रामनवमी

रामनवमी
सौ. अपर्णा वांगीकर
  • April 5, 2025
  • 1 min read

आज रामनवमी. प्रभू रामचंद्र यांचा प्रकटदिन. त्या सर्वगुणसंपन्न अशा रामाचे गुणगान करण्याचा आजचा दिवस. आज श्री समर्थांचा देखील जन्मदिनआजच्या शुभदिनी   श्रीसमर्थ आपल्या आराध्य देवतेचे गुणगान करत आहेत.  

प्रभु श्रीराम हे सत्चिदानंद परिपूर्णब्रह्म आहेत. सत्चिदानंद म्हणजे सत्+ चिद+ आनंदसत् म्हणजे सत्य, शाश्वत, कायमस्वरूपी, परिवर्तन होणारासमाप्त होणारा म्हणजेच परब्रह्मचित् म्हणजे चेतना,  शुद्ध जाणीवशुद्ध संकल्पनाशुद्ध ज्ञान, आणि आनंद म्हणजे समाधान, शांती. आनंद हेच जीवाचे मूळ स्वरूप आहे कारण परमात्मा परब्रह्म हे आनंद स्वरूप आहे.

श्री समर्थ म्हणतात..

ऐसा सर्वात्मा राजाधीश सकळ पाहाती सावकाश।
तेथे पिसाट रामदास। उभा असे दीनरुप ।।१।।
रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग
तुजकारणें सर्व संग त्यक्त केला ।। ।।
रामा तुझिया स्वामीपणें मी हे ब्रह्मान्ड मानी ठेंगणे।
स्वामी तुजविण कोण जाणे अंतर आमुचे।।३।।
तुजविण मज माया। काही नाही रे रामराया।
आम्हां अनाथा कासया। उपेक्षिसी ।।४।।
तुज समुदाव दासांचा परी आम्हांसी स्वामी आणिक कैचा।
तुजकारणें जिवलगांचा।संग सोडिला ।।५।।
सगुण रघुनाथ मुदल। माझें इतुके चि भांडवल।
कास धरुनी टाकीन पैल पार या भवाचा ।।६।।

समर्थ अत्यंत करुणामय शब्दांत आपल्या अंतरीची तळमळ, व्यथा वरील ओव्यांतून मांडत  आहेत.  सर्व ओव्या करुणाष्टकांचीच आठवण करून देतात, करुणाष्टकातील विचार, भाव, तळमळ या ठिकाणी आपल्याला दिसून येतेसमर्थांना अक्षरशः रामाचं वेड लागले आहे हे पिसाट या शब्दांतून व्यक्त होतेदीनरूप म्हणजे नम्रपणे,  समर्थ रामाची करुणा भाकत आहेत.  श्री रामचंद्र हे विष्णूचा सातवा अवतार आहेत हे समर्थांना ज्ञात आहे त्यामुळे त्यांचे सर्व भक्त म्हणजे नारदमुनी, ध्रुव, प्रल्हाद या थोर भक्तांशी समर्थ स्वतःची तुलना करतात त्यांच्या मानाने आपण किती हीनदीन आहोत याचा विचार करतात. समर्थांचे मन एक रामाशिवाय कोठेही लागत नाही. राम हे अनाथांचा नाथ आहेत म्हणून स्वतःला समर्थ रामाविना अनाथ म्हणवून घेतात आणि म्हणतात की तुझ्याशिवाय मायेचं माझं कोणी नाहीं, माझी उपेक्षा करू नकोसतुम्हाला अनेक भक्त आहेत, पण भक्तांना एकमेव श्रीरामच आहेत. भक्त उदंड तुम्हाला आम्हाला कोण पुसते हे समर्थांचे दुःख किंवा  तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो। ही समर्थांची खंत आपल्याला करुणाष्टकांमध्ये दिसते. जिवलगांचा संग का सोडला याचं यथार्थ कारणही करुणाष्टकांमध्ये आहे. तर देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी।सर्व अर्पावें सेवटीं प्राण तोही वेंचावा ।।४८।। असे दासबोधात समर्थ सांगतात

समर्थांनी रामाला स्वामी, धनी, मालक, राजा म्हणून मानलं आहे आणि रामाचं दास्यत्व स्वीकारले आहे आणि म्हणून आप्तस्वकीयच काय तर ब्रह्मान्ड देखील रामापुढे तुच्छ मानलें आहे. एक भगवंत साचार, तोच आधार, तोच स्वामीभगवंताचे सगुण रूप हेच माझें मुद्दल म्हणजे हीच माझी मूळ रक्कम, ठेव आहे. रामराया हेच माझे एकमेव भांडवल आहे. या भांडवलाच्या जोरावर समर्थांनी भक्तीचे मळे फुलवायचे होते, धर्मसंस्थापना, राष्ट्र उभारणीचे कार्य करायचे होते, रामकथा पल्याड न्यावयाची होती, आणि सद्गुरु म्हणून कास धरून हा भवसागर तरून जाण्यासाठी रामराया शिवाय दुसरं कोणतं मोठ्ठं भांडवल त्यांना दिसत नव्हते. सर्वसंगपरित्याग केलेल्या समर्थांची संपत्ती म्हणजे फक्त रामराया

दासाची संपत्ती राम सीतापति। जीवाचा सांगाती राम एक।। १।।

राम येक माता राम येक पिता। राम सर्व भ्राता सहोदरू।।२।।

अशाप्रकारे समर्थांची रामरायांवर अनन्य निष्ठा, भक्ती, प्रेम, होतं. रामराया हेच त्यांचे आराध्य दैवत, सद्गुरू, माता पिता, विद्या वैभव, कांचन, स्वजन होते. रामच कैवारी, ज्ञान, ध्यान आणि समाधान ही रामच होते

