‘बलोपासनेची प्रेरणा देणारे’ श्रीमारुती

‘बलोपासनेची प्रेरणा देणारे’ श्रीमारुती
वीरेंद्र चित्रे
  • April 12, 2025
  • 1 min read

मारुती स्तोत्र ही एक नितांत सुंदर काव्यरचना आहे. श्रीसमर्थांनी एकूण तेरा मारुती स्तोत्रे लिहिली. शब्दकळा, गेयता, रेखीव रचना आणि आवेश यामुळे प्रचलितभीमरूपी महारुद्राहे मारुतीस्तोत्र सर्वांच्या पसंतीला उतरलेले दिसते. इतर संस्कृत स्तोत्रप्रमाणे हे देखील इष्ट देवतेची म्हणजेच हनुमंताची स्तुती करणारे आहे. त्यात मारुतीच्या विविध पराक्रमांचे संदर्भ येतात. तसेच बहुतेक स्तोत्रे, आरत्या, अभंग किंवा प्रार्थना त्या, त्या इष्ट देवतेची स्तुति सुमने गाणारी, सुखसमृद्धी मागणारी असतात. परंतु जेव्हा हीच शब्दरचना काव्यात्मकता घेऊन येते तेव्हा त्या शब्दांना, विचारांना भाषासौंदर्याचे आगळेच लेणे चढवित जाते. हे संत केवळ धर्मप्रसाराचे किंवा धर्मरक्षणाचे काम करणारे धर्माचेजागलेनव्हते तर ते व्युत्पन्न आणि प्रतिभावंत कविदेखील होते. त्यामुळे शारदेच्या दरबारात संत साहित्याचे दालन फार मोठे आणि तेवढेच वैभवशाली आहे. समर्थांचेभीमरूपीसुद्धा त्यातलेच एक लेणे आहे, हे नि:संशयपणे मान्यच करायला हवे

हनुमंताची उपासना केवळ शक्तिची उपासना नव्हे. शक्ती, भक्ती, नीती, साहस, वीरश्री, नम्रता, मुत्सद्दीपणा, कर्तव्यपरायणता, अनन्य निष्ठा आणि श्रद्धा अशा उत्तमोत्तम गुणांचा समुच्चय हनुमंताच्या ठायी एकत्रित झाला आहे. अशा श्रीरामांच्या सर्वश्रेष्ठ अनुयायी भक्ताला उद्देशून समर्थ म्हणतात,”भीमरूपी महारुद्रा! हे महाकाय बलवंता, तू महारुद्र भगवान शंकराचा अवतार आहेस. तू वज्रासारखा शक्तिमान आहेस. तू तर वादळासारखा झंझावात, प्रभंजन आहेस.” ते त्यालावनारीअशी उपमा देतात. वनाचा अरी म्हणजे वनाचा शत्रू! ही उपमा सामान्यांना बुचकळ्यांत टाकणारी आहे

सीतेच्या शोधात लंकेत गेल्यावर आपले शक्तिप्रदर्शन करताना मारुतीने रावणाच्या आवडत्या अशोकवनाचा विध्वंस मांडला होता. त्याचाच संदर्भ यावनारीउपमेशी आहे. अन्यथा वानर कुळातील असूनही हनुमंत वनाचा शत्रू कसा होऊ शकेल? पुढे ते म्हणतात, “हे बुद्धिवंता, तू तर श्रीरामाचा दूत आहेस.” रावणाच्या दरबारात मारुती श्रीरामांचा दूत म्हणून सामंजस्याची बोलणी करायला गेला होता. रावणासारख्या वेदशास्त्रसंपन्न सम्राटाशी बोलणी करायला श्रीरामांनी त्याची निवड करावी, यातच हनुमंताच्या राजकारणाची, मुत्सद्दीपणाची आणि विद्वत्तेची ओळख पटावी. ते पुढे म्हणतात,”हे महाबलो, तू प्राणदाता आहेस, सर्वांमध्ये चैतन्य फुंकणारा, बलाची स्थापना करणारा आहेस. लक्ष्मणासाठी तू हिमालयातून संजीवनी आणल्यामुळे त्याचे प्राण तर वाचलेच परंतु त्याचबरोबर त्या संजीवनीमुळे युद्धात मारले गेलेले वानरगणही पुन्हा जिवंत झाले. असा तू प्राणदाताही आहेस. तू सुखांचा वर्षाव करणारा आणि दु:खितांचे दु: हरण करणारा,अत्यंत हुशार वैष्णव आहेस.” 

