षड् विकार

षड् विकार
सुमेधा बापट
  • May 3, 2025
  • 1 min read

विकार म्हणजे बदल ,फेरबदल परिवर्तन आणि चित्तक्षोभ.

आपल्या अध्यात्म शास्त्रात सहा विकार सांगितले आहेत.

अस्ति जायते वर्धते विपरणमिते क्षीयते आणि म्रीयते किंवा अस्तित्व, जन्म, वाढ, बदल, क्षीणता आणि मृत्यू हे सहा विकार कोणाला आहेत? तर जे निर्माण झालं त्या सगळ्यालाच. मग प्रश्न असा पडतो

जायतेच्या अगोदर अस्ति कसे काय आले? कसं काय?

पण असं पहा की माठ, सुगड, सुरई, रांजण इत्यादी वस्तू बनवण्यासाठी, त्या निर्माण करण्यासाठी आधी माती लागते. पाणी, कुंभार, त्याची तयार झालेली वस्तू पक्की करायला अग्नी हे सगळंच लागतं हे खरं आहे. पण माती असल्याशिवाय काहीच बनवता येणार नाही हेही तितकच खरं म्हणजे मातीचे अस्तित्व आधी असायला हवं. निरनिराळी वस्त्रे बनवायला धागा, यंत्र, कुशल कारागीर आणि मुख्य म्हणजे कापूस हवा. म्हणजे कापूस असल्याशिवाय बाकी काही होणार नाही. तसे, अलंकार बनवायचे तर सोने  असल्याशिवाय ते बनणार नाहीत. म्हणजे माती, पाणी, सोनं हे सारच अस्तित्वात आल्याशिवाय कारागीर   कितीही कुशल असला तरी त्याचा उपयोग नाही. आता आणखी काही उदाहरण बघू दुधाचं दही होणं, कैरीचा आंबा होण किंवा कच्च फळ  पक्व होणे, धान्य शिजवणं, भाज्या शिजवून अन्न तयार करणे हे सारे विकारच आहेत लौकिक भाषेत आपण त्याला रासायनिक बदल असेही म्हणतो. ते शाश्वत असतात हेही शिकलोय. आपण पण लौकिकातील शाश्वत आणि अध्यात्म शास्त्रातील शाश्वत हे भिन्न आहेत. दह्याचं पुन्हा दुधात रूपांतर होत नाही किंवा आंब्याची कैरी होत नाही. भातापासून पुन्हा तांदूळ होत नाही. कच्च्या भाज्या  परत मिळवता येत नाहीत.म्हणजेच  हे बदल कायमस्वरूपी आहेत. असं जरी असलं तरी दही खराब होतं, आंबा सडतो किंवा शिजवलेले अन्न खराब होते. काही तासदिवस, महिने असा त्याचा कालावधी असतो. म्हणजेच ते कायमस्वरूपी नाही. नष्ट होणारच आहे. बर, हे विश्व डोळ्यांना दिसते. प्रचंड विस्तार आहे. आपल्या सूर्यमाले सारख्या अनेक सूर्यमाला आहेत असं आज खगोलशास्त्रही सांगते. पण आपले अध्यात्मशास्त्र काय सांगते?

जे उपजे ते नाशे” | मग विश्व पण नाहीस होणारच ना ! मग त्याआधी अस्तित्व कशाचे? कशापासून, कशामुळे ही ब्रम्हांडे जन्माला आली?

तर अष्टधा प्रकृती पासून. पण ती सुद्धा नश्वरच आहे. त्यांना कोणी निर्माण केले तर परमात्म्याच्या शक्तीने! त्या शक्ती सुद्धा अनंत आहेत म्हणजेच परमात्मा अस्तित्वात आहे म्हणून जग निर्माण झाले. समर्थ दासबोधात सांगतात –

मूळ माया तेची मूळ पुरुष l तोचि सर्वांचा ईश l

अनंतनामी जगदीश l तयासी बोलिजे ll ८/३/२० ll

 

पण परमात्म्याला विकार नाहीत, तो कालातीत, गुणातीत, देहातीत आहे, तशी मूळमायाही अव्यक्तच!

पण तिच्या शक्ती गुणक्षोभिणी माया, जडमाया या विश्व निर्मिती करतात. अर्थातच मूळमाया, गुण माया, पंचभूते इत्यादी निर्माण झाले तरी परब्रह्म तसेच अविकारी, अचल आहे. ते निर्गुण निराकार होते. सगुणपंचभूते इत्यादी निर्माण झाले तरी परब्रह्म तसेच अविकारी, अचल आहे. ते निर्गुण निराकार होते ते सगुण निराकार झाले, ते मायोपाधित ब्रह्म. मग विश्वाची निर्मिती झाली.