सूर्यकुलोत्पन्न, सुर्यवंशाचे भूषण श्रीराम सर्वात्मा म्हणजे सर्वांच्या हृदयात वास करणारा आहे. सगुणरुपी आहे. समर्थ रामाला लावण्यरूपी, लावण्यपेठी संबोधतात आणि याच सगुण रूपाच्या आधारे निर्गुणाची उपासना करायला सांगतात. श्री रामचंद्र हे समर्थांचे सगुण, साकार रूप तर राघव हे निर्गुण, निराकार रूप आहे, म्हणून मनाच्या श्लोकात समर्थ सांगतात गमू पंथ आनंत या राघवाचा. श्री रामरायाचे स्तवन म्हणजे मनाचे श्लोक. श्लोक क्र. ६७ ते १३५ या उपासना मार्गाच्या श्लोकात रामरायाचे स्तुती वर्णन दिसून येते. असा परिपूर्ण रामराया आपल्या दासांची, भक्तांची उपेक्षा कधीच करत नाही, करणार नाही.  

समर्थ म्हणतात… 

महा संकटी सोडिले देव जेणें।
प्रतापें बळे आगळा सर्व गुणें।
जयातें स्मरे शैल्यजा शूळपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।३१।।

रावणाला ब्रह्मदेवाकडून जे विविध वरदान मिळाले त्याच्या बळावर त्याने अनन्वित अत्याचार सुरु केले. या अत्याचारांची परिसीमा म्हणजे त्याने स्वर्गावर विजय मिळवून देवांना बंदी बनविले. तुरुंगात या देवांना रावणाने हलकी सलकी कामे दिली म्हणून त्यांचे जीवन या भीषण संकटाने लाजिरवाणे आणि दुःखमय होऊन गेले होते, प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून सर्व देवांना संकटातून मुक्त केले. रामचंद्र प्रतापी आणि बलशाली तर होतेच पण त्याचबरोबर अनेक गुणांनी युक्त होते. केवळ पराक्रमी असणे, प्रतापी असणे, अत्यंत शौर्यशाली असणे एवढेच रामचंद्रांचे वैशिष्ट्य नाही, ज्या ज्या सद्गुणांच्या अस्तित्वामुळे थोरपणा येतो, श्रेष्ठत्व प्राप्त होते ते सर्व सद्गुण भगवान रामचंद्रांच्या ठिकाणी एकवटलेले आहेत

वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी रामचंद्रांच्या अनेक गुणांचं भावपूर्ण वर्णन केले आहे. रामांच्या या गुणांमुळे प्रत्यक्ष भगवान शंकर आणि भगवती पार्वती त्यांचे स्मरण करतात. भगवान शंकर ज्ञानी आणि पराक्रमी असूनही रामचंद्रांची भक्ती करतात. शौर्यसंपन्न, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवादी, दृढवत, चारित्र्यसंपन्न, सर्व भूतमात्रांचे हित साधण्यात तत्पर, विद्वान, सामर्थ्यशाली, संयमी, क्रोध जिंकलेला, निर्मत्सर, वीर, . गुणांनी रामचंद्र अलंकृत होते. 

इक्ष्वाकू कीर्तिमान वंशात जन्मलेला, अयोध्येचा राजा रामचंद्र सर्व गुणांचा मूर्तिमंत पुतळा आहे. मदनानेही लाजावे असे त्यांचे शरीर सर्व शुभलक्षणांनी युक्त आहे. रेखीव, सुडौल, दीर्घबाहू, बलवान, छाती रुंद आहे, कपाळ भव्य आहेश्रीरामचंद्र बुद्धिमान आहेत, नीतिमान आहेत, असामान्य वक्ता आहेत, सर्व शास्त्रांचे मर्म जाणणारे आहेत, चतुर आहेत, समदृष्टिने पाहणारे आहेत, साधूसंतसज्जनांनाही हवेहवेसे वाटणारे लोकप्रिय आहेत, समुद्रासारखे गंभीर आहेत, त्यांचे ध्येय हिमालया सारखे उत्तुंग आहे. महाविष्णूंचा सातवा अवतार असल्याने ते पराक्रमी आहेत, चंद्राप्रमाणे आल्हाददायक आहेत, पृथ्वीसारखे क्षमाशील आहेत, संतापले म्हणजे प्रलय काळाचा अग्नी वाटावे असे तेजस्वी आहेत, कुबेरासारखे वैभवसंपन्न आहेत, प्रजावत्सल आहेत, आचरण अत्यंत पवित्र आहे. वेदशास्त्र निपुण आहेत रक्षणकर्ता आहेत.  

समर्थ म्हणतात, माझा प्रभू श्रीराम सर्व सद्गुणांनी युक्त आहे त्यांचे हे स्वरूप असामान्य आहे. नारदासारखे देवर्षी किंवा महर्षि वाल्मिकींसारखे प्रतिभासंपन्न कवी रामाच्या या गुणसंपदेला मोहित झाले यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. देवाधिदेव भगवान शंकर आणि त्रिलोकजननी महासती पार्वतीही रामचंद्रांचे स्मरण करण्यात धन्यता मानतात. असा रामचंद्र भक्तांचा अभिमानी आहे तो भक्तांची कधीही उपेक्षा करणार नाही.   

।। जानकीजीवनस्मरण जय जय राम ।।

Language