तू दीनांचा नाथ असून जगातील अती सुंदर असे हरीचे रूप लाभलेला देखणा वीर आहेस. तूपाताळ देवताहंताम्हणजे पाताळातील राक्षसांना जिंकणारा आहेस. लंकेतील युद्धाच्या वेळी रात्री निद्रेत असताना श्रीराम आणि लक्ष्मण यांना मायावी राक्षस अहिमही यांनी आपल्या मायावी शक्तीचा वापर करून पाताळात पळवून नेले बांधून ठेवले होते. परंतु हनुमंताने त्यांचा वध करून त्यांना सोडवून आणले होते. हा कथासंदर्भ इथे आहे

पुढे ते म्हणतात की, हे मारुतीराया, तुला शेंदूरलेपन आवडते आहे. तू पुण्यवंत, पावन, शीलवान असून सर्व जगाला परमानंद देणारा आहेस. अशी स्तुतीसुमने गाऊन समर्थ हनुमंताच्या सामर्थ्याचे आणि पराक्रमाचे वर्णन रामायणातील संदर्भ घेऊन करू लागतात

हनुमंताच्या युद्ध सज्जतेचे वर्णन करताना ते म्हणतात,”मारुती अत्यंत उग्र धारण करून तो रावणसैन्यावर तुटून पडतो. ‘ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू मारुतीराया पर्वतासारखा शत्रूच्या सैन्यापुढे मार्ग अडवून उभा राहिला. त्याची शरीरयष्टी अतिशय कमावलेली, कुठे ही स्थूलता नसलेली होती. त्याची चपलता तर विद्युल्लतेला लाजवील अशी होती. त्याने आपले मोठे रौद्र रूप धारण केले. ते ब्रह्मांड व्यापून राहिले. रागारागाने दातओठ आवळून तो पुढे सरसावला. त्याच्या डोळ्यातून जणू काही अग्नीचे लोळ बाहेर पडू लागले. रागाने त्याने आपले पुच्छ डोक्यामागून वळविले. त्याचा मुकूट आणि कानातली कुंडले थरारून उठली. त्याच्या विजेसारख्या चपळ हालचालींमुळे त्याच्या सुवर्णमय कासोटीच्या लहान लहान घंटा किणकिण नाद करू लागल्या. आपला उजवा हात पुढे करून तो शत्रूच्या सैन्यावर तुटून पडला. त्याचे असे उग्र रूप पाहून यमराजाचे काळाग्नी आणि काळरुद्र हे दोन्ही दूत चळचळा कापू लागले

युद्धात इंद्रजिताच्या अमोघ अस्त्राने लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर त्यावर उपचार करण्यासाठी तितकीच अमोघ औषधी महोदय पर्वतावर आहे, असे वैद्य सुषेणाने सांगितल्यावर ती आणण्यासाठी हनुमानवर तिथे जाण्याची जबाबदारी येते. मारुतीस अणूपासून ब्रह्मांडाएवढे म्हणजेच लहानात लहान, आणि मोठ्यात मोठं ब्रह्मांड व्यापेल असे रूप घेण्याची सिद्धी प्राप्त असल्यामुळे त्याने आपले प्रचंड रूप धारण करून उत्तरेकडे झेप घेतली. द्रोणागिरी पर्वत रांगातील महोदय पर्वतावरील नेमकी संजीवनी औषधी कोणती हे ध्यानात आल्यामुळे त्याने ते पर्वत शिखरच उखडून, उचलून आणले.. समर्थ म्हणतात की, मनासही मागे टाकेल अशा वेगाने त्याने पर्वत शिखर आणून परत नेऊनही ठेवले. अशा अनेक कथांचे  संदर्भ येतात. काव्यरचनेच्या सोयीनुसार त्यांचा कालानुक्रम पुढे मागे झाला आहे इतकेच

अणूपासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे असे सूक्ष्मापासून महाविक्राळ रूप धारण करणाया  मारुतीची कोणाशी तुलना करणार? त्याच्या अतिविशाल, अक्राळविक्राळ रूपापुढे मेरुमांदार हे पर्वत देखील छोटे वाटू लागले. तर त्याच्या शेपटीचे महात्म्य काय सांगावे? रावणाच्या दरबारात त्याच्या शेपटीला चिंध्या गुंडाळून ती पेटविण्याच्या प्रयत्नात ती एवढी वाढू लागली की सगळ्या  राक्षसांची भंबेरी उडाली. त्यातूनच लंकादहनाचा प्रसंग घडला

समर्थ म्हणतात की, “हे पुच्छ एवढे वाढू शकते की,सगळ्या ब्रह्मांडालाही वेढा घालू शकेल. यामुळे हनुमंताची तुलना विश्वात कुणाशीही होऊ शकणार नाही, असे ते म्हणतात. त्याच्या रागाने लाल झालेल्या डोळयांपुढे सूर्याची प्रभाही त्याने व्यापून टाकल्यासारखे भासू लागले. तर त्याचे वाढलेले अक्राळविक्राळ रूप अंतराळाचे शून्यमंडळ देखील भेदून जाईल एवढे विशाल झाले. इथे विसाव्या शतकात पाश्चात्त्य आधुनिक विज्ञानाने स्वीकारलेलीअंतराळातील काळेविवरही संकल्पना आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी फार पूर्वीच जाणली होती याचा प्रत्यय येतो. अशा महाबली हनुमंतापुढे आपणही नतमस्तक होतो

आपल्या आराध्य दैवतावर स्तुतिसुमनांची अशी उधळण केल्यावर समर्थ स्तोत्राच्या फलश्रुतीकडे वळतात. प्रार्थना अथवा ग्रंथाच्या अखेरीस प्रसाद मागण्याची परंपरा समर्थही पाळतात, असे आपल्याला वाटते पण हे श्लोक समर्थांचे नसावेत कारण सामार्थांच्या स्तोत्रात कुठेही ऐहिक फलप्राप्ती नाही. शेवटच्या दोन श्लोकात ते सांगतात की, ‘हे पंधरा श्लोक पठण केल्यामुळे म्हणजेच मारुतीची उपासना केल्याने बलदंड शरीर आणि कोणताही संदेह नसलेले, चिंतामुक्त खंबीर मन लाभेल. त्यांची प्रगती चंद्राच्या वाढत्या कलांप्रमाणे चढत्या क्रमाने वाढतच जाईल

वानरकपिकुळातील अग्रगण्य रामभक्त, ज्याचे अंतरंग श्रीराममय झाले आहे अशा परमश्रेष्ठ हनुमंताचे दर्शन भक्तांच्या सर्व पीडा नाहीशा करील. हनुमंताची उपासना म्हणजे केवळ ईश्वर भक्ती नाही, तर ती मरगळलेल्या आणि तेजहीन झालेल्या हृदयात शौर्य, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा स्फुल्लिंग जागृत करणारी बलाची, कर्तृत्वाची आणि आत्मसन्मानाची उपासना आहे. समर्थांच्या जीविताचे तेच ध्येय होते. त्यामुळेच हे स्तोत्र लिहितांना त्यांची प्रतिभा अत्यंत उत्साहाने उचंबळून आलेली दिसते. असा सुंदर अर्थ आणि उच्चारण्याची स्फू्र्तिदायक गेयता यामुळे ते कुणासही मुखोद्गत करता येण्यासारखे झाले आहे. त्यामुळेच  ” भीमरूपी महारुद्राहे मारुती स्तोत्र सर्वांना अतिशय प्रिय झाले आहे.

Language