वर्धते

बर, निर्मिती झाल्यावर ते तसेच राहिले का? अर्थातच नाही. अनेक ब्रह्मांडे, चार खाणी इत्यादी निर्माण झाले, त्यांची वाढ झाली आणि दृश्य विश्व निर्माण झाले – यात पिलू हळू हळू वाढतेच. सामान्यपणे आपण बाल, किशोर, प्रौढ अशा अवस्था पाहतो. पक्ष्याचे अंड्यातून बाहेर येणारे पिलू काही दिवसातच भरारी घेते. वनस्पतीच्या बीजातून अंकूर कोंब फुटताना दिसतो. त्यातून आपण  रोपं, झाडं झालेले पाहतो.  काही प्राण्यात पिलू मादीच्या शरीरातून जन्माला येते, तर काही वनस्पती मुळापासून, खोडापासून, फांद्यापासून, पानांपासून जन्माला येतात. तसे इतर प्राण्यात सहसा होत नाही.जन्माला आलेला जीव पुढे वाढतो, पण सर्वांचे स्वभाव, गुण, वृत्ती सारख्या नसतात. तसेच अचेतनातही इतक्या सूक्ष्म प्रमाणात होते की सामान्य माणूस ते जाणत नाही. उदा. हिमालयाची उंची वाढते, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते, अचानक नदी, तळी यांच्या जलसाठ्यात वाढ होते. सर्व सृष्टी माया – आकाश – वायू – तेज – आप – पृथ्वी या क्रमाने निर्माण झाली. महाभूतांचे गुण ही सांगितले आहेत. सृष्टीत विविधता आढळते आणि अर्थातच नामरूपेही भिन्न आहेत.

विपरणमिते, क्षीयते –

जन्म झाल्यावर सचेतन असो वा अचेतन,  त्यात वाढ, विकास होतो. (कमी जास्त).

प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव, मनुष्य, वनस्पती यांच्यात बदलाची प्रक्रिया सुरू असतेच. वजन उंचीत बदल होतोच पण शरीरातील संप्रेरकात काही बदल होत असतात. तरुण प्रौढ होतो, प्रौढ वृद्ध होतो. साऱ्या शक्ती क्षीण होत जातात. आपणही म्हणतो बघा पहिल्यासारखे आणि आधीसारखे वेगाने काम होत नाही.ही क्षीणता सर्वच सचेतनात दिसते – प्रमाण कमी जास्त. वनस्पतीमध्येही पान गळती, कुठे झाडं मोडून पडणे हे  दिसतेच. कडे कोसळून डोंगराचा ऱ्हास होतो, तर कुठे पाणी आटून नदी, तळी – जल साठ्यांचा ऱ्हास  होतो. वादळाने धूळ एका ठिकाणाहून दुसरीकडे जाते. पूर्वी डोंगरांना पंख होते असे पुराणात वाचायला मिळते आणि आज तर कोणत्याच पर्वताला पंख नाहीत. त्यांच्यातील हा बदल, ऱ्हास / मृत्यू म्हणता येईल. अगदी पृथ्वीचा व्यास ही कमी होतो आहे असे आज शास्त्रज्ञ सांगतात.

 

म्रियते  –

वृद्ध प्राणी शक्ती क्षीण झाल्याने, रोगाला बळी पडल्याने मृत होतो. प्राणी, पक्षी सुद्धा ठराविक काळाने काहीवेळा रोगाने मृत होतात. पूर्वीचे डायनासोर सारखे महाकाय प्राणी, काही पक्षाच्या जाती तर आता नामशेष झाल्या आहेत. पण इतर प्राणी, मनुष्य प्राणी आपल्याच शरीरात अस्तित्व टिकवण्याचे बीज राखून असतो आणि अनेक जन्मातून फिरत राहतो.

मग अचेतनाला मृत्यू / विनाश आहे का? असा प्रश्न येतोच.

तर आहेच. त्याची झलक आपल्याला त्सुनामी, ढगफुटी, महापूर, तीव्र दुष्काळ इत्यादितून पाहायला मिळते.

आता विकार म्हणजे चित्तक्षोभ असा अर्थ घेतला की सारे बदल चित्त शांत, स्थिर करण्यासाठी होतात. परमार्थात हे अंतरंगातील बदल अपेक्षित आहेत आणि ते ही कायमस्वरूपी! कारण मनुष्य लवकर मोहग्रस्त होतो (अर्जुनाला आठवून पाहा), परमार्थ मार्गात अडथळे खूप, तेही आपणच  निर्माण करतो. कारण निर्माण होऊ देणारेही आपल्या आतच असतात, म्हणून चित्तशुद्धी साठी प्रयत्न हवेत. तेही सातत्याने! नाहीतर खाली घसरणे आहेच. जन्म मृत्यू चक्रातून सुटका नाही.

म्हणून प्रभाते मनी राम चिंतीत जावा |”

रोजची उगवणारी पहाट तशीच आयुष्याची सुरुवात (बालपण) ही सुद्धा पहाटच!

मग आपल्या अज्ञानाला दूर करून ज्ञान प्राप्तीची सुरुवात ही पण पहाटच, तो ही विकारच!

Language