वती यांचे गृहस्थाश्रम याच प्रकारचे होते. 

कल्याण स्वामी एका अभंगात म्हणतात “ आवडी म्या व रिला | गुरु वर आवडी म्या वरिला| स्वात्मसुखाचे कुंकुम लेऊनी | संसृतिशीण हरिला.  समर्थांनी दासबोध सांगितला.  कल्याण स्वामींनी लिहिला. त्या नंतर शिष्यांमधील मीपणा जाऊन वृत्ती पालटावी म्हणून आत्माराम ग्रंथ लिहिला. कल्याण स्वामींना कुंडलिनी जागृतीचा अनुभव दिला. तो त्यांनी सोलिव सुखात शब्दबद्ध केला. आज्ञाचक्रात आत्मज्ञानाची अनुभूती मिळाली. त्यांना चारी देहांचा विसर पडला, उन्मनी अवस्था अनुभवली, आत्म्याशी अंत:करण वृत्ती एकरूप झाली. वृत्ती शून्य अवस्थेचा अनुभव आला. गुरुरूपी अंतरात्म्यात त्यांचा आत्मा विलीन झाला. अद्वैत अवस्थेचे वर्णन कल्याण स्वामी करतात. “एकपण एकचि झाले | ऐक्यरूपी सम मिळाले | करुनिया सुख उधळले | नाहीपण जाऊनी” समर्थांच्या अवतार समाप्तीनंतरही समर्थांच्या व कल्याण स्वामींच्या आस्थींचे विसर्जन एकाच वेळी झाले. 

रुक्मिणी व श्रीकृष्णाचा विवाह म्हणजे शुद्ध जीव-ईश्वर यांचा विवाह होता. श्रीकृष्ण गोपाळ म्हणजे जितेंद्रिय होते. रुक्मिणी निरपेक्ष, निष्काम, विकाररहित, निर्विकार, सद्गुणी, सुंदर, चतुर होती. तिने सहा श्लोकात भगवंताच्या ऐश्वर्य, यश श्री, ज्ञान, वैराग्य, विवेक या सहा गुणांचे वर्णन केले. सातव्यात विनंती केली असा हा सप्तपदी संबंध होता. पत्र फक्त सात श्लोकांचे पण भक्ति भावाने त्यातील अक्षर व भाषा भरलेली होती. जणू तिने छोट्या घागरीत भक्तीचा पूर्ण सागर भरला होता. जीव जेव्हा ईश्वराशी विवाह करतो तेव्हाच कृतार्थ होतो. रुक्मिणी भगवंताची “आद्य शक्ति होती. ती अनन्य होती. श्रीकृष्णाशी विवाह नाही झाला तर ती शरीर त्याग करणार होती. तिचे पत्र नेणाराही “सुदेव” ब्राह्मण होता. सद्गुरूकृपेशिवाय जीव शिवमय होत नाही. 

रासक्रीडेत गोपींच्या सूक्ष्म देहाचे आत्ममिलन होते. गोपींनी विषयांचा, कामविकारांचा, त्याग केलेला होता. गोपी पांच भौतिक शरीराने घरी होत्या. प्रभूची रासलीला शुद्ध प्रेमाची होती. “हरिचिंतने मुक्ति कांता वरावी” याचे चिंतन करतांना मुक्तिकांतेचे रूपकात्मक वर्णन करू शकतो. ही कांता स्वात्मसुखाचे कुंकू आज्ञा चक्रावर दोन भुवयांमध्ये लावते. आत्मबुद्धीची पैठणी नेसते. “ बहू जीर्ण झाली देह बुद्धी कंथा” या वचनाप्रमाणे देहबुद्धी नष्ट करते. नवविधा भक्तीचा रत्नाहार घालते. सहस्रधर चक्रावर बिंदी घालते. विवेक-वैराग्याची कुंडले कानी घालते. षट संपत्तीच्या बांगड्या  (शम, दम, तितिक्षा, उपरम, श्रद्धा, समाधान) सारासार विचाराच्या पाटल्या घालणे अभेदाच्या वाक्या घालून मनातले भेद घालवते. परावाणीवर कंबरपट्टा घालते व सोsहं नादाची नथ घालते. मुक्तीसाठी या सर्व गोष्टी कराव्या लागतात. अद्वैताच्या फुलांच्या हाराने हा विवाह संपन्न होतो.

सर्व प्रकारच्या अज्ञानापासून, दु:खापासून, बंधनापासून, वासनांपासून, मोकळे होण्याची अवस्था म्हणजे मुक्ती त्यालाच अमृतत्वाची प्राप्ती, व कैवल्य असे म्हणतात. मीरेनी श्रीकृष्णाशी आध्यात्मिक विवाह करून ती मुक्त झाली. हरीचिंतने मुक्तिकान्ता वरावी या चरणात इतका अर्थ चिंतन करण्यासारखा आहे. 

आवडी म्या वरिला | गुरुवर आवडि म्या वरिला |

स्वात्म सुखाचे कुंकुम लेऊनि | संसृति शीण हरिला |

स्वात्म भूषणे भूषविले मज | संशय नच उरला |

गुरुकृपे कल्याणचि होईल | निश्चय मनी स्थिरला ||

                  

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language